Sunday, June 18, 2017

एक होती आजी

आपला जन्म कुठल्या गावात व्हावा हे जसे आपण ठरवू शकत नाही अगदी तसेच आपले आई-वडील कोण असावेत हे देखील ठरवू शकत नाही. मग आजी आजोबांची गोष्टच दूर!! पण असे जरी असले तरी आजी-आजोबा आवडत नाहीत असा माणूस या पृथ्वीतलावर नावालाही सापडायचा नाही. ज्या गोष्टीवर आपले अजिबात नियंत्रण नाही, ज्याच्या मध्ये आपल्या आवडी निवडीला कसलेही स्थान नाही, त्या आजी-आजोबांच्या नात्याबाबत मात्र विलक्षण ओढ आणि निखळ प्रेम असते. कदाचित कोवळ्या वयात फक्त निखळ प्रेमाचे संस्कार व्हावेत म्हणून परमेश्वरानेच हे असे अढळ नाते निर्माण केले असावे. कोण असतात हे आजी-आजोबा? त्यांना का वाटते एवढे प्रेम? काय देतात ते आपल्याला? आणि आपण त्यांना काय देतो ? सगळेच गूढ आहे.
आयुष्य भर खस्ता खाउन त्यांनी त्यांच्या मुलांना मोठे केलेले असते. आता मुले मार्गी लागली की मग त्या खस्ता आपोआप बाजूला पडतात आणि सुरु होतो त्यांच्या आयुष्यातला आनंदोत्सव!! एखाद दुसरे नातवंड मांडीवर नाहीतर कडेवर आले की त्यांना साऱ्या कष्टांचा विसर पडतो आणि निखळ प्रेमाचा झरा, पुन्हा एकदा खळाळून वाहायला लागतो. या झऱ्याला कसलेही बंध नसतात. कसले किनारे नसतात. कसली वळणेही नसतात. हाती आलेल्या नातवंडाच्या आयुष्याची सुरुवात जास्तीत जास्त प्रेमाने करून देण्याचा हा एक ईश्वरी प्रयत्न असावा असे वाटते.
फुलांचे परागकण जपण्यासाठी, ज्याने मऊ, मुलायम पाकळ्या तयार केल्या, त्यानेच कधीतरी माणसाच्या मऊ मनाला जपण्यासाठी आजी-आजोबा तयार केले असावेत.
मग वाऱ्या-पावसात त्या परागांनी कितीही खिदळावे. कोवळ्या उन्हांशी तासंतास गप्पा कराव्यात, कधी रंगीबेरंगी फुलपाखरांना आपले गूज सांगावे. कधी घटकाभर इंद्रधनुष्याचे रंग वेचावेत नाहीतर कधी आपलाच रंग न्याहाळत बसावे. त्या परागांचे सारे विश्व त्या पाकळ्यातच सामावलेले असते. त्या परागांना सारे जग मग त्या पाकळ्या इतकेच मऊशार भासते. सोबतीला फक्त सुगंध असतो आणि वेड्या वाऱ्याचा छंद असतो.
या निष्पाप, अल्लड परागांना तेव्हा कशाचीही पर्वा नसते. ते बेभान होऊन नाचतात. पाकळ्यांच्या अंगणात, पावसात भिजून चिंब होतात. धुक्यात लपून कुंद होतात. पाकळ्यांना आपला गंध देतात आणि नकळत पाकळ्यांचा रंग घेतात.
हलकेच एका नव्या आयुष्याची सुरुवात होते.
मी वास्ततिक तिचा चौथा नातू!! पण मुलाकडून पहिलाच. त्यामुळे थोडा इतरांपेक्षा अधिक लाडका. आम्ही नातवंडे आजीला आजी आणि आजोबाना आण्णा म्हणायचो!! आण्णा त्याच्या भावंडामध्ये सगळ्यात मोठे होते. त्यांना ३ धाकटे भाऊ आणि २ बहिणी होत्या. त्यामुळे आजी घरातली पहिलीच सून आणि सगळ्यांची लाडकी वहिनी!! त्यामुळे तिला सगळे वहिनीच म्हणायचे. ते ऐकून ऐकून माझे वडील आणि आत्या सुद्धा तिला वाहिनीच म्हणायला लागले. इतके कि मी संपूर्ण आयुष्यात आजीला माझ्या वडिलांनी किंवा आत्यानी कधीच आई म्हणून हाक मारलेले ऐकले नाही. तर या वहिनीचा मान खूप मोठा होता. आता ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडायची तिथे फुकटच्या मानाशिवाय दुसरे होते काय द्यायला!! पण तिचा अधिकार होता. आजोबांचे सगळे भाऊ तिचे सगळे ऐकायचे. पुढे पुढे एक एक होत त्यांची लग्नं झाली. पायावर बसून त्याची पोटं मग हळू हळू चहु दिशांना निघून गेली. आणि मग खऱ्या अर्थाने आजीचा संसार सुरु झाला. अण्णा हेर्लेकर हे देवी डॉक्टर होते. आताच्या मुलाना "देवी" हे प्रकरण माहीतच नसते. दंडावर भयावह डाग घेऊन मिरवणारी आमची पिढी शेवटची ठरली त्याचा आनंदच आहे. तर ते भयावह डाग कोवळ्या दंडावर काढून त्या निष्पाप जीवाला "न भूतो न भविष्यती" रडवण्याचा त्यांना पगार मिळत असे. म्हणजे त्याच्यात वाईट काही नव्हते. पण आता आपल्याकडे बघून ईश्वरी प्रसाद असल्यासारखे हसणारे हे बाळ आता काही क्षणात मरणोप्राय वेदनांनी टाहो फोडणार आहे हे माहीत असूनही, मोठ्या धीरोदात्त पणे दंडावर देवीचा बत्ता घुसवणाऱ्याला कर्मयोगीच म्हटला पाहीजे.
त्यामुळे जिथे देवाची यात्रा तिथे त्यांचा मुक्काम असायचा. कधी पंढरपूरला विठोबाकडे तर कधी कार्ल्याला एकवीरा देवी कडे!! तिथे बरेच यात्रेकरू देवदर्शनाला म्हणून यायचे आणि तिथूनच एखादा रोग घेऊन पुढच्या कायमच्या प्रवासाला निघायचे. अशा वेळी अण्णांचे काम म्हणजे त्यांना रोगाची सरकारी लस देणे हे असायचे. त्या भक्ताला प्रत्यक्ष देव भेटीला न जाऊ देता देव दर्शन घेऊन घरी परत पाठवणे याच्यावर अण्णांचा भर असायचा. त्यामुळे असेल म्हणा किंवा त्यांचा पिंडच तसा होता म्हणा पण अण्णांचा देवावर फारसा विश्वास नव्हताच. त्यांच्या कामाचे स्वरूपच असे होते कि त्यांनी कुणाच्या बरोबर राहावे, काय खावे, कुठे आणि कधी झोपावे याच्यावर त्यांचा कसलाही अधिकार नव्हता. 'जेव्हा जे मिळेल तेव्हा तसे' असे त्यांच्या आयुष्याचे अगदी सोपे तत्वज्ञान होते. मिरज आणि शेजारच्या कर्नाटकात खूप छोटी-छोटी गावे आहेत. हि गावे इतकी छोटी होती कि काही काही गावांना तर जायला रस्ताच नव्हता. गावाच्या शेजारून बेळगाव रेल्वेचे, मीटर गेजचे, रूळ मात्र गेलेले असायचे. मोठ्या-मोठ्या एक्स्प्रेस तिथून जायच्या पण एकही गाडी थांबायची नाही. तेव्हा अशा गावात जाण्यासाठी सरकारने आजोबाना रेल्वेचे एक इंजिन ड्रायवर सकट assign केले होते. या इंजिन मध्ये बसून अण्णा त्या गावापर्यंत जायचे. तेवढ्या पुरते इंजिन थांबायचे. काम झाले कि परत इंजिन मधे बसून पुढे!! आजोबाना त्याचा अतोनात अभिमान होता !! पुढे देखील अण्णा किती तरी वेळा त्यांच्या या इंजिन बद्दल सांगायचे. मोठी मजा वाटायची. पण या सगळ्यामुळे त्यांचे घराकडे अतोनात दुर्लक्ष व्हायचे. त्यांचा सरकारी नोकर कधीही घरी बोलावयाला यायचा. यांची वळकटी बांधून तयारच!! गेले कि मग पुन्हा महिना-महिना घरी यायचे नाहीत. मुलांचे काय झाले, बायकोचे काय झाले याची त्यांना सुतराम फिकीर नसायची. अर्थात फिकीर नसायची हे खरे का त्यांचा आजीवर गाढ विश्वास होता हे खरे, ते नक्की सांगाता यायचे नाही. पण तो कर्मयोगी घर-दार आजीवर टाकून कुठे तरी प्लेगाच्या नाहीतर देवीच्या साथीवर निघून जायचा आणि मग आजी घराचा बाप होऊन कामाला लागायची.
अण्णांच्या नोकरीचा दुसरा प्रकार अजून वेगळा होता. तो म्हणजे सरकारी दरबार आणि महिना ५ रुपये पगार!! त्यांचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इतके गरीब असायचे कि पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यापलीकडे त्यांच्या कडे देण्यासारखे काहीही नसायचे. अण्णांचेही काही मागणे नव्हते. उलट माळ्यावर नाहीतर शेतात लपून बसलेली पोरं शोधून काढून अण्णा त्यांना लस द्यायचे. आणि लपून बसल्या बद्दल पाठीत एक रट्टा देखील द्यायचे. मिरज म्हणजे मराठी-कानडी दोन्ही जोरात!! अण्णांना दोन्ही भाषा इतक्या सफाईने बोलायला यायच्या कि यांची मातृभाषा नेमकी कोणती असा प्रश्न पडायचा. त्यामुळे त्यांचे कुठे अडायचे नाही. कुठल्याही गावी जायचे. तिथल्या बाप्याला बोलवायचे. पोरांना लशी द्यायचे. मग त्याच्या घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेबद्दल त्याची खरड निघायची. मराठी किंवा कानडी, त्याची जी भाषा असेल त्याच्या मातृभाषेत त्याच्या अस्वच्छतेबद्दल, अगदी त्याला समजेल अशा अर्वाच्य शब्दात, समज दिली कि हे चालले पुढच्या घरी!! समाज सेवाच ती!! एकूण त्यांच्या कामात ते मग्न होते एवढाच त्या कामाचा घरासाठी उपयोग होता. आजी मात्र विलक्षण होती. चतुर होती. धाडसी होती. करारी होती. धूर्त होती. घरात जे काही थोडे फार हेर्लेकर घराण्याचे म्हणून वैभव वाचले होते ते देखील गांधी हत्येनंतर लोप पावले. आजी सांगायची कि तिचे लग्न झाले तेव्हा घरात चांदीची भांडी होती. गाडी भर आंबे यायचे शेतातून वगैरे वगैरे!! पण आता म्हणजे एका प्लास्टिकच्या ग्लास मधे थोडे थोडे शेंगदाणे ठेवलेले असायचे आणि दुसऱ्या तसल्याच ग्लास मधे थोडे शेंगदाण्याचे तेल!! कोडोलीकर गल्ली मधे कृष्णराव कोडोलीकरांचा वाडा होता. त्यात रस्त्याला लागून एक दुकानासारखी खोली होती त्यात तिचा संसार चालू होता. पुढे कधी गप्पा मारताना मजेत आली कि हळूच तिच्यातला लपलेला त्रागा डोकावून जायचा. आजी म्हणायची कि 'गांधी परवडले पण नथुराम नको. तो म्हाताराही मेला. हा तरणाही मेला. फुकट आमचं घर दार मात्र धुऊन गेला!!' काही खोटे नव्हते त्याच्यात. "इनामदार हेर्लेकर कुलकर्णी" अचानक "दारोदार कुलकर्णी" झाले होते आणि त्या "दारोदार" होण्याची प्रत्यक्ष लाभार्थी होती आजी!!
हिम्मत हरेल ती आजी कसली!! तिने एकच ठरवले होते कि पोरांना शिकवायचे. तिच्या घरासमोर त्यावेळी तात्याकाका कोडोलीकर राहायचे. मोठे जमीनदार!! २०० का ३०० वर्षे जुना चौसोपी वाडा होता. वाड्याला मोठे किल्ल्याला असते तसले भले मोठे दार होते. त्या दाराला दिंडी दरवाजा होता. तो दिंडी दरवाजा देखील इतका मोठा होता कि आम्ही लहान पोरं त्या दिंडी दरवाज्यातून न वाकता चालत जायचो. त्याच्या पुढे पडवी होती. बाजूला जनावरांचा मोठा गोठा होता. त्यात हटकून एखादी गाय नाहीतर म्हैस व्यालेली असायची. त्याचं वैरण, चारा, पेंड बाजूला रचलेला असायचा. त्याच्या पुढे सोपा होता. सोप्याला एक जुना शिसवी कडीपाटाचा झोपाळा होता. झोपाळ्या खाली भले मोठे पेव होते. झोपाळ्याच्या मागे आणि पेवात भरपूर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची. त्यानंतर माजघर, त्याच्या बाजूला बाळंतीणीची अंधारी खोली होती. तिथून आत गेल्यावर मग जेवायची जागा होती. त्याच्या एका बाजूला तुळशी वृंदावन होते आणि दुसऱ्या बाजूला चुलखंड होते. मागे न्हाणीघर आणि त्याच्या मागे मोठे परसू होते. त्यात हत्ती सारखी चिंचेची झाडे होती. वरच्या मजल्यावर सगळ्या झोपायच्या खोल्या होत्या. खोल्या कसल्या महालच ते! मोठे घर. त्यात माणसे पण भरपूर रहायची. २ भाऊ, ४ बहिणी, आला-गेला, वाटेकरी, नातेवाईक, आश्रित अशी सगळी मिळून किमान पक्षी २५ ते ३० लोकं तरी पंक्तीला असायची. या पंक्तीला कधी कधी गावातली मंडळी सुद्धा असायची सहज गम्मत म्हणून!! गांधी गेल्यावर तात्या काका बंदूक घेऊन गल्लीच्या दारात उभे राहिले होते म्हणे!! त्यामुळे गल्लीतली बरीच घरे वाचली. त्यांचाही वाडा वाचला. तर त्यांच्या घरी तीन त्रिकाळ जेवणाच्या पंक्ती उठायच्या. एकेका पंक्तीला १००-१०० भाकरी लागायच्या. मग आजी त्यांच्याकडे भाकरी करायला जायची. ५० भाकऱ्या थापल्या कि काकी, काकी म्हणजे तात्या काकांची बायको, तिला २-३ भाकऱ्या आणि भाजी द्यायच्या. त्याच्यावर बाबा आणि आत्याचे जेवण व्हायचे. कृतार्थ मनाने कोडोलीकराना धन्यवाद देत सगळी रात्री झोपी जायची. पुढे मी मोठा झाल्यावर कधी कधी रात्री न जेवताच झोपायला जायचो तेव्हा आजी अगदी कळवळून डोक्यावरून हात फिरवून म्हणायची "उपाशी झोपू नये रे बाळा!!' ती असे का म्हणायची ते कळायला बराच वेळ जावा लागला. तिच्या हाताला बसलेले चटके तेव्हाही जिवंत होते.
आपल्याला हवे ते मिळणे याला जर सुख म्हटले तर आपल्याला जे मिळाले ते हवेसे वाटणे याला मुक्ती म्हणत असावेत. त्या अर्थाने आजी मुक्त होती. तिचे नाव देखील मोठे निर्गुण निराकार होते. कमल. त्याला कुठेही आकार नाही. कसला उकार नाही. वेलांटी नाही कि मात्रा नाही. ती आसक्त तर नव्हतीच. विरक्तही नव्हती. कृष्णाने गीतेत सांगितल्या सारखी ती 'अनासक्त' होती. अगदी मुक्त होती.
मुले मोठी होत होती. शाळेत जायला लागली. त्यांच्या शाळेची फी, पुस्तके, वह्या नवा खर्च उभा राहिला. तशी तिने गल्ली मधली मुले आणि मुली गोळा केली. त्यांच्या सगळ्यांच्या शिकवण्या चालू केल्या. महिन्याला ८ आणे फी! विषय गणित! वास्तविक आजी स्वत: तेव्हाची सातवी पास!! वडील शाळा मास्तर. एकूण १३ भावंडां मध्ये हि ११ वी!! वयाच्या ५ व्या वर्षीच तिची आई देवाघरी गेली आणि मग मोठ्या भावांच्या आणि बहिणींच्या आधाराने मजल दरमजल करत अगदी लग्न होईपर्यंत शिकत राहिली. अण्णा तिच्या पेक्षा चांगले १५ वर्षांनी मोठे होते. लग्न झाले तेव्हा तर जोडी अगदीच विजोड दिसत होती. पण आई विना वाढलेली पोरं!! तिचे वडील सगळ्यांचे करून करून अगदी भागले होते. जे कुणी पहिल्यांदा समोर आले ते त्यांनी जावई केले आणि एकेका पोरीला उजवून मोकळे झाले. अर्थात कुणाचे काही वाईट झाले नाही पण इथे कुणाच्या पसंतीला फारसा वाव नव्हता इतकेच!!
तर आजीने तिचे जुजबी शिक्षण अगदी हातोहात वापरून घेतले. तिचा स्वभाव अतिशय बोलका होता. कुणालाही ती अगदी काही क्षणात आपलेसे करून टाकायची. अगदी कुठेही गेली तरी तिला तिच्या ओळखीचे कुणीतरी भेटायचे. आणि कुणी ओळखीचे भेटले नाही तर हि नव्या ओळखी तयार करायची. वाघ कळपात रहात नाही कारण त्याला त्याची गरज नसते. तो एकटाच त्याच्या साठी समर्थ असतो. पण गरीब गाई, हरणे, नाहीतर शेळ्या नेहमी कळपात राहतात. त्यांना संगतीची विलक्षण ओढ असते. आजीला अशीच संगतीची ओढ होती. कुणाशीही बोलावे. कुठले गाव, माहेर कुठले, मुलगी कुठे दिली आहे, सून कुठली आहे, यातल्या कुठल्या तरी प्रश्नावरून एखादे तरी ओळखीचे गाव तिला सापडायचे आणि मग या गावात माझा भाऊ असतो, नाहीतर बहिण असते, नाहीतर दीर, भाऊजय, नणंद कुणी ना कुणीतरी असते म्हणून ज्या गप्पा सुरु व्हायच्या कि तो माणूस मुग्ध होऊन जायचा. पहिल्या भेटीत आजीच्या अगदी जीवा-भावाच्या मंडळीमध्ये तो माणूस जमा!! अर्धे मिरज तर तिला प्रत्यक्ष ओळखायचे. त्याच्यात मोठे मोठे नामांकित डॉक्टर होते. प्रथितयश वकील होते. मग गल्लीतल्या सगळ्याच पालकांनी आपली मुले अगदी खुशाल तिच्या शिकवणीला पाठवली. त्याच्यात मग श्रीमंताची मुले होती. गरीबाची होती. अगदी आमच्या गल्लीत एक मुसलमान कुटुंब होते. व्यवसायाने तांबट. म्हणजे तांब्याच्या घागरी वगैरे तयार करायचे. आणि त्यांच्या बायका तंबाखूच्या बिड्या वळून विकायच्या. शिक्षणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. पण आश्चर्य म्हणजे त्यांचा गेंगाणा सिकंदर पण आजीच्या शिकवणीला यायचा. आजी मुलांना पाढे शिकवायची. बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार असं अगदी सोपं सोपं शिकवायची. हे सगळं जरी सोपं असलं तरी माणूस आयुष्यात याच्या पेक्षा वेगळे अजून करतो तरी काय हे मला अजून तरी कळलेले नाही.
माणसाला फक्त दिवा लावायचा अधिकार आहे. एकदा ज्योत पेटली की मग उजेडाने कुठे कुठे पडावे हे उजेडच ठरवत असतो. त्याच्यावर माणसाची काहीही सत्ता नसते. आजीने समई लावली होती. आणि आता त्याच्या उजेडात काहीतरी दिसायला लागले होते. दिवस जात होते. मुले मोठी होत होती. आत्या STCPED झाली. ज्या शाळेत शिकली तिथेच शिक्षिका म्हणून तिला नोकरी मिळाली. घराला खूप मोठा आधार झाला. मग तिच्या मागोमाग वडील पण शिकत गेले. आजीचा भार हळू हळू हलका होत होता. वडील विलिंग्डन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दिवस वेगाने बदलत चालले. आजीचे वडीलही गणित शिकवायचे. मुलं मोठी करताना आजीने देखील गणित शिकवले. आणि आता आजीचा मुलगा गणिताचा PhD झाला आणि गणिताचाच प्राध्यापक!! गणित शिकवण्याचा अगदी त्रिवेणी योग होता. आत्याचे लग्न झाले. मग पुढे वडिलांचेही लग्न झाले आणि आजीचा आजी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला.
मी चौथा नातू होता. त्यामुळे मी नातू होण्याच्या आधीच आजी, तीन वेळा तरी आजी झालेली होती. मला कळायला लागल्या पासून मी आजी जवळच असायचो. सकाळ झाली कि आजी मला बखोटीला मारून कोडोलीकारांच्या वाड्यात जायची. मग हम्मा दाखवायची. हम्माला हात लावून द्यायची. मग ते हम्माचे वासरू पण कान टवकारून बघायला लागायचे. तिथेच मग भांडे भरून गाईचे निरसे दुध प्यायला मिळायचे. त्यात एखाद्या हम्माने शी-शी केली कि गम्मत वाटायची. मग तिथलेच एखादे चिपाड घेऊन मी हम्माच्या समोर धरायचो. तिला "खा खा" म्हणायचो. बऱ्याच वेळेला हम्मा काही ते खायची नाही. मग मी नाराज व्हायचो. आपण फक्त तिचे दुदु घेतले आणि तिने आपले चिपाड घेतले नाही याचे वाईट वाटायचे. हम्माच्या पिल्लाला डोक्यावर थोडे थापट केलं कि त्याची भीड चेपते आणि मग ते चिपाड खायला घेतं. हे पुढे कधीतरी कळलं. शब्दांच्या पलीकडे स्पर्शाची भाषा सुरु होते आणि त्या मुक्या जीवाना जिथे शब्दच नसतात त्यांना तर फक्त स्पर्शाचीच भाषा समजते. कळत नकळत हम्माशी मैत्री होत गेली. हळू हळू ऋणानुबंध जुळू लागले होते. हे माझे आणि आजीचे रोज सकाळी हम्मा कडे जाणे गल्लीत इतके प्रसिद्ध झाले, मोठी माणसे गमतीने आजीलाच हम्मा म्हणायला लागली. आणि याची सुरुवात अंता काकाने केली. अंता काकाची आठवण सांगायलाच हवी. त्याशिवाय हि गोष्ट पूर्ण व्हायची नाही. अंता काकाचे पूर्ण नाव अनंत सीताराम फाटक.
आमच्या घरासमोरच कोडोलीकर वाड्याला लागून फाटकांचा वाडा होता. तो हि बराच मोठा होता कोडोलीकर वाड्या सारखाच!! त्या वाड्याच्या एका बाजूला मधू काका चे पडके होते आणि दुसऱ्या बाजूला अंता काका राहायचा. त्याला ३ सोन्या सारखी मुले होती. ताकदवान आणि बलिष्ठ! सगळे हनुमंताचे सख्खे भक्त!! अंता काका देखील उंच धिप्पाड होता. ६ फुट तरी असेल. पण तब्बेत अशी आडवी होती कि तो वाटायचा ५ फुटाचा!! तो कुठल्यातरी सरकारी नोकरीत Inspector होता excise का customs का असेच काही तरी. त्यामुळे त्याचा आवाज हि असा दमदार होता कि त्याने कुणाला साधी हाक जरी मारली तरी सगळ्या गल्लीला ती ऐकू जायची. गल्लीतली माझ्या वयाची पोरं तर अंता काकाला जाम टरकून असायची. वरती हिरवा किंवा करड्या रंगाचा स्वेटर आणि खाली हिरवी नाहीतरी तांबडी चड्डी घालून पाठीमागे हात बांधून हि स्वारी गल्ली भर फिरत असायची. त्यांनी कुणालाही काहीही विचारावे. आमच्या घरासमोरून खूप पोरं शाळेला जायची. कधी कधी त्यांच्या आया त्यांना शाळेत सोडायला जायच्या. मग त्यातलीच काही पोरं रडत-खुरडत चाललेली असायची. त्यांना शाळेत जायचे नसायचे. जोरजोरात भोकाडं पसरलेली असायची. आई ओढत न्यायाची आणि हि मागं खोंडासारखी ओढ देत चाललेली असायची. आया अगदी वैतागलेल्या असायच्या. पोरं म्हणजे अगदी झोंड असायची. असं एखादं पोर अंता काकाला दिसलं कि झालंच त्याचं काम!! त्याला थांबवून अंता काकाने विचारावे 'कितवी ला आहेस रे?' किंवा 'कुठल्या शाळेला जातोस?' नाहीतर 'कुठे राहतोस?' काहीही विचारावे. त्याचा अवतार बघून ते पोर आधीच अर्धमेलं झालेलं असायचं. प्रश्नाचं उत्तर राहू द्या त्याच्या तोंडातून साधा शब्द बाहेर पडायचा नाही. मग अंता काका त्याला अजून घाबरवायचा. 'रडतोस का रे? शाळेला जाणार नाहीस तर काय गुरं राखणार आहेस का?' मग ते पोर अजून जोरात पुंगळी सोडायचं. मग अंता काका अजून पेटायचा. त्याच्याकडे दोन कुत्री होती. एक होता टाग्या आणि दुसरा टाॅम्या. अंता काकाने त्यांना हाक मारायचा अवकाश ती कुत्री लगेच त्या पोराच्या बाजूला गोळा व्हायची. त्या पोराची म्हणजे अगदी बोबडी वळलेली असायची. 'शाळेला जातो पण कुत्रा आवर' अशी अवस्था व्हायची. क्षणात रडणे बंद. पोर मुकाट्याने शाळेला चालू लागायचं. पोराची आई अगदी अंता काकाला मनापासून धन्यवाद द्यायची. याचा परिणाम फक्त त्या एका पोरावर व्हायचा नाही. आजूबाजूने जाणारी ४-५ पोरं पण तो प्रकार पाहत थांबलेली असायची. मग हा प्रकार पाहून त्यांची पण शाळा नियमित सुरु!! अंता काका म्हणजे अगदी टेरर झाला होता पोरांसाठी! पण एक सांगू का, मिरजेची माणसे फणसासारखी!! बाहेरून सगळे काटेच. पण कधी आत डोकावून बघा. गोड गऱ्याची काळीजं दिसायची! अंता काकाचे तेच होते. गल्लीत कुणाच्याही घरी अगदी सकाळी सकाळी घुसावे. त्यांचे पोर उचलावे. खांद्यावर टाकावे आणि बिनधास्त गल्लीभर आपलेच पोर असल्या सारखे फिरावे. काही पोरं रडायची. काही हसायची. मी हसणाऱ्या मधला होता. मला अंता काकाची भीती कधीच वाटली नाही. उलट त्याच्या मजबूत खांद्यावर बसावे. मस्त कोवळ्या उन्हात उभे राहावे. येणाऱ्या गाड्या, माणसे उंचावरून मस्त दिसायची. मजा वाटायची. पण आजीचा जीव वर-खाली व्हायचा. ती म्हणायची 'त्या अंताला नसते शुद्ध!! गल्लीला गेला कि तो गल्लीचा. पोर पडलं तरी कळायचं नाही त्याला. नाहीतर कुठेतरी ठेऊन यायचा तसाच!!' त्यामुळे ती अंता काकाला मला घेऊन जाऊ द्यायची नाही आणि अंता काका काही मला घेतल्या शिवाय सोडायचा नाही. मग एकदा तो मला म्हणाला 'कुठे घेऊन जाते रे आजी तुला?'. मी सांगितले 'हम्मा कडे'. झाले तिथून आजीलाचा हम्मा म्हणायला सुरुवात केली त्याने!! मला विचारायचा 'हम्मा कुठे आहे?' आणि मी आपोआप आजीकडे बोट दाखवायचो. मग अंता काका खूप मोठ्याने हसायचा.
हळू हळू आजीने माझा पूर्णच ताबा घेतला. सकाळी अण्णा तीन चाकी सायकल वरून अंबाबाईच्या देवळात घेऊन जायचे आणि संध्याकाळी आजी!! कुणाबरोबर जायला जास्त आवडायचे ते सांगणे अवघड आहे. अण्णा परत येताना बाबूच्या दुकानातून ५ पैशाच्या गोळ्या घ्यायचे. नियम एकच होता की घरी पोचायच्या आधी सगळे खाऊन संपले पाहिजे. नाहीतर आजी रागवायची दात किडतात म्हणून!! आता यातलं चांगलं कुणाला म्हणायचं?
संध्याकाळी आजी बरोबर वेगळी मजा असायची. गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या तिथे, अंबाबाईच्या देवळात जमायच्या. बोडसांच्या वहिनी, साधनाच्या आई, सहस्रबुद्धे आजी, देवकुळे आजी, प्रकाशच्या आई, यरगोळे आजी, बोरवणकर आजी, नमाक्का वगैरे सगळ्या नऊ वारी पातळात देवळात जमायच्या. त्यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असायचे. जाताना एकमेकींना दारातूनच हाका मारत जायच्या. मोठी गम्मत वाटायची. मी आजी बरोबरच असायचो. मग देवळात गेल्यावर देवीचा धावा सुरु व्हायचा. प्रत्येक बाईची टाळ्या वाजवायची पद्धत निराळी!! कुणाचा उजवा हात अगदी उजव्या काना पर्यंत वर जायचा. कुणाचे दोन्ही हात एकदम दचकुन जागे झाल्या सारखे कुटत राहायचे. डोळे मिटून तल्लीन होऊन "अंबे धाव झणी आता" असा धावा म्हणताना त्यांना पाहिले तर कुणालाही हसू येईल. माझ्या बरोबर अजून २-३ पोरं असायची. मग देवळात सगळी पळायची. वर देवीच्या नगारखान्यात जायची. आजीचं बारीक लक्ष असायचं. त्या देवळात गर्दीत मी किती तरी वेळा चुकलो होतो. पण आजीला बरोबर ठाऊक असायचं मी कुठे आहे ते!! आता आपण हरवलो अशी मला खात्री वाटायला लागली कि आपले काहीतरी चुकले असे वाटायचे. आपोआप मनातल्या मनात मी पण देवीचा धावा म्हणायला लागायचो आणि अचानक देवासारखी आजी समोर येउन उभी रहायची. मग जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. ते कमी म्हणून मग सगळ्या बायका खडी साखर आणि फुटाणे प्रसाद म्हणून द्यायच्या. अगदी तोबरा भरून भरून फुटाणे खायचो. क्षणापूर्वी आपण हरवलो होतो याची मग आठवण सुद्धा नसायची. मग हळूच कधीतरी ABCD शिकायला सुरुवात झाली. आजी कोडोलीकारांच्या झोपाळ्यावर घेऊन बसायची अगदी तासंतास. हळू हळू पायाने झोके घेत, A for Aeroplane, B for Bat, C for Cat वगैरे चालू झाले. आजी गाणी फार सुंदर म्हणायची. कधी 'लिंबोणीच्या झाडाखाली' म्हणायची. त्यातले 'गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊ ताई' हे ऐकताना तर कोडोलीकरांची झोपलेली गाय दिसायची. पेरूच्या आणि चिंचेच्या झाडावर झोपलेल्या घरट्यातल्या चिमण्या दिसायच्या. आणि त्यातच कधीतरी झोप लागून जायची. तिचे 'एका तळ्यात होती, बदके पिल्ले अनेक' हे गाणे ऐकताना तर मला दररोज रडू यायचं. पिल्ले तीच होती, तळेही तेच होते. तरी जोवर त्या कुरूप पिल्लाचा राजहंस व्हायचा नाही तो पर्यंत मला चैन पडायची नाही. तोवर मी रडत रडत जागाच असायचो. त्याच्या नंतर कधी माधव ज्युलिअन यांची आईची कविता म्हणून दाखवायची. तेव्हा तिचा अर्थ कळला नव्हता. पण नंतर जेव्हा ८ वी का ९ वी मधे ती कविता अभ्यासाला आली तेव्हा खूप छान वाटले. आजीने आपल्याला नेमके काय ऐकवलं ते समजून आजीचे कौतुक वाटलं. ती गोष्टी पण फार सुरेख सांगायची. एकदा तिने आईच्या काळजाची गोष्ट सांगितली होती. बायको मागते म्हणून मुलगा आईचे काळीज काढून नेतो. आई पण त्याला मोठ्या कौतुकाने ते देते. ते नेत असताना वाटेत त्या मुलाला ठेच लागल्यावर त्या काळजातून आवाज येतो 'बाळ तुला लागलं तर नाही ना रे?'. खूप वाईट वाटलं होतं ती गोष्ट ऐकून!! गम्मत म्हणजे आजी आणि अण्णा त्याच्या वडिलांना बाळ म्हणायचे. त्यामुळे मला बरेच दिवस त्या गोष्टीतल्या आईच्या जागी आजीच दिसत होती. श्रावण बाळाची गोष्ट तर आजीनेच सांगावी. अर्थात गोष्टीतले सगळे खरे नसते हे कळायचे ते वय नव्हते. पण ते जरी खरे नसले तरी सत्य असते हे जेव्हा कळले तेव्हा त्या गोष्टी मग जगण्याचा भाग झाल्या. मनात खूप आत गेलेल्या गोष्टी कधी आपल्या विचार तंत्राचा भाग होतात ते कळत देखील नाही. आणि नंतर कधीतरी आयुष्यात एखाद्या वेळी त्या विचार तंत्रातून एखादी कृती घडली तर मन मात्र त्याच्या उगमाचा शोध घेत राहते. अशा आजीने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी बहुतेकदा लहान पाणीच मनात खोल जाउन बसलेल्या असतात आणि पुढे जन्मभर पदोपदी सोबत करत राहतात.
पाकळ्या तरी पराग कणांना अजून दुसरे काय देतात!!
हळू हळू आजी जशी जबाबदारीतून मोकळी होत गेली तशी ती अजूनच खुलत गेली. अण्णाही रिटायर झाले होते. तिने तिची आयुष्याची लढाई जिंकली होती. आयुष्याने जे मागितले ते दान तिने हसत हसत दिले होते. आता आयुष्याकडून तिला मिळायचे बाकी होते. दोघांचेही खरे दात जाऊन मोत्यासारखे खोटे दात आले. एकदाचे ते खरे दात गेले कि माणसातले सगळे विकार संपत असावेत. आणि त्यांची जागा निखळ प्रेमाने भरून निघत असावी. तिच्या चिंता मिटल्या होत्या. स्वस्थ चित्ताने सोन्याचा घास खायचा होता. आजीचा मुळचा मिश्किल स्वभाव दिसायला लागला. कुणीही घरी येउन गेला कि त्याची अगदी हुबेहूब नक्कल करायची. मग तो बाबा असो नाहीतर बाई!! observation आणि acting यातले तिचे काय जास्त चांगले होते ते सांगणे अवघड आहे. पण आजीच्या नकला पाहून कुणालाही हसू यायचे. कधी बाबा घरी नसतील तर ती बाबांची पण नक्कल करायची. आणि मग घरातले सगळे मिळून हसायचे. वास्तविक तिने आता बसून खाल्ले असते तरी तिला काही कमी पडणार नव्हते. आशिर्वाद आणि सल्ल्याशिवाय तिच्या कडून कुणी कसली अपेक्षाही केली नव्हती. पण तिचा जीव संसारात गुंतून गेला होता. कधी तव्यावर तांदळाच्या नाहीतर बाजरीच्या भाकरी करायची. कधी रव्याचा केक, कधी लाडू, चकली नाहीतर शेव करायची. परीक्षेला जाताना हातावर हमखास खडी साखर ठेवायची आणि "जा तुझा पहिला नंबर येईल" असा आशीर्वाद द्यायची. आणि खरेच कुणी पहिले आले तर सगळ्यात मोठा आनंद आजीचा!! लगेच उठून काहीतरी गोड करायला घ्यायची. कधी गुळाच्या पोळ्या, कधी नुसताच गुळाचा सांजा, कधी सत्यनारायणाचा केळ्याचा शिरा आणि कधी वेळ झाला तर आईला हाताशी घेऊन पुरणाची पोळी!!
"माणसानं नेहमी लीन असावं" आणि "समाधानी मनुष्य खरा श्रीमंत" हे तिची दोन आवडीची वाक्यं!!
पुण्यात गेल्यानंतर ती थोडी हळवी झाली होती. सारखी मिरज मिरज करायची. कधी आत्या आली की तिला कानात खुसुखुसु सांगायची की तिला "मिरजेला जावून मरायचे आहे म्हणून"!! गल्लीतल्या बायकाना गोळा करून शेवया करणे, आंबाबाईच्या देवळातला धावा, चैत्रगौरीतले हळदी-कुंकू समारंभ, आंबेडाळ, पन्हं, नाचणीचं अंबील हे सगळं अचानक बंदच झालं. मिरजेत असताना तासगाव वेशेच्या मारुती पर्यंत फिरायला जायची. ते फिरणं देखिल पुण्यात आल्यावर बंद झालं. फर्ग्युसन काॅलेजच्या आवारात फिरायची. मिरजेत चौका-चौकात तिला कुणीतरी ओळखीचं भेटायचं. आता पुण्यात तेही बंद झालं. मग आपली एकटीच घरातल्या देवासमोर बसून धावा म्हणायची. पेटीवर एखादं गाणं वाजवायची. "ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले, मला हे दत्त गुरू दिसले" नाहीतर "आज मी दत्तगुरू पाहीले" असली दत्ताची गाणी म्हणायची. नाहीतर "भजो रे भैय्या, राम गोविंद हरी" किंवा "ठुमकी चलत रामचंद्र, बाजत पैंजनीया" अशी शास्त्रीय वळणाची भजने म्हणायची. या गाण्यात तंत्रापेक्षा तल्लीन होण्याचाच आनंद जास्त होता.
घरातल्या प्रत्येकाचे वाढदिवस तिला पाठ असायचे. प्रत्येकाला काय काय पाहीजे ते आधीच विचारून ठेवायची. अण्णांची पेंशन तिला मिळे. ती साठवून त्यातून ज्याला जे हवे ते आणून द्यायची. वाढदिवसाला नाहीतर दिवाळीच्या दिवशी, लेक, सून, जावई, नातवंडांना ओवाळायचा तिचा आग्रह असे. त्या दिवशी स्वारी अगदी सकाळ पासून खूष असे. दिवसभर सगळ्या कामांची देखरेख करून संध्याकाळच्या ओवाळणीसाठी तिची लगबग व्हायची.
दिवसामागून पान पिकत चाललं होतं. पण जगण्याचा तजेला तोच होता. नऊ वारी पातळ, त्यावर बाबांनी इटलीहून आणलेला निळा जाड जूड स्वेटर, डोक्याला आणि कानाला रुमाल, पायाला जाड पाय मोजे, त्यावर अस्मिताने अमेरिकेतून आणलेल्या कोझी चपला (आजी त्या चपलाना "गोद्या" म्हणायची!), हाताला हात मोजे असा कडेकोट बंदोबस्त करून हातात जपाची माळ घेऊन हरिपाठाचे वाचन सुरु असायचे. "हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी".. हे किती अलौकिक लिहीले आहे याची जाणीव आजीकडे पाहून व्हायची. कोडोलिकरांच्या घरी भाकरी करताना पडलेले तापलेल्या तव्याचे चटके हातावर शिक्का होऊन राहीले असतीलही पण मनाचं आकाश निरभ्रच राहीलं होतं. कुणाचा राग नव्हता. कुणाचा द्वेष नव्हता. आपल्या पोरा-बाळाना खायला करून घालायचा एक छंद सोडला, तर कशाचा लोभही नव्हता. दासबोधाची पारायणे चालू झाली होती. आजी मुळची साताऱ्याची!! त्यामुळे समर्थांवर विशेष भक्ती. माहूलीच्या देवळातल्या गोष्टी सांगायची. चाफळ, सज्जनगड, परळी वगैरे समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावांच्या आठवणी सांगायची. जुनी जुनी गाणी, जुन्या कविता पाठ म्हणायची. तिची आई तिच्या बालपणीच गेल्यामुळे तिच्या बोलण्यात तिचे वडील खूप वेळेला यायचे. त्यांना तीची भावंडे "भाऊ" म्हणत. १३ मुलांचा संसार आई विना एकट्या भाऊंनी केला याचा तिला जबरदस्त अभिमान होता. कदाचित विपरीत परिस्थिती मधे घनगंभीर राहण्याची तिची प्रेरणा इथूनच येत असावी. कुणी खूप उशीर पर्यंत बाहेर गेलं कि दारात जाऊन वाट बघत बसायची. पुढे मी अमेरिकेत गेल्यावर अधून मधून skype वर भेटायची. तिला त्या नविन तंत्रज्ञानांचं देखिल काही वावडं नव्हतं. माझ्या पोरी पण फार जीव टाकायच्या तिच्यावर!! अर्चिस आणि रेनिसानी तिला "प आजी" असं नाव दिलं होतं.
आयुष्याच्या एका टोकाला शेणाच्या गोवऱ्या चुलीत सारत धुरानी भरलेल्या घरात केलेला मोडका-तोडका संसार होता. तर दुसऱ्या टोकाला, सर्व सुखांनी भरलेला कृतकृत्य संसार होता. मोह कशाचाच नव्हता!! एक दिवशी आईचा फोन आला की आजीला बरं नाही. दवाखान्यात नेलंय म्हणून!! काही काळजी करण्यासारखं नाही असं पण म्हणाली. पण माझा जीव काही स्वस्थ बसेना. मी रोज दोन-तीन फोन करायला लागलो. आजी छान बोलायची. थोडी जीभ जड झाली होती. पण बोलणे स्पष्ट कळत होते. "आर्चिस फार गुणी मुलगी आहे. तिची काळजी घे." असं म्हणाली. ते शेवटचेच बोलणे!!
दुसऱ्या दिवशी आई पाणी आणायला म्हणून खोलीतून बाहेर पडली आणि आजीने डोळे मिटले ते कायमचेच!! जवळ जवळ ८५ वर्षे अखंड चालू असलेला श्वास थांबला. फक्त दुसऱ्याना देण्यासाठी, गेली ८५ वर्षे मायेनं आणि ममतेनं धडधडलेलं प्रेमळ हृदय कायमचं थांबलं. पूर्ण पिकलेलं फळ जसं अलगद झाडावरून निसटतं आणि कृतार्थ जन्मासाठी धरणीला धन्यवाद देण्यासाठी आवेगानं झेपावतं, अगदी तसाच तो क्षण होता. वास्तविक तिचं राहीलं काहीच नव्हतं. तिच्यासाठी मला काही करताही आलं नाही. तरी ती गेल्याचं दु:ख झालं.
भगवद्गीतेमधे कृष्ण अर्जुनाला सांगतात की, अरे ज्यांना तू आज मारणार आहेस, त्यांना होणाऱ्या शारिरीक यातनेपेक्षा तुला होणारी मानसिक यातना मोठी आहे. आणि ती मानसिक यातना हे तुझ्या स्वार्थाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ज्या भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना तू तुझ्या बाणांनी सद्गती देणार आहेस, त्यांच्या लेखी तू एक जगातला सर्वोच्च धनुर्धर आहेस. त्यांच्या लेखी तू महान योद्धा आहेस. महारथी कर्णाला धनुर्विद्येत हरविणारा पार्थ आहेस. त्यांच्या तुझ्या बद्दलच्या या भावनेची तुला पुर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच तू मनातून दु:खी झाला आहेस की यांच्या जाण्याने तुझे गुणगान गाणाऱ्या या महान प्रशंसकांचा अंत होणार आहे. तुझ्या किर्तीचे गोडवे गाणाऱ्यांची संख्या कमी होणार याचे तुला दु:ख झाले आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या हृदयामधे असणारी अर्जुनाबद्दलची अनुकंपा संपून जाणार आहे. याचे तुला दु:ख वाटते आहे. त्यांच्या बरोबरच त्यांच्या मनामधे अखंड वास्तव्य केलेली अर्जुनाची दृढ प्रतिमा देखिल नष्ट होणार आहे. त्याचे तुला दु:ख वाटते आहे. आणि हा फक्त तुझा स्वार्थ आहे.
आजी गेली तेव्हा काहीसं असच वाटत राहीलं..
कापुसलेल्या केसांची� कर्दमलेल्या शालीची� सुरकुतलेल्या मायेची� एक होती आजी ....
जुन्या पुराण्या पोथ्यांची� चुडा भरल्या हातांची� टोप पदरी लुगडयाची� एक होती आजी ....
तुकोबाच्या गाथेची� मनाच्या श्लोकांची� हरीच्या पाठाची� एक होती आजी ....
वाकलेल्या पाठीची� आजोबांच्या काठीची� सुन्ठेच्या चिमटीची � एक होती आजी ....
साखरेच्या खड्याची� खारकेच्या तुकड़याची� बोटभर गुलकंदाची� एक होती आजी ....
साठलेल्या क्षणांची� गोठलेल्या व्रणांची� सोनसावळ्या कणांची� एक होती आजी ....
एक होती आजी� आठवांच्या गाठोड्याची� आसवांच्या उशाशी� डोइवरल्या हाताची
�एक होती आजी ....
~ निखिल कुलकर्णी

1 comment:

  1. या लेखातील खालील काव्यमय परिच्छेद मला आवडले आणि ते मी स्टेटस वर आपल्या नावाचा उल्लेख करून टाकले.या निष्पाप, अल्लड परागांना तेव्हा कशाचीही पर्वा नसते. ते बेभान होऊन नाचतात. पाकळ्यांच्या अंगणात, पावसात भिजून चिंब होतात. धुक्यात लपून कुंद होतात. पाकळ्यांना आपला गंध देतात आणि नकळत पाकळ्यांचा रंग घेतात.

    हलकेच एका नव्या आयुष्याची सुरुवात होते.

    ReplyDelete