Tuesday, December 22, 2015

संजय उवाच

काल संजय लीला भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" पाहिला. लोकांच्या टीका, पिंगा गाणे, बाजीराव पेशव्यांनी केलेला नाच, खुद्द ज्या गावात हे कथानक घडले त्या गावात सिनेमाच्या प्रक्षेपणावर लादली गेलेली बंदी या सगळ्या मुळे उत्सुकता खूपच ताणली गेली होती. शिवाय पहिल्या दिवशी अमेरिकेत देखिल सिनेमा हाउस फुल होता. तिकिट मिळाले नाही. त्यामुळे अजून जास्त उत्कंठा वाढली. अमेरिकेतल्या गर्दीचा पूर्वानुभव लक्षात घेत २ तास आधीच थिएटर मध्ये पोचलो होतो. तरी देखील रांगेचा भला मोठा नागोबा पुढे होताच. एकूणच इथली गर्दी बघता इथे देखील तिकिटांचा काळा बाजार सुरु व्हायला फार वेळ लागेल असे दिसत नाही. तर ते एक असो.

पण मला सिनेमा आवडला. खूप आवडला. संजय लीला भंसाळीचे अभिनंदन!!

मुळात पेशवे आणि त्यांची कारकीर्द यांच्या बद्दल मला जरां जास्तच आकर्षण आहे. त्यामुळे या विषयीची मिळतील ती जवळ-जवळ सर्व पुस्तके मी परत परत वाचली आहेत. त्यातून काय मिळाले हा भाग वेगळा. पण हि पुस्तके वाचल्या मुळे शनिवारवाड्याच्या बुरुजाच्या आत जो प्रचंड कार्यखाना होता, तो प्रत्यक्ष कसा असेल याचे जबरदस्त कुतूहल जागे झाले हे मात्र नक्की! त्या मोडून पडलेल्या जोत्यावर अनेक वेगवेगळे महाल कसे उभे असतील, त्यातल्या कुठल्या महालात बाजीरावसाहेब चिमाजीआप्पा बरोबर दौलतीचे हिशेब पाहत बसले असतील, त्यातल्या कुठल्या जोत्यावर आरसे महाल उभा असेल, कुठल्या जोत्यावर मस्तानीचा महाल असेल, कुठल्या महालात मल्हारराव होळकर तंबाखूचा बार आणि मिशीला पीळ भरत बसले असतील, कुठल्या महालात नानासाहेब, रघुनाथराव, जनार्दनराव, समशेरबहाद्दर आणि सदाशिवरावभाऊ सोंगट्या खेळायला नाहीतर श्लोक म्हणायला एकत्र जमत असतील, तो सात मजली महाल कुठे असेल, पार्वती बाई कुठल्या खिडकीतून सदाशिवरावभाऊच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील असे असंख्य प्रश्न पडत राहिले. कितीही वेळा त्या वाड्यात फिरलो तरी याची उत्तरे मिळाली नाहीत.

संजय लीला भंसाळीचे अभिनंदन खरे तर त्यासाठी कि ज्याने हा आज नसलेला वाडा उभा करून दाखवला. ज्या वाड्यातली लक्ष्मी आणि दिवा कित्येक शतकांपूर्वी इंग्रजाने जाणिवपूर्वक विझवून टाकले, त्या वाड्यात पुन्हा एकदा रांगोळ्या काढल्या जाताना पाहणे हा खरेच एक अप्रतिम अनुभव होता. त्यातले चौक, प्रवेशद्वारे, सज्जे, खिडक्या, झुंबरे, संगमरवरी फरशा, भिंतीवर काढलेले रामायण आणि महाभारता मधले प्रसंग… सगळेच अतिशय समर्पक वाटले. ज्या वास्तूची आज राख देखील शिल्लक नाही ती वास्तू केवळ कल्पनेने उभी करणे आणि त्याच्यात तोच आब आणि तीच पुण्याई ओतणे हे सोपे काम नाही. Great Job!!

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा हिंदी माणुस हिंदी भाषेमध्ये मराठी माणसावर सिनेमा काढतोय हे देखील काही कमी नाही. ज्या गावातून औरंगझेबाच्या नावाचे रस्ते आहेत त्या गावात लहान मुलांना शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी आणि बाजीराव यांना गुंड आणि लुटरु म्हणून शिकवत असले तरी नवल वाटायला नको. तर अशा पार्श्वभूमीवर एखाद्या हिंदी दिग्दर्शकाने बाजीरावावर सिनेमा काढावा याचेही कवतिक करावेच लागेल.

बाकी कामाच्या बाबतीत काशीबाई (प्रियांका चोप्रा) सर्वात अव्वल!! प्रियांका चोप्रा ला अभिनय करता येतो हे प्रथमच पाहिले. त्या खालोखाल राधाबाईनी झकास काम केले आहे. छत्रपती शाहू (महेश मांजरेकर) देखील अप्रतिम. एक दोन-तीन अपवाद वगळले तर मस्तानी आणि बाजीराव देखील उत्तम! अर्थात रणवीर ची तुलना नकळत मनोज जोशी बरोबर करण्याचा अनावश्यक मोह होतो हे मात्र खरे! मनोज जोशी आणि स्मिता तळवलकर यांनी केलेला मराठमोळा बाजीराव आणि काशीबाई लोकविलक्षण होते यात वादच नाही. तरी देखील "तुलना अनावश्यक" हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

बहुतेक सर्व प्रसंग, संवाद खिळवून ठेवणारे आहेत. एकमेद अपवाद म्हणजे मस्तानी ची बाजीरावांनी केलेली delivery!! बाजीरावांनी मस्तानीला lamaze (म्हणजे प्रसुतीच्या वेळी घ्यायचे श्वासाचे विशिष्ठ तंत्र) चे training दिले ते पाहून अंमळ हसू आले इतकेच!! पण काय सांगा त्यांनी दिलेही असेल. (नाही म्हणणाऱ्यानी तसे training न दिल्याचा पुरावा शनिवारात नाहीतर कोतवालीत उद्या दुपार पर्यंत जमा करणे.)
तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

आता काही आक्षेपांबद्दल. अर्थात मी काही सिनेमाचा तज्ञ वगैरे नाही. तरी पण एक सामान्य माणूस म्हणुन जे काही वाटले ते असे.…

पिंगा गाण्यात खरे तर गैर काहीच वाटले नाही. उलट त्यातून काशीबाईच्या आणि अर्थात पर्यायाने मराठी मनाचा मोठेपणा ठळकपणे जाणवला. कपडेपट थोडासा झाकीव असता तरी चालले असते. पण राणीवशात कुणी, कसले, कधी आणि किती कपडे घातले असतील याचे कसलेही पुरावे उपलब्ध असतील असे वाटत नाही. (असतील तर शनिवारात नाहीतर कोतवालीत उद्या दुपार पर्यंत जमा करणे.) तर ते एक असो. एकूण गाणे कथेला अगदी समर्पक आणि आवश्यक वाटते.
तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

बाजीराव साहेबांनी केलेला मल्हारीच्या नावाचा भंडार्याचा नाच!! मला याच्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. शेवटी तो शिपाई गडी. त्यात युद्ध मारून आलेला. त्यांचा मित्र मल्हारबा होळकर कि ज्यांचे दैवत म्हणजे मल्हारी मार्तंड. केला असेल मित्राच्या संगतीने नाच. आता गणपतीच्या मिरवणुकीत सर्व जातीचे आणि धर्माचे लोक रात्र भर नाचतात. काय त्यांचे सर्वांचे दैवत गणपती असते का काय? नाच हे बेधुंदपणाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. विजयाने माणूस बेधुंद होणे स्वाभाविक हि आहे. आणि अशा बेधुंद वेळी 'आपले दैवत काय' याचा कोता विचार करत बसण्यापेक्षा ज्यांनी आज आपल्याला विजयी केलं त्या आपल्या भोळ्याभाबड्या मराठी-धनगरी गड्यांच्या दैवताचे स्मरण बाजीरावाने केले असेल तर त्यामुळे माझ्या लेखी बाजीरावांच्या प्रती आदरात वाढच झाली आहे. हे देखील जाणत्या आणि नेणत्या नेत्याचे लक्षण म्हणावे लागेल.

बर असेही नाही कि बाजीराव कंबर उडवत "मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है" च्या अंगाने नाचला आहे. उलट मी तर म्हणेन कि हे गाणे म्हणजे Team Work आणि Coordination चा एक उत्कृष्ठ नमुना आहे. किमान ३०० पेक्षा जास्त लोकांना घेऊन नाच करायचा हे अवघड काम आहे. या गाण्याला आक्षेप घेणार्यांनी हवे तर त्यांच्या गल्लीतल्या १०-१२ धडधाकट पुरुषांन घेवून एखादा नाच बसवून बघावा. आणि हातीपाई वाचलात तर पुढचा आक्षेप घ्यावा.

तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

तर एकूण सिनेमा एकदम झकास आहे. मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. सिनेमाच्या थिएटर मध्ये माझ्या शेजारी खूप हिंदी भाषिक मंडळी बसली होती. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून तर बाजीरावाचा, शिवाजीचा आणि मराठी साम्राज्याचा अतिशय अभिमान वाटत होता. आणि उगाचच आपण मराठी आहोत म्हणजे जणू आपणही त्या बाजीचेच अंश आहोत असेही वाटत होते. एकाच वेळी मराठी आणि अमराठी लोकांना आनंद देण्याचा हा चमत्कार करणाऱ्या संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

राहता राहिला प्रश्न इतिहासामधल्या त्रुटींचा!! तर एक लक्षात घेतले पाहिजे कि ज्या "राऊ" या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे, त्याच्या प्रस्तावनेत स्वत: ना. सं. इनामदारांनी लिहिले आहे कि "हि एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ऐतिहासिक बखर किंवा दस्तावेज नव्हे". तेव्हा प्रसंगानुरूप एखादे पात्र घातले असेल. एखादा संवाद वगळला असेल. एखाद्या प्रसंगात फेर फार देखील केला असेल. उद्या एखादा तज्ञ (कि तद्दन?) इतिहासकार म्हणेल कि "बाजीरावसाहेबानी ८ ऑकटोबर १७२९ रोजी घोड्यावर बसून पवन मुक्तासन केले होते. त्याचा सिनेमात कुठेही उल्लेख नाही.". तर त्यावर इतकेच म्हणावे लागेल कि ते घोड्यावर बसून मक्याची कणसे खात असल्याने कदाचित एखाद वेळी अवचितपणे घोड्यावर पवन मुक्तासन केले देखील असेल. पण जिथे मुदलात कणीस खाण्याचाच प्रसंग दाखवलेला नाही त्यामुळे पवन मुक्तासनाच्या प्रसंगालाही फाटा दिला आहे. तेव्हा हे ऐतिहासिक तद्दनानो जरा थंड घ्या. शास्त्रीबुवा बसा खाली!!

तेव्हा संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

अर्थात हे काही मी संजय लीला भंसाळीला सांगावेच असे नाही. पण तरी देखील राहवत नाही म्हणून सांगतोच.

हे संजया,

या टीका करणाऱ्याकडे ढुंकूनही पाहू नको. अरे त्यांनी खुद्द प्रत्यक्ष बाजीरावास जिथे सोडला नाही तिथे ते तुला सोडतील कि काय!!

या लोकांनी ज्ञानेश्वरावर टीका केली आहे. समर्थ रामदासांवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. त्यांचे महाप्रतापी चिरंजीव छत्रपती संभाजी महाराजांवरही टीका केली आहे. इतकेच काय पण त्यांचे चरित्र लिहून मराठी माणसाला शिवाजीचा आदर्श घालून दिलेल्या बाबसाहेब पुरंदरे नाही त्यांनी सोडलेले नाही.

हे टीकाकार जगातले सर्व श्रेष्ठ टीकाकार आहेत. चंद्रावरचे डाग त्यांना आधी दिसतात. सूर्याची भोके दिसतात. यांना भीमसेनचा षड्ज चुकतो आहे असे देखील वाटू शकते. हरीजीना देखील "आता बासरी थांबवा" असे सांगायला हे कमी करत नाहीत. हे गांधींजीची टिंगल करतात आणि नथुरामला देखील शिव्या घालतात. तिथे तुझ्या सिनेमाची काय गोष्ट!!

यांच्या या सवई मुळेच, ७०० वर्षे झाली तरी दुसरा ज्ञानेश्वर निर्माण करता आलेला नाही. ४०० वर्षात दुसरा शिवाजी नाहीतर संभाजी तयार करता आलेला नाही. आणि ३०० वर्षे झाली तरी एखादा प्रती बाजीराव देखील तयार करता आलेला नाही. पण या रणगाझी बाजीचा दिग्विजय समस्त भारत वर्षातील लोकांना आज तुझ्या मुळे बघायला मिळाला आहे. मराठी माणसाचा भव्य दिव्य पराक्रम आणि मराठी माणसाचे तितकेच उत्कट प्रेम सगळ्या भारतीयांना तुझ्यामुळे पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या रस्त्यावर गुजराण करणाऱ्या उत्तर भारतीयांना धमकावून आणि मारून स्वत:ची पोटे भरणाऱ्या आचरट बंधूनी मराठी माणसाची जी अब्रू वेशीला टांगली आहे ती या सिनेमा मुळे थोडी तरी परत मिळाली आहे हे नक्की!! हे खरे तर मोठेच काम आहे. आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे.

तेव्हा संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

लेखक - निखील कुलकर्णी