Monday, September 24, 2018

ओढ

ओढ
~निखिल कुलकर्णी 

विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे आत्मरुप होत, बेभान होऊन अनिमिषपणे चमचमणाऱ्या, पृथेच्या य:कश्चित दिनकराहून सहस्त्र पटीने प्रदीप्त अशा शुभ्रधवल तेजोनिधीला, त्या दिवशी उल्का होण्याची ओढ का वाटली असावी? 

दूर कुठेतरी मायेच्या अथांगात, आत्मभान हरवून स्वतःशीच भरकटत, क्षीणशा, दुय्यम वाटावे अशा तेजाने, तांबूस पिवळसर दिसणाऱ्या लोहगोलाच्या भोवती एकलग प्रदक्षिणा काढत बसलेल्या त्या निळसर, ओलसर, वेडगळ पृथेत, त्या महान तेज:पुंजाने काय पाहिले असावे? तेजोमय अहंकाराची राजस वृत्ती कायमची सोडून द्यायला लावणारा, अवकाशाच्या अथांग पोकळीतला अनभिज्ञ आणि आत्मघातकी प्रवास त्या नभोत्तमाला ठाऊक नसेल काय? नक्षत्रांच्या स्वर्गीय रांगोळी मधले स्वत:चे अढळ स्थान कायमचे सोडून देऊन पृथेच्या भेटीला जाताना होणाऱ्या अतिउष्ण तलखीची त्याला कल्पना आली नसेल काय? या प्रवासात वाटेत जागोजागी थांबलेले काळ्याकुट्ट मायेचे लोट, त्याचे स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशीत तेजाचे अस्तित्व आपल्या चिकटलोळ पदरांनी कायमचे झाकोळून टाकतील याची त्याला यत्किंचीतही तमा वाटली नसेल काय?

कदाचित त्याने कधीतरी ब्राम्हमुहूर्तावर आपल्याच अन्हिकात रमलेल्या पृथेवरचे प्राजक्ताचे महादान पाहिले असावे. आकाशातल्या इवल्या इवल्या दहिवराच्या साकळलेल्या थेंबांनी, पाकळी-पाकळी गहिवरून आलेला, अहम विसरून, एकटाच धरेकडे झेपावणारा भाबडा प्राजक्त त्याने साक्षेपी नेत्रांनी पाहीला असावा. संपूर्ण अस्तित्व ज्या मायेने दिले तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहात, अलगदपणे विलग होऊन, आपल्याच पाकळ्यांचे पंख करत, जमिनीवरच्या चंद्रस रांगोळीतला एक कण म्हणून अजरामर होण्याची प्राजक्ताची अलौकिक ओढ त्याने अनुभवली असावी. स्वत:चे अहंमन्य अस्तित्व संपवून, पृथेच्या पार्थिवावर असंख्य प्राजक्तांनी एकच एक होत घातलेली पांढरी तांबडी पाखर त्याला भावली असावी. आणि मग जन्मापासून मोक्षा पर्यंतचा, तो, केवळ काही पळांचा कृतकृत्य, एकमग्न, मनस्वी प्रवास त्या नभश्रेष्ठास आकाशातल्या तेजोमय अनंत अढळतेहून श्रेष्ठ भासला असावा.

ओढ वैश्विक आहे..

~निखिल कुलकर्णी


Saturday, August 18, 2018

अटलजी

अटलजी
~ निखिल कुलकर्णी 

अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही. 

त्यांची पहिली सभा मी ऐकली तेव्हा मी चौथीत होतो. मिरजेच्या अमर खड्ड्यात त्यांची सभा झाली होती. प्रचंड गर्दी, आकाशाला भिडलेले मातीचे लॉट, अटलजींचे मिरज जंक्शन वरचे भव्य स्वागत, रस्त्या रस्त्यांवर अशोक खटावकरनी रात्र रात्र जागून स्वत:च्या हाताने रंगवलेले मोठे मोठे कट आउट्स या पलीकडे फारसं काही आठवत नाही. अटलजी काय बोलले ते काही कळायचे ते वय ही नव्हते आणि ते बोलले हिंदी मध्ये. आणि तेव्हा हिंदी हि एक भाषा आहे याच्या पलीकडे दुसरे त्यातले काहीही कळत नव्हते. पण कदाचित तेव्हा जे काही प्रश्न पडले त्या प्रश्नांनी या नेत्याची माझ्या मनाने तेव्हा पासूनच एक उंचच उंच अशी प्रतिमा रंगवायला घेतली असावी. नंतर मग घडत गेलेल्या प्रत्येक घटनेने त्या प्रतिमेत रंग भरत गेले असावेत. 

इंदिरा गांधी गेल्याची बातमी रेडिओवर ऐकली होती. तो प्रसंग अजून हि जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गांधी वधानंतर झालेल्या बेफाम जातीय दंगलीचा आणि लुटीचा अनुभव पाठीशी असल्याने गल्लीतली कर्ती माणसे एकमेकांना "इंदिराजींची हत्या कुणी केली?" हा प्रश्न परत परत विचारून खात्री करत होती. पोलिसांच्या गाड्या गल्लीच्या चौका-चौकात उभ्या होत्या. घरांचे, वाड्यांचे दरवाजे कडेकोट बंद झाले होते. खिडकीचे दरवाजे किलकिले उघडून आम्ही रस्त्यावर काय चालू आहे याचा अंदाज घेत होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. मधेच एखादी पोलीस गाडी जायची तेवढीच काय ती हालचाल. शेवटी रात्री खूप उशिरा जेव्हा कुणी खून केला याची पक्की बातमी रेडिओवरून आली, तेव्हा लोकांच्या जीवात जीव आला. बाजीरावाच्या देशात आणि पटवर्धनांच्या गावात ब्राह्मणांना जीव मुठीत धरून जगायची वेळ आणणाऱ्या सरकारांचे, त्यांच्या पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण मूळ मुद्दा माहितीचे प्रसारण किती तोकडे होते हा आहे. कशाचा कशाला धरबंध नव्हता.      

नंतर मग देखण्या राजीव गांधींचा शपथविधी झाला. याच्या नंतर कधीतरी गल्लीत TV आला होता. वासू काका बोडसांच्या घरी अक्खी गल्ली, पोरे बाळे घेऊन रोज संध्याकाळी TV  बघायला जमायला लागली. चित्रहार, बातम्या, साप्ताहिकी आणि ये जो है जिंदगी बघता बघता रात्रीचे ९ वाजायला लागले. काही काही सोकावलेली मंडळी तर "चांगला आहे, चांगला आहे" म्हणून रात्री दहाचा प्रणव रॉय यांचा "The world this week" कार्यक्रम पण बघत बसायची. वासू काकाची आई कधी कधी संतापून म्हणायची कि उद्या येताना गाद्या आणि उश्या पण घेऊन या म्हणून!! एक चांगले म्हणजे तेव्हा वासू काकाचे लग्न झाले नव्हते. अर्थात पुढचा फायदा लक्षात घेऊन गल्लीतल्या जाकीट नेहरूंनी, वासू काकाला, "लग्न का करू नये?" हे पटवून दिले असावे असाही एक मत प्रवाह आहे. पण धमाल यायची. कित्येक नविन नविन गोष्टी बघायला मिळू लागल्या. माहितीचे नविन दालन नुकतेच उघडत होते. अनेक गोष्टी घडायच्या होत्या. अनेक प्रश्न पडायचे होते. अनेक उत्तरे मिळायची होती. 

हळू हळू मग नाना महाजनांकडे TV आला. मग पटवर्धनांकडे TV आला. आणि मग बघता बघता TV घेण्याची स्पर्धा सुरु झाली. नंतर कधीतरी आमच्याही तीर्थरुपांना आपल्याकडे TV नसल्याने आपले चिरंजीव गावात वरावरा हिंडत असतात असे वाटून असेल कि काय पण मग आमच्या पण घरी एकदाचा TV आला. मग त्याला लाकडाची केस काय, त्याच्या वर टाकायला कसला कसला काशिदा काढलेले फडके काय, काही विचारायची सोय नाही. मग मधूनच ते चित्र हलायला लागायचं. मग कौलावर चालून तो अजस्त्र अँटेना हलवणे, खालून कुणीतरी "आलं आलं" असं ओरडे पर्यंत मग ते फिरवत राहायचं. आणि सगळं करून खाली आलो कि वर परत एक कावळा जाऊन बसायचा कि खाली परत सगळे नेते, क्रिकेटर, सलमा सुलताना वगैरे जगच्या जागी नाचायला लागायच्या. पण त्यांना परत सरळ करायचा हट्ट फार मोठा होता. त्यावेळेला मला कावळ्यांचा फार राग यायचा. तर या TV  ने घरी बातम्या आणल्या. हिंदी भाषा आणली. माझं तर असं मत आहे कि जर तेव्हा TV आला नसता, तर मराठी लोकांना पण आज तामिळ्यांना जेवढी हिंदी येते तेवढीच हिंदी आली असती. तर हिंदी भाषेची ओळख करून गोडी लावल्या बद्दल खरे तर वासू काकाचे आणि TV चे आभार मानायला हवेत. मग पुढं या हिंदी भाषेनेच आपण केवढ्या मोठ्या देशाचे नागरिक आहोत याची जाणीव करून दिली. हि भाषा जिथे बोलली जाते तिथले नेते हे संपूर्ण देशावर कसे गारुड करतात याची ओळख व्हायला लागली. मग त्यातूनच पुढे व्ही पी सिंग, बुटासिंग, ग्यानी झैलसिंग, गुलाम नबी आझाद (हे गृहस्थ चंद्रशेखर आझाद यांचे नातेवाईक आहेत असेच मला वाटत आले होते. पण ते नातेवाईक नसून त्यांचे चंद्रशेखर आझादांशी नाते वाईट आहे हे नंतर TV पाहूनच कळत गेले.),  एन डी तिवारी, चंद्रशेखर, इंदर कुमार गुजराल, एल के अडवाणी हि नावे ऐकू यायला लागली. आणि मग व्ही पी सिंगांचे सरकार आले. त्यांची ती फरची टोपी, चष्मा, जयपुरी कोट काय रुबाबदार माणूस होता! त्यांच्या बातम्या, त्यांचे वर्तमान पत्रातले फोटो, सत्तेत येण्यासाठी आणि आल्यावर ती टिकवण्यासाठी त्यांची अद्वितीय धडपड, सगळेच अद्भुत वाटत होते. मग त्यांनी राखीव जागांचा मंडल आयोग लागू केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून तरुण मुले मुली आत्मदहन करायला लागली. हे सगळेच इतके दाहक होते कि कधी कधी हे सर्व आपण का पाहिले असेही वाटते. TV  ने हि सगळी परिस्थिती अगदी घरात आणून ठेवली. एकच चॅनेल लागायचे. त्यामुळे मुले बघताहेत म्हणून चॅनेल बदलायचा प्रश्न नव्हता. आणि भरीस भर म्हणून रिमोट नसल्याने प्रत्यक्ष उठून TV  बंद करायला लागायचा. त्यामुळे न जाणो TV  बंद करताना अँटेनाच्या वायर ला धक्का लागला तर परत TV लागायचाच  नाही या भयाने लोक एकदम रात्री सगळे कार्यक्रम संपल्यावर, मुंग्या दिसायला लागल्यावरच TV बंद करत असत. 

तेव्हा जे दिसेल ते सर्व बघणे हा एकच पर्याय होता. त्यामुळे इच्छा असो नसो हा सगळा देशी लोकशाहीचा अफलातून अविष्कार बघायला मिळाला. आज काय व्ही पी सिंग पंतप्रधान होते. मग त्यांनी कुणावर तरी कसले तरी कॅमेरे लावले. आणि मग त्यांचा पाठींबा गेला. मग अचानक त्यांच्या जागी चंद्रशेखर पंतप्रधान झाले. हे म्हणजे थोडेसे "ये ग साळू, दोघी लोळू" सारखं चाललं होतं. मग आम्ही गल्लीत एकेक पंतप्रधान आणि त्यांच्या बोलण्याची नक्कल करायचो. एवढंच नाही पण गोट्या खेळताना ज्याच्यावर तंगीचा डाव यायचा, त्याचा "व्ही पी सिंग" झाला असे म्हणण्या पर्यंत आमची मजल गेलेली होती. अहो हातात, पुठ्ठयाचे कव्हर घालून आणि गळ्यात म्हशीचे कासरे गुंडाळून, गल्लीतून अमिताभ बच्चन च्या "शहेनशहा" सारख्या फिरणाऱ्या आम्हाला TV ने राजकीय पात्रे पण आमच्या विश्वात आणून ठेवलीच होती.

त्याच्या नंतर परत एकदा आक्रीत झालं. एका सभेत राजीव गांधी गेले. अर्थात यावेळी TV ने चांगलेच बाळसे धरले होते. तीन तीन भाषांतून दिवसातून दोन तीन वेळा बातम्या मिळत होत्या. पण याचा परिणाम असेल कि काय पण ते जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत कुठल्याही दलाची डाळ अजिबात शिजली नाही. आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. मला हा माणूस विलक्षण आवडायचा. एक तर अत्यंत संयमी, धीरगंभीर असे व्यक्तिमत्व होते. आणि ते कुणाचे तरी पुत्र, नातू, पणतू होते म्हणून पंतप्रधान झालेले नव्हते. शिवाय त्यांना १३ भाषा अस्खलित बोलता यायच्या. त्यांच्या महाराष्ट्रातल्या सभेत ते कित्येक वेळेला मराठीत बोलायचे. TV वर ते पाहताना अचंबा वाटायचा. आता आमच्या ओठांवरती पण काळी रेघ दिसायला लागली होती. वर्गात कोण आधी दाढी करतो याची चुरस लागायला लागली. 

आणि त्याच वेळेला अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रश्नाची धग वाढत गेली. आडवाणीनी रथ यात्रा काढली. तिला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कि देश ढवळून निघाला. ती रथयात्रा  जनता दल "इ" का "फ" वाल्यानी बिहार मध्ये अडवली (हे जनता दलदलीतून नंतर मग म्हशीचा चारा खाल्ला म्हणून तुरुंगात जाऊन आले. काय चुकून खाल्ला कि मागचा जन्म आठवला देव जाणे!!). मग तर काय अजूनच प्रकरण चिघळले. देऊळ बांधायचा घोष चालूच होता. त्याच्यात "रथ सोडा" च्या आरोळ्या पण सामील झाल्या. आमच्या गावात एक रामाचे देऊळ होते. पण आमच्या पैकी कुणी फारसे तिकडे फिरकत नसे. आमच्या गावात रामापेक्षा दत्ताची आणि गणपतीची चलती होती. रामाच्या देवळाची फुटलेली कौले देखील बदलायला पैसे मिळत नसत. देवळाचे पुजारी राम नवमीच्या आधी गयावया करून वर्गणी गोळा करत. तेवढ्या एक दिवशी देऊळ गजबजून उठे. पुढे पुजारी जाणोत आणि खुद्द राम जाणोत.. पण अचानक लोक राम भक्त व्हायला लागले. कारसेवेच्या नावाखाली पैसे जमा होऊ लागले. आणि अचानक रेल्वे भरून भरून माणसे अयोध्येला जायला लागली. कल्याण सिंग, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, झालच तर कुठल्या कुठल्या साध्वी जोरजोरात भाषणे देऊ लागल्या. गल्लोगल्ली एकच ध्यास दिसू लागला "अयोध्या"! मी तर म्हणतो कि प्रत्यक्ष भगवान राम, राज्य करत असताना देखील भरतखंडाला अयोध्येची एवढी आस लागली नसेल. याच्या मध्ये जे प्रत्यक्ष कार सेवेला चालले होते किंवा जाऊन आले होते ते कार सेवेला न जाणाऱ्या लोकांकडे इतक्या तुच्छतेने पाहत कि त्या माणसाला त्याच्या पुरुषत्वाचीच  शंका यावी. आणि मग तो हि लगोलग "तिकीट कसे काढायचे" वगैरे चौकशी करायला लागायचा. गर्दीने जे करायचे ते सगळे पुढे केलेच. पण हे सगळं होत असताना दोन माणसं मात्र पहाडासारखी अविचल होती. एक होते देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि दुसरे अटलजी.. रावांचे एक समजू शकतो कि ते सत्तेत होते. पण अटलजींनी एकही भडकावू भाषण केले नाही. कसल्याही घोषणाही दिल्या नाहीत. उलट ते वेळोवेळी संयमाची आठवण करून देत होते. त्यांच्या पक्षातील काही लोकांना कदाचित ते आवडले नसेलही. पण माझ्या या नेत्याच्या चित्रात मात्र वेगळेच रंग भरत गेले. त्याच्या नंतरच्या प्रत्येक घटनेने या माणसा बद्दलचा माझा आदर वाढत गेला. मग त्यांच्या कवितांची पुस्तके साहित्य संमेलनातून विकत घेतली. एकाहून एक कविता. 

बाधाएँ आती है आये, 
धीऱे प्रलय की घोर घटाये 
पावों के नीचें अंगारे,
सीर पर बरसें यदि ज्वालाएं 
निज हाथों में हंसते हंसते,
आग लगाकर जलना होगा |  
कदम मिलाकर चलना होगा | 

हास्य रुदन में, तूफानों में, 
अमर असंख्यक बलिदानों में, 
उद्यानों में, वीरानों में ,
अपमानों में, सम्मानों में, 
उन्नत मस्तक, उभरा सीना 
पीड़ाओं में, पलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
उजियारों में, अंधकार में, 
कल कछार में, बीच धार में, 
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में, 
जीवन के शत शत आकर्षक,
अरमानो को दलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
 
काय स्थितप्रज्ञता आहे!! हातात निखारे असतील, पायाखाली निखारे असतील. मित्रा पण आपल्या साठी एकच मार्ग आहे चालत राहण्याचा.. आणि ते देखील हसत हसत.. कुणी तुझी निंदा करतील.. कुणी तुझी स्तुती करतील. अपमान होतील. सन्मान होतील. विजय होतील आणि पराजय हि होतील. पण मित्रा आपल्याला फक्त चालत राहायचं आहे आणि ते देखील ताठ मानेने आणि वाघा सारखी छाती काढून! 
 
हे एखादया राजकीय पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा नेता सांगतोय याच्यावर मुळात माझा विश्वासच बसेना. मग मी अजून वाचत गेलो. केवढा दुर्दम्य आत्मविश्वास आहे, केवढी अविचल वृत्ती आहे, केवढा ध्येयवाद आहे..प्रत्येक माणसाला जगताना एक तरी आदर्श लागत असतो. माझा तो शोध नुकताच संपला होता.
 
मंदिर बांधायचे ठरत नव्हते. पण मशीद मात्र पडली होती. मशीद पडली तेव्हा मला तरी वैयक्तिक रित्या थोडे वाईटच वाटले होते. काळाने केलेल्या सम्राट बाबराच्या नामुष्कीची आणि पराभवाची एक अस्सल निशाणी आपण आपल्या हातानी पुसून टाकली असे मला वाटले होते. मग त्यानंतर मुंबईच्या दंगली झाल्या. मग मुंबईचे 
बॉम्ब स्फोट झाले. 

हत्तीच्या टकरीमध्ये कुठला हत्ती जिंकतो ते माहित नाही. पण मोडलेल्या फांद्यावरची चिमण्यांची घरटी मात्र अधांतरी होतात हे मात्र नक्की. अनेक संसार मोडले. अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक चिमुकली अनाथ होऊन वाटेला लागली. काही कायमची आंधळी पांगळी झाली. युद्धच कशाला हवंय, पण मला तरी प्रत्येक संघर्षात आणि रक्तपाता मध्ये Tolstoy स्वत:च मरतो आहे असेच वाटत आले आहे. तर ते एक असो. 

पण त्याच्या नंतर देशात राजकीय चक्रे गतिमान झाली. आणि भारतीय जनतेने भारतीय जनता पक्षाला लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनविला. त्याचे नेते म्हणून अटलजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली. मला अतिशय आनंद झाला. एक अत्यंत हळव्या अशा कवी मनाचा, सर्वाना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मानसिकता असलेला, स्वच्छ प्रतिमेचा नेता, देशाचे नेतृत्व करणार होता. अतिशय मनापासून आनंद झाला होता. अगदी किती आनंद झाला होता हेच मोजायचे झाले, तर वाजपेयी पंतप्रधान होणार या खुशीत आम्ही आणि आमच्या समस्त रिकामटेकड्या मित्रानी Walchand Engineering College च्या बाहेरच्या चहा गाडीवाल्याची, त्याचं नाव "मंज्या" होतं, तर त्याची सगळी, म्हणजे सगळी, गेल्या सहा-आठ महिन्यांची उधारी, एका दमात फेडून टाकली होती. अतिशय आनंद!! आता देशात परत एकदा कायद्याचे राज्य येणार. कायद्यासमोर सर्व समान असणार. समाजातल्या सर्व घटकांना समान संधी मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन सरकार पाकिस्तान वर अणू हल्ला करून पाकिस्तान बेचिराख करणार. पण मग तसे झाले तर पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मॅच कशा होणार? असा पण एक प्रश्न चर्चेला येऊन गेलेला होता. या आणि अशा विचाराने आम्ही सातव्या अस्मान मध्ये मुक्कामाला गेलो होतो. वयच ते होतं. पण एक नक्की कि आमच्यातल्या प्रत्येकाला तो स्वत:च पंतप्रधान झाल्यासारखा भास होत होता. त्यात भरीस भर म्हणजे महाराष्ट्रात देखील वर्षानुवर्षे बसून बसून पुठ्ठ्यावर खुर्चीचे छाप उठलेल्या खादीतल्या पांढऱ्या बगळ्यांना देखील पब्लिक ने घरी बसवले होते. संघर्ष यात्रा, जोशी-मुंडे सरकार, प्रमोद महाजन, नितीन गडकरी.. वाह!! आता बारामतीत देखील सांगली सारखे लोड शेडींग मुळे दिवस दिवस दिवे जायला लागणार, या कल्पनेने तरअंगावर रोमांच आले होते. एन्रॉनचा प्रकल्प बुडवण्यासाठी मुंडे साहेब तो प्रकल्प समुद्रापर्यंत नेणार कसा? असे काही अनुत्तरित प्रश्न होते, नाही असं नाही. पण प्रत्येक दिवस म्हणजे असा उत्साहाने रसरसून भरूनच उगवत होता. सकाळी उठल्यावर काय करू आणि काय नको असे व्हायचे. एका युगाचा अंत झाला असे खात्रीने वाटत होते. 

पण हा आनंद एक आठवडाभरच टिकला. त्याच्या नंतर बातमी आली की जरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी देखील त्यांच्या कडे बहुमत सिद्ध करण्यासाठी लागतील इतके खासदार नाहीत. आता काय करता येईल हा मोठाच प्रश्न होता. तेवढ्यात कुणीतरी मंज्याचे पैसे द्यायची एवढी घाई करायची जरुरी नव्हती, असाही एक मुद्दा मांडला. पण हा घाव जिव्हारी लागलेल्या एका गणूने त्याला लगोलग, इथे राष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि तुला चहाच्या उधारीची काय पडली आहे अशा आशयाचा दम भरून विषय तिथेच संपवला. अटलजींचे सरकार कसे वाचवता येईल? याचा सगळ्यांनाच पेच पडला होता. कुणी कुणाशी फारसे बोलेना. तरी एक चांगले म्हणजे महाराष्ट्रातले युती सरकार भक्कम उभे होते. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार अशीच आमची भावना होती. त्यात बाळासाहेब काहीतरी जादू करतील असेही वाटायचे. आमच्यातल्या कुणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे आम्हाला काय वाटावे हे आमचे आम्हीच ठरवत असू. तर शेवटी एकदा तो दिवस आलाच ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटत होती. अटलजींनी राजीनामा दिला. जो तो आपल्या वाटेने निघून गेला. हाता तोंडाशी आलेली आणि एवढ्या महत्प्रयासाने मिळवलेली सत्ता अशी कसल्या तरी तांत्रिक कारणाने जावी हे म्हणजे पेपरात सगळी गणिते बरोबर सोडवून देखील केवळ नावात खाडाखोड केली म्हणून नापास होण्यासारखे होते. त्या रात्री मंज्याच्या गाडीवरची संसद निपचित झाली होती. 

त्याच्या नंतर दिल्लीत जो निर्लज्ज प्रकार झाला त्याने तर मला आज हि संताप येतो. अटलजींसारख्या एका देखण्या, सज्जन, ज्ञानी माणसाला, अत्यंत दुःख देऊन तुम्ही बाजूला काढलत. आणि आणलं कुणाला तर देवेगौडांना? तेव्हा पासून, न्यायासारखी सत्ता देखील आंधळी असते यावर आमचा अगदी गाढ विश्वास बसला. तो अजून उतरलेला नाही. मग पुढे बहुतेक त्या सकलविद्यामंडित, मदनरूप  अशा  देवेगौडांनी कुणालातरी रागवलेलं असावं. एक तर ते कानडी अप्पा. त्यांनी साधं "काय कस काय चाललंय?" असं जरी विचारलं कानडीतून, तरी समोरचा खजील होऊन टकामका बघायला लागतो. त्यात या बुवांना झोपेचं भारी वेड! जिथे जातील तिथे झोपत. दोन भाषणांच्या मध्ये तर ते झोपतच. पण एकाच भाषणाच्या दोन वाक्यात देखील झोपत असावेत असाही एक प्रवाद होता. तर अशा गृहस्थाबद्दल "बोलले असतील झोपेत एखाद दुसरा शब्द" म्हणून दुसर्यांनी तरी सोडून द्यायचं कीं नाही? तर नाही.. ते अडून बसले. जे झोपेत सुद्धा बोलणार नाहीत असे बुवा गादीवर बसवा म्हणाले. मग लागला इंदर कुमार गुजरालांचा नंबर. हे गृहस्थ काय बोलले हे अजूनही एक कोडंच आहे. किंबहुना ते पंतप्रधान असताना "देश चालवायला खरेच पंतप्रधान लागतात का? आणि नसले तर काय होईल?" यावरही एक परिसंवाद झालेला आठवतो आहे. 
त्यांची दाढी मात्र मला अतिशय आवडली होती. पण तशी दाढी आपण ठेवली तर मंज्याच्या गाडीवरचे "संसदीय सहयोगी" आपल्याला "गुजराल" म्हणतील या विचाराने ती ठेवता पण येईना. पण एकूण हा आमच्या साठी एक अत्यंत दुःखद असा कालखंड होता. मग ते इंदर कुमार पण गेले आणि मग सगळी लोकसभाच बरखास्त करून टाकली. पण या राजकारणी लोकांच्या "मला नको. तुला पण नको. घाल कुत्र्याला." या वृत्तीचा अतिशय संताप आला होता. देशाचा पैसा वापरून हा काय गोरखधंदा चालवला आहे असे आमच्या सारखेच देशातल्या जवळ जवळ प्रत्येकालाच वाटले असावे. जमेची बाब एवढीच होती कि अटलजी १३ दिवस का होईना देशाचे पंतप्रधान झालेले होते. घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में, कदम मिलाकर चलना होगा | 

आता नव्या निवडणुकाआल्या. परत एकदा प्रमोद महाजनांची तोफ चौफेर धडाडू लागली. ममता, समता, जयललिता सगळे एका झेंड्याखाली एक आले. "अटलजी आदी.. आता लै झाली खादी" असल्या घोषणा आम्ही पण तयार केल्या होत्या. अर्थात त्या दिल्या नाहीत हे हि खरेच आहे. पण निकाल लागला.  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत सगळे भुई सपाट झाले. आणि अटलजी परत एकदा पंतप्रधान झाले. मागच्या खेपेचा अनुभव लक्षात घेऊन पानपट्टीवाल्या स्वामीची उधारी लगोलग देण्याचा मोह सर्वानी मिळून टाळला होता. देशातल्या विरोधी पक्षांवरचा, त्यांच्या उद्दिष्ठावरचा विश्वास सर्वात कमी झालेला होता. कधी काय भानगडी करून परत अटलजीना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील याचा काही नेम नव्हता. अटलजी हे भारतीय मनाचा मानबिंदू झालेले होते. आणि त्यांना विरोध करणारे गुन्हेगार! शेवटी सहा महिन्यांनी सगळे व्यवस्थित चालले आहे असे बघून परत एकदा स्वामीची उधारी फेडण्यात आली. देर हैं अंधेर नही.. अयोध्या तो झाकी है,  काशी मथुरा बाकी हैं वगैरे नव्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. माझ्या पोटात गोळा आला होता. एक अयोध्येचं नाव काढलं तर इथं रामायणापेक्षा मोठं रामायण झालं. आता हे लोक काशी मथुरा म्हणू लागले. मनात म्हटले कि हे काही बरोबर नाही. आम्ही मनातच म्हणायचे. पण त्या बाईंच्या डोश्याच्या पिठात कुणी कणिक घातली काय ठाऊक, पण अचानक जयललितानी बोट बदलली. परत एकदा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आणि अटलजींना परत राजीनामा द्यावा लागला. 

मध्ये एकदा अटलजी पुण्याला आले होते. फर्गुसन कॉलेज मध्ये त्यांची सभा होती. त्यावेळी अपक्ष म्हणून कलमाडी उभे होते आणि त्यांना भाजप ने पाठिंबा दिला होता. मला फार वाईट वाटले होते. कारण एक तर दुसरे उमेदवार होते अविनाश धर्माधिकारी. आता अविनाश धर्माधिकारी यांच्या सारखा स्वच्छ चरित्राचा, तरुणाईचा आदर्श असा  उमेदवार असताना खरे तर भाजप ने त्यांनाच पाठिंबा द्यायला हवा होता असे मला अगदी मनापासून वाटले होते.पण तसे व्हायचे नव्हते. सभेला प्रचंड गर्दी होती. मैदान तुडुंब भरले होते. मुंगीला देखील शिरायला जागा नव्हती. जबरदस्त पोलीस बंदोबस्त होता. मला मिरजेची सभा आठवली. इतकी वर्षे निघून गेली. इतके पक्ष आले आणि गेले. इतक्या घटना झाल्या. इतके नेते होऊन गेले. प्रश्न बदलले. लोकांचे राहणीमान बदलले. पण गर्दीने अटलजींची पाठ कधी सोडलीच नाही. 

रिवाजा प्रमाणे कलमाडींनी त्यांच्या सुस्पष्ट मराठी (?) मध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह "घडियाल" म्हणून सांगितले. त्याच्यावर अटलजींनी त्यांना सावरून घेत, "मंडळी, हि हिंदी मधली घडियाल नाही.. मराठी मधले घड्याळ" म्हणून सांगितले आणि एकाच हशा पिकला. त्यांच्या भाषणात त्यांनी अविनाश धर्माधिकारी यांना देखील अत्यंत सन्मानाने त्यांचा उल्लेख करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. आपण एकाच ध्येयासाठी काम करतो आहोत. मग वेगवेगळे आणि एकमेकांशी लढण्यात काय हशील आहे असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता.अर्थात झालेही तसेच.. तेव्हा कलमाडीही पडले आणि धर्माधिकारी सुद्धा!!  मोठ्यांचं मोठेपण हे दुसऱ्यांना मान देण्यात असतं हे अटलजींकडून शिकावं. हास्य रुदन में, तूफानों में, कदम मिलाकर चलना होगा | 

पण मेलं कोंबडं जाळाला अजिबात भीत नाही. नंतर परत निवडणुका झाल्या आणि या वेळेला मात्र स्पष्ट बहुमत घेऊन अटलजी पंतप्रधान झाले. या सगळ्या मनस्ताप देणाऱ्या प्रकारात त्यांची लोकसभेतील भाषणे TV वर पाहाणे  हा एक अत्यंत नितांत सुंदर असा अनुभव असे. ते त्यांच्या विरोधकांना देखील इतक्या आर्ततेने, मैत्रीच्या नात्याने  विनवणी करत आणि न्यायाची आणि सत्याची बाजू उचलून धरायची विनंती करत कि आमच्या तर डोळ्यात पाणी यायचे. आणि असले जबरदस्त मुद्देसूद भाषण ऐकून सुद्धा त्याचा स्वतः:वर काहीही परिणाम होऊ न देणारे समोर बसलेले काँग्रेस आणि  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे ची मंडळी अत्यंत रडीचा डाव खेळत आहेत याची खात्रीच पटली होती. मला तर वाटतंय अटलजी या प्रत्येक पराभवाच्या वेळेला खचून न जाता उलट कणभर जास्त उत्साहाने उसळून येत होते. उन्नत मस्तक, उभरा सीना,पीड़ाओं में, पलना होगा । कदम मिलाकर चलना होगा |     

एवढा सगळा खटाटोप यांनी का केला याचं उत्तर पुढच्या पाच वर्षात मिळालं. पोखरण मध्ये दुसरी अणुचाचणी करून राष्ट्राची शस्त्रसिद्धता सिद्ध केली. अशी तुलना करू नये पण अमेरिकेच्या उपग्रहांना चकवून हे काम घडवून आणणं हे अधिक कठीण काम होतं. एका बाजूला दिल्ली लाहोर बस सेवा सुरु करून एखाद्या पौराणिक योध्याच्या दिलदार वृत्तीनं चिवट आणि जुनाट शत्रूलाही आपलंसं केलं आणि पुढं त्याच शत्रूने आगळीक करताच त्याचा सामना देखील एखाद्या कसलेल्या सेनापतीच्या करारी पणाने केला. वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा!!
देशात वेगवान रस्त्याचं जाळं विणायला सुरुवात केली. देशातल्या नद्या एकमेकींना जोडायला सुरुवात केली. देशाला काय काय हवंय याचा आराखडा तयार केला. आपत्ती निवारणासाठी देश पातळी वर नवी यंत्रणा उभी केली. त्यांच्याच काळात गुजरातेत दंगे झाले. त्यावेळी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावायला देखील त्यांनी कसलाही अनमान केला नाही. नंतर मग परत एकदा सत्ता बदल झाला. मग प्रमोद जी पण गेले आणि आता अटलजी पण गेले. मंज्याच्या गाड्यावरची संसद आज पोरकी झाली. 
    
अटलजींच्या जनतेवर आणि जनतेचा अटलजींवर एक अतूट विश्वास होता. सन्मान आणि विश्वास या गोष्टी कधी मागून मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. जपाव्या लागतात. त्यासाठी कुठल्या पक्षाची, धर्माची आणि भाषेची  बांधिलकी लागत नाही. किंवा कुठल्या हाय कमांडचा आदेश पण लागत नाही. अशा नेत्याला एकाच वेळी देशाचं पितृत्व घ्यावं लागतं. एखादी तुरट औषधाची मात्रा एखाद्या वेळेला द्यावी लागते. एखाद्या वेळेला स्वप्नांची दुलई द्यावी लागते. कधी बागुलबुवाची तर कधी राजा राणीची गोष्ट सांगावी लागते. काळीज आभाळाएवढं करून कधी खोटी खोटी सावली देखील करावी लागते. आणि हे सगळं करताना स्वत:ची दमलेली पावलं आणि डोळ्यातलं पाणी आपल्यापाशीच ठेवून, कुंतीचा कर्ण होऊन जगावं लागतं. आपल्याच मनाशी खूप खूप बोलावं लागतं श्वास संपेपर्यंत. 

अटलजी म्हटले कि मला पुरुषसुक्तात वर्णन केलेल्या पुरुचे रूप आठवते. कधीकाळी आकाशाला भिडलेल्या धुळीच्या लोटा मधून उमटलेली हि प्रतिमा, हि खरे तर पुरुषोत्तमाची आहे हे स्पष्ट उमटू लागले आहे. त्याचे सहस्त्रशीर्ष, सहस्त्र अक्ष, ज्याने जमीन, समुद्र, आकाश आणि अंतरिक्ष व्यापला आहे आणि तरी देखील जो दशांगुळे शिल्लकच उरलेला आहे. या पुरुनेच या विश्वाची निर्मिती केली आहे. तरी देखील या विश्वाच्या समष्टीसाठी स्वत:च्या पूर्णाहुतीसाठी त्याने स्वत:लाच यद्नवेदीला बांधून घेतले आहे.
या पुरुषोत्तमाचे सामर्थ्य, महाकाय अस्तित्व आणि ते सर्वस्व वाटून टाकण्याची त्याची मनीषा आणि संयम पाहून एकच म्हणावेसे वाटते, 

वेदा॒हमे॒तं पुरु॑षं म॒हान्तम्॓ । आ॒दि॒त्यव॑र्णं॒ तम॑सः॒ पर॑स्तात् ।
तमे॒वं वि॒द्वान॒मृत॑ इ॒ह भ॑वति । नान्यः पन्था॑ विद्य॒ते‌உय॑नाय ॥

(अर्थ - मी अशा एका पुरुषाला पाहिलं आहे कि ज्याचं तेज सूर्यापेक्षा किंचित जास्तच आहे आणि हेच तेज घेऊन ज्याने अज्ञान आणि अनास्थेचा शेवट केला आहे.  या अशा तेज:पुंज पुरुषोत्तमाला केवळ ओळखण्यामुळेच मला अमर्त्य असे ज्ञान झाले आहे. आता मला मोक्षासाठी दुसरा कोणता मार्ग किंवा धर्म किंवा शिकवणीची कसलीही गरज उरलेली नाही..)

लेखनसीमा     
~ निखिल कुलकर्णी   

Monday, June 25, 2018

मेपल

मेपल

~ निखिल कुलकर्णी

Listen to "Maple" here

आज पियोरातल्या आमच्या मित्राने आमच्या पियोरियातल्या घराचे काही फोटो पाठवले. पियोरियातून काहीही आलं, एखादा फोन, ईमेल किंवा अगदी गेलाबाजार पियोरिया काउंटीचं टॅक्स भरायचं स्मरणपत्र जरी आलं, तरी मला म्हणजे अगदी त्रासलेल्या सासुरवाशीणीला माहेरगावचं माणूस आल्यासारखं वाटत आलेलं आहे. माझ्यासारख्या “मारुती छाप” माणसाला हळवं करणाऱ्या ज्या काही थोड्याच गोष्टी आहेत त्यातली पियोरीया ही एक आहे.
वास्तविक माझा जन्म आणि आयुष्यातली जवळ जवळ पंचवीस एक वर्षे तर भारतातच गेली. त्यामुळे भारतातल्या एखाद्या गावाविषयी अशी ओढ वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. मिरज, सांगली, फलटण, पुणे, बारामती, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी या ना त्या कारणाने छोट्या मोठ्या कालावधीसाठी राहण्याचा योग आलेला आहे. त्याने यातल्या एखाद्या गावाशी भावनिक बंध जुळलेले समजण्यासारखे आहे. त्यातल्या त्यात मिरजेच्या तर जवळजवळ प्रत्येक घराशी काहीना काही आठवण चिकटलेली आहे. कित्येक घरातले खाष्ट आजोबा, नाहीतर कशावर तरी जन्माच्या रागावून बसलेल्या, एकेकट्या म्हाताऱ्या, त्यांना दुपारच्या वेळेत बारीकशी सुद्धा झोप लागू नये यासाठी आमच्याच वयातल्या, आमच्या गुरु आणि गुरूबंधूंना सोबत घेऊन केलेल्या नानाविध क्लृप्त्या, चिंच, वड, पिंपळ अशा वेगवेगळ्या झाडावर चढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि एका झाडावर चढून, दोन तीन म्हाताऱ्यांना यथेच्छ त्रास देऊन, दुसऱ्या भलत्याच झाडावरून खाली उतरण्याचे आकाशमार्ग, मर्कटमार्ग म्हणू हवे तर, वगैरे आठवले की हसू येते. आणि एक एक करत एकेक आजी आजोबा गेल्याच्या बातम्या कळल्या की वाईटही वाटतं. कधीकळी माणसांनी गजबजलेले वाडे रिकामे झाल्याची कल्पनाच सहन होत नाही. मग मी मिरजेला जायचं टाळत राहतो.
सांगलीची वेगळीच तऱ्हा.. या गावातल्या सगळ्या आठवणी तरूण!! सकाळी पाच ते सहा आणि नंतर आठ ते नऊ अशा दोन शिकवण्यांच्या मधल्या वेळेत, कृष्णेच्या काठावर, शाळेतल्या ड तुकडीतल्या मुलांबरोबर केलेला अजस्त्र व्यायाम.. म्हणजे ती मंडळी व्यायाम करत आणि आम्ही नुसते बाजूला उभे राहून त्यांच्या कडे बघून उगाच खूष होत असू. म्हणजे अगदीच काही व्यायाम केला नाही असे नाही. पण त्यांच्या दहा जोरा मागे आपण एक जोर मारावा आणि उरलेल्या वेळी त्यांना प्रोत्साहन द्यावे असा प्रकार!! शाम सोनावणे, राजा मुंढे, गड्डया पवार वगैरे मंडळी म्हणजे दृष्ट लागावी अशी एकेकाची शरीरयष्टी. यातल्या शाम्याने तर पुढे, न थांबतां सलग दहा हजार जोर मारून, जगात सगळ्यात जास्त जोर मारायचं जागतिक रेकाॅर्ड केलं. त्याची गिनीज बुकात नोंद देखील झाली. एकूण मित्रसंपदा अफाट. एकतर अ तुकडीतला मुलगा, अभ्यास वगैरे असल्या क्षुल्लक बाबी सोडून, आपल्या बरोबर व्यायामाला येतो याचेच त्यांना कौतुक वाटत असणार. काय असेल ते असो. ती मंडळी पण “या पैलवान. काल दिसला नाही तालमीवर!” किंवा “परवा ऐकला तुमचा रेडीओ वरचा प्रोग्राम” वगैरे विचारत. वाह वाह, अजून काय हवे होते महाराजा!! आपण अ तुकडीत असून आपल्याला लोक “पैलवान” म्हणतात हा एक अत्यंत सुखद आणि उगाचच शंभर पटीनं आत्मविश्वास वाढवणारा असा अनुभव असायचा.
नंतर मग संध्याकाळी मारुती रोड वरची चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे पाहावीत. त्यातल्या एखादीचा भाऊ कुठल्या तालमीत जातो त्याचा माग काढून ठेवावा. अशा सगळ्या अतिशय छान आणि चिरतरुण आठवणी सांगलीच्या. पण त्यातलीच काही स्थळे आमच्याच काही अ आणि ब तुकडीतल्या ढोंगी मित्रांनी आमच्या डोळ्यादेखत फूस लावून पळवून नेलेली होती. त्यामुळे न जाणो, सांगलीत गेल्यावर तिच्या त्या फसव्या राव्याची सावली हातात घेऊन ती दिसलीच तर तिचे काजळात बुडालेले चंद्र आपल्याला पाहणे जमेल का? अशा अवेळीच दाटून आलेल्या अंधाऱ्या विचाराने मी सहसा सांगलीला जायचं देखील टाळत आलेला आहे..
इतर गावांचे योग तसे अगदीच जुजबी. नातेवाईक होते म्हणून नाते होते अशातला काहीसा प्रकार. औरंगाबादमधली असंख्य थडगी आणि बुरूज, कोल्हापूरातला जुना राजवाडा आणि जाधवांची भेळ, बारामतीतली नवी MIDC आणि तिथले दृष्ट लागावी असे स्वप्नील रस्ते, फलटणातला “टिप्या” नावाचा कुत्रा असल्या छोट्या छोट्या आठवणी सोडल्या तर काही फारसं जोडून ठेवेल असं काही नाही. पुण्याची तर तऱ्हाच न्यारी. काहीएक वर्षे इथल्या समुद्रातला एक अव्यक्त थेंब होऊन दररोज गर्दीच्या काठाला धडकत राहीलो आणि एक दिवशी एका लाटेने समुद्रातून हाकलून लावले. यापेक्षा जास्त काही आठवत नाही. आणि ज्या गावात महत्वाकांक्षे शिवाय दुसरं काहीच जोपासल नाही, त्या गावाविषयी यापेक्षा जास्त काही आठवूही नये.
अशा पुण्यप्रभावातून तावून सुलाखून निघालेल्या या थेंबाने मग देशाबाहेरची अनेक गावे पाहीली. न्यूयाॅर्क, शिकागो, डेट्राॅइट, मिनीयापोलीस, अटलांटा, डॅलस, ह्युस्टन, लाॅस एंजेलिस, फिनिक्स, सॅन होजे, सॅन फ्रान्सिस्को, एकाहून एक दिपवून टाकणारी श्रीमंत गावे.. तिथल्या उंचच्या उंच इमारती, लांबच लांब सरळसोट विस्तीर्ण आणि वेगवान रस्ते, भव्य पटांगणे, नद्यांवरचे अजस्त्र पुल, सगळंच दिपवून टाकणारं! प्रत्येक गावाची तऱ्हा न्यारी. ही गावे रात्री एखाद्या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यासारखी दिसतात आणि दिवसा एखाद्या उत्तुंग शिल्पासारखी!! प्रत्येक गावाला स्वत:चं असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक इमारतीला तिचा इतिहास आहे. बांधणाऱ्या अभियंत्यांचं कसब लेवून एकेक भींत वर्षानुवर्षे दिमाखात उभी आहे. यातल्या एखाद्या इमारतीतल्या चाळीसाव्या मजल्यावरून खालून वाहणाऱ्या रस्त्यांवरच्या गाड्या पाहणे आणि किनाऱ्यावर बसून दुरवर तरंगणारी जहाजे पाहणे हे दोन्ही अनुभव मला तरी सारखेच वाटत आलेले आहेत. कारण या दोन्ही वेळी आपण गर्दीत असून देखील गर्दीत नसल्याचा आभास हा सारखाच आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचं आकर्षण घेवूनच आम्ही “जगाची बौद्धीक राजधानी” सोडली होती. तेव्हा लाॅस एंजेलिस मधे होतो आणि अचानक साहेबाचा फोन आला की दोन तीन आठवड्यांसाठी पियोरियाला जायचे आहे म्हणून. ह्या गावाचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते. नकाशात नेमके कुठं आहे ते देखील नीट सापडले नाही. मग ते अमेरिकाच्या बर्फाळ भागांत असून तिथं जायला थेट विमान नसल्याने भयंकर वेळ लागतो असे कळले. तेव्हा “हमारे दो” नसल्याने कुठेही जायची अडचण अशी नव्हती. तरी नविन गाव, अप्रचलित ठिकाण, बर्फ या सगळ्या शंका होत्याच. तरी मी आपला “दोन तीन आठवड्यांच्या” भरवशावर हो म्हणालो होतो.
लाॅस एंजेलिस सोडले त्या दिवशी सकाळी विमानतळावर तुफान गर्दी होती. सुरक्षेच्या रांगेत थांबून राहीलो आणि दहाचे विमान चुकले. मग शेवटी काहीतरी करून दुपारी चारचे विमान मिळाले. त्याने शिकागोत पोचायला रात्रीचे बारा वाजले. मग आता तिथून रात्री पियोरियाला जायला टॅक्सी केली. त्यालाही काही माहिती नाही आणि आम्हालाही काही माहिती नाही. त्याला वाटले, असेल इथंच कुठेतरी पियोरिया म्हणून. आमचा तर पत्ताच गुल झालेला होता. टॅक्सीत झोपायला तरी मिळेल या विचाराने मी बसून होतो. हळू हळू शिकागोमधून बाहेर पडलो. रस्त्यावरचे दिवे संपत गेले. आणि मग महाकाय अंधारात टॅक्सी एकटीच चालू लागली. आमच्या शिवाय त्या अखंड रस्त्यावर कोणीही नव्हते. लांब दूरवर कुठेतरी मिणमिणते दिवे दिसायचे आणि परत अदृष्य व्हायचे. बराच वेळ झाला तरी हा प्रकार चालूच होता. मला तर ते मरतुकडे दिवे पाहून कसली अवदसा आठवली असे वाटायला लागले होते. मजल दर मजल थांबत आणि पत्ता शोधत शेवटी सकाळी चार वाजता पियोरियात पोचलो. ते झोपलेलं, “रुकडी छाप” गाव पाहून भयंकर अपेक्षाभंग झालेलाच होता. पण त्या टॅक्सी वाल्याचे बील ऐकून मी भूतो न भविष्यति हादरलो होतो. त्याने चारशे डाॅलर मागितले. जेव्हा महिन्याचा पगार चार हजार डाॅलर होता तेव्हा चारशे डाॅलरची टॅक्सी म्हणजे सायकलवरून घरोघरी जावून, सोलापूरी चादरी वगैरे विकून महिन्याकाठी शंभरेक रुपये मिळवणाऱ्या इसमाने, “हाॅटेल ताज रेसिडेन्सी” मध्ये जावून तीस रुपयाचा चहा पिल्यासारखेच होते. काही इलाज नव्हता. “रात्र के समय तुम ऐसे कैसे पैसे मांग सकते हो?” अशा आशयाचं इंग्रजी वाक्य मी त्याच्यावर फेकून बघीतलं. पण त्या घटोत्कचावर कसलाही परिणाम झाला नाही. शेवटी सगळे खिसे, पर्स, बॅगा सगळे उघडून अक्षरश: वेचून वेचून एकूण तीनशे नव्वद डाॅलर त्याला दिले. आणि “when you come to India, you will have a friend there in our form” वगैरे थापा मारून त्याला बिदा केला. पण हे करताना या राधेयाची तीनशे नव्वद डाॅलर मधे साठलेली अमोघ शक्ती संपून गेली होती हे वेगळे सांगायला नकोच.
सकाळचे पाच वाजले. सात वाजता मिटींग होती. मग न झोपता तसाच तयार झालो. पण आता काॅफी साठी देखील डाॅलर नव्हता. साहेबाला फोन केला की आपण त्याच्या गाडीत जरा मिटींगची तयारी करू वगैरे. मग तो मला घ्यायला आला. आणि मग पहिला दिवस साजरा झाला. पियोरियाने केलेले जंगी स्वागत जन्मभर लक्षात राहील असे होते.
पण हा एक दिवस सोडला तर या गावाने आमच्यावर फार प्रेम केले. “दोन तीन आठवडे” म्हणून आलेले आम्ही नंतर तब्बल नऊ वर्षे या गावात राहीलो यातच सगळे आले. बरे वाईट सगळेच अनुभव होते. पण या गावात झोप छान लागली. इथे उंच इमारती नव्हत्या. भले मोठे रस्ते नव्हते. गजबजलेली डाऊनटाऊन नव्हती. पण गाव चांगलं होतं. या गावात परत एकदा मी माणसात मिसळलो. अगदी सांगली मिरजेत असल्यासारखा!! खूप माणसं भेटली. मराठी मंडळ काढलं. मुलांसाठी मराठी शाळा चालवली. मुलांची नाटके बसवली. खूप कार्यक्रम केले. तुकारामांची गाथा अखंड वाचून त्याच्यावर एक दीड तासाचा कीर्तनासारखा कार्यक्रम केला. नाट्यसंगीतावर एक विवेचनात्मक कार्यक्रम केला. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या “वऱ्हाड निघालय लंडनला” चे प्रयोग केले. जुन्या कवितांचे कविसंम्मेलन केले. असंख्य गोष्टी केल्या. कुणाला आवडल्या. कुणाला कदाचित काही गोष्टी आवडल्या नसतीलही. पण मी माझ्यासाठी माझ्यापुरता या गावात अगदी भरभरून जगलो.
याचं गावात “हम दो” चे “हम दो हमारे दो” झाले. मग आर्चिसच्या पहिल्या वाढदिवशी हे घर घेतलं होतं. अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण तेव्हा पियोरीयात कॅटरपिलरचे एम्प्लाॅई असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जायचे. आणि तेव्हा आम्ही दोघेही साधे कन्सल्टंट होतो. मग “कन्सल्टंटनी घर घ्यावे का?” (म्हणजे इथे “कन्सल्टंट” हे “भिकार कन्सल्टंट” असे वाचावे.)
यांवर काही घरात रात्रीची चर्चा सत्रे झाल्याचे आम्हास ठाऊक होते. पण मेलं कोंबडं जाळाला भीत नाही. पहिल्याच दिवशी चारशे रुपयांची टॅक्सी केलेली असल्याने आमची पैशाची आणि ते संपल्याची भीती तेव्हाच संपलेली होती. अर्थात गंमत अशी की अशा भिकार कन्सल्टंटनी घर घेतलेले बघून नंतर बऱ्याच, जवळ जवळ निवृत्तीला पोचलेल्या (ही ज्ञानोबांची निवृत्ती नव्हे!!) आणि वैचारिक गुंत्यात अडकलेल्या एंप्लाॅईंनी पटापट घरे घेऊन टाकली. होऊ नयेत पण कितीही म्हटले तरी अशा गोष्टीनी मनाला गुदगुल्या व्हायच्या त्या होतातच.
तर अशा कन्सल्टंटच्या घरात आता झाड लावायचे ठरवले. इतर लोकांनी कुठून कुठून तीनशे चारशे डाॅलर देवून झाडे विकत आणून लावली. ती झाडे आणली तेव्हाच तीन चार फुटांची होती. चांगली खात्यापित्या घरची वाटायची. आम्ही थोडा वेगळा विचार केला. म्हटले कुठेतरी दुसरीकडे मोठे वाढलेले झाड उपटून आणण्यापेक्षा एखादे रोपटे लावून बघू. एका कॅनाॅलच्या शेजारी एक झाडांचे गचपण होते. अतिशय अंधारलेल्या जागेत मेपलची दोन चार रोपे जीवाचा आटापीटा करून सूर्याच्या शोधात वेडी वाकडी वाट काढत वाढत होती. ती अशा ठिकाणी उगवली होती की त्यांना सूर्य दिसणे अवघडच नाही तर अशक्य होते. तरी त्यांच्यातल्या कोंबाचा संघर्ष अलौकिक होता. मी काहीही विचार न करता त्यातले एक रोप हळूवार पणे उपटले आणि घरी घेवून आलो. तसेही त्या गचपणातल्या अंधारात ते बोटभर अस्तित्व मेलंही असतं आपल्याशीच कुढत. पण आता मी त्याला उपटून आणल्याने त्याच्या प्रत्येक श्वासाचा विश्वस्त मी झालो होतो. त्याला घरी आणून एका स्वच्छ, मोकळ्या जागी लावले. आर्चिस रोज पाणी घालायची. पण का कुणास ठाऊक त्याची पाने गळायला लागली. जन्मापासून अंधारात राहीलेल्या त्या जीवाला दिवसभराचा स्वच्छ सूर्यप्रकाश सहनच होईना. त्याच्या पानांना विचित्र भोकं पडायला लागली. आर्चिसच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे सुचायचे नाही. मी आपलं काहीतरी सांगून तिची समजूत काढायचो. पण एकामागोमाग एकेक पाने गळून गेली. शेवटचे पान गळाले तेव्हा तर मला फारच अपराधी वाटलं. बाहेर उन्हात त्या रोपाची काडी तशीच एकटी उभी होती. शेवटी काहीतरी सांगायचे म्हणून मी आर्चिसला रविंद्रनाथांची शांतिनिकेतनाची गोष्ट सांगितली. मग ती पण त्या काडीपाशी जावून बोलत बसायला लागली. “लवकर लवकर मोठा हो” म्हणायची. त्याला हात लावून “I love you!!” म्हणायची. प्रत्येक क्षणाला माझी घुसमट वाढत होती. मला बऱ्याच जणांनी सांगितले की ते झाड काही परत येणार नाही म्हणून. पण आर्चिसचा भाबडेपणा मला ते काढू देईना. आणि तिची समजूत कशी काढावी तेही कळेना.
आणि शेवटी एक दिवशी त्या काडीवर एक कोवळी फुट फुटताना दिसायला लागली. आणि मला आभाळ थोडे झाले. रोपाला कोंब येणे ही काही विशेष बाब नाही. पण त्या रोपाचा कोंब हा रविंद्रांच्या अलौकिक अस्तित्वाची प्रचिती होता की आर्चिसच्या असीम भाबडेपणाला आलेलं यश होतं हे सांगणे अवघड आहे.
आज दहा वर्षे झाली तो मेपल अगणित हिरव्यागार पानानी डवरला आहे. खरे तर आता तो घरापेक्षाही उंच झाला आहे. आता त्याला त्याचे अस्तित्व आहे. व्यक्तित्व आहे. त्याची मुळे कुठे कुठे खोल गेलेली आहेत. त्यांना देखील मायेचे असीम ओलावे सापडले आहेत. एका बाजूला वसुधेला घट्ट धरून ठेवत तो असंख्य डोळ्यांनी आकाशातल्या ताऱ्यांना त्याच्या अस्तित्वाचा डौल समजावून सांगतो आहे. आपल्याच पानातून ऐकू येणारं रविंद्रसंगीत ऐकून तृप्त होतो आहे. अंधारलेल्या गचपणात प्रकाशाच्या शोधात त्याच्या बुंध्याच्या तळाशी झालेली थोडी वेडीवाकडी वाढ सोडली तर गतजन्माची अशी कोणतीच खूण आता त्याच्या अंगावर शिल्लक नाही.
आम्हाला पियोरिया सोडून देखील पाच वर्षे होवून गेली आहेत. त्याला आता आमची काही गरज देखील वाटत नसेल कदाचित. आम्हालाच वाटत राहते जावू कधीतरी पियोरियाला म्हणून. आता ते घर आम्ही त्याच्यासाठीच ठेवले आहे.

स भूमिं विश्वतो वृत्वा। अत्यतिष्ठद्दशांगुलम ।।


~निखिल कुलकर्णी

Monday, April 30, 2018

अनंत यात्रा

आपल्याच रंगात रंगावं, सृष्टीनं दिलेलं दोन थेंबांचं दान पिऊन, फुलून यावं रखरखीत वाळूत सुद्धा, आपले इवलेसे पाय रोवून, खाऱ्या बोचऱ्या वाऱ्यात, लाटांच्या भीषण रौद्र खर्जात देखिल, उमलून यावं कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या उषेच्या अमोघ किरणासारखं, आसमंत भेदत शिरावं अनंताच्या गर्तेत, आपल्याशीच संवाद करत, वाटेत भेटेल त्या अस्तित्वाच्या प्रत्येक जड कणाला आपल्याच रंगाचा दुबोटी गंध लावत, उजळून टाकावीत त्यांची ललाटे, टिपावे क्षणिक स्मित आणि जातच रहावे परत एकदा अनादी अनंताकडे, अलगद, हळूवार पंखाला पराग चिकटलेल्या फुलपाखरासारखे.. 

करू दे त्या मग्रूर सागराला त्याच्या उन्मत्त लाटांचा हिशेब..मोजू देत त्या नेभळत कड्यांना त्यांच्याच वाळूंचे डोंगर..वाहू देत त्या गर्विष्ठ वाऱ्याला त्याच्या सामर्थ्याची प्रौढी मिरवत..

नेल्या दोन चार जांभळ्या पाकळ्या त्याने त्याच्या हिडीस खांद्यावरून तरी पडतीलच कधीतरी परत पृथेच्याच मायेने तिच्याच पार्थिवावर तिच्या अनंत यात्रेसाठी..


~ निखिल कुलकर्णी

Monday, April 16, 2018

प्रत्येकाचा क्षण

गेल्या वसंताच्या आठवणीने कष्टी होऊन, अविरत निश्चलतेनं, चैतन्यहीन होऊन, आपल्याशीच कुढत बसलेल्या, पायाखाली स्मशानातील भुतांच्या गुंतवळी प्रमाणे अविरत घुटमळत राहणाऱ्या अतीशीत अशा पयाचा मनस्वी तिटकारा येवून, निळ्याशार आकाशातून, खाली पृथेचा उत्सव पाहात उभ्या असलेल्या, बघ्या वृत्तीच्या जलधींना, आपल्या असंख्य पिंजारलेल्या हातांनी लहलहा करून हुसकावून देवून, आपल्या अशा निर्वस्त्र, बेढब आणि कुरूप अशा अस्तित्वाकडे कुणीही पाहू देखिल नये अशा इर्षेने, एखाद्या क्रुद्ध आणि शापीत समंधासारख्या संत्रस्त झालेल्या, तळ्याकाठच्या या आत्ममग्न वृक्षाला कल्पना तरी आहे का की, त्याच्याच पायाशी, शिशिराच्या कडाक्यात देखिल हिरवट खुरट गवताच्या पात्यांवर सूर्याचे कण होऊन बहरलेली ही पिवळसर फुले, जणू त्यांच्या स्वर्गीय पाकळ्यांच्या क्षणिक अस्तित्वाचा सोहळा अनाहूतपणे साजरा करत, वाऱ्याच्या प्रत्येक तरंगाला सोबतीला घेत, स्वत:ला आकाशाच्या कुशीत आश्वस्त होऊन मनसोक्त झोकून देत आहेत? की ज्या तळ्याच्या थेंबांवर ही इवलीशी सृजनाची प्रतिके उमटली, त्या थेंबांना सूर्याकडून उसने घेतलेले हळदीचे वाण देवून, आपल्या जडत्वहीन बहराचे शिंपण घालत, कृतकृत्य होऊन आलिंगन देत आहेत?

प्रत्येक क्षण तर वेगळा आहेच. पण कदाचित प्रत्येकाचा क्षण हा त्याहूनही वेगळा आहे..

~ निखिल कुलकर्णी



सहवासी

मंतरलेल्या प्रत्येक सकाळी, नव्या लाटा घेवून जुनेच प्रश्न परत परत विचारत का बसलेला असतोस त्याच मुक्या आकाशाला, कधीतरी बोलेल आकाश तुझ्याशी तुझ्या अस्तित्वाविषयी असे वाटून? खरेतर प्रत्येकाचेच अस्तित्व स्वत:ला निर्गुण करुणे मधे शोधत बसलेले असते अहोरात्र, वाळूच्या एकेकट्या कणांसारखे, अथांग अपरंपार निष्ठेने...एवढी साधी गोष्ट तुला कळू नये?

एकेक थेंब मिळून झालेला अजस्त्र थेंब ही तुझ्या कुरूप अस्तित्वाची ओळख तुला पुरेशी नाही का? आणि काय करायचे आहे तुला तुझ्या जन्माचे गुह्य ऐकून? अरे त्या निराकार आकाशा सारखा तुझा जन्म देखिल अपरंपार असहायतेतूनच झाला असेल कदाचित. तुझ्या जन्मासाठी कुणीही कसलाही यज्ञ केला नसेल किंवा तुझ्या जन्माचा कुणी कुठेही उत्सव देखिल साजरा केलेला नसेल. कदाचित पृथेचा लाडका चंद्र जेव्हा रागाच्या भरात तिला सोडून कायमचा निघून गेला असेल त्या दिवशी अशाच ब्राम्हमुहूर्तावर ती रडली असेल एकटीच काळ्या कुट्ट अंधारात, गोठ्यातल्या वासरू हरवलेल्या गाई सारखी, सूर्याची चाहूल लागण्यापूर्वी, ताऱ्यांच्या संगतीत रमलेल्या आपल्या लाडक्या कोरीतल्या चंद्राकडे पहात आणि भरली असेल तिची रिती ओटी तिच्याच अथांग अश्रुंनी..या अपार दु:खाची आठवण म्हणून वागवत असेल ती तुला तिच्या अंगाखांद्यावर अपार करुणेने. त्याची थोडी तरी आठवण ठेव कृतघ्ना आणि थांबव ते भयंकर निष्ठूर आसूड...सहवासी हो, प्रगल्भ हो, प्रशांत हो..आकाशासारखा..

~निखिल कुलकर्णी


दैवी: स्वस्तिरस्तुन:

आकाशाशी स्पृहा करणाऱ्या काळ्या कभिन्न कड्यावरच्या एकुटक्या धारेतल्या उगमापासून, ते सहस्त्र भुजांनी अजस्र सागराला उत्कट आलिंगन देणारी, शीतोष्ण पयाच्या अगणित बिंदूंनी काढलेली, अनेकानेक गहीवरांनी, उन्मादांनी, प्रपातांनी आणि कल्लोळांनी काठोकाठ भरलेली एक रेघ. ही रेघ त्यातल्या पाण्याइतकीच अखंड होऊन, उगमा इतकाच उत्साह घेऊन अव्याहत वाहात राहते, महादाना पर्यंत..

धारोष्ण उग्रट ज्वालामुखीच्या संगतीने अहंकाराच्या गर्तेत आकंठ बुडालेल्या, नाही तर कदाचित नभांगणातला एखादा स्वयंप्रकाशी तारा होण्याचं स्वप्न कायमचं भंगल्याने, निराशेच्या गर्तेत थिजून, अकालीच प्रौढत्वात गेलेल्या जडत्वाच्या ठिपक्यांना, ती अहोरात्र ऐकवत राहते शैशवाचे गान, तांबड्या रिबीनी लावलेल्या परकरातल्या पोरीसारखी, उत्शृंखलपणे गजग्यांचा खेळ खेळत हातातल्या बांगड्यांची अविरत किणकिण करत, अगदी ठिपक्यांच्या अंतापर्यंत..

या क्षणांची आठवण म्हणून नेते ती सोबत त्या ठिपक्यांचे काही कण गाठीला बांधून आणि मग आपल्याच आनंदात हरकून दिसू लागते नवयौवनेसारखी अधीर, आसक्त तरीही अव्यक्तच. हा जडत्वाचा समागम वाढवत राहतो तिचा आवेग क्षणाक्षणाने आणि अलगद एखाद्या प्रपातावर, अनावर होत देहाची कुरवंडी करून झोकून देते ती स्वत:ला बेफाम, बेलगाम, बेफिकीर होत आकाशाच्या प्रतलावर, अनावर विश्वव्यापी ओढीने. आणि मग जिवंत होतो तिचा प्रत्येक कण, आकाशाला धरून हिंदोळताना आणि स्वत:च्याच अस्तित्वाची ओळख विसरून स्वच्छंद विहार करू लागतो, यथेच्छ रानवारा पिऊन कळपाचे भान सुटलेल्या चौखूर उधळलेल्या वासरा सारखा..

गुरूत्वाच्या प्रभावाने जशी ही धुंदी उतरते तेव्हा हे अवखळ बाष्पाचे वारू परत एकदा निर्गुण निराकार होत आकाशाची संगत सोडून धरेला जावून बिलगतात आणि निष्पाप होउन करू लागतात सलगी, त्याच साकळलेल्या ठिपक्यांच्या कणांशी आणि चालू लागतात आपल्याच धुक्याचा पदर डोक्यावरून ओढून घेत, समाधिस्त अस्तित्वाच्या संगतीने, चिरकालासाठी..

भेटतात तिला वाटेत काहीएक जीवांची कोंडाळी, घाटांवरच्या आपल्याच जळमटात रमलेली. येत राहतात त्यांचे कृतघ्न हात आणि जिव्हा, अनभिषिक्त रिक्तता घेऊन, जन्मभराची. ती मात्र पुरवत राहते त्यांची तृषा, जो जे वांछील तो ते लाहो असे माऊलीचे काळीज घेऊन..

एखाद वेळी तिच्या कुशीत आकंठ डुंबणारी पोरं पाहून हसते स्वत:शीच, कड्यावरचं तिचे शैशव आठवून आणि मोहरून उठते परत एकदा आपल्याच सृजनाच्या जाणिवेने. भरलीच कोणी ओटी तर लावून घेते हळदी कुंकवाचे ठसठशीत डाग कपाळावर आणि ठेवून घेते चार तांदूळ, तिच्या, देवळांच्या गोपूरांच्या नक्षांनी आणि नंदीच्या घंटांनी सजलेल्या, हिरव्यागार पाचूच्या पदरात..

कधी आकाशात दूरवर, उंच उंच गेलेल्या, तिच्या कर्तबगार लेकुरवाळ्यांची, निरतिशय कौतुकाने, पुसत राहते वास्त, त्यांच्या, जमिनीच्या अंतरंगात खोलवर गेलेल्या पायाशी बसून, त्यांना ठिपक्यांचे लिंपण लावत आणि विसावते त्यांच्याच विशाल सावल्यांमधून माध्यान्हीची धाप टाकत पळभरासाठी..

परत पुन्हा एकदा उत्फुल्ल मनाच्या, संध्येच्या अविरत ओढीने, तिची पाऊले चालू लागतात अनामिक अगांतुकपणाने, जडावलेला देह घेऊन, अस्ताच्या दिशेने प्रशांताच्या दर्शना साठी. आणि तिचे असंख्य हात आतूर होतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या अखंड महादानासाठी..

उगमा पासून फक्त देतच आलेली ही चिरभरीता सरीता, सर्वव्यापी सागराला देखिल अर्पण करत राहते आपले स्नेहल अस्तित्व, बळीसाठी वेदीला बांधलेल्या अनंत पुरूखासारखे..

तिच्या यज्ञवेदीवरून, कधीच कुणी रीतं जात नाही.. जलधी सुद्धा...

शेवटच्या महादाना वेळी आकाशीचे गंधर्व गात राहतात कल्याणाचे महासूक्त, दैवी: स्वस्तिरस्तुन:, स्वस्तीर्मानुषेभ्य: ...

~निखिल कुलकर्णी



मोरपीस

मोरपीसाला वय नसतच मुळी. असतात त्या असंख्य आठवणी, अमुक्त आणि अनुत्तरीत. आठवणी अमुक्त आहेत की त्या धारण करणारे मन हा मोठाच प्रश्न आहे. पण एखादं मोरपीस मनाच्या अथांग विवरात आठवणींचे तरंग उठवत राहतं, सागराच्या लाटांसारखे, अलगद, अनाहत, अविरत..

वास्तविक ती निघून गेली त्यालाही बरीच वर्षे झाली. तसं तीचं म्हणून काही त्याच्या जगात राहीलेलं देखिल नाही फारसं. तिचे आवाज ऐकू येत नाहीत की तिचे श्वास देखिल जाणवेनासे झाले आहेत कधीपासूनच. आणि तो देखिल तिचे काहीच देणे लागत नाही अशाच अहंकारात दिवसामागून रात्री गुंतवत चालला आहे, अजस्त्र दिशाहीन अर्गलेसारख्या, वर्तमानाच्या अर्वाच्य कोलाहलात..

पण असतं एखादं मोरपीस थांबलेलं, एखाद्या पुस्तकात, अंधारलेल्या धुळकट माळ्यावर, एकटच, निपचीत, तिच्याच आठवणींची संगती लावत बसलेलं. लागलंच कधी ते पुस्तक हाताला, तर त्याच्या हळूवार केसांना चिकटलेल्या असंख्य आठवणी जाग्या होत जातात, एका मागून एक, नागीणीसारख्या, लहलहा करत, मनांतल्या अंधारलेल्या कोपऱ्यातून आणि वर्तमानाचा आसमंत भूताच्या रंगांनी माखून जातो संध्याकाळच्या भळभळीत आभाळासारखा, आरक्त, आसक्त तरीही अव्यक्तच..

सूर्य अज्ञाताला निघून जाणार या कल्पनेने धरती कासावीस होते अंतर्बाह्य. हरेक संध्येला, पिळवटून निघते तिचे अंत:करण विरहाच्या जाणिवेने अस्वस्थ होऊन, संध्यामग्न मित्राच्या ओढीने..

तिच्या भाबड्या मनाची अवस्था, मायावी मारिचयाला विशद करण्याचा मोह, आवरत नाही त्या सर्वव्यापी आकाशाला. आणि मग आकाश त्याचे दिव्य कण, असे अनंत हस्तानी, मुक्तपणे उधळून टाकते आसमंतात, जशा रंगीबेरंगी अक्षतांच्या सरीच पडत राहतात, विचारमग्न तरीही खिन्न, पृथेच्या सर्वांगावर एकामागून एक, अनंत, अगणित, अविरत..

भयाण वाटणाऱ्या शांततेला, घराच्या ओढीनं लगबगीनं उडत चाललेले खग त्यांच्या अस्फुट फडफडीचे संगीत देत निष्ठूर हिरण्यगर्भाची विनवणी करत राहतात केविलवाणी, क्षितीजाच्या रेषेवरून. तरी देखिल तो आदित्य अदृष्यच होत जातो वर्तमानाच्या पानावरुन पुढे...

आकाशानी टाकलेल्या या अक्षता हे मोरपीस गोळा करून साठवून ठेवतं त्याच्या रंगीबेरंगी डोळ्यात आणि जिवंत ठेवतं तो विरहाचा विहंगम सोहळा शतजन्मांतरी पुनर्भेटीच्या पळापर्यंत. त्या सोहळ्याचे सूर वर्तमानाचे कोलाहल शांत करत राहतात आणि परत एकदा पृथ्वीचे अंतरंग उमटू लागतात पाण्यावर तरंगणाऱ्या भास्कराच्या डोळ्यांतून...

~निखिल कुलकर्णी



गाज

जडत्वाची प्रौढी मिरवत धरतीचे दूत, सागराला आव्हान देत अखंड उभेच असतात, अव्याहत पणे.
तितक्याच स्पृहेने सागर देखिल आपल्या अगणित करांनी या धरतीच्या दूतांना खेळवत बसलेला असतो. आणि प्रत्येक क्षणाला जलाच्या प्रवाही वृत्ती पुढे धरतीचे जडत्व झीजत जात राहते.
सागराला चिरतारूण्याचे वरदान आहे. त्याला भेदाचा शापही नाही आणि वेळेचे बंधन सुद्धा. त्याचा प्रत्येक थेंब हे चिरतारूण्य घेऊन, अखंड होवून, अभेद्य होऊन नाचत राहतो अनादी कालापर्यंत निष्पाप, निर्व्याज मनाने!!
वास्तविक ज्या धरेने संपूर्ण सागराला धारण केले, त्या धरेचे हे सागराने केलेले कृतकृत्य पादप्रक्षालन आहे की आकाशात दूरवर निघून गेलेल्या चंद्राच्या ओढीने संतप्त होऊन केलेले निश:ब्द आक्रमण, हे सागरा इतकेच प्रशांत असे कालातीत गूढ आहे.
इवली इवली पाखरे त्यांच्या बोटभर पंखात मावेल तेवढं, चिमूटभर आकाश साठवून सागरावरून उडत जातात. तरी सागरापेक्षा त्यांचा जीव आकाशाच्या अथांगतेत जास्त रमत असावा. कधी लागलीच एखादी धाप, तर टेकवतात त्यांची करडी पाऊले त्या दूतांच्या अंगाखांद्यावर. पण ती देखिल या दूतांना सागराविषयी कधीच काहीच सांगत नाहीत. क्षणिक एक मूक साक्ष ठेवून, शेवटची भेट घेत असल्यासारखा कटाक्ष टाकत, आकाशातल्या अनंताकडे निघून जातात. त्यांच्या सावल्यांची रांगोळी दूतांच्या अंगावर काही क्षण उमटते दूतांच्या भविष्यासारखी आणि पुन्हा नाहीशी होते.
पाण्यातल्या माशांची देखिल काही वेगळी स्थिती नसते. क्षणिक पाण्याच्या पृष्ठावर येवून ते बिचारे एखाद क्षण किनारा न्याहाळत असतील देखिल. पण लगेचच, सूर्याच्या तेजाची अंगावर पडलेली चांदणी पाहून, दिपून जात, परत एकदा विहंगम लाटेत तोल जावून समतल अनंतात अदृश्य होत राहतात.
नाही म्हणायला सागरातल्या मृत वनस्पती थांबतात घटकाभर किनाऱ्याची वास्त पुसायला. कदाचित प्रशांत सागराच्या अंतरंगातली अविरत घुसमट, किनाऱ्यावर स्तब्ध उभ्या असलेल्या दूतांना त्या सांगत देखिल असतील त्या घटकेत. पण सागरावर धरेने केलेल्या उपकरांचे उन्मत्त वारे प्यायलेल्या त्या भ्रमिष्ट दूतांना ते निर्वाणीचे आर्त स्वर ऐकू तरी येत असतील का?
पुढच्याच लाटेत, आपले गुह्य उघड होण्याच्या अनामिक भीतीने सागर त्या मृत वनस्पतींना देखिल परत आपल्या अथांगात ओढून घेत राहतो हापापल्यासारखा.
अनिमिष नेत्रानी, सागरा सारखेच विशाल, निवळशंख तरीही हतबल आकाश, सागराला थोपवत राहते एका बाजूने. सूर्य आणि चंद्र हा अविरत योग फक्त पहात राहतात त्रयस्था सारखे, अस्फुट, अविचल!!
आता सागराची गाज सोडली तर इथे कुणीही कुणाला काहीच सांगू शकत नाही. धरतीचे दूत झीजतच राहतात अंता पासून अनंता पर्यंत...

~निखिल कुलकर्णी