Friday, June 30, 2017

आमचा "जावईशोध"

आमचा "जावईशोध"
असं म्हणतात कि आईची चप्पल मुलीला बसायला लागली कि बापाची खटपट सुरु होते चांगला जावई मिळवण्याची. त्यांनी तसे करावे किंवा कधी करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याच्या त्याच्या मुलींचा तोंडवळा, ज्याची त्याची आर्थिक कुवत, ज्याचा त्याचा सामाजिक स्तर यावर देखील त्याचे उत्तर बऱ्याच वेळेला अवलंबून असते. हल्ली बऱ्याच कुटुंबात मुली या मुलांसारख्याच किंबहुना त्याहून जास्त शिकलेल्या असतात. त्या नोकरी देखील करत असतात. अशा वेळी त्यांना अनुरूप जावई शोधून काढणे हे खरे म्हणजे जसे (बापाचे आणि मुलींचे) वय वाढेल तसे जरा जास्तच जिकिरीचे होत असावे. त्यामुळे "शुभस्य शीघ्रम" या न्यायाने हे महत्कर्म दिवसेंदिवस लवकरात लवकर सुरु होताना दिसते. किंबहुना मुलींचे शिक्षण, मुलींच्या आणि मुलांच्या वाढत्या आणि बदलत्या अपेक्षा, बदलत जाणाऱ्या समाजमान्यता आणि रूढी, वाढती धावपळ आणि त्या योगे बदलत जाणाऱ्या अपेक्षांची उतरंड याने देखील वधू पित्याना बऱ्याच ठिकाणी जेरीला आणलेले दिसते आहे.
आम्हालाही बऱ्याच कन्या आहेत. "मुलगा होईल" आणि अनायासे आमच्या हजारो वर्षांची भव्य दिव्य परंपरा असलेल्या "जत्तेकर-इनामदार" खानदानाला "दिवा" मिळून जाईल या एका प्रामाणिक उद्दिष्टाने गेली आठ वर्षे आम्ही "निष्काम" पणे आमचे कर्तव्य, केवळ कर्तव्य भावनेने पार पाडत आलो आहोत. अर्थात देव दयेने आम्हाला आठही वेळेला कन्या रत्न होऊन अजूनही "जत्तेकर-इनामदार" खानदानाला "अंधारातच" ठेवले आहे. प्रत्येक वेळी निराश न होता, "यंदा योग्य नव्हता" अशा विचाराने त्यांची नावे आम्ही "बबिता", "योगिता", "सीता", "गीता", "नीता", "समता" आणि "ममता" अशी ठेवली आहेत. पण आठव्या खेपेनंतर सरकारांनी मनाच केल्याने शेंडे फळाचे नाव "खुशाली" ठेवले आहे. आता स्वत:च्या "दिव्याचा" नाद सोडून इतरांचे "दिवे" कसे गळाला लागतील याचा अभ्यास सुरु केलेला आहे.
सांप्रत काळ मोठा विपरीत आलेला आहे. एकानेक कारणाने अनेक भाषा बोलणारे, अनेक जातीचे, अनेक वर्णाचे लोक आता अनेक देशातून अमेरिकेतल्या मोठ्या-मोठ्या शहरातून एकत्र येत आहेत. आम्ही देखील मागच्याच वर्षी Computer Programmer म्हणून आमच्या परंपरागत "जत्ते-हरणाक्ष" या गावातून "New York" ला सहकुटुंब सहपरिवार येऊन ठेपलो आहोत. यायोगे पोटा-पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आमच्या गावातल्या पडत आलेल्या वाड्याचे वासे, तुळया आणि ठेपे बदलता येतील हि एक माफक अपेक्षा आहे.
आमच्या कडून या प्रचंड परंपरेच्या खानदानाला "दिवा" जरी देता आला नसला, तरी ज्या वंश परंपरागत वाड्यात एकाहून एक अशे अनेक "दिवे" लागले, ज्यांची नावे देखील आज इतिहासाला ठाऊक नाहीत (उद्या या यादीत कदाचित आमच्या नावाचा देखील समावेश होईल!!), तर अशा वाड्याची इमारत आमच्या डोळ्यात प्राण असे पर्यंत तरी उभी असावी अशी देखील आमची एक प्रामाणिक इच्छा आहे.
त्यामुळे व्हिसाचे अर्ज, त्याची खोलीभर कागद पत्रे, आमचे, आमच्या कुटुंबाचे आणि ८ मुलींचे पासपोर्ट वगैरे जबरदस्त जामानिमा केला आहे. अमेरिकन व्हिसा अधिकाऱ्याने दिलेले कुत्सित हास्य, आमच्या दिवंगत मोठ्या काकांच्या पत्नीचे आणि त्यांच्या बोलघेवड्या मुलींचे कुजकट सल्ले आणि विमानतळावरच्या लोकांनी दिलेले कुतूहल मिश्रीत कटाक्ष या कडे 'इदं न मम' अशा न्यायाने पाहात, सुमारे ४८ तासांच्या जग प्रवासानंतर आम्ही एकदाचे "New York" ला सहकुटुंब सहपरिवार येऊन ठेपलो आहोत.
विमानातून येताना तर जवळ जवळ एका अक्खा पंखावर, या "जत्तेकर-इनामदार" कुटुंबाची पडलेली छाप पाहून आमच्या कर्तबगारीचे आम्हालाच अप्रूप वाटत आले आहे.
सध्या तरी आम्ही "एतद्देशीय भारतीय" "तपकिरी" दिव्यांचाच फक्त विचार करत असून वेळ पडलीच तर "पांढऱ्या", "काळ्या", "पिवळ्या" तसेच "किरमिजी" दिव्यांचाही विचार करण्याचा मानस आहे.
तेलुगू -
हे लोक सर्व क्षेत्रात पुढे आहेत. बँका, सरकारी कार्यालये, सॉफ्टवेअर कंपन्या सर्व क्षेत्रात यांचा वावर आहे. तेलुगू हि जागतिक भाषा असून ती सगळ्यांना येतच असते असा त्यांचा समज असतो. त्यामुळे समोरचा माणूस ओळखीचा असो किंवा नसो, ते त्याची "एंट दी गारु?" अशी सुरुवात करतात. ते ऐकून समोरचा गार पडतोय असे वाटले कि मग "how are you?" वगैरे विचारून वेळ मारून नेतात. दोन तेलुगू जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा तर "आजी म्या ब्रह्म पाहिले" अशा थाटात गडाबडा लोळायलाच घेतात. यांच्या चर्चेचा मुख्य विषय "अमेरिकेत नोकऱ्या कुठे कुठे उपलब्ध आहेत?" असा असतो. यांचे नेटवर्क अतिशय जबरदस्त असते. एखाद्या तेलुगू माणसाचा job जातोय असे कळायच्या आत हे त्याला नवीन जॉब मिळवून देतात. विशेष म्हणजे सर्व तेलुगू लोकांना सर्व programming languages अस्खलित पणे लिहिता येतात. त्यांना सर्व प्रकारचे डाटाबेस तसेच सर्व प्रकारच्या ERP हे जन्मापासूनच येत असते. कधी कधी ते तेलुगू मधून Computer Programming, Technology वगैरे बद्दल पण बोलत असतात. याचा मुख्य अर्थ "इकडचा कोड घेऊन तिकडे कॉपी करून टाक" असा असतो. मग ऐकणाराही हे पहिल्यांदाच ऐकत असल्या सारखे हात वारे करतो. मग दोघेही मोठ्याने हसून एकमेकांना टाळ्या देतात. सगळाच निर्मळ आनंदाचा प्रकार असतो.
तेलुगू माणूस हा कधीही एक तेलगू माणुस म्हणून जगतच नाही. "समस्त तेलुगू मेळवावा, तेलुगू धर्म वाढवावा" असा श्लोक तेलुगू मध्ये आहे कि नाही ते माहित नाही. पण यांचे वागणे अगदी याला अनुसरूनच असते.
हे लोक राहतात मात्र अतिशय स्वच्छंदी!! आधीच गडद काळपट रंग, त्यात महिना महिना दाढीला पाणी लागत नाही. अधून मधूनच आंघोळीची तसदी घेतली जाते. डोकीस कसली कसली हैद्राबादी वासाची तेले लावून खुशाल "हे विश्वची माझे घर" अशा थाटात विहरत असतात. यांच्या मोज्यांना बऱ्याच वेळेला भयंकर वास येत असतो. पण हे चलाख लोक समोरच्यालाच सल्ला देतात कि "मोजे धुवत चला" म्हणून!!
हे लोक शक्यतो Public Transport ने प्रवास करतात. एकदा का रेल्वेत देह कोंबला कि त्यांना मुक्तीचा भास होतो. मग कानाला फोन लावून खुशाल जोरजोरात बोलत आणि हसत बसतात. ते इतक्या जोरात बोलत असतात कि त्यांनी फोन ठेवून दिला तरी ऐकणाऱ्याला ऐकू येतच राहील असेहि आमचे एक मत आहे. हि एक अत्यंत पुरुष प्रधान संस्कृती आहे. इथे स्त्रीयांच्या मताला फारसा वाव नाही. स्त्रियांना त्यांनी खर्च केलेल्या प्रत्येक डॉलर चा हिशेब पुरुषांना द्यावा लागतो. त्यामुळे त्या स्त्रिया क्वार्टर टाकून पाण्याची बाटली सुद्धा विकत घेताना १० वेळा विचार करतात.
हे लोक अतिशय धार्मिक असतात. Computer वर रन होणारा कोड हा सुद्धा काही दैवी शक्ती मुळेच रन होतो अशी त्यांची ठाम समजूत असते. गुरुवारी साई बाबांच्या देवळात झुंडीने जातात. कसल्या कसल्या मराठी आरत्या म्हणतात. तोंडाने जप करतात. भल्या मोठ्या दर्शनबारीत उभे राहून, कसले कसले चेहरे करत, काहीतरी पुटपुटत असतात. बऱ्याच वेळेला त्याचा अर्थ "मला ग्रीन कार्ड मिळू दे" असा असतो. साई बाबांच्या पुतळ्याची दाढी कुरवाळतात. पाय चाटून स्वच्छ करतात. स्वत:चे कान धरून उठा-बशा काढतात. साई बाबाना चिलमीच्या ऐवजी पाईप चा प्रसाद दाखवतात. शनिवार आणि रविवारी यांच्या बायका इथल्या दिवस भर देवळातले संडास वगैरे स्वच्छ असतात आणि पुरुष घरी तेलुगू टीव्ही वर गाणी बघत बसलेले असतात. भारतातल्या तुरुंगातून सुटलेले बाबा-बुवा जेव्हा अमेरिकेत येत असतात, तेव्हा त्यांना घरी ठेवून घेण्याचा, त्यांची पाद्य वगैरे पूजा करण्याचे सर्वाधिकार तेलुगू लोकांकडेच आहेत.
इतकेच काय पण यातले काही काही लोक अमेरिकेतील तुरुंगात देखील जाऊन पोचले आहेत. सर्वच क्षेत्रात आघाडी घेण्याच्या यांच्या ओढीने, अमेरिकेत देहदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय होण्याचा मान देखील यांना नुकताच मिळालेला आहे.
यांच्या याच "सबसे आगे, सबसे तेज" राहण्याच्या ओढीपायी तेलुगू घरात लेक द्यायची का? या विचाराने मन अधूनमधून भयभीत होत असते.
बंगाली -
यांचे सगळेच भालो भालो असते. बंगाली भाषेपासून ते बंगाली नायिकांपर्यंत सर्वच आम्हाला आवडतच आलेले आहे. शिवाय हि सर्वच बंगाली माणसे देखील, प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोर, त्यांचे सक्खे चुलत मामा असल्यासारखी, सदैव आनंदी आणि प्रेमात न्हाऊन निघालेली दिसतात. यांचे बोलणे गोड. मिठाई गोड आणि बंगाली वहिनी तर फारच गोड!! अशा सगळ्या गोडांब्या मध्ये सुभाषचंद्र बोस कसे काय जन्मले याचे राहून राहून आश्चर्य वाटते आहे. पण भलतीच मिठ्ठास!! वास्तविक फाळणीचे सगळ्यात जास्त चटके पंजाब आणि बंगालला बसले. दुःखाचे डोंगर पाठीशी घेऊन हि माणसे अमेरिकेत येऊन राहिली. पण त्यांनी लोकांना फक्त आनंदच दिलेला आहे. मासे आणि सिगारेटचे यांचे प्रेम अमेरिकेत देखील टिकून आहे. इथे स्त्रियांना अतिशय सन्मान दिला जातो. संगीत, नाटक, साहित्य यांची याना विशेष आवड असते. यांना लक्ष्मी पेक्षा सरस्वतीचीच गोडी जास्त!! त्यातल्या त्यात सतार ह्या वाद्यावर बंगाली माणसाचा फार जीव असतो. निखिल बॅनर्जी, सत्यजित रे, मन्ना डे, RD बर्मन, आशा भोसले, लता मंगेशकर, तेंडुलकर आणि गांगुली हे यांचे अगदी जिव्हाळ्याचे विषय!! तासनं तास बोलत बसतील. कधी पेटीवर रवींद्रनाथांची गाणी वाजवत बसतील. कधी पंडित रोणू मुजुमदारांनी बासरी वर बनारसच्या घाटावर पंडित किशन महाराजांच्या स्वर्गीय पखवाजाच्या साथीत वाजवलेल्या "अहिर भैरव" च्या आठवणीने गहिवरून जातील. कधी तुटलेल्या बंगालची आठवण काढत त्यांच्या ढाक्यातल्या नाहीतर चितगाव मधल्या जुन्या घराच्या आठवणी मध्ये रमून जातील.
या लोकांकडे पाहून साहेबाने त्याची राजधानी कलकत्त्याला का केली ते कळून चुकते. एक अतिशय रुबाबदार आणि अत्यंत हवा हवासा वाटणारा समाज आहे. यातला एखादा "दिवा" आमच्या आठ पैकी एका गळाला लागला तर आनंदच होणार आहे.
तामिळ आणि केरळी -
वास्तविक आम्हाला अमेरिकेत येई पर्यंत या दोघात काही फरक असतो हे मान्यच नव्हते. उलट आमचे तर असेच मत होते कि बेळगावच्या दक्षिणेला जो मुलुख आहे तो सगळा एकच एक प्रदेश असून त्याला दक्षिण भारत म्हणतात. तेव्हा तिथे चार वेगळी राज्ये असून त्यांना स्वत:च्या प्रतिमा आहेत याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यातल्या त्यात केरळ आणि तामिळनाडूची भौगोलिक सलगता पाहून आणि भारताच्या नकाशात उंदराच्या काना एवढे दिसणारे हे केरळ हे वेगळे राज्य तामिळनाडूला का जोडून टाकत नाहीत असाही एक प्रश्न पडत असे. याच्या भाषा म्हणजे भरलेल्या पाण्याच्या तांब्यात सागरगोटे टाकल्यावर येतो तासला होणारा ध्वनी, जिलब्या किंवा चकल्या एकमेकांना जोडून ठेवल्या सारख्या त्यांच्या लिप्या, नारळाची, पोफळीची झाडे, केळीच्या पानावरचे डोसे आणि उत्तप्पे , इडल्या आणि मेदू वडे आणि गरम कॉफी!! हे सर्व या दोन राज्यात समान होते असेच वाटायचे. अर्थात अमेरिकेत येऊन देखील आमच्या यांच्या बद्दलच्या ज्ञानात फारशी भर पडलेली आहे असे नाही. पण निदान हि दोन राज्ये वेगळी असून त्यांच्या प्रादेशिक अस्मिता वेगळ्या आहेत हे कळले आहे.
तामिळ लोक स्वत:ला संपूर्ण पणे वेगळे राष्ट्र मानत आले आहेत. आणि केरळी लोक त्यांच्या "विशाल" राज्याला "Gods own country" म्हणत आले आहेत. त्यांचा तो हेका, अमेरिकेतही कायम आहे. अत्यंत फटकून वागतात. अतिशय बुद्धीमान आहेत. कर्तबगार आहेत. पण त्यांच्याच विश्वात पुरेपूर गुरफटून गेले आहेत. "भरतनाट्यम" ला "बरतनाट्यम" म्हणतात आणि "बबिता" ला "बबिथा"!! यांचा नेमका प्राॅब्लेम काय आहे तेच कळत नाही. ना यांच्या कडे कानड्यांसारखे अभिजात संगीत आहे, ना गर्व करावा असे साहित्य!!
कपाळावर कसले कसले पांढरे चट्टे काढतात. ही मंडळी शर्ट पॅंट मधे असली तरी सदैव एक अदृश्य लुंगी घातल्यासारखी, पायातल्या पायात, दुडकी पावले टाकत चालतात. मस्त मर्दासारख्या टांगा टाकल्या तर लुंगी सुटेल कि काय अशी भीती वाटत असावी. आपण त्यांची भाषा शिकायचा प्रयत्न केला तर आपल्यालाच तोंडभर हसतात. स्वत: भात मुठीत घेऊन खातात. पण तामिळनाडू मध्ये आधी इडली खातात का मेदू वडा, याच्यावर संस्कार वर्ग देतात. हिंदीत बोललो तर जसे काही एखादी गाय मारल्यासारखे डोळे मोठे करून नुसते बघतच बसतात. आणि नंतर "No hindi you know!!" म्हणत विक्राळ हसतात. जसं काही तामिळनाडू म्हणजे अमेरिकेतच आहे!!
अशाच एका तमिळ मंडळाच्या कार्यक्रमात आम्ही आमच्या पहिल्या तीन कन्यांना घेऊन गेलो होतो. त्यांची पाटी वाचली तर त्यांवर "Tamiz" असे लिहीले होते. म्हटले चला सापडली यांची चूक!! आम्ही मोठ्या उत्साहाने मंडळाच्या अध्यक्षांना भेटून ते सांगितले. तर त्यांनी आम्हाला वेड्यातच काढले. "तामिळ" चे इंग्रजी स्पेलिंग "Tamiz" होते हे पहिल्यांदाच कळत होते. त्याचे कारण विचारले तर त्यांनी घशातल्या घशात काहीतरी खाकरल्या सारखे करून, अगम्य उच्चार करून दाखवले आणि म्हणाले, "So did you get it no?".. आम्ही फक्त हसून मान हलवली.. मग त्यांनी आमच्या कन्येचे नाव विचारले. म्हटले आता ही संधी सोडायची नाही. आम्ही सांगितले की पहिलीचे नाव "ब्याबझी", दुसरीने नाव "यागझी" आणि तिसरीचे नाव "सीझी" म्हणून!! म्हाताऱ्याला फेपरे यायची वेळ आली. मराठी मुलींची नावे "ब्याबझी", "यागझी" आणि "सीझी"?
मनात म्हटले "तंब्या, लेका शेंड्या लावतोस होय मला? आता विचार ब्याबझी, यागझी आणि सीझी यांची स्पेलिंगं?"
या लोकांचे खाद्य पदार्थ सोडले तर व्याही म्हणून यांच्याशी फारसे जमेल असे सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही यांवर विचार करणे थांबवले (खरे तर "तांबवले" असेच म्हणणार होतो!!) आहे.
उडिया -
समस्त जग हे आमच्या विरोधात असून आता आमची भाषा, संस्कृती, रीती रिवाज सर्व धोक्यात आले आहे. असा एक विचार यांच्या डोक्यात सतत येत असतो. त्यांचे इतर कुठल्याच देशी आणि परदेशी भाषिकांशी फारसे पटत नाही. हि मंडळी आपल्याच जगात जास्त रमत असतात. त्यातल्या त्यात दक्षिण भारतातल्या लोकांबद्दल यांना विशेष पूर्वग्रह असतो. मराठी आणि गुजराती माणसाविषयी त्यांना विशेष आत्मीयता असते. त्यांच्या मताप्रमाणे सम्राट अशोकाने, दंडकारण्य तोडून तो भाग आपल्या साम्राज्याला जोडण्यासाठी त्याच्या सैन्यातल्या महा रथ्यांना आणि गज रथ्यांना आज्ञा केली. महा रथ्यांनी जंगल तोडावे. तिथली हिंस्त्र श्वापदे करावीत. आणि गज रथ्यांनी त्यांना वाण सामानाचा व्यापार करावा असा त्याने नियम घालून दिला. यातल्या महा रथ्यांचे पुढे मराठी झाले आणि गज रथ्यांचे पुढे गुजराती झाले. या योगे मराठी आणि गुजराती हे दोघेही मुळचे उडिया असल्या बद्दल त्यांची पूर्ण खात्री पटलेली दिसते.
उडिया लोक संख्येने देखील फार नसल्याने अमेरिकेतील बहुतेक सर्व उडिया लोक एकमेकांना व्यक्तिगत रित्या ओळखत असतात. भुवनेश्वर हा यांचा वीक पॉईंट असतो. कोणार्क, जगन्नाथ पुरी या विषयी भरभरून बोलतात. क्वचित प्रसंगी उडिया वहिनी "ओडिसी" नृत्यात पारंगत देखील असतात. "पण काय, मुलं झाल्यानंतर बंदच केलं" वगैरे मराठी सारखी वाक्ये तिथे देखील ऐकू येतात. पण तो नृत्य प्रकार हा एक अतिशय सर्वांग सुंदर असा प्रकार आहे. त्याच्या मध्ये सर्व प्रकारचे भाव, सर्व प्रकारचे राग, सर्व प्रकारच्या वेळा, सर्व प्रकारचे आनंद आणि सर्व प्रकारची दुःखे व्यक्त करण्यासाठी अतिशय समृद्ध अशा मुद्रा दिलेल्या आहेत. हे नृत्य इतके बहारदार असते, कि त्या त्या मुद्रेच्या वेळी प्रत्यक्ष तो तो भाव प्रकट होताना दिसतो. नर्तिकेचा कपडेपट, रंगपट सगळेच अतिशय समृद्ध आणि मनमोहक असते. नर्तिकेचे हाव-भाव हे इतके उमदे असतात कि तिने "कामभाव" जरी प्रकट केला तरी तो जराही ओंगळ वाटत नाही. अत्यंत निखळ आणि संकेतांच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा विराट अनुभव असतो.
यांचे खाणे, कपडे, भाषा, राहणीमान सगळेच अभिजात वाटते. पण तरीही ते कानडी सारखे उग्रट वाटत नाही. एक सौम्य अस्मिता घेऊन, छोटे छोटे हट्ट करत हि मंडळी आपला हेका घेऊन ठाम उभी असतात.
एक हट्टी तरी पण जीव लावणारा समाज आहे. यातला एखादा "दिवा" आमच्या आठ पैकी एका गळाला लागला तर आनंदच होणार आहे.

बिहारी -
हा एक अतिशय महान समाज आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण या भूमीत जन्मले. वाढले. त्यांची बरीच कारकीर्द देखील इथेच झाली. त्यामुळे यांचा ऐतिहासिक वारसा अद्वितीय आहे यात शंकाच नाही. तरी देखील आज घडीला हा भारतातला एक सर्वात मागे पडलेला समाज समजला जातो. कदाचित भगवान श्रीकृष्णाच्या आशिर्वादापेक्षा त्यांच्या नंतरच्या यादवीचा प्रभाव अधिक ताजा असावा. तरी देखील एक अत्यंत घरंदाज समाज! अर्थात या समाजातून जे लोक अमेरिकेत येतात आणि इथे स्थायिक होतात, ते कमालीचे बुद्धिमान असतात यात शंकाच नाही. टोकाची बुद्धिमत्ता, त्याच्या जोडीला कमालीची चिकाटी आणि पिंपळाच्या रोपट्यासारखी कुठेही उगवून येण्याची यांची जिद्द कमालीची आहे. हि मंडळी सर्व क्षेत्रात आहेत. अत्यंत उच्च्च पदावर आहेत. आणि कमालीची लाघवी आहेत. बिहारी माणसाशी शत्रुत्व घेणे हि माझ्या दृष्टीनं फारच अवघड गोष्ट आहे. कारण तशी वेळ ते आपल्यावर येऊच देत नाहीत. एक नितांत गप्पिष्ट, खवैय्या आणि आयुष्याच्या सगळ्या गोष्टीत रस घेऊन जगणारा समाज आहे.
यांना वावडे असलेल्या गोष्टींची यादी फार छोटी आहे. मद्य-मदिरा, धूम्रपान, तंबाखू, पत्ते, नाच, गाणे-बजावणे सगळे अगदी मनसोक्त केले जाते. उगाच "मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली" असला बनाव नाही. बहुतेक बिहारी घरांमधून हुक्का असतो. गुडगुडी असते. कॅरम बोर्ड असतो. बोरिक पावडरचा डबा असतो. भला मोठा TV आणि त्याहून मोठी म्युझिक सिस्टीम असते. इथे स्रीया अगदी बंगाली सारख्या सत्तेत नसल्या तरी त्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यांना बहुतेक समारंभात जोडीने मान दिला जातो.
बिहारी माणसाचा मुख्य छंद म्हणजे गप्पा मारणे. या गप्पात थेट श्रीकृष्णा पासून ते अगदी लालू परशादांपर्यंत कुणीही सुटत नाही. बिहारी माणसाची प्रत्येक गोष्टीवर ठाम मते आहेत. कृष्णाचे काय चुकले, अशोकाचे काय चुकले, बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ आहे इथं पासून ते राज ठाकरे कसे चुकीचे आहेत किंवा लालू प्रसाद हे कसे अवलिया पुरुष आहेत यावर त्यांची अगदी ठाम अशी मते आहेत. आमचे एक बिहारी स्नेही दरभंगा नावाच्या गावातून लहानाचे मोठे झाले. त्यांच्या बोलण्यात तर हे गाव इतक्या वेळेला येते कि काही विचारायची सोय नाही.
रेल्वे मधून प्रवास करताना तिकीट घ्यायचे असते, हा नियम फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांना लागू असून, भारत वर्षातल्या इतर सर्व राज्यात रेल्वे हि मोफत सेवा आहे असे देखील बिहारी लोकांचे ठाम मत आहे. किंबहुना शाळा कॉलेजात असताना, रेल्वेतून विना तिकीट प्रवास करत असताना, "कृपया टीकट मांग कर शरमिंदा न करें।" अशी पाटी हातात घेऊन कसे जायचो याचे किस्से बिहारी बाबूंनीच सांगावेत. एकदा तर आमच्या या स्नेह्यांनी लालू प्रसादांची त्यांच्या गावात एक सभा झाली होती त्याची मोठी हृद्य आठवण सांगितली होती. ज्या गावात सभा होती ते गाव नदीच्या पलीकडे होते. तिथे देशी हात भट्टीचा मोठा कारभार चालत असे. म्हणजे गावातील जवळ जवळ सर्वच जण त्याच एका उद्योगामध्ये काम करत असत. लालूजी नावेत बसून तिथे गेले. सभा जमली. लालूजीना कुणीतरी सांगत होते कि नदीवर जर पूल बांधला तर जाणे येणे सोईचे होईल. मुलांना शाळेत जाता येईल. महापुरात देखील नदी ओलांडून जाता येईल. याच्यावर लालूंनी मोठा नामी प्रश्न विचारला कि, "देखो भाई हम तो कबसे कह रहा हूं कि इस गाव मी पूल क्यो नाही? पर देखो भाई, अगर पूल बन जायेगा, तो पूल से पुलिस भी आ जायेगी और इ गाव का धंदा चौपट कर देगी। तो अब बताओ, कब से शुरु करना है पूल काम?" आणि मग लोकांनी ओरडून ओरडून "पूल नको" म्हणून कसे सांगितले याचा किस्सा त्यांच्याच तोंडून ऐकावा. खास बिहारी हेल काढत, समजावत समजावत सांगायची क्षमता इतर कुठल्या भाषेत असेल असे आम्हास वाटत नाही.
यांचे संगीत अलौकीक आहे. ग्रामीण भागातले संगीत थोडे फार आपल्या कडच्या पोवाड्या सारखे आहे. मर्दानी आणि माहिती पूर्ण!! खाण्या-पिण्यावर देखील यांचा स्वतंत्र असा ठसा आहे. "खाट" आणि त्या खाटेवर बसून केलेलं जेवण हा अलौकिक अनुभव आहे. गावातल्या सरपंचाला वडिलकीचा मान आहे. शिक्षणाविषयी विलक्षण तिटकारा आहे. मर्दानी खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण एकूण लोक व्यवस्थेवर एक प्रकारच्या खट्याळ पणाची छाप आहे. इतकी, कि कदाचित भगवान श्रीकृष्ण जेव्हा इथून द्वारकेला गेले तेव्हा बहुतेक ते त्यांचा सगळा खट्याळ पणा याच मातीत सोडून गेले असावेत असे वाटते.
आमच्या आठ पैकी एका गळाला बिहारी "दिवा" लागला तर आम्हाला आनंदच आहे.
गुजराती आणि मारवाडी -
देशी हॉटेल आणि देशी किराणा सामानाची दुकाने थाटून "काय ताई कसे काय? तुमचे ते काका कसे हाये आता? सोकरी कोणत्या स्कुल मंदी जाते?" वगैरे चौकशी करून आधी गिऱ्हाईकाला खिशात टाकायचे. आणि नंतर त्याचा खिसा रिकामा करून घ्यायची, हे यांचे देशी उद्योग इथेही तसेच चालू आहेत. "कुठून आले तुम्ही?" याचे उत्तर "महाराष्ट्र" असे दिले कि त्यांचे डोळे चकाकतात. कदाचित त्यांना "मोरारजी भाई", "मुंबई", "गरवी गुजरात", "संयुक्त महाराष्ट्र", "अत्रे", "शिवसेना" वगैरे असल्या अप्रिय गोष्टी एकदम आठवत असाव्यात.
बाकी हि माणसे हिशेबात चोख!! घ्यायचे पैसे कधीहि विसरणार नाहीत आणि द्यायच्या पैशाचा विषय आपणहून कधीही काढणार नाहीत. यांचं सगळं चक्र पैशाभोवती फिरत राहतं. चांगलं-वाईट ठाऊक नाही. पण हे खरं आहे.
तेलुगू लोकांप्रमाणेच हे देखील कधीच एकटे एकटे जगत नाहीत...ते नेहमी गुजराती समाज म्हणून जगत असतात. दोन तेलुगू जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्या चर्चेचा विषय असतो, "अमेरिकेतील नोकऱ्या".. तसे दोन गुज्जू जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचा विषय असतो "अमेरिकेतील देशी ग्रोसरी स्टोर्स"...कुठल्या गावात किती देशी लोक राहतात, तिथे किती दुकाने आहेत, कुठल्या गावात अजून दुकान नाही? हि सगळी आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. त्याच प्रमाणे पुढच्या वर्षभरात गुजरात मधून कोण कोण अमेरिकेला फॅमिली व्हिसा वर येतो आहे, त्याला कुठल्या गावात दुकान काढायला पाठवायचे? कुणाचे दुकान नीट चालत नाही? मेक्सिको वगैरे मधून अजून स्वस्तात माल मागवता येईल का? अशी त्यांची विचारचक्रे चतुरस्र फिरत असतात. त्यामुळे कधी कुठे एखादा गुजराती किंवा मारवाडी, हतबल होऊन, निराश मनाने "दुकान विकणे आहे" असा बोर्ड लावताना आम्ही तरी पाहिलेला नाही. कुणी एखादा गुज्जू भाई नुकसान मंदी छे असा सुगावा लागला कि लगेच दुसरा गुज्जू भाई त्याच्या मदत ला धावून जाते नी!! दोन महिन्यात परिस्थिती एकदम चोकस!!
आमच्या मते भारतात एक गुजराती, मारवाडी आणि तेलुगू सोडले तर अशी मुंग्यांसारखी रांगेत चालायची आणि एकमेकांच्या मदतीला धावून जायची वृत्ती इतरत्र कुठेही दिसत नाही.
अर्थात हे लोक इतर अनेक क्षेत्रात देखील आहे. पण गुजराती माणूस अगदी Ernst and Young मध्ये नाहीतर PwC मध्ये अगदी Partner जरी असला तरी आम्ही त्याला "शेठ" च म्हणत आलो आहोत. किंबहुना तेच नामाभिधान त्यांना सर्वाधिक शोभून दिसते. डॉक्टर पटेल किंवा श्रीयुत अगरवाल म्हणण्या पेक्षा पटेल शेठ किंवा अगरवाल शेठ म्हणणे अधिक संयुक्तिक वाटते. किंबहुना त्यांना देखील तेच आवडते असेही आमचे एक निरीक्षण आहे. गमतीचा भाग म्हणजे हे जरी Ernst and Young मध्ये नाहीतर PwC मध्ये Partner जरी असले, तरी बहुतेक वेळेला यांचे वडील नाहीतर काका नाहीतर मामा यांचे भावनगर मंदी भंगारचे मोठे दुकान असते. नाहीतर सुरतेला रेशमाची पेढी असते. काही काही जणांचा तर डायमंड मंदी बिजनेस असते. हे लोक आपला देश आणि तिथली पिढीजात संपन्नता सोडून इथे घाटी लोकांसोबत दारोदार नोकऱ्या शोधत का येतात हे एक मोठे कोडेच आहे. पण अर्थात त्याचे आम्हाला कौतुकही आहेच. उगाच "मराठा सरदार" म्हणून एका जागी बसून पिढ्यानपिढ्या गाद्या उबवण्यापेक्षा हे लाख पटीने चांगले!!
अर्थात हे सगळे नाजूक काम आहे. अगदी तुपात तळलेल्या इमरती सारखे!! इथे धसमुसळेपणा, रानगटपणा, रासवटपणाला अजिबात वाव नाही. त्यांची भाषाच इतकी मऊ-मऊ मखमली आहे, कि बोलताना एखादे शांत संगीत ऐकत आहोत असा भास होतो. हे लोक त्यांच्या मराठी वगैरे नोकर लोकाना रागावतात ते सुद्धा ऐकायला इतके लोभस वाटते कि हे रागावत आहेत का शाबासकी देत आहेत ते बराच वेळ कळत नाही. यांच्या टिपऱ्या घेऊन केलेल्या दांडियाची तुलना, "बल्ले बल्ले" म्हणत केलेल्या भांगड्याशी करून पहा. म्हणजे यांच्यातली नजाकत कळून येईल. हे लोक कधीही मराठी किंवा बंगाल्यांसारखे बंदुका वगैरे घेऊन "ठीश ठीश ठीश्याव" करण्यात आपला वेळ फुकट घालवत नाहीत. त्यामुळे यांच्या समाजातून सावरकर, चाफेकर, बिपीनचंद्र पाल, सुभाषचंद्र बोस, बंकिम चॅटर्जी वगैरे जहाल क्रांतिकारी न तयार होता, एकदम बापू आणि कस्तुरबा तयार होतात.
असे जरी असले तरी या लोकांचे राजकीय मत कोणाला? याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही. ज्यावेळेला इथे गांधी तयार होतात, त्याच वेळेला निजामाला आणि जुनागढ च्या नबाबाला सैन्याच्या जोरावर हुसकून लावणारे सरदार पटेल हि तयार होतात. जसे सामाजिक न्यायाची हाक देणारे मोरारजी पंतप्रधान होतात तसेच प्रखर हिंदुत्वाची हाक देणारे नरेंद्रभाई देखील पंतप्रधान होतात.
अचंबा वाटतो आणि कौतुकही!!
यांच्याकडे सरस्वती पेक्षा लक्ष्मीला मान जास्त!! घरातल्या मुलींची, सुनांची नावे हमखास लक्ष्मी, धन, भरभराट, लाभ, फायदा अशा गोष्टी सूचित करत असतात. हे लोक बहुतेक एकत्र कुटुंबात राहतात. त्या घरात ५-६ भावंडे, त्यांच्या बायका, त्यांची २-३, २-३ पोरं, नोकर चाकर असं सगळं मिळून एक मोठं बारदान असतं. या घरात सुनांना फारसा मान मिळत नाही. पण या ५-६ मुलांची जी आई असते, ती सर्व सत्ताधीश असते. तिचा शब्द अंतिम असतो. बऱ्याच वेळेला हे घर परंपरावादी असते. त्यामुळे, घुंघट, बिंदी, मंगळसूत्र वगैरे सगळे यथोचित ठिकाणी पाहायला मिळते. यांच्यात एखादा मुलगा काही संगीत वगैरे शिकायला निघाला, तर त्याला त्यातून पैसे कसा मिळवशील? असा प्रश्न विचारून त्याला थंड केले जाते. म्हणजे प्रश्न पैशाचा कधीच नसतो. फक्त लक्ष्मीच्या सेवेसाठी जन्मलेला आपला एक शागीर्द सरस्वतीच्या नदी लागून हातचा जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
गुजराती जेवणाचे तर काय सांगावे!! गुजराती थाळी किंवा काठियावाडी थाळी म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे. एकाहून एक सरस (वास्तविक "सरस" हा गुजराती शब्द आहे कि मराठी यावर वाद घालून घाट्यानी रंगाचा बेरंग करू नये) भाज्या, उसळी, उंधियो, कोशिंबिरी अगदी बोट सुद्धा आत जाणार नाही अशा छोट्या छोट्या वाट्यात घालून देतात. त्या बरोबर बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा म्हणजे पाहता क्षणी प्रेमात पडावे अशी अवस्था होते. मुगाच्या डाळीची खिचडी मराठी लोक पण करतात. पण त्यांची वाढायची पद्धत म्हणजे "गिळा मुकाट्यानं पुढे बघून" असा असतो. इथे म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे एक पक्वान्न असून ते फक्त नशीबवंतास लाभते अशा थाटात ते कढीच्या वाटी शेजारी वाढले जाते. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे मिठ्ठास श्रीखंड!!
शरीराला सुख, मनाला शांती आणि आत्म्याला समाधान एकाच वेळी मिळवून देण्याची ताकद फक्त गुजराती आणि काठियावाडी थाळीत आहे असे आमचे मत झाले आहे.
खावे गोड, राहावे गोड,
करावे गोड, सकळ जना...
कानड्याना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहून मूळव्याध उपटलेल्या आमच्या सारख्या घाट्याना अशा गोडा घरी एखादी लेक गेली तर ते हवेच आहे हे वेगळे सांगणे न लगे!!! जै श्रीकृष्णा!!
कानडी -
यांचे दुकान पूर्ण पणे वेगळे चालू असते. इतर भाषिकांहून हि मंडळी स्वत:ला चार आणे श्रेष्ठ समजत आली आहेत. त्यांच्या मते इतर सर्व भाषा आणि संस्कृती यांच्या पासून यांची भाषा आणि संस्कृती हि अधिक ठाशीव, उठावदार आणि प्रगल्भ आहे. त्यामुळे त्यांचे संगीत, त्यांची लिपी आणि त्यांची भाषा याचा त्यांना अतिशय ठाम आदर आहे. त्यायोगे इतर सर्वांचा ते यथोचित अनादर देखील करत असतात. यांचे कुणाशीही फारसे पटत नाही. मराठी लोकांशी कृष्णेवरून वाद, तेलगू लोकांशी पुनश्च कृष्णे वरून वाद, तामिळ लोकांशी कावेरी वरून वाद आणि केरळी लोकांशी जंगलातल्या सीमेवरून वाद!! वाद हे कानडी लोकांचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे असे आमचे मत आहे. त्यात त्यांची भाषा इतकी आघात युक्त आहे कि ते प्रेमाने जरी बोलत असले तरी आता एकमेकांचा जीव घेणार असे वाटत राहते. म्हणजे अगदी देवदास आणि पारू मधला संवाद देखील नळावरच्या भांडणासारखा वाटतो.
वास्तविक कानडी साहित्य हे सर्व भारतीय भाषांमध्ये अग्रगण्य मानले गेले आहे. एक अतिशय अभिजात अशी भाषा, तिचे व्याकरण, तितकीच अगम्य अशी लिपी त्यांना लाभलेली आहे. या भाषेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात लिंग भेद केला जात नाही. आमचे एक मराठी स्नेही आहेत ज्यांची अर्धांगिनी कानडी आहे, त्यांना एकदा दुपारी फोन केला होता. स्नेह्यांचा अंमळ डोळा लागला होता. म्हणून त्यांच्या कानडी औव्वेने फोन उचलला. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कशाला उगाच त्रास म्हणून उचलला असेल वहिनींनी फोन. वहिनींनी नुकतेच मराठी शिकायला घेतले होते. त्यांनी फोन उचलला आणि म्हणाल्या, "नमस्कार्री सरी".. आम्ही म्हणालो, "नमस्कार नमस्कार वाहिनी.. काय म्हणताय? आहे का सचिन?" त्यावर वाहिनी जे बोलल्या त्याने आमची दातखीळच बसली. वाहिनी म्हणाल्या, "मी मजेत असतंय बगा की. सचिन नव्हे? ते झोपलंय बगा यिळसरी!!"... "सचिन झोपलंय?" स्वत:च्या नवऱ्याला अरे-तुरे म्हणणे इथे पर्यंत आम्ही पण मॉडर्न आहोत. पण म्हणून त्याच्या विषयी नपुंसकलिंगी क्रियापद ऐकून आम्हाला अक्षरश: घाम फुटला होता.
कानडी संगीत हे देखील तितकेच अभिजात आहे. त्यांचे राग वेगळे, स्वर वेगळे, श्रुती वेगळ्या, ताल वेगळे, मात्रांची ठिकाणे वेगळी, माधुर्याच्या व्याख्या वेगळ्या!! सर्व काही वेगळे!! हिंदुस्थानी म्हणून जे काही आहे, त्याच्याशी उभा दावा मांडून तितक्याच समर्थपणे उभी असलेली हि एक प्राचीन संस्कृती आहे. हे कितीही जरी खरे असले तरी कानडी मातृभाषा असलेले आणि केवळ आपल्या तानेवर भारतरत्न पदाला पोचलेले पंडित भीमसेन जी कदाचित या उग्रट पणाला कंटाळूनच मराठीत रमले असावेत.
कानडी घरातून बहुतेक वेळेला पुरुष प्रधान संस्कृती असते. तसे जरी असले तरी कानडी वहिनी, यांना "औव्वा" म्हणतात, तर या औव्वा" या अतिशय खमक्या स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांचे परिस्थितीवर अतिशय चांगले नियंत्रण असते. बहुतेक कानडी घरातून राघवेंद्र स्वामींचा एक तरी फोटो असतोच. त्याच्या समोर तप्त मुद्रांकित असे वैष्णव कानडी अण्णा, भले मोठे दुबोटी गंध ओढून, अंगावर ठीक ठिकाणी गंधाचे पट्टे ओढून, जानवं हातात घेऊन जोर जोरात विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसलेले असतात. इथे सोवळे-ओवळे अतिशय कडक!! तडजोड खपवून घेतली जात नाही. आम्हाला तरी असेच वाटत आले आहे कि "तडजोड" या शद्बाला समानार्थी शब्दच कानडी मध्ये नसावा.
एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावी लागेल ती म्हणजे कानडी जेवणाची!! कानडी औव्वेच्या हातात साक्षात अन्नपूर्णा राहते असे आमचे मत आहे. काय एकेक एकाहून एक अप्रतिम पदार्थ केले जातात. अळुच्याच भाजीचे १०-१२ तरी प्रकार करतात. सुकवलेल्या डाळीचे वाटण, हिरव्या मिरच्या वाटून केलेली पीठ लावलेली भाजी, डाळीच्या पिठाचे गोळे घालून केलेली गवारीच्या शेंगांची भाजी, पांढरा सुट्टा सुट्टा भात, त्याच्यावरचे गूळ घातलेले वरण!! याच्या इतके सुंदर जेवण स्वर्गात देखील मिळत नसेल!! आणि विशेष म्हणजे या जेवणाचा वास पुढचे कित्येक दिवस जात नाही आणि आठवणी तर कित्येक वर्षे!!
पण का कुणास ठाऊक, कानडी घरात लेक द्यायची म्हणजे जरा छाती दडपून जाते. आमच्या आडनावातील "कर" पाहून तर काही काही कन्नडिगांच्या बोटातल्या अंगठ्या देखील घट्ट झालेल्या आम्ही पाहिले आहे. अशी माणसे संभाषणाची सुरुवातच मुळात "आता विसरून जावा बगा बेळगाव तुमी!!" अशा अस्मितेला हात घालणाऱ्या वाक्याने करत असतात. त्यांचा तो अजागळ अवतार बघून मग आम्ही देखील छत्रपतींचे, एन. डी. पाटलांचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्मरण ठेवून "भालकी, बिदर, बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!" हि आरोळी (मनातल्या मनात) देऊन आमचे मराठीपण आणि लढाऊ बाणा जपत आलेलो आहोत.
त्यात आता कृष्णेवरच्या अलमट्टी नामक धरणाने आमची वडिलोपार्जित जमीन दर वर्षी पाण्याखाली जायला लागली आहे. पाव एकराचा, वाडवडिलांनी कसलेला जमिनीचा तुकडा, दर वर्षी पाण्याखाली जात असताना, पहात राहण्याशिवाय आम्हाला दुसरे काहीही करता येत नाही. त्यामुळे कुठेही कानडी दिसला कि त्याला याचाही जाब विचारण्याचा मोह आवरता आवरत नाही.
"आता बघाच तुम्ही कानड्यानो...सुप्रीम कोर्टात केस चालू आहे म्हणून जास्त बोलत नाही. नाहीतर दाखवला असता तुम्हाला मराठी हिसका!!" वगैरे वाक्ये मनात जुळवत बसलेलो असतो. ती बोलायचा संकल्प सिद्धीला जायच्या आतच आम्हाला आमच्या अष्ट कन्यांची आठवण होऊन आम्ही आमची अदृश्य तलवार म्यान करत आलेले आहोत.
पंजाबी -
हे लोक भारतात ट्र्क चालवतात आणि अमेरिकेत पेट्रोल पंप!! वास्तविक दोन्ही व्यवसाय हि मंडळी एकाच देशात का करत नसावीत हा देखील आम्हाला न उलगडलेला प्रश्न आहे. पण बंगाल्यांप्रमाणे हे लोक देखील फाळणीचे खूप मोठे ओझे घेऊन अमेरिकेत आलेले असतात. अमेरिकेत अनेक क्षेत्रात त्यांचा वावर आहे. यातले बहुतेक लोक शीख धर्माचे असून, ते कितीही शिकले, सवरले तरी एक धार्मिक बाब म्हणून, ते दाढी आणि केस राखतात. आमची त्या बद्दल काहीच तक्रार नाही. पण बहुतेक गुरु गोविंद सिंगांनी काही वेगळेच सांगितले असावे आणि यांनी काही वेगळेच ऐकले असावे असे आम्हाला कायमच वाटत आले आहे. कदाचित गुरु गोविंद सिंग जी म्हणाले असतील कि "सीखो और बल बढाओ" आणि यांनी ऐकले कि "शिखो और बाल बढाओ".. असो.
पण माणसे सोन्या सारखी असतात हे खरेच!! आपण कुणाच्या तरी उपयोगाला पडले पाहिजे यावर त्यांचा सगळा भर असतो. हे करत असताना, ते भान हरपून जातात. मागे मी एकदा कॅब केली होती तिचे सारथ्य एक सरदार जी करत होते. प्रचंड गर्दी होती. बहुतेक सगळ्या लेन मध्ये गाड्या जवळ जवळ थांबलेल्याच होत्या. अर्थात मलाही काहीही घाई नव्हती. पण सरदारजींना होती. त्यांनी हळू हळू एग्झिट च्या लेन मध्ये गाडी आणली आणि जोरात दामटली. मी हादरलोच. म्हटले, "प्राजी, अराम से जायेंगे. कोई जल्द नही।".. तर प्राजी मला जवळ जवळ रागावलेच. "सर जी, आप हमे मत सिखावो जी। आप पीछे अराम करो। बाकी हम है।".. वास्तविक पोलिसांनी बघितलं असतं तर या प्राजीना भक्कम तिकिट लागलं असतं. पण त्याचं त्यांना काहीही भय नव्हतं. परिस्थिती हातात घेऊन त्याच्यावर मालकी गाजवायची यांची खोड फार प्राचीन आहे. मग भले त्याच्यात त्यांचे नुकसान झाले तरी त्याची यांना पर्वा नसते. बघता बघता हजारो गाड्यांची गर्दी पालथी घालून मोजून १० मिनिटात यांनी घरी आणून सोडलं. पण त्यांचा एकूण अवतार बघून आमचीच त्यांना परत आज पर्यंत सारथ्याला बोलावण्याची हिम्मत झालेली नाही.. "तुसी ग्रेट हो प्राजी"...
पंजाबी जेवण म्हणजे तर "त्वाडा ज्वाब नही पुत्तर!!". मक्के दि रोटी आणि सरसों दा साग तो बस नसीब वालों दा मिले है। अजवन वाले प्राठे, अम्रीत्सरी कुल्चे आणि दाल मखनी हि तर खाण्याच्या पदार्थांची नावे नसून, स्वर्गातल्या अप्सरांची नावे आहेत असेही आमचे मत आहे. काय अदभूत स्वाद!! आणि त्यापेक्षा हे जेवण खिलवणाऱ्या भाभीजीची तर काय गोष्ट सांगावी!! इथे नाजूकपणाला वावच नाही. सगळा "घे मार आणि दे ठाय" प्रकार!! इतक्या प्रेमाने आणि आग्रहाने, मी तर म्हणेन हक्काने, दुसरीकडे कुठे जेवायला घालत असतील असे आमच्या तरी ऐकिवात नाही.
बाकीचे जेवू घालतात तर कुणी जेवण वाढतात. पंजाबी भाभी मात्र जेवण "खिलवतात"..फार फरक आहे. जी गोष्ट पंजाबी घरातल्या जेवणाची तीच गुरुद्वाऱ्यातल्या लंगरची!! सगळे स्वयंसेवक फुकट दिवस रात्र राबत असतात. कुणी तुमचे काढलेले बूट पोलिश करून ठेवतो. कुणी पाय पुसायला टॉवेल धरून उभा असतो. "सेवा" या शद्बाचा अर्थ समजावून घायचा असेल तर काही वेळ गुरुद्वाऱ्यात जाऊन राहावे असे आमचे मत आहे.
नाच, गाणे, बजावणे यांनी पंजाबी माणूस बेधुंद होऊन जातो. प्रसंग कुठलाही असो. फेर धरून एक भांगड्याचा झोल केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आणि गम्मत म्हणजे पंजाबी माणूस तामिळ किंवा केरळी मित्रांच्या लग्नांत देखील नाचताना भांगडाच करतो. आता त्या बिचाऱ्या तामिळ किंवा मल्लूनी, पांढरी शुभ्र लुंगी लावून भांगडा कसा करावा हा देखील आम्हाला पडलेला प्रश्नच आहे. तामिळ किंवा मल्लू माणसाला भांगडा करायला लावणे म्हणजे करकोच्याला बशीतून सूप प्यायला दिल्यासारखेच आहे!!
पण पंजाबी माणूस आत कुठेतरी दुःखी असावा असे वाटते. कदाचित दुलिपसिंगानी, व्हिक्टोरिया राणीला देऊन टाकलेल्या "कोहिनुर" हिऱ्याच्या आठवणीने त्याचे मन शोकाकूल होत असेल. कदाचित १८५७ मध्ये लाल किल्ल्याच्या लाहोर दरवाज्यावर बहादूर शहा जफरच्या स्वातंत्र्य सैनिकांवर, केलेल्या दुर्दैवी गोळीबाराच्या आठवणीने तो कष्टी होत असेल. कदाचित ते फाळणीचे दुःख असेल. पाकिस्तानात गेलेल्या गुरु नानकजींच्या गुरुद्वाऱ्याची आठवण येत असेल. ज्या गावावर जीवापाड प्रेम केलं ते "लाहोर" एका क्षणात कायमचं तुटलं याचंही दुःख असेल. कदाचित इंदिराजींच्या प्रसंगाचे वाईट वाटत असेल. जनरल अरुणकुमार वैद्यांविषयी काही मत मतांतरे असतील. कदाचित पंजाबातल्या व्यसनी आणि दिशाहीन युवकाकडे पाहून त्याला रडू येत असेल. काहीतरी आहे खास!! मला तरी प्रत्येक हसता खेळता पंजाबी आत कुठेतरी कण्हत असल्यासारखाच दिसतो.
वाघाचं काळीज आहे, म्हणून तर नियतीचे इतके बेभान फटके त्यांना सोसता आले आहेत. इतर कुणी असता तर त्याचा जगण्यावरचा विश्वास कधीच उडून जायचा!!
यातलच एखादं वाघरू आमच्या आठ पैकी एका गळाला लागलं तर आम्हाला आनंदच होणार आहे.
इतर भाषिकांचा शोध सुरूच ठेवणार आहे. भारतातच राहिलो असतो तर कदाचित कुंडली, गोत्र, नाड, जात हे बघून, तेवढ्याच वर्तुळात हे आठही नग खपवून मोकळा झालो असतो कदाचित!! ४-२ कुलकर्णी, ४-२ देशपांडे आणि उरलेले जोशी जावई करून, पडणाऱ्या वाड्यात, पडून राहिलो असतो झालं...
आपल्याच देशात इतक्या प्रकारचे जावई मिळू शकतात याचा "जावईशोध" खरे तर अमेरिकेत आल्यावरच लागलेला आहे. त्यामुळं अमेरिकेचे मनापासून आभार!!
कोणता जावई कधी आणि कितव्या क्रमांकाला मिळेल यावर खरे तर आमचे काहीच नियंत्रण नाही. चांगल्या वाईटाचाही हा प्रश्न नाही. आपण फक्त बघत राहायचं. कोण मिळालं तर काय होईल याची चौकट आधीच आखून घ्यायची इतकंच!!
शेवटी "ईश्वरेच्छा बलियसी"!! काय म्हणता?

Sunday, June 18, 2017

ए हसीनो

ह्या फेसबुकाने एक मोठाच प्राॅब्लेम करून ठेवला आहे..
जुनी जुनी, जवळ जवळ विस्मरणात गेलेली "प्रीतीपात्रे" आयुष्यात परत डोकावत आहेत.. त्यांचे ते मेनके सारखे फोटो, त्यांच्या एकाहून एक दिलखेचक अदा, काही विचारायची सोय राहीलेली नाही. कधी पाय घसरेल काही सांगतां यायचे नाही...
शाळेत असताना दोन वेण्या घालून, तांबड्या-पिवळ्या रिबीनी, डोकीस पॅराशूट (ते एक प्रकारचे तेल होते) चोपडून शाळेला येणाऱ्या, तसेच नाकासमोर (स्वत:च्या) चालणाऱ्या या मुलींच्या अचानक मेनका, उर्वशी आणि रंभा कधी झाल्या ते कळेनासे झाले आहे.
त्यांचे नवे रूपडे पाहून त्याचे कौतुक करणे भागच आहे. परंतु अशा प्रकारच्या कौतुकाला आपल्याकडे "सांस्कृतिक" परवानगी नसल्याने उर्दूचा आधार घ्यावा लागत आहे.
ख्वाब है या जिंदगी,
आप को देखे जमाना।
जब आप देखे हमे कही,
तब जिंदगी ख्वाब बन जाये।
अर्थात सासऱे मामांनी, गडाचे दोर जवळजवळ १५ वर्षांपूर्वीच कापलेले असल्याने, "अस्मिते"ला कसलाही धक्का न लागू देतां सर्व मावळे, गडावरच लढत राहणार आहेत.
तरी एक विनंती अवश्य करावीशी वाटते. असल्या विनंत्या देखिल "सांस्कृतिक" नाहीत. त्यामुळे परत उर्दूचा आधार!!
ए हसीनो, इतनी तो खातीर करो,
देखने वालो की।
होष उड जाये तब तक तो ठीक है,
पर वे कही बेहोष ना हो जाये।
अर्थात हे अद्भूत रुपांतरण पाहून, मुलींनी त्यांच्या वयाच्या ३५ व्या वाढदिवसानंतरच शाळेत जायला सुरूवात करावी की काय असाही एक विचार मनांत आल्या शिवाय राहात नाही.

नाव नावाची गोष्ट

आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवावं, हा वास्तविक ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असे किती जरी म्हटले तरी, ज्या समाजात माणूस राहतो, त्या समाजाचा मुलांच्या नावावर आणि उलटपक्षी त्या नावांचा त्या समाजावरही परिणाम होतच असतो. बऱ्याच वेळेला या आई वडिलांनी दिलेल्या नावांमुळे, "नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" याचा प्रत्यय येत असतो. प्रत्येक नावाला एक प्रकारचे सामाजिक वलय अाणि प्रतिमा असते. मग ते नाव धारण करणाऱ्या माणसाची इच्छा असो अथवा नसो, त्याला ती समाजमान्य प्रतिमा सिद्ध करावी लागते. काही काही माणसे इतकी कर्तबगार असतात की ती त्या नावाला एका वेगळ्या उंचीवर घेवून जातात. पण काही माणसे जन्मभर त्या प्रतिमेच्या आगे-मागे घुटमळत राहतात.
परवा एक राजकीय नेते तावातावाने बोलत होते की ब्राम्हण लोकात मुलाचे "शिवाजी" असे नाव ठेवत नाहीत. आणि याचे कारण म्हणजे ब्राम्हण समाजाचा "शिवाजी" ला असलेला छुपा विरोध हे दिले होते. खरेखोटे माहीत नाही. पण माझ्या माहितीत तरी "शिवाजी जोशी", "शिवाजी लेले" किंवा "शिवाजी देशपांडे" आढळात नाही. पण जसा "शिवाजी" नाही, तसा सांप्रत काळी कुणी "बाजीराव जोशी", "बाजीराव लेले" किंवा "बाजीराव देशपांडे" देखिल आढळात नाही. अर्थात आमचे मर्यादीत वर्तुळ हे देखिल त्याचे एक कारण असू शकेल. पण त्यामुळं ब्राम्हणात "शिवाजी" नाव नसायचं कारण काहीतरी वेगळं असणार असे आमचे एक ठाम मत आहे. कदाचित ब्राम्हण समाजाला "शिवाजी" या नावाबद्दल इतका जास्त आदर असू शकतो, कि जोपर्यंत आपले "कारटे" त्या योग्यतेचं काम करत नाही, तो पर्यंत त्याला "शिवाजी" म्हणून हाका मारणं त्यांना संयुक्तिक वाटत नसावे.
"हनुमंतराव" किंवा "मारोतराव" हे असेच एक भारदस्त नाव आहे. हे नाव धारण करणारा माणूस हा घणघणीत तब्बेतीचा आणि भारदस्त आवाजाचा असावा ही एक माफक अपेक्षा असते. बऱ्याच वेळेला, या "हनुमंतरावांचा" किंवा "मारोतरावांचा" जन्म देखिल हनुमान जयंती किंवा राम नवमी या दिवशी झालेला असतो. तेव्हा आपले अपूर्ण राहीलेले पैलवानकीचे स्वप्न आपले चिरंजीव पूर्ण करतील, अशा आशेने वडिलांनी, काकांनी नाहीतर मामांनी यांचे नाव, "हनुमान", "हनुमंत", "जांबुवंत" किंवा मारुती" असे शक्तीचे आराध्य दैवत असणारे असे ठेवलेले असते. पण पुढे मग त्या मुलाच्या एकूण कर्तबगारीला अनुसरून, त्याचे एकतर, "हनुमंतराव", "मारोतराव" होते किंवा मग सरकारी आॅफिसातून आरोळ्या ऐकू येत राहतात "मारूती, ती चौदा नंबरची फाईल घेऊन ये" किंवा शेताच्या बांधावरून हुकूम सुटतात की "हणम्या, ए हणम्या रं, बैलं सोड गड्याभाऊ!!". अर्थात या "मारूती" किंवा "हणम्या" चे क्वचित प्रसंगी, त्यांच्या मुलाच्या किंवा पुतण्याच्या लग्नात, मानपानाला धरून, मुलीकडची मंडळी मांडवात असे पर्यंत, अचानक "मारोतराव" किंवा "हणमंतराव" होत असतात. पण तो त्यांचा मूळ पिंड नसल्याने, परत संध्याकाळी मिरवणूक संपली की कुणीतरी सांगत येतो की "मारत्या पिऊन गटारीत पडलय" म्हणून!! असे घनगंभीर नाव धारण करून, ते नाव सार्थ करून दाखवणारे, "खासदार जांबुवंतराव धोटे" किंवा "हिंदकेसरी पैलवान मारुतीराव माने" अशी उदाहरणे फारच कमी दिसतात.
"राजा" या नावाचाही मराठी मनावर चांगलाच पगडा आहे. राजा गोसावी, राजा परांजपे यांनी एक काळ खरेच "राजा" सारखा गाजविलेला आहे. जयसिंगपूरात एका वक्तृत्व स्पर्धेसाठी राजा गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. इतर वक्ते राहीले राहीले बाजूला. राजाभाऊंनी पहिल्या वाक्यात सभा जिंकून टाकली. म्हणाले, " नमस्कार मंडळी, मी राजा गोसावी. म्हटलं तर राजा नाहीतर गोसावी"..इतकी राजस वृत्ती राजाचीच असायची.
"शरद" या नावाचीही मराठी माणसाला भारी हौस. या नावाला जातीचे वावडे नाही. तळवळकर, जोशी, पवार, पाटील असा यत्र-तत्र-सर्वत्र असा वावर आहे. बर ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आभाळाएवढी मोठी आहेत. त्यांनी या नाम महात्म्यात भरच घातली आहे.
"रघुनाथ" या नावाची तऱ्हा थोडी वेगळी आहे. वास्तविक हे पुर्ण पुरुषोत्तम असलेल्या प्रभू रामचंद्राचे नाव आहे. त्यामुळे ते सर्वात जास्त प्रचलित असायला काहीच हरकत नव्हती. आता उद्या कोणी असेही म्हणेल की राम क्षत्रिय होता. म्हणून ते नाव ब्राम्हणात ठेवत नाहीत. परंतु मधल्या पेशवाईच्या काळात प्रत्यक्ष थोरल्या बाजीरावांच्या पुत्राने, राघोबादादानी हे नाव धारण करून त्याला एक वेगळेच महत्व प्राप्त करून दिलेले दिसते. ज्या मराठ्यांच्या गादीचा आपण अभिमान बाळगतो, तिचे, "मराठेशाही" मधे रूपांतर करायचे श्रेय, खरे तर बाजी-रघुनाथ या पिता-पुत्रांचे! त्यातही जरीपटका अटकेपार गेला तो तर प्रत्यक्ष रघुनाथरावांच्या अंबारीवरून!! इतका मोठा पराक्रम केल्यावर मराठी घराघरातून एक तरी रघुनाथ दिसायला हवा होता. पण कदाचित नंतर च्या पेशवाईच्या पडत्या काळात एकानेक कारणांमुळे कदाचित या नावाचा करिष्मा संपत गेला असावा.
"गोपाळकृष्ण" या नावाची गंमत वेगळीच आहे. वास्तविक गोपाळ हे विशेषण असून कृष्ण हे नाम आहे. पण "कृष्ण" पेक्षा "गोपाळ" हे निदान महाराष्ट्रात तरी अधिक प्रचलित आहे. कृष्णाचे जरासे ग्राम्य रूप "किसन" असे असले तरी "किसना" मधून कृष्णाचा खट्याळ, लडिवाळ चेहरा दिसत राहतो. या उलट "गोपाळ" नाव धारण करणारी मंडळी, लवकरच "गोपाळराव" पदाला पोचतात असेही एक निरीक्षण आहे.
मागे मी एका बॅंकेत गेलो होतो. तिथल्या शिपायाचं नाव होतं "दशरथ". हा "दशरथ" अतिशय डिमांड मधे होता. क्षणाक्षणाला त्याला हाका सुटत होत्या. "दशरथ, ते फॅारेन एक्सचेंज चे लेजर आण.", "दशरथ, या पासपोर्ट च्या दोन काॅपीज काढून आण", "दशरथ, ते डेबिट कार्ड चे रजिस्टर घेवून ये", "दशरथ, साहेबांना पाणी आण.", "दशरथ ८ नंबर वर थोडी कॅश आणून दे.". माझ्या ३० मिनिटांच्या वास्तव्यात, अगणित वेळा "दशरथ" या नावाचा पुकारा झाला. माझे ऊर अभिमानाने भरून आले. अनेक कामे लिलया पार पाडत, "इदंम् न मम" असा निर्विकार चेहरा करून झेराॅक्स मशिनपाशी उभा राहून काॅपीज काढणारा "दशरथ" पाहून मला त्याचा अपार अभिमान वाटला. ज्या महान व्यक्तीचे नाव त्याने धारण केले होते, त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या वडिलांपेक्षा तो मला कर्तबगार वाटू लागला.
रामचंद्रांच्या वडिलांनी, रथात केवळ उभे न राहता, या बॅंकेतल्या दशरथाप्रमाणे, अखंड सावधानता दाखवली असती, तर कदाचित त्यांना, शत्रुचा वेढा पडला नसतां. कैकेयीची मदत घ्यावी लागली नसती. मग तिला वर द्यावे लागले नसते. त्या वरांमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला नसता. भरतावर कसलेही राजकीय आणि सामाजिक दडपण आले नसते. लक्ष्मणाचा संसार सुखाचा झाला असता. सीतेला रावण पळवून नेऊ शकला नसतां. कदाचित रामाची आणि सुग्रीवाची भेट झालीच नसती. त्यामुळे कदाचित आपल्याला हनुमान, जांबुवंत वगैरे कोण हे कळले देखिल नसते. त्यामुळे कुणीही त्यांच्या मुलाचे नाव "मारोती" किंवा "हनुमंत" ठेवलेही नसते. त्यामुळे अशा सर्व "मारोती" आणि "हनुमंत" यांचे, नावापुढे "राव" लावण्याच्या जीवघेण्या खटपटीतून कायमची सुटका झाली असती. विचार करू तेवढा थोडाच आहे.
मागे कानपूर का लखनौमधे पोलिसांनी एका पाकीटमाराला पकडल्याची बातमी वाचली. त्यात त्या पाकिटमाराचं नाव होतं, "दिलीप गुप्ता"!! मोठी गंमत वाटली. प्रभू रामचंद्रांचे एक महापराक्रमी पूर्वज होते त्यांचे नाव होते "दिलीप"...आणि भारतवर्षातली छोटी छोटी स्वतंत्र राज्ये संघटीत करून त्यांचे गणराज्य स्थापन करणारे राजघराणे होते "गुप्ता".. प्रत्यक्ष आर्य चाणक्यानी ज्याला शिकवून अखंड भारत वर्षांचा सर्व सत्ताधीश सम्राट केले, त्या चंद्गगुप्ताचे हे "दिलीप गुप्ता" वंशज!! या अशा, एक महान नाव धारण केलेल्या "दिलीप गुप्तांची" नव्या सरकार दरबारी नोंद एक पाकीटमार म्हणून होणे, हे समाजाच्या अधोगतीचे व्यवच्छेदक लक्षण नाही काय?
हे म्हणजे जिल्हे इलाही, माबदौलत, सल्तनत-ए-हिंद, शहेनशाह अकबर यांच्या सहाव्या किंवा सातव्या पिढीतील "इसरत बेगम" किंवा "फातिमा बेगम" नावाच्या सुनेने, लाल किल्ल्याच्या बाहेर वडा-पावची गाडी चालवण्यासारखेच आहे.
वास्तविक अमेरिकेला वावडे असलेल्या गोष्टींचा यादी खूपच छोटी आहे. पण त्यात "ॲडाॅल्फ" हे अगदी वाळीत टाकण्यात आलेले नाव आहे. हे नाव अमेरिकेत धारण करायला कायदेशीर बंदीच आहे. ठीकच आहे. ज्याच्या उच्चाराने लाखो माणसांच्या कत्तलीचे स्मरण होते, असले नाव ठेवायची गरज ही नाही. भारतात "नथुराम" या नावाचे देखिल हेच झाले असावे. वास्तविक सीताराम, राजाराम, सावळाराम, जलाराम तसेच नथुराम हे पण एक राम नामच..पण या राम नामाने "हे राम" चे महत्व वाढवून स्वत:चा शेवट ओढवून घेतलेला दिसतो.
अमेरिकेत येवून राहीलेल्या भारतीय, त्यातल्या त्यात मराठी लोकांमधे, कुठले कुठले संस्कृत शब्द, नाव म्हणून ठेवायची स्पर्धा लागलेली दिसते. ह्या संस्कृत शब्दांचा उच्चार थोडासा वेगळ्या पद्धतीने केला की एखादे इंग्रजी नाव वाटावे याची देखिल खबरदारी घेतलेली असते. परवा एका भारतीय मुलीची आई तिला "हे डियाना", "हे डियाना" म्हणून हाक मारत होती. आम्ही न राहवून आश्चर्याने आणि कौतुकाने, मुलीचे शुद्ध इंग्रजी नाव ठेवल्याबद्दल त्या बाईंचे अभिनंदन केले. त्यांवर त्या बाईनी आम्हाला वेड्यातच काढले. त्यांनी "डियाना" हा संस्कृत शब्द असल्याचे सांगून, हल्ली कसली कसली "असंस्कृत" माणसे अमेरिकेत येतात असा झणझणीत कटाक्ष टाकला (म्हणजे मराठीत "लूक दिला"). मी संपूर्ण शरणागतीनं त्यांना त्याचा अर्थ विचारला तर म्हणाल्या की, "तिचं खरं नाव की नाही "ध्याना" आहे. पण आम्ही सगळे तिला "डियाना" च म्हणतो. वाटतय की नाही अमेरिकन?" आम्ही चाटमचाट!! प्रश्न फक्त असा पडला होता की या अमेरिकन मराठी मुलीने "ध्याना" होण्यासाठी मेहनत घ्यायची की "डियाना"?
"सिद्धार्थ" चे "सिद" झाले आहेत. "विक्रम" चे "विकी" झाले आहेत. "अशोक" चे "एशाॅक" झाले आहेत. या मुलानी देखिल नेमके कोणाकडे पहात मोठे व्हायचे हा प्रश्नच आहे.
अामचे एक स्नेही, अर्थात संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषा कोविद!! त्यांनी त्याच्या मुलाचे नाव ठेवलय "व्यास". ते ऐकून मला भरून आले. मत्स्यकन्येचा मुलगा, पुढे मोठी दाढी, जटा वगैरे वाढवलेले, "व्यासंग" हा शब्द ज्यांच्या नावामुळे तयार झाला असे विद्वान पुरूष, वेदमूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आले. आणि अचानक आतल्या खोलीतून वहीनींचा आवाज आला की "अरे व्यास चे डायपर संपत आले आहेत. आज काॅस्टकोत जावेच लागेल."
३२,००० फुटांवर असताना आमचे कल्पना विश्व, "व्यासांचा डायपर" नामक पक्षाला धडकून, अचानक जमिनीवर आदळले. मग पुढे "व्यास आता रात्री दर ३ तासांनी उठतो", "व्यासला आम्ही एनफामिलचा फाॅर्म्युला देतो", "व्यासला शाॅट द्यायचे आहेत", "अले लब्बाड, व्याशू!!", "व्यासचे केस किती लांब आहेत", "अगं व्यासला ओकी झाली वाटतं" वगैरे वाक्ये ऐकू येत होती. पण त्याचे काहीही वाटायचे बंद झाले होते.
याहून गमतीचा प्रकार म्हणजे आमचे दुसरे स्नेही, हे देखिल, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी कोविद!! (अमेरिकेचा विसा मिळवला की देशी लोक या किमान तीन भाषात आपोआप कोविद होतात.) तर त्यांनी त्यांच्या बछड्याचे नाव ठेवले आहे "भीष्म"!! ते ऐकून, आणि आमचा "महर्षी व्यासांचा" पूर्वानुभव लक्षात घेऊन, पितामहांचे डायपर, पितामहांच्या शी-शू करण्याच्या वेळा वगैरे मौलिक चर्चा सुरू होण्याआधीच तिथून लगोलग सटकलो.
परंतू सांप्रत काळात यातल्याच एखाद्या "आरव मुनींचे", "महर्षी व्यासांचे" किंवा "पितामह भीष्मांचे", चि. सौ. कां. "डियाना" हीज बरोबरच्या शुभ-विवाहाची निमंत्रण पत्रिका कधी पहायला मिळते याची उत्कंठा लागून राहीली आहे.

एक होती आजी

आपला जन्म कुठल्या गावात व्हावा हे जसे आपण ठरवू शकत नाही अगदी तसेच आपले आई-वडील कोण असावेत हे देखील ठरवू शकत नाही. मग आजी आजोबांची गोष्टच दूर!! पण असे जरी असले तरी आजी-आजोबा आवडत नाहीत असा माणूस या पृथ्वीतलावर नावालाही सापडायचा नाही. ज्या गोष्टीवर आपले अजिबात नियंत्रण नाही, ज्याच्या मध्ये आपल्या आवडी निवडीला कसलेही स्थान नाही, त्या आजी-आजोबांच्या नात्याबाबत मात्र विलक्षण ओढ आणि निखळ प्रेम असते. कदाचित कोवळ्या वयात फक्त निखळ प्रेमाचे संस्कार व्हावेत म्हणून परमेश्वरानेच हे असे अढळ नाते निर्माण केले असावे. कोण असतात हे आजी-आजोबा? त्यांना का वाटते एवढे प्रेम? काय देतात ते आपल्याला? आणि आपण त्यांना काय देतो ? सगळेच गूढ आहे.
आयुष्य भर खस्ता खाउन त्यांनी त्यांच्या मुलांना मोठे केलेले असते. आता मुले मार्गी लागली की मग त्या खस्ता आपोआप बाजूला पडतात आणि सुरु होतो त्यांच्या आयुष्यातला आनंदोत्सव!! एखाद दुसरे नातवंड मांडीवर नाहीतर कडेवर आले की त्यांना साऱ्या कष्टांचा विसर पडतो आणि निखळ प्रेमाचा झरा, पुन्हा एकदा खळाळून वाहायला लागतो. या झऱ्याला कसलेही बंध नसतात. कसले किनारे नसतात. कसली वळणेही नसतात. हाती आलेल्या नातवंडाच्या आयुष्याची सुरुवात जास्तीत जास्त प्रेमाने करून देण्याचा हा एक ईश्वरी प्रयत्न असावा असे वाटते.
फुलांचे परागकण जपण्यासाठी, ज्याने मऊ, मुलायम पाकळ्या तयार केल्या, त्यानेच कधीतरी माणसाच्या मऊ मनाला जपण्यासाठी आजी-आजोबा तयार केले असावेत.
मग वाऱ्या-पावसात त्या परागांनी कितीही खिदळावे. कोवळ्या उन्हांशी तासंतास गप्पा कराव्यात, कधी रंगीबेरंगी फुलपाखरांना आपले गूज सांगावे. कधी घटकाभर इंद्रधनुष्याचे रंग वेचावेत नाहीतर कधी आपलाच रंग न्याहाळत बसावे. त्या परागांचे सारे विश्व त्या पाकळ्यातच सामावलेले असते. त्या परागांना सारे जग मग त्या पाकळ्या इतकेच मऊशार भासते. सोबतीला फक्त सुगंध असतो आणि वेड्या वाऱ्याचा छंद असतो.
या निष्पाप, अल्लड परागांना तेव्हा कशाचीही पर्वा नसते. ते बेभान होऊन नाचतात. पाकळ्यांच्या अंगणात, पावसात भिजून चिंब होतात. धुक्यात लपून कुंद होतात. पाकळ्यांना आपला गंध देतात आणि नकळत पाकळ्यांचा रंग घेतात.
हलकेच एका नव्या आयुष्याची सुरुवात होते.
मी वास्ततिक तिचा चौथा नातू!! पण मुलाकडून पहिलाच. त्यामुळे थोडा इतरांपेक्षा अधिक लाडका. आम्ही नातवंडे आजीला आजी आणि आजोबाना आण्णा म्हणायचो!! आण्णा त्याच्या भावंडामध्ये सगळ्यात मोठे होते. त्यांना ३ धाकटे भाऊ आणि २ बहिणी होत्या. त्यामुळे आजी घरातली पहिलीच सून आणि सगळ्यांची लाडकी वहिनी!! त्यामुळे तिला सगळे वहिनीच म्हणायचे. ते ऐकून ऐकून माझे वडील आणि आत्या सुद्धा तिला वाहिनीच म्हणायला लागले. इतके कि मी संपूर्ण आयुष्यात आजीला माझ्या वडिलांनी किंवा आत्यानी कधीच आई म्हणून हाक मारलेले ऐकले नाही. तर या वहिनीचा मान खूप मोठा होता. आता ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडायची तिथे फुकटच्या मानाशिवाय दुसरे होते काय द्यायला!! पण तिचा अधिकार होता. आजोबांचे सगळे भाऊ तिचे सगळे ऐकायचे. पुढे पुढे एक एक होत त्यांची लग्नं झाली. पायावर बसून त्याची पोटं मग हळू हळू चहु दिशांना निघून गेली. आणि मग खऱ्या अर्थाने आजीचा संसार सुरु झाला. अण्णा हेर्लेकर हे देवी डॉक्टर होते. आताच्या मुलाना "देवी" हे प्रकरण माहीतच नसते. दंडावर भयावह डाग घेऊन मिरवणारी आमची पिढी शेवटची ठरली त्याचा आनंदच आहे. तर ते भयावह डाग कोवळ्या दंडावर काढून त्या निष्पाप जीवाला "न भूतो न भविष्यती" रडवण्याचा त्यांना पगार मिळत असे. म्हणजे त्याच्यात वाईट काही नव्हते. पण आता आपल्याकडे बघून ईश्वरी प्रसाद असल्यासारखे हसणारे हे बाळ आता काही क्षणात मरणोप्राय वेदनांनी टाहो फोडणार आहे हे माहीत असूनही, मोठ्या धीरोदात्त पणे दंडावर देवीचा बत्ता घुसवणाऱ्याला कर्मयोगीच म्हटला पाहीजे.
त्यामुळे जिथे देवाची यात्रा तिथे त्यांचा मुक्काम असायचा. कधी पंढरपूरला विठोबाकडे तर कधी कार्ल्याला एकवीरा देवी कडे!! तिथे बरेच यात्रेकरू देवदर्शनाला म्हणून यायचे आणि तिथूनच एखादा रोग घेऊन पुढच्या कायमच्या प्रवासाला निघायचे. अशा वेळी अण्णांचे काम म्हणजे त्यांना रोगाची सरकारी लस देणे हे असायचे. त्या भक्ताला प्रत्यक्ष देव भेटीला न जाऊ देता देव दर्शन घेऊन घरी परत पाठवणे याच्यावर अण्णांचा भर असायचा. त्यामुळे असेल म्हणा किंवा त्यांचा पिंडच तसा होता म्हणा पण अण्णांचा देवावर फारसा विश्वास नव्हताच. त्यांच्या कामाचे स्वरूपच असे होते कि त्यांनी कुणाच्या बरोबर राहावे, काय खावे, कुठे आणि कधी झोपावे याच्यावर त्यांचा कसलाही अधिकार नव्हता. 'जेव्हा जे मिळेल तेव्हा तसे' असे त्यांच्या आयुष्याचे अगदी सोपे तत्वज्ञान होते. मिरज आणि शेजारच्या कर्नाटकात खूप छोटी-छोटी गावे आहेत. हि गावे इतकी छोटी होती कि काही काही गावांना तर जायला रस्ताच नव्हता. गावाच्या शेजारून बेळगाव रेल्वेचे, मीटर गेजचे, रूळ मात्र गेलेले असायचे. मोठ्या-मोठ्या एक्स्प्रेस तिथून जायच्या पण एकही गाडी थांबायची नाही. तेव्हा अशा गावात जाण्यासाठी सरकारने आजोबाना रेल्वेचे एक इंजिन ड्रायवर सकट assign केले होते. या इंजिन मध्ये बसून अण्णा त्या गावापर्यंत जायचे. तेवढ्या पुरते इंजिन थांबायचे. काम झाले कि परत इंजिन मधे बसून पुढे!! आजोबाना त्याचा अतोनात अभिमान होता !! पुढे देखील अण्णा किती तरी वेळा त्यांच्या या इंजिन बद्दल सांगायचे. मोठी मजा वाटायची. पण या सगळ्यामुळे त्यांचे घराकडे अतोनात दुर्लक्ष व्हायचे. त्यांचा सरकारी नोकर कधीही घरी बोलावयाला यायचा. यांची वळकटी बांधून तयारच!! गेले कि मग पुन्हा महिना-महिना घरी यायचे नाहीत. मुलांचे काय झाले, बायकोचे काय झाले याची त्यांना सुतराम फिकीर नसायची. अर्थात फिकीर नसायची हे खरे का त्यांचा आजीवर गाढ विश्वास होता हे खरे, ते नक्की सांगाता यायचे नाही. पण तो कर्मयोगी घर-दार आजीवर टाकून कुठे तरी प्लेगाच्या नाहीतर देवीच्या साथीवर निघून जायचा आणि मग आजी घराचा बाप होऊन कामाला लागायची.
अण्णांच्या नोकरीचा दुसरा प्रकार अजून वेगळा होता. तो म्हणजे सरकारी दरबार आणि महिना ५ रुपये पगार!! त्यांचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इतके गरीब असायचे कि पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यापलीकडे त्यांच्या कडे देण्यासारखे काहीही नसायचे. अण्णांचेही काही मागणे नव्हते. उलट माळ्यावर नाहीतर शेतात लपून बसलेली पोरं शोधून काढून अण्णा त्यांना लस द्यायचे. आणि लपून बसल्या बद्दल पाठीत एक रट्टा देखील द्यायचे. मिरज म्हणजे मराठी-कानडी दोन्ही जोरात!! अण्णांना दोन्ही भाषा इतक्या सफाईने बोलायला यायच्या कि यांची मातृभाषा नेमकी कोणती असा प्रश्न पडायचा. त्यामुळे त्यांचे कुठे अडायचे नाही. कुठल्याही गावी जायचे. तिथल्या बाप्याला बोलवायचे. पोरांना लशी द्यायचे. मग त्याच्या घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेबद्दल त्याची खरड निघायची. मराठी किंवा कानडी, त्याची जी भाषा असेल त्याच्या मातृभाषेत त्याच्या अस्वच्छतेबद्दल, अगदी त्याला समजेल अशा अर्वाच्य शब्दात, समज दिली कि हे चालले पुढच्या घरी!! समाज सेवाच ती!! एकूण त्यांच्या कामात ते मग्न होते एवढाच त्या कामाचा घरासाठी उपयोग होता. आजी मात्र विलक्षण होती. चतुर होती. धाडसी होती. करारी होती. धूर्त होती. घरात जे काही थोडे फार हेर्लेकर घराण्याचे म्हणून वैभव वाचले होते ते देखील गांधी हत्येनंतर लोप पावले. आजी सांगायची कि तिचे लग्न झाले तेव्हा घरात चांदीची भांडी होती. गाडी भर आंबे यायचे शेतातून वगैरे वगैरे!! पण आता म्हणजे एका प्लास्टिकच्या ग्लास मधे थोडे थोडे शेंगदाणे ठेवलेले असायचे आणि दुसऱ्या तसल्याच ग्लास मधे थोडे शेंगदाण्याचे तेल!! कोडोलीकर गल्ली मधे कृष्णराव कोडोलीकरांचा वाडा होता. त्यात रस्त्याला लागून एक दुकानासारखी खोली होती त्यात तिचा संसार चालू होता. पुढे कधी गप्पा मारताना मजेत आली कि हळूच तिच्यातला लपलेला त्रागा डोकावून जायचा. आजी म्हणायची कि 'गांधी परवडले पण नथुराम नको. तो म्हाताराही मेला. हा तरणाही मेला. फुकट आमचं घर दार मात्र धुऊन गेला!!' काही खोटे नव्हते त्याच्यात. "इनामदार हेर्लेकर कुलकर्णी" अचानक "दारोदार कुलकर्णी" झाले होते आणि त्या "दारोदार" होण्याची प्रत्यक्ष लाभार्थी होती आजी!!
हिम्मत हरेल ती आजी कसली!! तिने एकच ठरवले होते कि पोरांना शिकवायचे. तिच्या घरासमोर त्यावेळी तात्याकाका कोडोलीकर राहायचे. मोठे जमीनदार!! २०० का ३०० वर्षे जुना चौसोपी वाडा होता. वाड्याला मोठे किल्ल्याला असते तसले भले मोठे दार होते. त्या दाराला दिंडी दरवाजा होता. तो दिंडी दरवाजा देखील इतका मोठा होता कि आम्ही लहान पोरं त्या दिंडी दरवाज्यातून न वाकता चालत जायचो. त्याच्या पुढे पडवी होती. बाजूला जनावरांचा मोठा गोठा होता. त्यात हटकून एखादी गाय नाहीतर म्हैस व्यालेली असायची. त्याचं वैरण, चारा, पेंड बाजूला रचलेला असायचा. त्याच्या पुढे सोपा होता. सोप्याला एक जुना शिसवी कडीपाटाचा झोपाळा होता. झोपाळ्या खाली भले मोठे पेव होते. झोपाळ्याच्या मागे आणि पेवात भरपूर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची. त्यानंतर माजघर, त्याच्या बाजूला बाळंतीणीची अंधारी खोली होती. तिथून आत गेल्यावर मग जेवायची जागा होती. त्याच्या एका बाजूला तुळशी वृंदावन होते आणि दुसऱ्या बाजूला चुलखंड होते. मागे न्हाणीघर आणि त्याच्या मागे मोठे परसू होते. त्यात हत्ती सारखी चिंचेची झाडे होती. वरच्या मजल्यावर सगळ्या झोपायच्या खोल्या होत्या. खोल्या कसल्या महालच ते! मोठे घर. त्यात माणसे पण भरपूर रहायची. २ भाऊ, ४ बहिणी, आला-गेला, वाटेकरी, नातेवाईक, आश्रित अशी सगळी मिळून किमान पक्षी २५ ते ३० लोकं तरी पंक्तीला असायची. या पंक्तीला कधी कधी गावातली मंडळी सुद्धा असायची सहज गम्मत म्हणून!! गांधी गेल्यावर तात्या काका बंदूक घेऊन गल्लीच्या दारात उभे राहिले होते म्हणे!! त्यामुळे गल्लीतली बरीच घरे वाचली. त्यांचाही वाडा वाचला. तर त्यांच्या घरी तीन त्रिकाळ जेवणाच्या पंक्ती उठायच्या. एकेका पंक्तीला १००-१०० भाकरी लागायच्या. मग आजी त्यांच्याकडे भाकरी करायला जायची. ५० भाकऱ्या थापल्या कि काकी, काकी म्हणजे तात्या काकांची बायको, तिला २-३ भाकऱ्या आणि भाजी द्यायच्या. त्याच्यावर बाबा आणि आत्याचे जेवण व्हायचे. कृतार्थ मनाने कोडोलीकराना धन्यवाद देत सगळी रात्री झोपी जायची. पुढे मी मोठा झाल्यावर कधी कधी रात्री न जेवताच झोपायला जायचो तेव्हा आजी अगदी कळवळून डोक्यावरून हात फिरवून म्हणायची "उपाशी झोपू नये रे बाळा!!' ती असे का म्हणायची ते कळायला बराच वेळ जावा लागला. तिच्या हाताला बसलेले चटके तेव्हाही जिवंत होते.
आपल्याला हवे ते मिळणे याला जर सुख म्हटले तर आपल्याला जे मिळाले ते हवेसे वाटणे याला मुक्ती म्हणत असावेत. त्या अर्थाने आजी मुक्त होती. तिचे नाव देखील मोठे निर्गुण निराकार होते. कमल. त्याला कुठेही आकार नाही. कसला उकार नाही. वेलांटी नाही कि मात्रा नाही. ती आसक्त तर नव्हतीच. विरक्तही नव्हती. कृष्णाने गीतेत सांगितल्या सारखी ती 'अनासक्त' होती. अगदी मुक्त होती.
मुले मोठी होत होती. शाळेत जायला लागली. त्यांच्या शाळेची फी, पुस्तके, वह्या नवा खर्च उभा राहिला. तशी तिने गल्ली मधली मुले आणि मुली गोळा केली. त्यांच्या सगळ्यांच्या शिकवण्या चालू केल्या. महिन्याला ८ आणे फी! विषय गणित! वास्तविक आजी स्वत: तेव्हाची सातवी पास!! वडील शाळा मास्तर. एकूण १३ भावंडां मध्ये हि ११ वी!! वयाच्या ५ व्या वर्षीच तिची आई देवाघरी गेली आणि मग मोठ्या भावांच्या आणि बहिणींच्या आधाराने मजल दरमजल करत अगदी लग्न होईपर्यंत शिकत राहिली. अण्णा तिच्या पेक्षा चांगले १५ वर्षांनी मोठे होते. लग्न झाले तेव्हा तर जोडी अगदीच विजोड दिसत होती. पण आई विना वाढलेली पोरं!! तिचे वडील सगळ्यांचे करून करून अगदी भागले होते. जे कुणी पहिल्यांदा समोर आले ते त्यांनी जावई केले आणि एकेका पोरीला उजवून मोकळे झाले. अर्थात कुणाचे काही वाईट झाले नाही पण इथे कुणाच्या पसंतीला फारसा वाव नव्हता इतकेच!!
तर आजीने तिचे जुजबी शिक्षण अगदी हातोहात वापरून घेतले. तिचा स्वभाव अतिशय बोलका होता. कुणालाही ती अगदी काही क्षणात आपलेसे करून टाकायची. अगदी कुठेही गेली तरी तिला तिच्या ओळखीचे कुणीतरी भेटायचे. आणि कुणी ओळखीचे भेटले नाही तर हि नव्या ओळखी तयार करायची. वाघ कळपात रहात नाही कारण त्याला त्याची गरज नसते. तो एकटाच त्याच्या साठी समर्थ असतो. पण गरीब गाई, हरणे, नाहीतर शेळ्या नेहमी कळपात राहतात. त्यांना संगतीची विलक्षण ओढ असते. आजीला अशीच संगतीची ओढ होती. कुणाशीही बोलावे. कुठले गाव, माहेर कुठले, मुलगी कुठे दिली आहे, सून कुठली आहे, यातल्या कुठल्या तरी प्रश्नावरून एखादे तरी ओळखीचे गाव तिला सापडायचे आणि मग या गावात माझा भाऊ असतो, नाहीतर बहिण असते, नाहीतर दीर, भाऊजय, नणंद कुणी ना कुणीतरी असते म्हणून ज्या गप्पा सुरु व्हायच्या कि तो माणूस मुग्ध होऊन जायचा. पहिल्या भेटीत आजीच्या अगदी जीवा-भावाच्या मंडळीमध्ये तो माणूस जमा!! अर्धे मिरज तर तिला प्रत्यक्ष ओळखायचे. त्याच्यात मोठे मोठे नामांकित डॉक्टर होते. प्रथितयश वकील होते. मग गल्लीतल्या सगळ्याच पालकांनी आपली मुले अगदी खुशाल तिच्या शिकवणीला पाठवली. त्याच्यात मग श्रीमंताची मुले होती. गरीबाची होती. अगदी आमच्या गल्लीत एक मुसलमान कुटुंब होते. व्यवसायाने तांबट. म्हणजे तांब्याच्या घागरी वगैरे तयार करायचे. आणि त्यांच्या बायका तंबाखूच्या बिड्या वळून विकायच्या. शिक्षणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. पण आश्चर्य म्हणजे त्यांचा गेंगाणा सिकंदर पण आजीच्या शिकवणीला यायचा. आजी मुलांना पाढे शिकवायची. बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार असं अगदी सोपं सोपं शिकवायची. हे सगळं जरी सोपं असलं तरी माणूस आयुष्यात याच्या पेक्षा वेगळे अजून करतो तरी काय हे मला अजून तरी कळलेले नाही.
माणसाला फक्त दिवा लावायचा अधिकार आहे. एकदा ज्योत पेटली की मग उजेडाने कुठे कुठे पडावे हे उजेडच ठरवत असतो. त्याच्यावर माणसाची काहीही सत्ता नसते. आजीने समई लावली होती. आणि आता त्याच्या उजेडात काहीतरी दिसायला लागले होते. दिवस जात होते. मुले मोठी होत होती. आत्या STCPED झाली. ज्या शाळेत शिकली तिथेच शिक्षिका म्हणून तिला नोकरी मिळाली. घराला खूप मोठा आधार झाला. मग तिच्या मागोमाग वडील पण शिकत गेले. आजीचा भार हळू हळू हलका होत होता. वडील विलिंग्डन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दिवस वेगाने बदलत चालले. आजीचे वडीलही गणित शिकवायचे. मुलं मोठी करताना आजीने देखील गणित शिकवले. आणि आता आजीचा मुलगा गणिताचा PhD झाला आणि गणिताचाच प्राध्यापक!! गणित शिकवण्याचा अगदी त्रिवेणी योग होता. आत्याचे लग्न झाले. मग पुढे वडिलांचेही लग्न झाले आणि आजीचा आजी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला.
मी चौथा नातू होता. त्यामुळे मी नातू होण्याच्या आधीच आजी, तीन वेळा तरी आजी झालेली होती. मला कळायला लागल्या पासून मी आजी जवळच असायचो. सकाळ झाली कि आजी मला बखोटीला मारून कोडोलीकारांच्या वाड्यात जायची. मग हम्मा दाखवायची. हम्माला हात लावून द्यायची. मग ते हम्माचे वासरू पण कान टवकारून बघायला लागायचे. तिथेच मग भांडे भरून गाईचे निरसे दुध प्यायला मिळायचे. त्यात एखाद्या हम्माने शी-शी केली कि गम्मत वाटायची. मग तिथलेच एखादे चिपाड घेऊन मी हम्माच्या समोर धरायचो. तिला "खा खा" म्हणायचो. बऱ्याच वेळेला हम्मा काही ते खायची नाही. मग मी नाराज व्हायचो. आपण फक्त तिचे दुदु घेतले आणि तिने आपले चिपाड घेतले नाही याचे वाईट वाटायचे. हम्माच्या पिल्लाला डोक्यावर थोडे थापट केलं कि त्याची भीड चेपते आणि मग ते चिपाड खायला घेतं. हे पुढे कधीतरी कळलं. शब्दांच्या पलीकडे स्पर्शाची भाषा सुरु होते आणि त्या मुक्या जीवाना जिथे शब्दच नसतात त्यांना तर फक्त स्पर्शाचीच भाषा समजते. कळत नकळत हम्माशी मैत्री होत गेली. हळू हळू ऋणानुबंध जुळू लागले होते. हे माझे आणि आजीचे रोज सकाळी हम्मा कडे जाणे गल्लीत इतके प्रसिद्ध झाले, मोठी माणसे गमतीने आजीलाच हम्मा म्हणायला लागली. आणि याची सुरुवात अंता काकाने केली. अंता काकाची आठवण सांगायलाच हवी. त्याशिवाय हि गोष्ट पूर्ण व्हायची नाही. अंता काकाचे पूर्ण नाव अनंत सीताराम फाटक.
आमच्या घरासमोरच कोडोलीकर वाड्याला लागून फाटकांचा वाडा होता. तो हि बराच मोठा होता कोडोलीकर वाड्या सारखाच!! त्या वाड्याच्या एका बाजूला मधू काका चे पडके होते आणि दुसऱ्या बाजूला अंता काका राहायचा. त्याला ३ सोन्या सारखी मुले होती. ताकदवान आणि बलिष्ठ! सगळे हनुमंताचे सख्खे भक्त!! अंता काका देखील उंच धिप्पाड होता. ६ फुट तरी असेल. पण तब्बेत अशी आडवी होती कि तो वाटायचा ५ फुटाचा!! तो कुठल्यातरी सरकारी नोकरीत Inspector होता excise का customs का असेच काही तरी. त्यामुळे त्याचा आवाज हि असा दमदार होता कि त्याने कुणाला साधी हाक जरी मारली तरी सगळ्या गल्लीला ती ऐकू जायची. गल्लीतली माझ्या वयाची पोरं तर अंता काकाला जाम टरकून असायची. वरती हिरवा किंवा करड्या रंगाचा स्वेटर आणि खाली हिरवी नाहीतरी तांबडी चड्डी घालून पाठीमागे हात बांधून हि स्वारी गल्ली भर फिरत असायची. त्यांनी कुणालाही काहीही विचारावे. आमच्या घरासमोरून खूप पोरं शाळेला जायची. कधी कधी त्यांच्या आया त्यांना शाळेत सोडायला जायच्या. मग त्यातलीच काही पोरं रडत-खुरडत चाललेली असायची. त्यांना शाळेत जायचे नसायचे. जोरजोरात भोकाडं पसरलेली असायची. आई ओढत न्यायाची आणि हि मागं खोंडासारखी ओढ देत चाललेली असायची. आया अगदी वैतागलेल्या असायच्या. पोरं म्हणजे अगदी झोंड असायची. असं एखादं पोर अंता काकाला दिसलं कि झालंच त्याचं काम!! त्याला थांबवून अंता काकाने विचारावे 'कितवी ला आहेस रे?' किंवा 'कुठल्या शाळेला जातोस?' नाहीतर 'कुठे राहतोस?' काहीही विचारावे. त्याचा अवतार बघून ते पोर आधीच अर्धमेलं झालेलं असायचं. प्रश्नाचं उत्तर राहू द्या त्याच्या तोंडातून साधा शब्द बाहेर पडायचा नाही. मग अंता काका त्याला अजून घाबरवायचा. 'रडतोस का रे? शाळेला जाणार नाहीस तर काय गुरं राखणार आहेस का?' मग ते पोर अजून जोरात पुंगळी सोडायचं. मग अंता काका अजून पेटायचा. त्याच्याकडे दोन कुत्री होती. एक होता टाग्या आणि दुसरा टाॅम्या. अंता काकाने त्यांना हाक मारायचा अवकाश ती कुत्री लगेच त्या पोराच्या बाजूला गोळा व्हायची. त्या पोराची म्हणजे अगदी बोबडी वळलेली असायची. 'शाळेला जातो पण कुत्रा आवर' अशी अवस्था व्हायची. क्षणात रडणे बंद. पोर मुकाट्याने शाळेला चालू लागायचं. पोराची आई अगदी अंता काकाला मनापासून धन्यवाद द्यायची. याचा परिणाम फक्त त्या एका पोरावर व्हायचा नाही. आजूबाजूने जाणारी ४-५ पोरं पण तो प्रकार पाहत थांबलेली असायची. मग हा प्रकार पाहून त्यांची पण शाळा नियमित सुरु!! अंता काका म्हणजे अगदी टेरर झाला होता पोरांसाठी! पण एक सांगू का, मिरजेची माणसे फणसासारखी!! बाहेरून सगळे काटेच. पण कधी आत डोकावून बघा. गोड गऱ्याची काळीजं दिसायची! अंता काकाचे तेच होते. गल्लीत कुणाच्याही घरी अगदी सकाळी सकाळी घुसावे. त्यांचे पोर उचलावे. खांद्यावर टाकावे आणि बिनधास्त गल्लीभर आपलेच पोर असल्या सारखे फिरावे. काही पोरं रडायची. काही हसायची. मी हसणाऱ्या मधला होता. मला अंता काकाची भीती कधीच वाटली नाही. उलट त्याच्या मजबूत खांद्यावर बसावे. मस्त कोवळ्या उन्हात उभे राहावे. येणाऱ्या गाड्या, माणसे उंचावरून मस्त दिसायची. मजा वाटायची. पण आजीचा जीव वर-खाली व्हायचा. ती म्हणायची 'त्या अंताला नसते शुद्ध!! गल्लीला गेला कि तो गल्लीचा. पोर पडलं तरी कळायचं नाही त्याला. नाहीतर कुठेतरी ठेऊन यायचा तसाच!!' त्यामुळे ती अंता काकाला मला घेऊन जाऊ द्यायची नाही आणि अंता काका काही मला घेतल्या शिवाय सोडायचा नाही. मग एकदा तो मला म्हणाला 'कुठे घेऊन जाते रे आजी तुला?'. मी सांगितले 'हम्मा कडे'. झाले तिथून आजीलाचा हम्मा म्हणायला सुरुवात केली त्याने!! मला विचारायचा 'हम्मा कुठे आहे?' आणि मी आपोआप आजीकडे बोट दाखवायचो. मग अंता काका खूप मोठ्याने हसायचा.
हळू हळू आजीने माझा पूर्णच ताबा घेतला. सकाळी अण्णा तीन चाकी सायकल वरून अंबाबाईच्या देवळात घेऊन जायचे आणि संध्याकाळी आजी!! कुणाबरोबर जायला जास्त आवडायचे ते सांगणे अवघड आहे. अण्णा परत येताना बाबूच्या दुकानातून ५ पैशाच्या गोळ्या घ्यायचे. नियम एकच होता की घरी पोचायच्या आधी सगळे खाऊन संपले पाहिजे. नाहीतर आजी रागवायची दात किडतात म्हणून!! आता यातलं चांगलं कुणाला म्हणायचं?
संध्याकाळी आजी बरोबर वेगळी मजा असायची. गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या तिथे, अंबाबाईच्या देवळात जमायच्या. बोडसांच्या वहिनी, साधनाच्या आई, सहस्रबुद्धे आजी, देवकुळे आजी, प्रकाशच्या आई, यरगोळे आजी, बोरवणकर आजी, नमाक्का वगैरे सगळ्या नऊ वारी पातळात देवळात जमायच्या. त्यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असायचे. जाताना एकमेकींना दारातूनच हाका मारत जायच्या. मोठी गम्मत वाटायची. मी आजी बरोबरच असायचो. मग देवळात गेल्यावर देवीचा धावा सुरु व्हायचा. प्रत्येक बाईची टाळ्या वाजवायची पद्धत निराळी!! कुणाचा उजवा हात अगदी उजव्या काना पर्यंत वर जायचा. कुणाचे दोन्ही हात एकदम दचकुन जागे झाल्या सारखे कुटत राहायचे. डोळे मिटून तल्लीन होऊन "अंबे धाव झणी आता" असा धावा म्हणताना त्यांना पाहिले तर कुणालाही हसू येईल. माझ्या बरोबर अजून २-३ पोरं असायची. मग देवळात सगळी पळायची. वर देवीच्या नगारखान्यात जायची. आजीचं बारीक लक्ष असायचं. त्या देवळात गर्दीत मी किती तरी वेळा चुकलो होतो. पण आजीला बरोबर ठाऊक असायचं मी कुठे आहे ते!! आता आपण हरवलो अशी मला खात्री वाटायला लागली कि आपले काहीतरी चुकले असे वाटायचे. आपोआप मनातल्या मनात मी पण देवीचा धावा म्हणायला लागायचो आणि अचानक देवासारखी आजी समोर येउन उभी रहायची. मग जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. ते कमी म्हणून मग सगळ्या बायका खडी साखर आणि फुटाणे प्रसाद म्हणून द्यायच्या. अगदी तोबरा भरून भरून फुटाणे खायचो. क्षणापूर्वी आपण हरवलो होतो याची मग आठवण सुद्धा नसायची. मग हळूच कधीतरी ABCD शिकायला सुरुवात झाली. आजी कोडोलीकारांच्या झोपाळ्यावर घेऊन बसायची अगदी तासंतास. हळू हळू पायाने झोके घेत, A for Aeroplane, B for Bat, C for Cat वगैरे चालू झाले. आजी गाणी फार सुंदर म्हणायची. कधी 'लिंबोणीच्या झाडाखाली' म्हणायची. त्यातले 'गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊ ताई' हे ऐकताना तर कोडोलीकरांची झोपलेली गाय दिसायची. पेरूच्या आणि चिंचेच्या झाडावर झोपलेल्या घरट्यातल्या चिमण्या दिसायच्या. आणि त्यातच कधीतरी झोप लागून जायची. तिचे 'एका तळ्यात होती, बदके पिल्ले अनेक' हे गाणे ऐकताना तर मला दररोज रडू यायचं. पिल्ले तीच होती, तळेही तेच होते. तरी जोवर त्या कुरूप पिल्लाचा राजहंस व्हायचा नाही तो पर्यंत मला चैन पडायची नाही. तोवर मी रडत रडत जागाच असायचो. त्याच्या नंतर कधी माधव ज्युलिअन यांची आईची कविता म्हणून दाखवायची. तेव्हा तिचा अर्थ कळला नव्हता. पण नंतर जेव्हा ८ वी का ९ वी मधे ती कविता अभ्यासाला आली तेव्हा खूप छान वाटले. आजीने आपल्याला नेमके काय ऐकवलं ते समजून आजीचे कौतुक वाटलं. ती गोष्टी पण फार सुरेख सांगायची. एकदा तिने आईच्या काळजाची गोष्ट सांगितली होती. बायको मागते म्हणून मुलगा आईचे काळीज काढून नेतो. आई पण त्याला मोठ्या कौतुकाने ते देते. ते नेत असताना वाटेत त्या मुलाला ठेच लागल्यावर त्या काळजातून आवाज येतो 'बाळ तुला लागलं तर नाही ना रे?'. खूप वाईट वाटलं होतं ती गोष्ट ऐकून!! गम्मत म्हणजे आजी आणि अण्णा त्याच्या वडिलांना बाळ म्हणायचे. त्यामुळे मला बरेच दिवस त्या गोष्टीतल्या आईच्या जागी आजीच दिसत होती. श्रावण बाळाची गोष्ट तर आजीनेच सांगावी. अर्थात गोष्टीतले सगळे खरे नसते हे कळायचे ते वय नव्हते. पण ते जरी खरे नसले तरी सत्य असते हे जेव्हा कळले तेव्हा त्या गोष्टी मग जगण्याचा भाग झाल्या. मनात खूप आत गेलेल्या गोष्टी कधी आपल्या विचार तंत्राचा भाग होतात ते कळत देखील नाही. आणि नंतर कधीतरी आयुष्यात एखाद्या वेळी त्या विचार तंत्रातून एखादी कृती घडली तर मन मात्र त्याच्या उगमाचा शोध घेत राहते. अशा आजीने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी बहुतेकदा लहान पाणीच मनात खोल जाउन बसलेल्या असतात आणि पुढे जन्मभर पदोपदी सोबत करत राहतात.
पाकळ्या तरी पराग कणांना अजून दुसरे काय देतात!!
हळू हळू आजी जशी जबाबदारीतून मोकळी होत गेली तशी ती अजूनच खुलत गेली. अण्णाही रिटायर झाले होते. तिने तिची आयुष्याची लढाई जिंकली होती. आयुष्याने जे मागितले ते दान तिने हसत हसत दिले होते. आता आयुष्याकडून तिला मिळायचे बाकी होते. दोघांचेही खरे दात जाऊन मोत्यासारखे खोटे दात आले. एकदाचे ते खरे दात गेले कि माणसातले सगळे विकार संपत असावेत. आणि त्यांची जागा निखळ प्रेमाने भरून निघत असावी. तिच्या चिंता मिटल्या होत्या. स्वस्थ चित्ताने सोन्याचा घास खायचा होता. आजीचा मुळचा मिश्किल स्वभाव दिसायला लागला. कुणीही घरी येउन गेला कि त्याची अगदी हुबेहूब नक्कल करायची. मग तो बाबा असो नाहीतर बाई!! observation आणि acting यातले तिचे काय जास्त चांगले होते ते सांगणे अवघड आहे. पण आजीच्या नकला पाहून कुणालाही हसू यायचे. कधी बाबा घरी नसतील तर ती बाबांची पण नक्कल करायची. आणि मग घरातले सगळे मिळून हसायचे. वास्तविक तिने आता बसून खाल्ले असते तरी तिला काही कमी पडणार नव्हते. आशिर्वाद आणि सल्ल्याशिवाय तिच्या कडून कुणी कसली अपेक्षाही केली नव्हती. पण तिचा जीव संसारात गुंतून गेला होता. कधी तव्यावर तांदळाच्या नाहीतर बाजरीच्या भाकरी करायची. कधी रव्याचा केक, कधी लाडू, चकली नाहीतर शेव करायची. परीक्षेला जाताना हातावर हमखास खडी साखर ठेवायची आणि "जा तुझा पहिला नंबर येईल" असा आशीर्वाद द्यायची. आणि खरेच कुणी पहिले आले तर सगळ्यात मोठा आनंद आजीचा!! लगेच उठून काहीतरी गोड करायला घ्यायची. कधी गुळाच्या पोळ्या, कधी नुसताच गुळाचा सांजा, कधी सत्यनारायणाचा केळ्याचा शिरा आणि कधी वेळ झाला तर आईला हाताशी घेऊन पुरणाची पोळी!!
"माणसानं नेहमी लीन असावं" आणि "समाधानी मनुष्य खरा श्रीमंत" हे तिची दोन आवडीची वाक्यं!!
पुण्यात गेल्यानंतर ती थोडी हळवी झाली होती. सारखी मिरज मिरज करायची. कधी आत्या आली की तिला कानात खुसुखुसु सांगायची की तिला "मिरजेला जावून मरायचे आहे म्हणून"!! गल्लीतल्या बायकाना गोळा करून शेवया करणे, आंबाबाईच्या देवळातला धावा, चैत्रगौरीतले हळदी-कुंकू समारंभ, आंबेडाळ, पन्हं, नाचणीचं अंबील हे सगळं अचानक बंदच झालं. मिरजेत असताना तासगाव वेशेच्या मारुती पर्यंत फिरायला जायची. ते फिरणं देखिल पुण्यात आल्यावर बंद झालं. फर्ग्युसन काॅलेजच्या आवारात फिरायची. मिरजेत चौका-चौकात तिला कुणीतरी ओळखीचं भेटायचं. आता पुण्यात तेही बंद झालं. मग आपली एकटीच घरातल्या देवासमोर बसून धावा म्हणायची. पेटीवर एखादं गाणं वाजवायची. "ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले, मला हे दत्त गुरू दिसले" नाहीतर "आज मी दत्तगुरू पाहीले" असली दत्ताची गाणी म्हणायची. नाहीतर "भजो रे भैय्या, राम गोविंद हरी" किंवा "ठुमकी चलत रामचंद्र, बाजत पैंजनीया" अशी शास्त्रीय वळणाची भजने म्हणायची. या गाण्यात तंत्रापेक्षा तल्लीन होण्याचाच आनंद जास्त होता.
घरातल्या प्रत्येकाचे वाढदिवस तिला पाठ असायचे. प्रत्येकाला काय काय पाहीजे ते आधीच विचारून ठेवायची. अण्णांची पेंशन तिला मिळे. ती साठवून त्यातून ज्याला जे हवे ते आणून द्यायची. वाढदिवसाला नाहीतर दिवाळीच्या दिवशी, लेक, सून, जावई, नातवंडांना ओवाळायचा तिचा आग्रह असे. त्या दिवशी स्वारी अगदी सकाळ पासून खूष असे. दिवसभर सगळ्या कामांची देखरेख करून संध्याकाळच्या ओवाळणीसाठी तिची लगबग व्हायची.
दिवसामागून पान पिकत चाललं होतं. पण जगण्याचा तजेला तोच होता. नऊ वारी पातळ, त्यावर बाबांनी इटलीहून आणलेला निळा जाड जूड स्वेटर, डोक्याला आणि कानाला रुमाल, पायाला जाड पाय मोजे, त्यावर अस्मिताने अमेरिकेतून आणलेल्या कोझी चपला (आजी त्या चपलाना "गोद्या" म्हणायची!), हाताला हात मोजे असा कडेकोट बंदोबस्त करून हातात जपाची माळ घेऊन हरिपाठाचे वाचन सुरु असायचे. "हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी".. हे किती अलौकिक लिहीले आहे याची जाणीव आजीकडे पाहून व्हायची. कोडोलिकरांच्या घरी भाकरी करताना पडलेले तापलेल्या तव्याचे चटके हातावर शिक्का होऊन राहीले असतीलही पण मनाचं आकाश निरभ्रच राहीलं होतं. कुणाचा राग नव्हता. कुणाचा द्वेष नव्हता. आपल्या पोरा-बाळाना खायला करून घालायचा एक छंद सोडला, तर कशाचा लोभही नव्हता. दासबोधाची पारायणे चालू झाली होती. आजी मुळची साताऱ्याची!! त्यामुळे समर्थांवर विशेष भक्ती. माहूलीच्या देवळातल्या गोष्टी सांगायची. चाफळ, सज्जनगड, परळी वगैरे समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावांच्या आठवणी सांगायची. जुनी जुनी गाणी, जुन्या कविता पाठ म्हणायची. तिची आई तिच्या बालपणीच गेल्यामुळे तिच्या बोलण्यात तिचे वडील खूप वेळेला यायचे. त्यांना तीची भावंडे "भाऊ" म्हणत. १३ मुलांचा संसार आई विना एकट्या भाऊंनी केला याचा तिला जबरदस्त अभिमान होता. कदाचित विपरीत परिस्थिती मधे घनगंभीर राहण्याची तिची प्रेरणा इथूनच येत असावी. कुणी खूप उशीर पर्यंत बाहेर गेलं कि दारात जाऊन वाट बघत बसायची. पुढे मी अमेरिकेत गेल्यावर अधून मधून skype वर भेटायची. तिला त्या नविन तंत्रज्ञानांचं देखिल काही वावडं नव्हतं. माझ्या पोरी पण फार जीव टाकायच्या तिच्यावर!! अर्चिस आणि रेनिसानी तिला "प आजी" असं नाव दिलं होतं.
आयुष्याच्या एका टोकाला शेणाच्या गोवऱ्या चुलीत सारत धुरानी भरलेल्या घरात केलेला मोडका-तोडका संसार होता. तर दुसऱ्या टोकाला, सर्व सुखांनी भरलेला कृतकृत्य संसार होता. मोह कशाचाच नव्हता!! एक दिवशी आईचा फोन आला की आजीला बरं नाही. दवाखान्यात नेलंय म्हणून!! काही काळजी करण्यासारखं नाही असं पण म्हणाली. पण माझा जीव काही स्वस्थ बसेना. मी रोज दोन-तीन फोन करायला लागलो. आजी छान बोलायची. थोडी जीभ जड झाली होती. पण बोलणे स्पष्ट कळत होते. "आर्चिस फार गुणी मुलगी आहे. तिची काळजी घे." असं म्हणाली. ते शेवटचेच बोलणे!!
दुसऱ्या दिवशी आई पाणी आणायला म्हणून खोलीतून बाहेर पडली आणि आजीने डोळे मिटले ते कायमचेच!! जवळ जवळ ८५ वर्षे अखंड चालू असलेला श्वास थांबला. फक्त दुसऱ्याना देण्यासाठी, गेली ८५ वर्षे मायेनं आणि ममतेनं धडधडलेलं प्रेमळ हृदय कायमचं थांबलं. पूर्ण पिकलेलं फळ जसं अलगद झाडावरून निसटतं आणि कृतार्थ जन्मासाठी धरणीला धन्यवाद देण्यासाठी आवेगानं झेपावतं, अगदी तसाच तो क्षण होता. वास्तविक तिचं राहीलं काहीच नव्हतं. तिच्यासाठी मला काही करताही आलं नाही. तरी ती गेल्याचं दु:ख झालं.
भगवद्गीतेमधे कृष्ण अर्जुनाला सांगतात की, अरे ज्यांना तू आज मारणार आहेस, त्यांना होणाऱ्या शारिरीक यातनेपेक्षा तुला होणारी मानसिक यातना मोठी आहे. आणि ती मानसिक यातना हे तुझ्या स्वार्थाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ज्या भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना तू तुझ्या बाणांनी सद्गती देणार आहेस, त्यांच्या लेखी तू एक जगातला सर्वोच्च धनुर्धर आहेस. त्यांच्या लेखी तू महान योद्धा आहेस. महारथी कर्णाला धनुर्विद्येत हरविणारा पार्थ आहेस. त्यांच्या तुझ्या बद्दलच्या या भावनेची तुला पुर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच तू मनातून दु:खी झाला आहेस की यांच्या जाण्याने तुझे गुणगान गाणाऱ्या या महान प्रशंसकांचा अंत होणार आहे. तुझ्या किर्तीचे गोडवे गाणाऱ्यांची संख्या कमी होणार याचे तुला दु:ख झाले आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या हृदयामधे असणारी अर्जुनाबद्दलची अनुकंपा संपून जाणार आहे. याचे तुला दु:ख वाटते आहे. त्यांच्या बरोबरच त्यांच्या मनामधे अखंड वास्तव्य केलेली अर्जुनाची दृढ प्रतिमा देखिल नष्ट होणार आहे. त्याचे तुला दु:ख वाटते आहे. आणि हा फक्त तुझा स्वार्थ आहे.
आजी गेली तेव्हा काहीसं असच वाटत राहीलं..
कापुसलेल्या केसांची� कर्दमलेल्या शालीची� सुरकुतलेल्या मायेची� एक होती आजी ....
जुन्या पुराण्या पोथ्यांची� चुडा भरल्या हातांची� टोप पदरी लुगडयाची� एक होती आजी ....
तुकोबाच्या गाथेची� मनाच्या श्लोकांची� हरीच्या पाठाची� एक होती आजी ....
वाकलेल्या पाठीची� आजोबांच्या काठीची� सुन्ठेच्या चिमटीची � एक होती आजी ....
साखरेच्या खड्याची� खारकेच्या तुकड़याची� बोटभर गुलकंदाची� एक होती आजी ....
साठलेल्या क्षणांची� गोठलेल्या व्रणांची� सोनसावळ्या कणांची� एक होती आजी ....
एक होती आजी� आठवांच्या गाठोड्याची� आसवांच्या उशाशी� डोइवरल्या हाताची
�एक होती आजी ....
~ निखिल कुलकर्णी

रामदासजी मंत्रिमंडळात

रामदासजी आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. 

याचा अस्मादिकास यथोचित आनंदच झाला आहे. एका सच्चा, सुविद्य आणि सत्शील कार्यकर्त्याचा सन्मान पाहून मन आणि डोळे भरून आले. आपल्या घटनाकारानाही रामदासजींची ही घटनात्मक आणि संघटनात्मक घोडदौड पाहून अचंबाच वाटला असेल.
रामदासजींचे अफाट वक्तृत्व, अचंबित करणारे कर्तृत्व, त्यांच्या साक्षेपी आणि आशयघन कविता आणि एकूणच त्यांनी दिलेला सर्वव्यापी पुरोगामी विचार यांचा हा एक प्रकारचा गौरवच आहे.
अर्थात रामदासजींनी केलेल्या कार्यापुढे हा सन्मान ठेंगणा आहे हे देखील मान्य करावेच लागेल.
मंत्रीपदाची शपथ घेताना नाव विसरणे हे देखील त्यांच्या व्यासंगाचे आणि भारावलेपणाचे व्यवच्छेदक लक्षणच मानावे लागेल.
हा क्रांतिकारी बदल पाहून आम्हास असा विश्वास वाटतो की,
आता आंबेडकर नगरातून नवचैतन्याचे वारे वाहू लागणार. शिक्षण, आयु, आरोग्य, धन आणि संपदा यांनी उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची बसकी घरे उजळून निघणार.
विक्रोळीच्या संपत गायकवाडला आणि त्याच्या कुटुंबीयांना दादरला हक्काचे सरकारी शौचालय आणि तिथे जाण्यासाठी रेल्वेचा मोफत पास देखील मिळणार.
हि म्हणजे पुढे येऊ घातलेल्या समतेच्या आणि विकासाच्या वादळाची नांदीच म्हणायला हवी.
एक प्रश्न असा पडला आहे कि हे सगळे लख्ख दिसत असून, स्वत:ला छ्त्रपतींचे प्रतिरूप मानणार्या आणि सकल समाजाच्या उन्नतीसाठी आपले अवघे आयुष्य वेचलेल्या, बारामतीच्या जाणत्या राजानी हा बदल त्यांच्या कारकीर्दीत का केला नसावा?
राजांना रामदासजींची पारख नव्हती म्हणावे की उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची पर्वा नव्हती असे म्हणावे?

भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन

काय मुलं म्हणजे एकेक चमत्कारिक प्रश्न विचारतात अगदी काय उत्तर द्यावे ते सुचतच नाही.
आर्चिस सध्या अमेरिकेचा इतिहास शिकते आहे तिच्या शाळेत. मग ते जाॅर्ज वाॅशिंग्टन, त्याचे सैन्य, त्याच्या वेगवेगळ्या युद्धाच्या कथा वगैरे सगळे मला घरी आल्यावर सांगत बसते. अमेरिकेने कसे लढून ब्रिटिशांना हरवले, कुठली कुठली युद्धे ब्रिटिशांना जड गेली, जाॅर्ज वाॅशिंग्टनने अमेरिकन लोकांना कसे प्रोत्साहन दिले वगैरे असे काय काय सांगत बसते. तिला जाॅर्ज वाॅशिंग्टनचा खूप अभिमान वाटतो.
बरेच आहे. त्यामुळे मलाच कित्येक नविन गोष्टी कळत आहेत.
तिला कुणीतरी शाळेत सांगितले की भारतावर देखील ब्रिटिश राज्य करत होते. मग तिला वाटलं की भारतात देखील एखादा जाॅर्ज वाॅशिंग्टन असेल. तिला कुणीतरी तिच्या मित्राने सांगितले आहे की गांधीजी हे भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन आहेत. मग तिनं विनाकारण माझ्या चौकशा सुरू केल्या आहेत की गाधीजींनी कसे युद्ध केले म्हणून.
आता तिला काय कपाळ सांगायचं!! मला काय वाटतं आणि काय पटतं हे बाजूला ठेवून माझ्या परीनं प्रयत्न चालूच आहेत. "दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल" हे गाणं पण तिला ऐकवून झालं आहे. तरी पण "युद्ध न करता ब्रिटिश भारत सोडून गेलेच कसे?" हा तिचा प्रश्न कायम आहे.
आता भारत स्वतंत्र का झाला किंवा भारत का स्वतंत्र झाला याविषयीच जिथे मोठे मोठे विद्वान गेली ७० वर्षे वाद घालत आहेत (अर्थात यातल्या बहुतेक विद्वानांचे वय ७० पेक्षा कमी आहे हे अजून विशेष!!) तिथं मी तिला काय उत्तर सांगणार!!
मनांत म्हटलं अगं या गांधीजींनी ब्रिटीशाना २५ वर्षे एवढं बोअर केलं की शेवटी ब्रिटीश त्याची टोपी काढून ढसाढसा रडला आणि "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा" असे म्हणत आंग्लदेशी निघून गेला.
आम्ही मनातच म्हणायचे!!

आरक्षण

बरेच दिवस विचार करतोय की "मराठ्यांना १६ टक्के आरक्षण" याचा व्यत्यास म्हणजे "ब्राह्मणांना ५०% आरक्षण" असा तर नाही?
वास्तविक दोन बोक्यांची, माकडाची आणि गोळ्याच्या वाटणीची गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जाते आहे. तरी अजून त्याच माकडाकडून वाटणी करून घ्यायची बोक्यांची हौस काही केल्या कमी होत नाही याचे जास्त नवल वाटते.
बोके दिवसेंदिवस खंगतच चाललेत आणि माकडाची चंगळ चालूच आहे.
उठाले रे बाबा!!