Sunday, June 18, 2017

रामदासजी मंत्रिमंडळात

रामदासजी आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. 

याचा अस्मादिकास यथोचित आनंदच झाला आहे. एका सच्चा, सुविद्य आणि सत्शील कार्यकर्त्याचा सन्मान पाहून मन आणि डोळे भरून आले. आपल्या घटनाकारानाही रामदासजींची ही घटनात्मक आणि संघटनात्मक घोडदौड पाहून अचंबाच वाटला असेल.
रामदासजींचे अफाट वक्तृत्व, अचंबित करणारे कर्तृत्व, त्यांच्या साक्षेपी आणि आशयघन कविता आणि एकूणच त्यांनी दिलेला सर्वव्यापी पुरोगामी विचार यांचा हा एक प्रकारचा गौरवच आहे.
अर्थात रामदासजींनी केलेल्या कार्यापुढे हा सन्मान ठेंगणा आहे हे देखील मान्य करावेच लागेल.
मंत्रीपदाची शपथ घेताना नाव विसरणे हे देखील त्यांच्या व्यासंगाचे आणि भारावलेपणाचे व्यवच्छेदक लक्षणच मानावे लागेल.
हा क्रांतिकारी बदल पाहून आम्हास असा विश्वास वाटतो की,
आता आंबेडकर नगरातून नवचैतन्याचे वारे वाहू लागणार. शिक्षण, आयु, आरोग्य, धन आणि संपदा यांनी उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची बसकी घरे उजळून निघणार.
विक्रोळीच्या संपत गायकवाडला आणि त्याच्या कुटुंबीयांना दादरला हक्काचे सरकारी शौचालय आणि तिथे जाण्यासाठी रेल्वेचा मोफत पास देखील मिळणार.
हि म्हणजे पुढे येऊ घातलेल्या समतेच्या आणि विकासाच्या वादळाची नांदीच म्हणायला हवी.
एक प्रश्न असा पडला आहे कि हे सगळे लख्ख दिसत असून, स्वत:ला छ्त्रपतींचे प्रतिरूप मानणार्या आणि सकल समाजाच्या उन्नतीसाठी आपले अवघे आयुष्य वेचलेल्या, बारामतीच्या जाणत्या राजानी हा बदल त्यांच्या कारकीर्दीत का केला नसावा?
राजांना रामदासजींची पारख नव्हती म्हणावे की उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची पर्वा नव्हती असे म्हणावे?

No comments:

Post a Comment