Sunday, June 18, 2017

भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन

काय मुलं म्हणजे एकेक चमत्कारिक प्रश्न विचारतात अगदी काय उत्तर द्यावे ते सुचतच नाही.
आर्चिस सध्या अमेरिकेचा इतिहास शिकते आहे तिच्या शाळेत. मग ते जाॅर्ज वाॅशिंग्टन, त्याचे सैन्य, त्याच्या वेगवेगळ्या युद्धाच्या कथा वगैरे सगळे मला घरी आल्यावर सांगत बसते. अमेरिकेने कसे लढून ब्रिटिशांना हरवले, कुठली कुठली युद्धे ब्रिटिशांना जड गेली, जाॅर्ज वाॅशिंग्टनने अमेरिकन लोकांना कसे प्रोत्साहन दिले वगैरे असे काय काय सांगत बसते. तिला जाॅर्ज वाॅशिंग्टनचा खूप अभिमान वाटतो.
बरेच आहे. त्यामुळे मलाच कित्येक नविन गोष्टी कळत आहेत.
तिला कुणीतरी शाळेत सांगितले की भारतावर देखील ब्रिटिश राज्य करत होते. मग तिला वाटलं की भारतात देखील एखादा जाॅर्ज वाॅशिंग्टन असेल. तिला कुणीतरी तिच्या मित्राने सांगितले आहे की गांधीजी हे भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन आहेत. मग तिनं विनाकारण माझ्या चौकशा सुरू केल्या आहेत की गाधीजींनी कसे युद्ध केले म्हणून.
आता तिला काय कपाळ सांगायचं!! मला काय वाटतं आणि काय पटतं हे बाजूला ठेवून माझ्या परीनं प्रयत्न चालूच आहेत. "दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल" हे गाणं पण तिला ऐकवून झालं आहे. तरी पण "युद्ध न करता ब्रिटिश भारत सोडून गेलेच कसे?" हा तिचा प्रश्न कायम आहे.
आता भारत स्वतंत्र का झाला किंवा भारत का स्वतंत्र झाला याविषयीच जिथे मोठे मोठे विद्वान गेली ७० वर्षे वाद घालत आहेत (अर्थात यातल्या बहुतेक विद्वानांचे वय ७० पेक्षा कमी आहे हे अजून विशेष!!) तिथं मी तिला काय उत्तर सांगणार!!
मनांत म्हटलं अगं या गांधीजींनी ब्रिटीशाना २५ वर्षे एवढं बोअर केलं की शेवटी ब्रिटीश त्याची टोपी काढून ढसाढसा रडला आणि "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा" असे म्हणत आंग्लदेशी निघून गेला.
आम्ही मनातच म्हणायचे!!

No comments:

Post a Comment