Wednesday, October 18, 2017

नवसहस्त्र कोट

नवसहस्त्र कोट 
~ निखिल कुलकर्णी 

गेल्या वर्षी आपल्या नव्या पेशव्यांनी पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बंद केल्या. खूप वाईट झाले. आमचा नव सहस्त्र रुपयांच्या “काळ्या नोटा” (“काळा पैसा” नव्हे!!) कशा खपवाव्यात , याच्या विचारात गेले सहा महीने मेंदू कुरतडून गेला आहे. कधीतरी शुक्रवारी संध्याकाळी, व्हिस्कीचे २-३ पेग पोटात गेल्यावर उगाचच त्या नव सहस्त्रांची आठवण होते. वाईट वाटते. रिझर्व बॅंकेने स्वत: छापलेल्या नोटा, जेव्हा खुद्द रिझर्व बॅंकेने देखिल स्विकारल्या नाहीत, तेव्हा आम्हास, किंवा आमच्या नोटास, अगदी अनाथ आणि पोरके झाल्यासारखे वाटलेले आहे..

“मै धारक को पाच सौ रूपये अदा करने का वचन देता हूं।” असे त्या नोटांवर “हिंदी” मधे लिहीलेले वाक्य आणि खाली "नाना फडणवीस" अशी स्वाक्षरी, आम्ही खुद्द रिझर्व बॅंकेच्या दारावर बसलेल्या “माननीय, महोदय, साहेब वगैरे” असलेल्या,  चार फुटी इसमास वाचून देखिल दाखविले.  उगाच कुठल्या कुठल्या सेनेचे कार्यकर्ते आहोत असे वाटू नये म्हणून आम्ही, आम्हाला अवगत असलेल्या, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती, बंगाली वगैरे इतर सर्व राष्ट्रभाषा टाळून, “हिंदी” ची निवड केली होती. पण ते साहेब मराठी सारख्या भाषेतूनच गुरकावले. “रिजर बॅंकेच्या गोरनर कडे गेलात तरी तुमची नोट बदलून मिळाची नाय आता.. टायम संपला कवाच.. काय? निगा आता, टायम वेष्ट नका करू!!” असा अस्सल कोकणी आणि इंग्रजी मिश्रीत मराठी मधे आमच्यावर वार काढला. त्याचा चढलेला आवाज पाहून आजूबाजूचे २-३ बंदूक वाले पोलीस देखील तिथे दाखल झाले. त्यांच्या दंडावर काढलेली "म. पो." (म्हणजे "महाराष्ट्र पोलीस"!! "मला पोसा" नव्हे!) हि अक्षरे पाहून आम्ही अधिक धारिष्ट्य केले नाही. "वैष्णव जन तो तेणे कहिये जी..." असे गुणगुणत, गांधी खिशात मारत तिथून काढता पाय घेतला. साऱ्या प्रकाराने आम्हाला अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले. आमच्या नोटांना आणि त्यावरच्या गांधींना तर खिशात परत लोटले जात असताना, भर रस्त्यात आई-बापाने ओळख दाखवण्यासही नकार दिलेल्या, केस वगैरे पिंजारून, चकचकीत गॉगल लावून, गावात मोकाट फिरणाऱ्या मवाली पोरासारखे वाटले. आमचे तर असेही मत झाले आहे कि गांधी वध हि एक निव्वळ घटना नसून ती एक अखंड चाललेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात फक्त नथुरामाने केली आणि त्यानंतर हरेक ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा मधून गांधी हत्येचे परमिट मिळू लागले आहेत. त्याच्यात विशेष म्हणजे "खादी" आणि "खाकी" वाल्याना तर हे परमिट विनामूल्य उपलब्ध आहे. असेही आमचे एक मत झाले आहे.   

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. आमच्या स्मरणात असल्या पासून, हिरवा असो कि लाल, गांधींवर ताबा मिळवणे हे एक परम संतोषदायक असे ध्येयच आहे. मागच्या खेपेला देश सोडला तेव्हा शरयूच्या आजीने (म्हणजे आमच्या सासूबाई) शंकर आणि शरयूच्या हातावर एकेक हिरवा गांधी ठेवला आणि “विमानतळावर गोळ्या आणि बिस्किटे खा हं!” असे म्हणाली. आता तिला कशाला सांगायचे की विमानतळावर गोळ्या बिस्किटे मिळत नाहीत म्हणून!! मिळताहेत दोन गांधी तर का सोडा असा विचार करून आम्ही मनातून जाम खूष झालो होतो. रिक्षात बसल्या बसल्या आम्ही ते ताबडतोब आमच्या ताब्यात जवळजवळ हुसकूनच घेतले. शंकऱ्याने त्याची नोट लगेच दिली. पण शरयूने, तिला तिच्या आजीने सांगीतल्या सारखे "गोळ्या पाहीजेत" म्हणून हट्ट करायला घेतला. विमानतळावर भोकाड पसरले. "गोळ्या खाऊन दात किडतात" वगैरे सांगून बघितले. शेवटी तिथल्या बंदूकवाल्या 
"म. पो." ची भीती दाखवली. मग मात्र तिने मोठ्या नाखुशीनेच तिची नोट आम्हाला दिली होती. कुठल्याही स्थळी गांधींच्या हस्तांतरणासाठी बंदूकवाल्या "म. पो." ची गरज लागते याची आता आम्हाला खात्री पटलेली आहे. अर्थात नोट ताब्यात घेतल्यावर आम्हाला मात्र चंद्रावर चालल्या सारखे हलके हलके वाटत होते. अशा लेकरा-बाळांच्या तोंडातून काढून घेतलेल्या नोटांची आणि त्या वरच्या गाधींची त्या कारकुंड्याने रिझर्व बॅंकेच्या आवारात बंदुकीच्या जोरावर हत्या केली त्याचे वाईट वाटते.

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. गांधींनी देशासाठी "काय केले" किंवा "काय काय केले" हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे. पण आमच्या साठी बापू हे पानपट्टीपासून ते विमानतळावरच्या Duty Free दुकानांपर्यंत कायमच सोबत करत आलेले आहेत. त्या काळी साठ पैशाची गाय छाप घेऊन आम्ही राजरोसपणे दहा रूपयाचा गांधी पुढे करत असू. तेव्हा संभा पानट्टीवाला कळवळून विचारत असे की “साहेब सुट्टे नाहीत का?” म्हणून!! मनात विचार यायचा की काय करंटा माणूस आहे हा, गांधी दिले तर सुट्टे मागतोय हा!! मग आम्ही तांबडे गांधी परत आमच्या खिशात ठेवून, त्याला “मांडून ठेव” असा आदेश देवून पुढे कूच करायचो..संभाने मांडून ठेवले की नाही ते एका विश्वंभरास ठाऊक! परंतु आजही आम्हाला जेव्हा जेव्हा संभा पानपट्टीवाला आठवतो, तेव्हा देखील गांधी सोडून सुट्टे मागणारा संभा हा तितकाच दयनीय आणि दळभद्री वाटत आलेला आहे. त्याला भेटून त्याचे थकलेले खाते एकदाचे देऊन टाकावे कि काय, असाही एक विचार मनात येत असतो. परंतु केवळ गांधी प्रेमा पोटी आम्ही असे आत्मघातकी विचार मागे टाकत आलेले आहोत.

तुम्हाला सांगू का, आमच्या घराचा एक मोठा विचित्र प्रकार आहे. इथे दोन भारतीय पासपोर्ट राहतात आणि दोन अमेरिकन!! 
उगाच सुभाषबाबूंच्या आठवणीने गहिवरून जाल आणि त्या बारक्या मिशीवाल्याची स्तुती कराल तर खबरदार!! तुमचे मुंडके उडवले जाईल मानवतेचे हत्यारे म्हणून!! 
मागे असेच एकदा “आझाद हिंद” सेनेचे गोडवे आम्ही या जीभेने आमच्या घरी गायले होते. "इंफाळचा लढा", "जपानचा पाठिंबा",  जर्मनी, जपान, सुभाषबाबू वगैरे बद्दल त्वेषाने आणि अभिमानाने बोललो. मग काय विचारता महाराजा!! आमचीच खरड निघाली. 
त्यानंतर शरयूने पुढचा एक महिना आम्हाला Netflix वर कसल्या कसल्या documentary बघायला लावल्या. यात बहुतेक ज्यूंचे कसे हाल झाले, जर्मन कसा वाईट होता वगैरे सगळे मुद्देसूद वर्णन होते. डोके सुन्न होऊन गेले. 
देवा नारायणा, या घरात रहावयाचे कसे हाच मोठा प्रश्न आहे..

मागे एकदा आमच्या अमेरिकन शरयूने प्रश्न विचारला होता की तुमच्या देशाचे जाॅर्ज वाॅशिंग्टन कोण म्हणून.. काय उत्तर द्यावे याला!! तिला सांगितले कि बापू हेच आमचे जॉर्ज आहेत आणि म्हणूनच त्यांचे चित्र सर्व नोटांवर छापलेले असते. मग तिने विचारले कि कुठे कुठे युद्धे झाली वगैरे...

शेवटी तिला सांगितले कि 'दे दि हमे आजादी बिना खड़ग बिना ढाल' म्हणून!! मग ती पुढे काही फार बोलली नाही. पण तेव्हा पासून तिचे ब्रिटिशांबद्दलचे मत बदलले आहे. ब्रिटिशांनी भारताला असेच स्वातंत्र्य दिले आणि अमेरिकेला मात्र युद्ध करायला लावले असे वाटून ब्रिटिश हा एक अत्यंत घातकी आणि पक्षपाती माणूस आहे असे तिचे ठाम मत झाले आहे. अर्थात ब्रिटिशांबद्दल आमचे देखील अगदी असेच मत असल्याने, या बाप आणि लेकीमधल्या अभूतपूर्व एकमताबद्दल बापुंचेच आभार मानायला हवेत.     

अर्थात असे जरी असले तरी आमचे देखील मराठी रक्त आहे. मी सुद्धा घरात अमेरिकन पासपोर्ट वाल्याना सांगून टाकले आहे कि या घरात एलिझाबेथ राणीच्या तोतऱ्या बापाचे आणि चर्चिलचे गोडवे गाल तर याद राखा म्हणून!! येता जावळी जाता गोवळी!! शेवटी एकदा वचपा काढलाच. तिला सावरकरांची माहिती सांगितली. सावरकर म्हटले कि आमचा उर अभिमानाने भरून येतो. जितका आम्हाला बापूंबद्दल आदर आहे तितकाच स्वातंत्र्यवीरांविषयी देखिल आदर आहे. मग बोलता बोलता आम्ही तिला अंदमान, काळे पाणी, तिथल्या अभेद्य भिंती, त्या भिंतीवर लिहीलेली 'कमला' सारखी अद्वितीय काव्यें हे देखील सांगून टाकले. मग क्रांतिकारी म्हणजे काय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू वगैरे बरीच माहिती सांगितली. ते ऐकून ती म्हणाली कि मग भारताचे खरे जॉर्ज वॉशिंग्टन तर हेच स्वातंत्र्यवीर आहेत. म्हटले चला. भारतीय पासपोर्ट जिंकला एकदाचा!! पण पुढच्याच क्षणी म्हणाली कि यातल्या कुणाचे नोटेवर चित्र कसे नाही म्हणून!! अर्थात याचे उत्तर आम्हालाच काय पण आमच्या इतिहासाच्या मास्तरांना देखील देता येणार नाही याची आम्हाला खात्रीच आहे. शेवटी तिला काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले कि जर स्वातंत्र्यवीरांनी थोडी अमेरिकेशी दोस्ती केली असती, तर कदाचित तेच भारताचे पहिले पेशवे झाले असते म्हणून!! आणि मग अगदी हजार, दोन हजारच्या नाही तरी २५ पैसे, ५० पैसे, रुपया असल्या चिल्लर नाण्यांवर तरी त्यांचे चित्र आलेच असते. 
अर्थात नंतर असा विचार केला कि त्यांचे चित्र नोटांवर आणि नाण्यांवर नाही ते बरेच आहे. उगाच कशाला लोकांच्या पुठ्ठयाचा सहवास द्यायचा त्यांना!!

पण एकूण चर्चेअंती तिला भारताचा जॉर्ज वॉशिंग्टन एकदाचा सापडला याबद्दल ती खुश झाली आहे आणि "अमेरिकेचे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्व" ऐकून तर तिच्या अभिमानाला पारावर राहिलेला नाही.
 
आमच्या इथे येण्यामुळे दोन कट्टर अमेरिकन नागरिकांची निर्मिती होणार आहे याची बारीकशी जरी कल्पना असती तर आम्ही देखिल कर्वे रोडच्या पेट्रोल पंपावर गुपचूप रांगेत जाऊन उभे राहीलो असतो. या आमच्या गुन्ह्याबद्दल रायगडावरील छत्रपती आम्हाला कदापिही माफ करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच वाटू लागली आहे. आम्ही फक्त पोटापाण्यासाठी या देशात आलेली “साधी माणसे” आहोत. गांधी, सावरकर, वॉशिंग्टन आणि हिटलर यांचा आमचा संबंध फक्त इतिहासाच्या पेपरातल्या ४ मार्कां पुरता!! आमच्या साठी नोट हि फक्त देण्यासाठी असते. मग त्याच्यावर बापू असोत, नाहीतर जेफरसन त्याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही.  

त्यातल्या त्यात एक बरे म्हणजे नवसहस्त्र कोट गांधी बगलेत मारून आमचे थोर गांधीवादी गुरुदेव, आंग्लदेशात वानप्रस्थाला वास्तव्याला आलेले आहेत. त्यांचाच आदर्श आम्हीही ठेवून आहोत. आमच्याकडे नवसहस्त्र कोट सध्या उपलब्ध नसल्याने, तूर्तास
आम्ही अंगात कोट घालून त्याच्या खिशात आमच्याकडे कायमचे मुक्कामाला आलेले नवसहस्त्र गांधी ठेवून गुरुदेवांसारखेच आचरण (दिवसा आणि रात्री सुद्धा) करायचे निश्चित केले आहे. 

अर्थात हे थोडेसे, दाढी वाढली म्हणून शिवाजी होऊन फिरण्यासारखे आहे याची देखील आम्हाला कल्पना आहेच!!

~ निखिल कुलकर्णी

Monday, September 25, 2017

"एनाराय" एक अभिष्टचिंतन

"एनाराय" एक अभिष्टचिंतन
~निखिल कुलकर्णी
"एनाराय" हे "येनार हाय" याचे अमेरिकन रूप आहे असे आमचे मत आहे. तर या "एनाराय" लोकांचे अमेरिकातील योगदान तर स्तंभित आणि अचंबित करणारे असेच आहे. त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच वैद्यकीय या सर्वच क्षेत्रातील सहज आणि सुगम वावर, त्यांना मिळालेली पदे ही सर्व दृष्ट लागावी अशीच आहेत. त्यांच्या याच ज्ञानाचा, पराकोटीच्या जिद्दीचा, अद्वितीय व्यासंगाचा, धैर्याचा, झालेच तर चिकाटीचा, फायदा आपल्या गरीब देशाला व्हावा, अशा आशेने त्यांची वेडी माय, तिच्या गोतावळ्याला हा आपला परदेशी गेलेला नरपुंगव एक दिवस परत "येणार हाय" "येणार हाय" म्हणून वेड्या आशेने सांगताना आम्ही या कानानी ऐकले होते. तर ते एक असो!!
परंतु सांप्रत काळी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे अध्वर्यु, राजकुमार, वार्धक्यातही आपल्यातले शैशव जपत आलेले, असे सर्वांग सुंदर देखणे राष्ट्रपुरूष, अमेरिकेत आलेले आहेत. त्यांचा प्रगाढ व्यासंग, इतिहासाची सखोल जाण, देशाबद्दल तसेच अमेरिकेतील भारतीय नागरीकांबद्दल असणारी जाज्वल्य अशा प्रकारची निष्ठा, देशप्रेम, त्याग तसेच आंग्ल भाषेच्या, वाघीणीच्या दुधावर पोसलेली तल्लख बुद्धीमत्ता यांनी तर आसमंत दिपून गेलेला आहे. हा नेमक्या कोणत्या लोकीचा ("लौकीकाचा" असे वाचू नये) राजपुत्र आहे? असा प्रश्न आम्हाला सततच पडत आलेला आहे.
त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्या अलौकिक विचार मंथनातून बाहेर आलेल्या रत्नासम वाटत आलेला आहे. प्रेझेटेशनला जाणे म्हणजे प्रेझेंट घ्यायला जाणे यासारख्या नव्या नव्या संकल्पना ते अगदी लिलया मांडून जातात. तेव्हा तर या भाषाप्रभूला साष्टांग नमस्कार करावासा वाटतो. परंतु दुष्ट आणि असहिष्णू राज्यकर्त्यांच्या राज्यांत कदाचित या राजकुमाराला नमन केल्या बद्दल आमचीच मान मारली जाईल या भीतीने आम्ही तो मनातल्या मनातच करत आलेलो आहोत.
बांगला देशाच्या निर्मितीचा विषय असो किंवा हाताच्या निवडणूक चिन्हाला सर्व धर्मातील मोठमोठ्या देवानी दिलेल्या पाठिंब्यावरचे त्यांचे विवेचन असो, सर्वच अद्भूत आणि अगम्य आहे. त्या शिवाय मागील सभेत सांगीतलेला चमत्कार काहीच नाही असे वाटायला लावून या सभेत नवा चमत्कार सांगायची त्यांची विजीगीषू वृत्ती हे सुद्धा त्यांच्या क्षात्रतेजाला शोभेल असेच आहे.
याच एकाहून एक उत्तुंग विक्रम करण्याच्या मनस्वीतेतून परवा त्यांनी "एनाराय" या विषयावर देखिल त्यांचे शब्दमौक्तिक मुक्त पणाने उधळले आहेत. वास्तविक "एनाराय" या शब्दाकडे पाहून "एना" हा कानडी शब्द असून "राय" हा बंगाली शब्द वाटतो. त्यामुळे "रोजा" सिनेमातल्या "आसामसे गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक" याप्रमाणे गेल्या पन्नास एक वर्षात "एना से राय तक" मधल्या अनेकानेक गावातून जे लोक पोटापाण्यासाठी भारता बाहेर गेले ते "एनाराय" असे आम्हाला वाटत आलेले आहे. अर्थात प्रत्येकाच्या बुद्धीचा जोर हा ज्याच्या त्याच्या आई वडिलांच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असतो असे आम्ही कुठेतरी वाचलेच होते. पण आज राजपुत्राचे बोल ऐकून आम्हाला या बोलाची खात्रीच पटली आहे.
वास्तविक अमेरिकेत राहणारे सगळेच कुठून कुठून आलेले "एनार" च आहेत. कुणी "एनार इंग्लीश" आहे. कुणी "एनार जर्मन" आहे. कुणी "एनार जपानी" आहे तर कुणी "एनार कंबोडीयन" आहे. पण यातल्या एकाही "एनार" जमातीला बापू, चाचा, सरदार तयार करता आलेले नाहीत, हे कळल्या पासून तर "एनाराय" च्या आनंदाला पारावार राहीलेला नाही. वास्तविक सकाळी आठ ते पाच पर्यंत गुगल, ॲपल वगैरे कंपन्यात पडेल ते सर्व "पडेल" काम करून, मुलाला किंवा मुलीला शनिवारी मराठी नाहीतर कानडी शाळेत घेऊन जाणारा आणि त्यांनी "कोलन" चा का असेना, पण डाॅक्टर व्हावे म्हणून त्याच्या शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून जुन्या चड्डया आणि मोजे सहा सहा वर्षे वापरणारा "एनाराय" आता अचानक एका वेगळ्याच तेजाने आणि आत्मविश्वासाने झळाळून गेला आहे. या "एनाराय" लोकांचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान खुद्द राजस मुखातून ऐकून आपण एका केवढ्या मोठ्या तेजस्वी आणि दिव्य परंपरेचे भाग आहोत असे वाटून गहिवरून गेला आहे. आता "त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करत राहणार आहे." अशी प्रतिज्ञा देखिल काहीजणानी घेऊन टाकली आहे.
आमचे एक परममित्र "एनाराय" श्री. गणोजीराव, (गावाकडे यांना "आमचं गण्या" असे म्हणत) यांनी तर हे बोलणे इतके मनाला लावून घेतले आहेत की त्यांनी त्याच्या अमेरिकन चिरंजीवानी, घराबाहेर लावलेला अमेरिकन ध्वज काढून गुंडाळून तळघरात ठेवून दिला आहे. तसेच ते आता त्यांच्या घरापुरता भूभाग हा "स्वतंत्र" झाला आहे असे देखिल सांगू लागले आहेत. याच बरोबर त्यांनी अमेरिकन राष्ट्रध्वज छापलेले बनियन आणि चड्ड्या देखिल वापरायचे थांबवले आहे असे कळते. बुधवारांतून आणलेले लंगोट आणि बंड्या, ॲटीक मधून काढून, धुवून, उन्हात वाळवून, परत वापरायला काढायचा निर्णय निश्चित झालेला आहे.
त्यांच्या "ॲरन" नावाच्या मुलाला ते आता "अरूण" म्हणून हाक मारू लागले आहेत. आणि "स्विटी" नावाच्या मुलीला "स्वाती" म्हणू लागले आहेत. तसेच त्यांची मुले, अरूण आणि स्वाती, त्यांना जेव्हा "डॅड" म्हणून हाक मारतात तेव्हा तर त्यांनी ओ द्यायचे देखिल बंद केले आहे. "तो मी नव्हेच" असा चेहरा करून बसून राहतात.
एकूण या राजकुमाराच्या राजस बोलाने "एनाराय" लोकांमधे एक अत्यंत दुर्दम्य अशा राष्ट्रवाद आणि देशीवाद वाढीला लागला आहे.
या राजपुत्राची आणि त्याच्या बोलाची महती "एनार पाकिस्तानी" लोकांना देखिल पटली असून, "मुस्लिम लिगची" चळवळ देखिल "एनार पाकिस्तानी" लोकांनी चालू केली असे त्यांचेही मत झाले आहे. त्यामुळे तिकडेही "इद-ए-मिलाद" सारखे वातावरण आहे.
इतकेच काय पण अगदी उजव्या विचारांच्या,कडव्या लोकांना देखिल स्वातंत्र्यवीर देखिल "एनाराय" असल्याचे कळल्यापासून, त्यांना देखिल या राजपुत्राबद्दल वाटणाऱ्या असूयेत लक्षणीय घट झालेली आहे.
रस्ताच्या कडेला वडा पावची गाडी लावून, चार घरची धुणी-भांडी करून संसार चालवणाऱ्या एखाद्या दामूला, आणि त्याच्या सखूला, जर अचानक कळले की ते प्रत्यक्ष पेशव्यांच्या वंशातले असून, थोरल्या बाजीराव साहेबांचे तिसरे सुपुत्र, श्रीमंत जनार्दनराव पेशवे, हेच त्यांचे मुळ पुरूष आहेत, तर जी अवस्था होईल, तीच अवस्था आज "एनाराय" ची झालेली आहे. या एका वैचारीक पुनरूत्थानासाठी राजकुमाराचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.
पण आता दोन खोल्याच्या ब्लाॅक मधे राहणाऱ्या या दामूला आपला दरबार कुठे भरवावा, याचीच काय ती चिंता लागून राहीली आहे.
~निखिल कुलकर्णी

Sunday, September 3, 2017

विल्यम कचरू डिसूझा

एक नविन लघु कथा "विल्यम कचरू डिसूझा" 

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर शंभरेक बसक्या कुडाच्या घरांची एक वस्ती होती 'वड्डी' म्हणून. बरीचशी घरे कानडीच होती. त्यांना मराठी पण येत असे. गावाच्या जवळून एक वाळत घातलेला ओढा कृष्णेला जाऊन मिळत असे. त्या ओढ्याच्या अंगाला वसलेली घरे म्हणून त्याला 'वड्डी' असे नाव मिळाले असावे. या ओढ्याला पाणी आलेले कधी कुणी पाहिलेले नाही. एक मोठाच मोठा लांब, तापलेल्या वाळूचा आणि खडकांचा ओबडधोबड असा तो अजगरासारखा पसरलेला पट्टा होता इतकेच! त्याच्यात गावातली पोरे खड्डे करून पाणी मिळवायची. गुरे मोकाट हिंडत असत. गावाच्या खालच्या बाजूला तर ओढ्याचा निव्वळ हागणदारी साठी उपयोग केला जाई. त्याच्या बाजूलाच एक पत्र्याची शेड करून घेतली होती. मागच्या वेळी आमदार साहेब आले होते तेव्हा त्यांनी 'हिंदू स्मशानभूमी' असा एक पत्र्याचा बोर्ड लावून त्याचे उदघाटन केले होते. गावातली बहुतेक घरे हिंदूच होती. तरणी ताठी लोकं कधीच गाव सोडून पोटापाण्यासाठी मोठ्या मोठ्या शहराकडे निघून गेली होती. आता बहुतेक सगळी म्हातारी, खंगलेली, पोटे पाठीला लागलेली मंडळी गावात राहिली होती. 

गावाचा मुख्य व्यवसाय शेती. सगळा कोरडवाहूच कारभार होता. गावातली खवट म्हातारी तर रंगात आली कि म्हणायची "त्या वड्याचे पानी तर धुवायला दिकून पुरत नाही!!". दुसरा व्यवसाय होता चामडी कमावण्याचा. गावात तशी गुरे कमीच. पण आजूबाजूच्या गावात कुठेही जनावर मेलं कि त्याला चाकाच्या गाडीवर घालून गावात आणायचे. मग त्याची खांडोळी करून त्याचे वाटे केले जायचे. आणि मग त्याची चामडी काढून ती सरसाच्या द्रवात भिजत घातली जायची. त्याचा उग्रट, कुबट दर्प वस्ती मध्ये भरून राहिलेला असे. नवख्या माणसाला तर त्या वासाने जागेवर उमाळून यायचे. गावाच्या बाजूने एक मोठा रस्ता जात असे. त्या रस्त्यावरून जाणारी माणसे देखील गाव सुरु झाले कि नाक बंद करून प्रवास करीत असत. पण गावातली अर्ध्याहून अधिक घरे याच व्यवसायात राबत असत. कमावलेले चामडे मग घड्या करून अथणीला नाहीतर कोल्हापूरला पाठवले जायचे. त्याच्यातून काय कमाई होईल ते सगळे गाववाले वाटून घेत असत. ज्याच्या त्याचा वाटा ज्याच्या त्याच्या जाती प्रमाणे ठरलेला होता. गावात म्हसोबाचे एक टेकडे होते. त्याच्या बाजूला मोठा वड होता. शनिवारी, अमावास्येला, पौर्णिमेला काहींना काही निमित्त काढून म्हसोबाला कोंबडे कापले जायचे. त्या कोंबड्यांच्या पिसांनी सगळा पार भरून गेलेला असे. किती तरी नवस कोंबडा मारून फेडले जात. एखादा जीवघेणा आजार सुद्धा म्हसोबाला कोंबडे कापून बारा होतो अशी गावाची श्रद्धा होती. गावात एखादे लग्न झाले कि नवीन जोडपे म्हसोबाला पाया पडून नैवेद्य दाखवून येई. गावातले कुणी गेले तरी देखील त्याच्या तेराव्याला म्हसोबाला कोंबडा ठेवला जायचा. 

म्हसोबाला वळसा घालून थोडे पुढे गेल्यावर एक सतीची समाधी होती. कधीतरी सोळाव्या शतकात कुठलीतरी बाई इथे सती गेली होती. तिची आठवण म्हणून वाल्मिकची बाई निर्मला इथे रोज दिवा लावून जात असे. या सतीच्या समाधीवर वर्षातून एकदा साफसफाई करून तांबडीभडक काव लावली जाई. त्याच्यावर चुन्याची स्वस्तिके आणि गाईची खुरे काढली जायची. सतीच्या समाधीवरून स्मशानात जळणारी चिता अगदी स्पष्ट दिसत असे. 

निर्मला बोलवाडची. वड्डी पासून गाडीने वट्ट एखादा तास लागायचा. घराची शेती वाडी होती. गुरं ढोरं  होती. येताना तिच्या बापानी तिला चांदीचे मंगळसूत्र करून घातले होते. निर्मलाचं वाल्मिक बरोबर लग्न झालं तेव्हा निर्मला होती ९ वर्षाची आणि वाल्मिक होता २३ वर्षाचा!! त्यांचा जोडा भलताच विजोड दिसत होता. गावातली सगळी लोकं हसायची. ओढ्यावर पाणी भरायला गेली तर सगळ्या बाया निर्मलाला फिदीफिदी हसत. घालून पडून बोलत. "वाल्मिक तिचा बाप शोभतो" असं म्हणत. आधी आधी निर्मलाला खूप वाईट वाटत असे. घरी येऊन वाल्मिकच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून ती रडायची. कधी कधी वाईट वाटून घेऊन घेरी येऊन बेशुद्ध पडत असे. मग वाल्मिक आणि त्याची माय तिची समजूत घालत. वाल्मिक तिला सायकलवर घालून रेल्वे रुळाच्या बाजूला फिरवून आणायचा. सतीच्या समाधीच्या बाजूला एक सोनचाफ्याचे झाड होते. त्याला मुबलक फुले लागत. त्या झाडाखाली बसून दोघे मग फुले गोळा करत. त्याचे दोन गजरे करत. एक सतीला वाहत आणि एक निर्मलाच्या केसात!! मग हसत हसत दोघे अंधारायच्या आत घरी जायची. 

वाल्मिकचं घर म्हणजे तरी काय, तर दोन खोल्यांचं एक कुडाचं झोपडं होतं. जागोजागी ठेपे लावून छप्परावरचे, वाळलेले गवताचे भारे असे थोपवून धरलेले असत. पावसाच्या महिन्यात वाल्मिक त्याच्यावर मोठी ताड पत्री घालत असे. तरी त्याच्या भोकातून सगळभर गळत असे. भिंती आणि जमीन शेणमातीने सारवलेली असायची. भिंतीवर कसल्या कसल्या नक्षा काढलेल्या असत. बाजूला चुलखंड होतं. त्याच्या बाजूला सुक्या लाकडाच्या ढलप्या ठेवलेल्या असत. वाल्मिकची आई सकाळी चाराला उठे आणि तेव्हापासून घर धुराने भरून जायचे. बाजूला दोरीवर कपडे वाळत घातलेले असायचे. जुनी धडुते आणि चिरगुटे जोडून जोडून गोधड्या शिवलेल्या असायच्या. वाल्मिकच्या आईला हि कला अवगत होती. ती निर्मलाला बरोबर घेऊन दिवसभर शेजार पाजारच्या गावातून चिंध्या, जुनी फाटकी कापडे गोळा करून आणायची. ती धुवून घेत. त्याचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करून, मग परत वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकमेकांना शिवून घेत. वाल्मिक जेव्हा चामडे विकायला शहरात जायचा तेव्हा निर्मला त्याच्या बरोबर अशा ४-२ गोधड्या घेऊन जात असे. त्याचे पैसे बघून निर्मलाचे डोळे चमकून उठत असत. मग वाल्मिकच्या आईला नवीन लुगडं, नाहीतर एखादी नवीन परात नाहीतर एखादे पितळ्याचे भांडे बाजारातून घेऊन ती घरी यायची. 

पुढं मग निर्मलाला दिवस गेले. पहिला मुलगा झाला. गुरुवारी झाला, म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं दत्तू. मग दोघे दत्तूला घेऊन बाजारला जायला लागले. बाजार झाल्यावर त्याला सुरकी, टोपडी घेत. हिरवे, तांबडे खुळखुळे घेत. त्याच्या पायात घालायला चांदीचे तोडे करून घेतले तेव्हा तर निर्मलाला आभाळ ठेंगणे झाले होते. "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं पायात चांदीचे तोडे घालणारा!!" असं वाल्मिक त्याला कौतुकानं म्हणायचा. वाल्मिकची माय पण तोंड भरून दत्तूचे कौतुक करत असे. त्याला नजर लागेल का काय म्हणून काजळ, तीट, बटटू लावायची. मीठमोहऱ्या ओवाळून टाकायची. त्याच्या वाढदिवशी म्हसोबाला कोंबडं देऊन यायची. 

दत्तू चार वर्षाचा झाल्यावर निर्मलाला परत दिवस गेले. यावेळी मात्रं लक्षण वेगळं दिसत होतं. निर्मलाला खूप दम लागायचा. मधेच डोके गच्चं धरून बसायची. श्वास कोंडल्यासारखे व्हायचे. कुणाला सांगायची देखील सोय नव्हती. वाल्मिकच्या म्हातारीने अंथरूण धरले होते. ती दिवस रात्र खोकून बेजार व्हायची. कण्हायची, रडायची, भेकायची. आणि शेवटी एक दिवस तिने डोळे मिटले. ती गेली तेव्हा सगळा गाव गोळा झाला होता. बाजूच्या गावातून देखील बाया येऊन बघून जात होत्या. शेवटी तिला खुर्चीवर बांधून बसवून नेलं स्मशानात. तेव्हा तर पार सतीच्या ओट्या पर्यंत गर्दी झाली होती. आठ महिन्याचं पोट घेऊन निर्मला देखील सतीच्या ओट्या पर्यंत जाऊन आली. डोळ्याची धार थांबत नव्हती. घरी आल्यावर एका कुडाला पाठ टेकून वाल्मिक शुन्याकडे बघत बसून होता. समोरच्या कुडाला टेकून निर्मला बसली होती भिंतीवरच्या गोधडी कडे बघत!!

या वेळी निर्मला फार दडपून गेली होती. छातीवर कसले तरी मणाचे ओझे असल्यासारखी हापत होती. वाल्मिक म्हसोबाला नवस बोलून आला होता. तरी निर्मलाची अवस्था बघून त्याला काही सुधरत नव्हते. जशी वेळ जवळ आली तशी वाल्मिक ने बाजूच्या गावातली सुईण बोलावली आणि निर्मलाची सुटका केली. बाळ आणि बाळंतीण दोघी सुखरूप बघून वाल्मिकच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. लगोलग नवसाची फेड करून आला. मोठ्याच अडचणीतून सुटका झाली असे वाटून त्याचे नाव ठेवले "उत्तम"!!

हळूहळू जगण्याचा धीर वाढू लागला. निर्मला मग परत सतीला दिवा लावायला जाऊ लागली. एकेक इयत्ता करत दत्तू शाळा पास होत गेला. गावातली शाळा संपली म्हणून तालुक्याला मिरजेच्या शाळेत गेला. तिथून शहरात गेला. आणि शेवटी एकदा मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये त्याला शिकण्यासाठी प्रवेश मिळाला. त्याची प्रगती बघून वाल्मिक खुळा व्हायचा राहिला होता. गावात भेटेल त्याला सांगायचा कि "माझा दत्तू मुंबईला आता मोठा साहेब होनार म्हणून!!". निर्मलाही हरकून जायची. पण त्याच्या शिक्षणाचा खर्च, प्रवासाचा, राहायचा खर्च कसा करायचा याच्या विचाराने तिला रात्र रात्र झोप लागत नसे. वाडवडिलार्जित जमिनीचा तुकडा विकून टाकला. त्यातून पैसे आले त्यातून दत्तूला सफारी शिवली होती. तेव्हा देखील वाल्मिक कौतुकाने म्हणाला कि, "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं सफारी घालणारा!!". त्याचा खर्च भागावा म्हणून आता निर्मला अजून चार गावात जाऊन चिंध्या गोळा करायला लागली. त्याचे भारेच्या भारे डोक्यावरून, उन्हातान्हातून घेऊन यायची. रात्र रात्र जागून त्याच्या गोधड्या शिवायची. अंगुस्तान घालून घालून तिच्या बोटातून रक्त निघायचे. बसून बसून पाठीचा कणा पार वाकून गेला होता. 

इकडे उत्तमचे काही अभ्यासात लक्ष नसायचे. तो आपला दिवसभर शेळ्या घेऊन ओढ्याच्या बाजूला हिंडत बसायचा. मधेच ओढ्यात खड्डे काढून त्याच्यात खेकडे धरायचा. त्याच्यात त्याच्या एका दोस्ताने त्याला साप पकडायला शिकवले. मग त्याचाच नाद घेऊन बसला. सतीच्या बाजूला सोनचाफ्याच्या गचपणात तासंतास दबा धरून बसायचा. एखादी धामण, नाहीतर घोणस बघून ठेवायचा. मग तिचा माग काढत काढत तिच्या बिळापर्यंत जायचा. आणि नकळत एखादी वाळलेली काटकी उचलावी तसा तो साप जिवंत पकडायचा. गावातल्या पोरांना त्याचं कौतुक होतं. पण निर्मलाला भारी भीती वाटायची. "काय सांगा एखादवेळी नेम चुकला तर संपलाच खेळ!!" या विचाराने ती खूप घाबरी व्हायची. पण बोलायची सोय नव्हती. आणि एक दिवस उत्तमचा मित्र धनाजी कुडाकडे धावत आला आणि त्याने निर्मलाला सांगितले कि उत्तमला साप चावला म्हणून!! 

त्या बातमीने निर्मलाचे अवसानच गळून गेले. डोळ्यापुढे अंधारी आली. आणि ती उभ्या जागी दारातच कोसळली. मग धनाजीने वाल्मिकला बोलावून आणले. गावातली ३-४ माणसे पुढे आली. निर्मला बोलत नव्हती. काही हालचाल होत नव्हती. मग सगळ्यांनी गाडी करून तिला मिरजेला हॉस्पिटल मध्ये न्यायचे ठरवले. हा सगळा गलका चालू असताना तिकडून उत्तम चालत आला. निर्मलाला गाडीत घालताना बघून तर त्याला काही कळेचना. त्याला बघितल्यावर तर वाल्मिकने त्याला मिठीच मारली. मग उत्तमने  त्याला सगळी हकीकत सांगितली कि तो आणि धनाजी एक साप धरत होते म्हणून. धनाजीचा चुकून त्या सापावर पाय पडला आणि तो साप उत्तमला चावला. ते बघून धनाजी पळत सुटला. पण उत्तम ने धीर करून त्या सापाला धरले. आणि मग कळले कि ती धामिण होती म्हणून!! आणि एवढे सांगून उत्तम हसायला लागला. वाल्मिकला काही सुधारत नव्हते. त्याने उत्तमच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे जण निर्मलाला घेऊन गाडीत बसले.

मिरजेत एक अगदी नावाजलेले हॉस्पिटल होते. निष्णात डॉक्टर, सेवाभावी नर्स आणि अद्ययावत मशिनरी होती. या दवाखान्याला अमेरिकेतून आणि युरोपातून पैसा मिळायचा. त्यामुळे मिरजेच्या आजूबाजूच्या गावातून बहुतेक गोरगरीब लोक इथेच उपचाराला यायचे. त्याची ख्याती ऐकून वाल्मिक निर्मलाला घेऊन इथे आला. डॉक्टर जॉर्ज म्हणून कुणीतरी होते. त्यांनी निर्मलाला तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि तिच्या हृदयाला एक भोक आहे म्हणून. त्यांनी वाल्मिकला बोलावून घेतले. त्याला सगळ्या परिस्थीतीची कल्पना दिली. खूप मोठे आणि अवघड ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. वाल्मिक खाली मान घालून ऐकत होता. सारखा डॉक्टरांच्या पाया पडत होता. डोळे पुसत होता. मानेने होकार देत होता. बोलता बोलता डॉक्टरांनी त्याचा धर्म, त्याची जात, त्याची आर्थिक स्थिती याचा अंदाज घेतला आणि मग डॉक्टरनी गोर्डे म्हणून एक नर्स होत्या त्यांना बोलावून घेतले.
 
गोर्डे बाईंबरोबर डॉक्टर काय बोलले ते वाल्मिकला कळले नाही. मग डॉक्टर गेल्यावर गोर्डे बाईंनी वाल्मिकला समजावून सांगायला घेतले. त्याला त्यांनी सांगितले कि हे खूप खर्चिक ऑपरेशन आहे म्हणून. आणि ते अगदी लवकरात लवकर करावे लागेल म्हणून. त्या साठी लाखो रुपये लागतील. ते सगळे ऐकून वाल्मिक अगदी सुन्न होऊन गेला. आता हे सगळे कसे जमायचे या एकाच प्रश्नाने त्याला ग्रासून टाकले होते. 

तेवढ्यात गोर्डे बाईंनी एक कागद समोर धरला. आणि सांगितले कि जर वाल्मिकने त्या कागदावर सही केली तर त्याला कशाचीही काळजी करायची गरज नाही. त्याने जर सही केली तर निर्मलाचे ऑपरेशन अगदी विनामूल्य आणि लगोलग होईल असेही आश्वासन दिले. वाल्मिकला काही सुचेना. हा कसला कागद आहे? याच्यावर काय लिहिले आहे? माझी जमीन तर मी कधीच विकली. आता माझ्या जवळ लिहून देण्यासारखे काय आहे? याची उत्तरे त्याला सापडेनात. मग गोर्डे बाईंनी त्याला सांगितले कि तो धर्मांतराचा कागद आहे म्हणून!! वाल्मिकने फक्त लिहून द्यायचा अवकाश कि तो धर्मांतराला तयार आहे म्हणून आणि लगोलग निर्मलावर उपचार सुरु होणार होते. वाल्मिक क्षणभर चरकला. पिढ्यांपिढ्या जो धर्म लावला तो आज अचानक सोडून द्यायचा या विचाराने त्याला अपराधी वाटले. तो विचार करत होता तेवढ्यात उत्तम तिथे आला आणि वाल्मिकने त्याला त्या कागदविषयी विचारले. उत्तम म्हणाला कि उठवा बिनधास्त अंगठा म्हणून!! नाहीतर "हिंदू म्हणून काय पेढे बर्फी खायला मिळती आहे का काय तुम्हाला?" असेही विचारून गेला. उत्तमचा सल्ला आणि निर्मलाचे मिटलेले डोळे पाहून वाल्मिकने त्या कागदावर डाव्या हाताचा अंगठा उठवला. गोर्डे बाईंचा चेहरा उजळून निघाला. त्यांनी तात्काळ फर्मानं सोडली. वार्ड बॉय आले. नर्स आल्या. त्यांनी निर्मलाला स्ट्रेचरवर घालून लगबगीने ऑपरेशन थेटर कडे नेले. डॉक्टर जॉर्ज देखील ऑपरेशन चा सूट घालून काही मिनिटात हजर झाले. वाल्मिकच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रभू येशू दयाळू आहे. आणि तो सर्वांची काळजी घेतो म्हणून सांगून गेले. वाल्मिक काही कळण्याच्या पलीकडे गेला होता. ऑपरेशन थेटर चे दार बंद झाले आणि वाल्मिक आपल्याच घोणेत मुंडी घालून मुसमुसत बसून राहिला. कसला धर्म? आपला धर्म कोणता होता? आपल्या मायला, हिंदूच्या स्मशान भूमीत नेऊन जाळण्याच्या पलीकडे आपण हिंदू धर्माचे म्हणून काय केले? आज आपण ख्रिश्चन झालो म्हणजे काय झाले? कागदावर अंगठा उठवल्यावर अचानक सगळे खर्च कसे काय माफ झाले? येशू कोण? तो अचानक दयाळू कसा झाला? असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते. पण त्याहून महत्वाचा प्रश्न होता निर्मला बारी होईल ना हाच होता. त्याच विचारात त्याचा कधीतरी डोळा लागला. 

त्याला जेव्हा जाग आली तेव्हा डॉक्टर जॉर्ज त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवत होते. निर्मला कशी आहे? निर्मला कशी आहे? असे तो परत परत विचारत होता. तेवढ्यात स्ट्रेचर वरून निर्मलाला वार्ड बॉय बाहेर घेऊन येत होते. निर्मला तशीच शांत झोपली होती. तिला बाहेर येताना पाहून वाल्मिकचा बांध फुटला. आणि तो हमसून हमसून रडू लागला. बाजूलाच गोर्डे बाई पण उभ्या होत्या. येशूने कृपा केली. सगळे व्यवस्थित पार पडले म्हणून सांगत होत्या. हळू हळू निर्मलाची तब्बेत सुधारत होती. टाके आणि जखमा भरून निघत होत्या. महिन्याभरात ती हिंडू फिरू लागली. आता डॉक्टर कधी एकदा घरी जायला सांगतात त्याची सगळे वाट बघत होते. 

आणि अचानक एक पाद्री निर्मलाला भेटायला म्हणून आला. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गळ्यात चार दोन काळ्या मण्यांच्या माळा, त्याच्यावर एक चार दोन क्रॉस असा सगळा पोशाख भरून वाल्मिक गडबडूनच गेला.  मग त्या पाद्रीने वाल्मिकला पुढचा कार्यक्रम सांगितला. दोन दिवसांनी वाल्मिक, उत्तम आणि तो पाद्री इचलकरंजीला गेले. तिथे विजापूर रस्त्यावर जरा आड बाजूला एक पाण्याचा तलाव होता. तिथे फारशी रहदारी नसायची. त्या तलावात गुडघाभर पाण्यात २ पाद्री आणि २ सिस्टर उभ्या होत्या. वाल्मिक सारखे इतरही बरेच जण तलावाच्या बाजूला रांगेत उभे होते. तो तलावातील पाद्री एकेकाला नाव घेऊन पाण्यात बोलावत होता. एकेक करत त्यांनी वाल्मिकला पाण्यात बोलावले. त्याला एका वाटीतून वाईन प्यायला दिली. मग एक अत्यंत कुबट वासाचा पावाचा तुकडा त्याला खायला दिला. डोक्यावरून तांब्याभरून कसले तरी पाणी ओतले. त्यातल्याच एका पाद्र्याने वाल्मिकला सांगितले कि आज पासून त्याचे नाव "विल्यम कचरू डिसुझा" झाले आहे म्हणून!! आणि मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या.

वाल्मिकला वास्तविक त्याचे काहीच वाटले नाही. त्याला परत घरी जायचे वेध लागले होते. संध्याकाळी तो परत मिरजेला आला. आणि २-३ दिवसात निर्मलाला घेऊन परत वड्डीला आला. गावात आल्यावर दोघेही म्हसोबाला डोकं टेकवून आली. नवस बोलला होता तसा एक तुर्रेवाला काळा कोंबडाही त्याने दिला. गाव जेवण घातले. त्या दिवशी वाल्मिक आणि निर्मला खूप खुश दिसत होती. गावात कुठेतरी बोलताना उत्तमने मग घडलेली हकीकत त्याच्या मित्रांना सांगितली. निर्मलाला मिरजेला कसं नेलं, तिथल्या डॉक्टरनी कसं तपासलं, मग कसल्या फॉर्म वर सही घेतली, मग ऑपरेशन कसं झालं आणि हे झाल्यावर त्याने गंमत म्हणून इचलकरंजीची गोष्ट पण सांगितली. ते पाद्री कसे बुटके होते आणि त्यांनी कसले घाणेरडे पाव खायला दिले ते पण सांगितले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. गावातल्या पंचांनी वाल्मिककडे चौकशी केली. त्याचे नाव "विल्यम" झाले का ते विचारले. घाबरत घाबरत वाल्मिकने जे सुचेल ते सांगून टाकले. मग पंचांनी जात पंचायत बोलावली. झाल्या प्रकारची चौकशी झाली. त्या दिवशी उत्तम पण चौकशीला हजर होता. त्याने पंचांना अर्वाच्य शिव्या दिल्या. निर्मला दवाखान्यात मरणाच्या दारात ताटकळत होती तेव्हा कुठे होती तुमची जात पंचायत म्हणून तो वाट्टेल ते बोलला पंचांना. वाल्मिकने पंचांची माफी मागून बघितली. पाया पडून बघितले. कशाचा काही उपयोग झाला नाही. आणि त्या दिवशी वाल्मिकला पंचांनी जातीतून काढून टाकले. सगळे एकेक करत घरी निघून गेले तरी वाल्मिक आणि निर्मला बराच वेळ तिथेच बसून होती. 

झाल्या प्रकाराने उत्तम मात्र भडकला होता. तशात त्याच्या मित्रांनी पण त्याला 'बाटगा, बाटगा' म्हणून हिणवयाला सुरुवात केली. त्याने तो अजूनच धुमसायला लागला. अशाच तिरीमिरीत त्याने मिरज गाठले. तिथल्या पाद्रीला जाऊन त्याने सगळी कहाणी सांगितली. पाद्रींने त्याला येशू दयाळू आहे. तो सर्व ठीक करेल वगैरे सांगून बघितले. पण उत्तम काही ऐकेना. उत्तम ने त्याला वड्डीला घेऊन जायचा हट्ट धरला. शेवटी एका रविवारी वड्डीला येण्याचे आश्वासन घेऊन उत्तम घरी परतला. आता उत्तम त्या पाद्र्याच्या स्वागताची तयारी करू लागला. तो कधी एकदा येतोय आणि आपण कधी एकदा गावातल्या लोकांचे  उट्टे काढतोय असे त्याला झाले होते. शेवटी एकदाचा तो पाद्री उत्तमच्या घरी आला. त्याने त्याला सगळा गाव हिंडून दाखवला. कोण कुठे राहतो, काय करतो याची बित्तम्बात त्याला पुरवली. गावातल्या लोकांनी देखील उत्तमला त्या पाद्री बरोबर फिरताना पाहिले. आता तो पाद्री दर रविवारी गावात यायला लागला. गावात अजून ४-२ जणांना त्यांनी ख्रिश्चन करून टाकले. त्यांच्या संगतीने त्यांनी एका जागेवर कुंपण घातले आणि त्याच्यावर पत्र्याची पाटी लिहिली कि "ख्रिश्चन स्मशानभूमी" म्हणून! मग त्या नंतर गाववाल्यानी उत्तमला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी याच्यावर उपाय म्हणून त्या पाद्र्याने उत्तमला आणि त्याच्या नवीन ख्रिश्चन मित्रांना घरातले देवाचे फोटो आणि मूर्ती गटारीत नेऊन ठेवायला सांगितल्या. आणि ज्या रविवारी पाद्री यायचा होता, त्या दिवशी उत्तमने त्याच्या घरातले देव, घरा समोरच्या गटारीत मांडून ठेवले. ते बघून तर गावातल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. आणि त्यातल्याच काही धडधाकट माणसांनी उत्तमची आणि त्या पाद्र्याची गचांडी धरली. पाद्री जीव वाचवून पळून गेला आणि उत्तमला लोकांनी मरेपर्यंत मारला. उत्तम कसा तरी खुरडत खुरडत घरी येऊन पोचला. त्याची अवस्था पाहून शेवटी वाल्मिकने दत्तूला तार करून बोलावून घेतले. दत्तू आला आणि मग त्याला हि धर्मांतराची बातमी गावातल्याच कुणीतरी सांगितली. दत्तूला दुःख झाले. आपल्या अपरोक्ष एवढ्या घटना घडल्या म्हणून तो आधी वाल्मिकवर भडकला. दत्तूने त्याची चांगलीच खरड काढली. वरतून त्याला हे पण सुनावले कि केवळ वाल्मिकने धर्म बदलला म्हणून दत्तूचा धर्म बदलला असे होत नाही. त्याची हि मग्रूर उत्तरे पाहून शेवटी उत्तमने त्याला निर्मला दवाखान्यात होती तेव्हा तू आणि तुझा धर्म कुठे होतात म्हणून विचारले. हे सगळे असह्य होऊन निर्मलाने डोळे मिटून घेतले ते कायमचेच!! दुसऱ्या दिवशी सकाळी वाल्मिक जेव्हा निर्मलाला उठवायला गेला तेव्हा त्याला कळले आणि त्याला शब्दच फुटेनात. 
बऱ्याच वेळाने त्याने उत्तम आणि दत्तूला निर्मला गेल्याची बातमी सांगितली. तरी दोघेही त्यांच्याच तंद्रीत होते. उत्तमने गावातली ख्रिश्चन मित्र बोलावले आणि दत्तूने हिंदू. मग त्यांनी मिळून निर्मलाची अंत्य यात्रा काढली. जेमतेम सतीच्या समाधीपर्यंत पोचले असतील नसतील, मग त्यातल्याच एकाने शंका काढली कि निर्मलाला हिंदू स्मशानात न्यायाचे कि ख्रिश्चन स्मशानात!! परत एकदा वादाला तोंड फुटले. निर्मलाच्या देह सतीच्या समाधीवर ठेवून जोरजोरात तंडायला सुरुवात झाली. काठ्या आणि तलवारी निघाल्या. रक्ताचे सडे पडायला लागले. 

वाल्मिकीने निर्मलाचे डोके मांडीवर घेतले. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि त्या पाद्र्याने दिलेला क्रॉस दोन्हीही काळवंडून गेले होते. आता वाल्मिकला काहीही ऐकू येत नव्हते. काहीही दिसत नव्हते. त्याने तिथलीच सोनचाफ्याची फुले गोळा केली. काही फुले सतीला घातली आणि काही निर्मलाला!! त्याच्या बाजूने एक काळीकुट्ट धामिण सळसळत निघून गेली.  

~निखिल कुलकर्णी 

Monday, August 14, 2017

जना

नवीन लघुकथा 'जना' 
~निखिल कुलकर्णी 

संध्याकाळच्या वेळेला जना पडक्याच्या बोळात उभा असायचा. अंगात जुनाट लक्तरे झालेला, मळकट तांबूस गुरु शर्ट घातलेला असे. त्याच्यावर कसले कसले डाग पडलेले असत. गळ्याशी कॉलर घासून घासून फाटली होती. तिची लक्तरे त्याच्या छातीवर लोम्बत असत. एखादया साधूबुवा सारखी अक्राळ विक्राळ दाढी वाढलेली असे. पांढरट, धुरकट रंगाची दाढी त्याच्या मळकट शर्टावर विरून गेल्या सारखी दिसत असे. मिशा वाढून वाढून त्यांच्या पारंब्या झालेल्या होत्या. या दाढीमिशांच्या जंजाळात जनाचे ओठ कुठे दिसतच नसत. त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली, कवटीच्या हाडावर एक भला मोठा तीळ होता. तो तीळ मात्र त्या अक्राळ विक्राळ दाढीतून देखील उठून दिसत असे. जी गत दाढीची तीच केसांची. महिनोंमहिने वाढलेले केस अजस्त्र झाले होते. ते मानेच्याही खाल पर्यंत वाढलेले असून त्याच्या जटा झालेल्या होत्या. हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या असत. त्यातून रक्त वहात असे. त्यांच्यावर माशा फिरत असत. जनाला त्याचे काही वाटत नसे. तो आपला निश्चलपणे एका जागी उभा असे. त्याची नजर शून्यात लागलेली असायची. त्याच्या समोरून कित्येक गाड्या वेगाने, कधी कधी कर्णकर्कश्य कर्णे वाजवत जात. तरी देखील जना अविचल उभा असे. उजवा हात पाठीमागे नेऊन त्याने डाव्या हाताचे कोपर धरून तो तासनंतास उभा असायचा. रस्त्यातून येणारे जाणारे कुणीतरी जनाची चौकशी करायचे. "काय जना कसं काय?" किंवा "काय जना जेवलास का?" वगैरे प्रश्नांना जना फक्त मानेनेच उत्तर देत असे. जना जेवतो काय? पाणी कुठे पितो? झोपतो कुठे? सगळंच एक गूढ होते. त्याच्या पडक्यातून सकाळी एक २ तास आणि संध्याकाळी २-३ तास बाहेर येऊन उभा राहायचा. आणि नंतर आत जाऊन बसायचा. त्याच्या पडक्यात जायची वाट देखील अतिशय अवघड झाली होती. बाजूच्या भिंतींचे दगड, माती, लाकडाच्या चौकटी वेड्या वाकड्या पडलेल्या असत. त्याच्यात काटेरी झुडुपे उगवलेली असायची. त्या झुडुपांना अतिशय उग्रट वास येत असे. त्या झाडांची पाने देखील खरबरीत असत. जना शिवाय इतर कोणी कधी त्या वाटेने जायचे धाडस देखील करत नसे. 
जना विषयी सगळ्यांनाच एक अत्यंत भय युक्त कुतूहल होते.  गल्लीतली टगी पोरं जनाला हरेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत. गल्लीतली कुत्री पकडून त्यांच्या शेपटीवर रॉकेल ओतून त्यांना जनाच्या पडक्यात सोडून देत. मग ते कुत्रे अत्यंत त्रस्त होऊन त्या पडक्यातून सैरावैरा पळत सुटे. 
कधी जनाच्या अंगावर धावून जाई. त्याच्या अंगावर नखाने ओरबाडत. पण जना एका शब्दाने कधी कुणाला त्या विषयी बोलला नाही. काही काही पोरं तर जनाच्या पडक्याच्या दारात हागुन ठेवत. आणि त्याच्यावर माती टाकून ठेवत. ठेचकाळत धडपडत जेव्हा जना चालत येई, तेव्हा माती समजून तो किती तरी वेळेला त्यात पाय देत असे. मग पोरे ते पाहून खिंकाळत असत. पण जनाला त्याचे काही वाटायचे नाही. तो तसाच पाय जमिनीला पुसून तिथे उभा राहायचा. पोरं का हसतात याचे देखील त्याला काहीही वाटायचे नाही. जना उभा असताना त्याच्या समोर रस्त्यात कधी कधी छोटे मोठे अपघात होत. पण त्याचेही जनाला काहीही वाटायचे नाही.त्याची हि अविरत निश्चलता पाहून कधी कधी लोक त्याच्यावर खेकसायचे. पण जना तसूभरही हलायचा नाही आणि काही उत्तर द्यायचा नाही. त्याच्या डोक्यात नेमके काय चालू होते काही कळायचे नाही. 

गल्लीतले लोक त्याला अधून मधून खायला काही काही आणून देत. पांडू बेकरी वाला कधी २-३ शिळे पाव आणून द्यायचा. चौकातला संभा परीट कधीतरी व्यंकण्णाच्या हॉटेलातून राईस प्लेट मागवून द्यायचा. यादवाड्याची विधवा कधी तरी शिळी भाकरी आणि कालवण आणून ठेवायची. त्यांच्या बरोबर देखील जना कधी बोलला नाही. जे काही आणून देतील ते बाजूला ठेवून द्यायचा. आणि संध्याकाळी परत जाताना आत घेऊन जायचा. 

गल्लीतली पुरुष मंडळी, वर्षातून २ वेळेला जनाला अंघोळ घालत. पहिली आंघोळ चैत्र पाडव्याला आणि दुसरी दिवाळीच्या पाडव्याला!! त्या दिवशी बाळबा न्हावी येऊन जनाचे केस कापीत असे. स्वच्छ गुळगुळीत दाढी करे. पडक्याच्या बोळाच्या दारात हा कार्यक्रम कित्येक तास चाललेला असे. केस कापताना त्याला ठीक ठिकाणी जखमा व्हायच्या. पण त्याच्या तोंडातून कधी शब्द बाहेर आला नाही. दाढी केल्यावर तर जना इतका रुबाबदार दिसे कि एखादा हाय कोडतातला वकील म्हणून सहज खपेल! त्याचे घारे हिरवे पाचू सारखे दिवे चमकून उठत. हजामत झाली कि मग जनाला रस्त्यातच आंघोळ घातली जायची. अंगावर मळाच्या वळ्या चढलेल्या असत. त्या काढायला कुणी दगडी कापरीने घासायला घायचा. घासून घासून त्याचे अंग रक्त बंबाळ होत असे. स्वच्छ आंघोळ केलेला बोडका जना तरीही निश्चल बसून असे. मग त्याला रुपनवंर टेलरने उरलेल्या कापडातून एक शिवलेला शर्ट आणि नविन चड्डी घालत. आता हे कपडे पुढच्या अंघोळीच्या वेळेलाच उतरत. 

नवीन कपडे घातले कि जना एक वाक्य म्हणायचा, "आई, जेवायला वाढ. " मग मंडळी त्याला पाटावर बसवून जेवायला घालत. एखादी पुरण पोळी नाहीतर गव्हल्याची खीर केलेली असे. एखादी साखर भाताची मूद असे. ते सगळे एकत्र कालवून जनाला खायला घातले जाई. जेवण चालू असताना जना थोडासा भावनिक व्हायचा. "ती समई नीट करा" म्हणायचा.  "अगं पुरे पुरे. किती तूप वाढशील" असे म्हणायचा. मधेच आपल्याशी हसे. जेवण झाल्यावर विचारे, "मी जरा झोपतो आता माझ्या आईच्या मांडीवर!!". असे म्हणून आत पडक्यात निघून जात असे. या सगळ्याची कुणालाच काही संगती लागत नसे. एकदा जना आत निघून गेला कि इतर मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी निघून जात. तिथून पुढे जनाचा दिनक्रम चालू!! असे कित्येक वर्षे चालू होते. 

एक यरगोळ्याची पांगळी म्हातारी सोडली तर कुणालाही जनाची काहीही फिकीर पडलेली नसे. यरगोळ्याच्या म्हातारीला जनाचा इतिहास ठाऊक होता. तिला फार अपराधी वाटे. पांगळी असल्याने तिला कुठे जाता देखील यायचे नाही. पण ती एकटीच बडबडत बसे. नऊवारी इरकली लुगडे गोल पातळासारखे गुंडाळून बसलेली असे. म्हातारी हेकट होती. तिचं तिच्या घरातल्या देखील कुणाशी पटायचे नाही. घरातल्या मोलकरणीवर तर सारखी गुरकायची. तिचे तिच्या सुनांशी तर पटायचे नाहीच. पण तिच्या लेकींशी पण ती फार फटकून वागत असे. तिची सेवा करायला एक बाई ठेवली होती संतराम ने अक्की नावाची. अक्कीचं आणि म्हातारीचं भारी जमायचं. कारण एक तर अक्की शिवाय तिचं हागमूत कुणी काढायचं नाही. आणि दुसरे म्हणजे अक्की ठार बहिरी होती. म्हातारी काय बोलती ते अक्कीला काही ऐकू यायचे नाही. म्हातारी दिवस भर बडबडत असायची आणि अक्की विचार मग्न चेहऱ्याने ते ऐकत असल्यासारखी करे.

म्हातारी सांगायची कि दादा आणि नमाक्काचा फार जीव होता जनावर. एकुलता एक लेक. घरात गडगंज संपत्ती. हर कामाला नोकर होते. घर कामाला बाया होत्या. घर म्हणजे तर काय, राजवाडाच तो!! दृष्ट लागावी असा जोमदार होता. या वाड्याला चारी बाजूनी तटबंदी सारखी भिंत होती. पुढच्या मुख्य दारावर नगारखान्यासारखी एक कमानीच्या खिडक्या असलेली खोली होती. दारातून आत गेल्यावर पडवी, सोपा, अंगण, गोठा, माजघर होते. दादा आणि नाना ब्याकुडकर असे दोन भाऊ. त्यांना ५ बहिणी होत्या. त्यांची लग्ने देखील कुठे कुठे मोठ्या मोठ्या जमीनदार घरामध्ये लावून दिली होती. दादा ब्याकुडकर म्हणजे तेव्हाचे निष्णात वकील. तेव्हाचे मुंबई, दिल्लीच काय, पण कराची आणि लाहोर मधल्या कोडतात देखील त्यांच्या केस चालत असत. अकाली पांढरे शुभ्र झालेले केस, त्याच्यावर काळी मखमलीची टोपी, काळा मोठा बॅरिस्टर कोट, नागाचे तोंड असलेली काठी, त्या काठीत एक गुप्ती लपवलेली असे. जाड काळ्या फ्रेमचा गोल चष्मा आणि ओठावर हूबेहूब गोपाळकृष्ण गोखल्यांसारख्या छपरी मिशा!! गावातून चालले कि लोक त्यांना अदबीने वाकून नमस्कार करत. गावात नवीन लग्न झालेली जोडपी दादांच्या दर्शनाला येत असत. दादा त्यांच्या हातावर एकेक चांदीचा रुपया ठेवत आणि नमक्का त्यांचे औक्षण करीत असे. घरंदाज श्रीमंतीची छाप सगळ्या वाड्यावर पडलेली असे. त्याकाळी त्यांची मेबॅक गाडी होती. तीची व्यवस्था करायला दोन ड्राइवर असत. गाडी लक्ख घासून पुसून ठेवलेली असे. तिची चाके देखील अशी चमकत कि त्याच्यात तोंड पाहून घ्यावे. तेव्हा गावात एक दोनच गाड्या होत्या. त्यामुळे गाडीत बसून दादासाहेब कुठे निघाले कि गावातली पोरं गाडी गाडी म्हणत त्यांच्या मागे पळत असत. गावात दसऱ्याच्या दिवशी अंबाबाई ची पालखी निघत असे. त्या पालखी पुढे गाडी आणि घोड्याचा मान म्हणून दादासाहेबांची गाडी असे. त्या दिवशी गाडीचे छप्पर उघडून, स्वत: दादासाहेब, नमाक्का आणि तान्हा जना गाडीत बसून मिरवत जात असत. नाना ब्याकुडकर त्यांच्या वडिलोपार्जित बारा बोअरच्या रायफल मधून देवीच्या स्वागतासाठी हवेत बार काढत असत. त्याच्या आवाजाने जना दचकून रडू लागत असे. मग त्याची समजूत काढे काढे पर्यंत नमाक्का ला पुरेवाट होऊन जायची. लोक त्यांच्यावरूनही लिंबलोण ओवाळून टाकत असत. न जाणो कुणाची दृष्ट लागायची!!  

पुढे पुढे नमाक्काला थोडी मदत होईल अशा हिशेबाने यरगोळ्याच्या म्हातारीला दादांनी वाड्यावर कामाला ठेऊन घेतले. संतराम देखील जनाच्याच वयाचा होता. दिवसभर जना त्यांच्या बरोबरच राहायला लागला. एकमेकांना लळा लागला. कधीतरी एखादे वेळेला नमाक्का जनाला कडेवर घेत असे. दादा साहेब बहुतेक वेळा बाहेरच असत. जेव्हा वाड्यावर येत तेव्हा काही ना काही जनाला घेऊन येत. कधी बोलक्या बाहुल्या, कधी खेळणी, कधी गाड्या काही ना काहीतरी घेऊन यायचे. एकदा तर त्यांनी मोठ्या लाकडी चौरंगावर चालणारी खरी खुरी आगगाडी आणली होती. त्याच्या इंजिन मध्ये खरे खुरे कोळसे घालावे लागत. पाणी पण भरून घ्यावे लागत असे. मग एकदा ते इंजिन चालू झाले कि अगदी खऱ्या आगगाडी सारखी झुक झुक असा आवाज काढत आणि हवेत धूर सोडत ती गाडी तिच्या रुळावरून चालत असे. मधेच तिचा हॉर्न वाजत असे. त्याच्या आवाजाने देखील जना दचकून जात असे. 

दादा साहेब घरी असले कि  नमाक्काचा उत्साह ओसंडून वाहत असे. संगमरवरी पाटा भोवती रांगोळ्या काढून पंगत सजवली जात असे. त्याच्या मध्ये खास मारवाडातून आणणेल्या चांदीच्या समया लावल्या जात. सुगंधी अगरबत्त्या आणि हैदराबादी अत्तरे शिंपडली जात. जुन्या ग्रामोफोन वरती बिस्मिल्लाह खान ची शहनाई लावली जायची. पंच पक्वान्नांनी ताट सजवले जायचे. चार भाज्या, २ कोशिंबिरी, तीन प्रकारचे भात आणि २ चटण्यांनी चांदीची पाने पान सजून जात असत. समई च्या ज्योतीने जनाचे डोळे चमकून उठत असत. मांगल्याची, परिपूर्णतेची आणि साफल्याची पंगत दादासाहेब, नमाक्का आणि जना कितीतरी वेळ आकंठ अनुभवायचे. जेवण झाल्यावर दादासाहेब कुठली कुठली गाणी आणि गझला लावत. गप्पा मारता मारता जना नमाक्काच्या मांडीवर डोके ठेऊन पडून राहत असे. नमाक्का मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून कधी "कौसल्ये चा राम" म्हणायची तर कधी "ठुमकी चलतं रामचंद्र" म्हणत असे. सर्व वृत्ती शांत होत कधीतरी जना झोपी जायचा. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तृप्ती मुक्कामाला आलेली असे.  

नाना ब्याकुडकर काही फार शिकले नाहीत. त्यांच्या कडे दादासाहेबांना सारखे व्यक्तिमत्व नव्हते. किंवा कसले कौशल्यही नव्हते. तसा अगदीच माणूसघाणा माणूस! फारसे कुणाशी बोलायचे नाहीत. वडिलोपार्जित शेती करत. दादासाहेबांच्या वाटणीची शेती पण तेच करत. म्हणजे वाटेकरी काम करायचे आणि नाना फक्त हिशेब ठेवत आणि वाटेकऱ्यांवर खेकसत असत. अतिशय कोपिष्ट होते. बायको पोरांना तर चप्पले सारखे वागवत. एकदा तर जेवताना भातात एक केस आला म्हणून बायकोला ताट फेकून मारले होते. त्यांच्या समोर दादासाहेब देखील गप्प गप्प राहत. एकतर दादा साहेब ३ वर्षांनी लहान होते. त्यात त्यांचा मानमरातब मोठा होता. नाना कधी कधी भडकले कि दादांच्या शिक्षणाचा, मोठेपणाचा, मनाचा देखील उद्धार करत. 

त्यांना तीन मुलगे होते. अर्थात ती मुले पण मोकाट होऊन गावातून फिरत असत. कित्येक वेळा गावातल्या कुणाशी तरी भांडण-तंटा करत. हाता-पाई करत. शिवीगाळ करत. कधी कधी त्यांना पोलीस पकडून खोड्यात घालून ठेवत असत. मग दादासाहेब जाऊन त्यांना सोडवून आणत. नानांच्या कुटुंबाचे, जाखाऊचे, तर घरात काही चालत नसे. अगदी पोतेऱ्या इतकी सुद्धा किंमत नव्हती. पोरांची हि तऱ्हा तर नवऱ्याची दुसरी तऱ्हा! त्यात नंतर तिला टीबी झाला. खोकत खोकत कांद्याच्या माडीत पडून राहायला लागली. तिच्याकडे तिची पोरे आणि नाना ढुंकूनही बघत नसत. कधी तरी अधून मधून नमाक्का, नाहीतर यरगोळ्याची म्हातारी येऊन बसून जायची. कधी कधी जना आणि संतराम पण यायचे. मग जाखाऊ, त्यांच्या डोक्यावरून चरबरीत हाताची बोटे फिरवायची. कानावर बोटे मोडून दृष्ट काढायची. मग पोरं तिला गाणी म्हणून दाखवत. कृष्णाचा नाच करून दाखवत. मग ती पोरांच्या हातावर बंदा रुपया ठेवायची. नमाक्काला भारी काळजी वाटे. कुठेतरी तिचा खोकला पोरांना झाला तर म्हणून तिचा जीव वर खाली व्हायचा. जनाला दिलेले रुपये ती लगेच काढून घेत असे. असे सगळे रुपये तिने एका पत्र्याच्या डब्यात जमा करून तो डबा तिच्या फडताळात ठेवून देत असे. जाखाऊच्या माहेरचे पण कुणी यायचे नाही. शेवटी खंगत खंगत एका संध्याकाळी तिचा श्वास संपला. सकाळी जेव्हा मोलकरीण खोली झाडायला गेली तेव्हाच कळलं कि जाखाऊ गेली म्हणून! तिच्या खोकल्याच्या धास्तीने नानांनी तिचे अंथरूण, पांघरूण आणि कपडे वाड्याच्या परड्यात नेऊन जाळून टाकले. इतकच काय पण ती ज्या कांद्याच्या मांडीत मेली,  त्या खोलीत देखील त्याने रॉकेल चा धूर आणि फिनेल मारून घेतले. आणि दाराला कायमची कडी घालून टाकली. मग पुढची कित्येक वर्षे त्या खोलीत कुणी फिरकले देखील नाही.  

जाखाऊ गेल्यावर नानाला रान मोकळे मिळाले. आधीच बाहेरख्याली होता. आता जहागीरच मिळाली. घरीच बाजार बसवायला लागला. भडवे आणि त्यांच्या बायका वाड्यावरच यायला लागल्या. बापाची हि तऱ्हा तर पोरांनी तरी का वेगळे वागावे! ती पण त्याच्यात सामील झाली. वाड्याची पार रयाच गेली. नमाक्काला काही तो प्रकार सहन होईना. वडील-वडील म्हणून दादा साहेबानी वाट पाहिली. वेगळ्या मार्गांनी समजावयाचा प्रयत्न करून बघितला. गावातले इतर प्रतिष्ठित लोक आणून त्यांना समजावयाला सांगितले. पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. उलट नानाची भेटी चेपतच गेली. उद्दाम पणा शिगेला पोहोचला. 

दादासाहेबांकडे प्रतिष्ठित लोक येत. कधी कधी त्यांच्या बरोबर त्यांची कुटुंबे असत. त्यांच्या समोर देखील नानाची थेरे चालूच असत. अगदी लाज यावी असे प्रकार चालू झाले होते. आणि या सगळ्याला पैसा देखील कापरासारखा संपायला लागला होता. ते खर्च भागवायला नानाने कुठल्या कुठल्या जमिनी खंडून द्यायला घेतल्या. त्याच्या मनानेच काही काही जमिनींचे व्यवहार देखील करायला घेतले. दादासाहेबांना हे कळायला देखील खूप वेळ लागला. मधेच कधीतरी एक वाटेकरी त्यांना भेटला आणि बोलता बोलता सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला. दादा साहेबांनी तरी देखील आपल्याला हे सर्व ठाऊक होते असे दाखवून नानांची आणि घराची लाज वाचवली. पण तो विषय त्यांना काही गप्प राहू देईना. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी नानांना या बद्दल विचारले. दारूच्या नशेत नानांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यात त्यांना त्यांचे चिरंजीव पण सामील झाले. 
बोलता बोलता विषय वाढत गेला. आणि शेवटी नानांनी हातातला ग्लास फेकून मारला. दादा साहेबांच्या डोक्याला खोक पडली. त्यातून रक्त यायला लागलं. त्याच्या वर भरीस भर म्हणून नानांच्या मोठ्या मुलाने देखील दादासाहेबांवर हात उगारला. अतिशय संतापाने दादा साहेबानी त्यांच्या काठीत लपवलेली गुप्ती उपसून काढली आणि त्या मुलावर चालवली. एका क्षणात त्या गुप्तीचे धारदार निळसर चंदेरी पाते त्याच्या पोटातून घुसून पाठीतून बाहेर आले. रक्ताची चिळकांडी उडाली. आणि दुसऱ्याच क्षणी तो मुलगा जमिनीवर कोसळला. एका क्षणात रंगाचा बेरंग झाला होता. दादा साहेब डोके धरून खाली बसले. नाना संतापाने फणफणत येरझाऱ्या घालू लागले. 
आतला गलका पाहून वाड्याच्या बाहेर देखील गर्दी जमा झाली होती. त्यातल्याच मग कुणीतरी पोलिसांना वर्दी दिली. थोड्या वेळात पोलीस आले. घटनेचा पंचनामा केला. नानाच्या मेलेल्या मुलाला आणि दादा साहेबाना गाडीत घालून घेऊन गेले. रात्र वाढत होती. वाडा अंधारात बुडून गेला होता.
 
नमाक्का तर ते सगळे दृश्य पाहून बेशुद्धच पडली. यरगोळ्याच्या म्हातारीने त्या दिवशी संतराम आणि जनाला तिच्या घरी नेले. बरेच दिवस जना तिच्या घरीच होता. इकडे दादासाहेबांवर खटला भरला गेला. तारखे मागून तारीख मिळू लागली. तारखेच्या दिवशी नाना आणि नमाक्का  दोघेही कोर्टात वेगवेगळे जात. वाड्यात देखील आता नमाक्का तिच्या खोलीतच राहू लागली. त्या खोलीत तिचे एक लाकडी कपाट होते. त्या कपाटाला एक मोठा आरसा होता. त्याच्यावर नमाक्काची कुंकवाची  बोटे उठलेली होती. कपाटा मध्ये दादा साहेब आणि नमाक्का यांच्या अगदी मौल्यवान काही वस्तू असत. त्याच्यात दादासाहेबांच्या वडिलांच्या हातातले फावर लुबा कंपनीचे रिस्ट वाच होते. त्याच्या आईचे काही दागिने होते. एक मोठी मोत्याची नथ होती. तिच्यात हिरे आणि पाचू मढवूंन ठेवले होते. ती नथ दादा साहेबांच्या आईने नमाक्काला दिली होती जायच्या आधी. 
दादासाहेबांच्या आवडीच्या २-४ पगड्या आणि टोप्या होत्या. नमाक्काच्या आवडीची २-४ रेशमी लुगडी आणि पैठण्या होत्या. त्या कपाटात सगळ्या कुटुंबाचा जीव गुंतलेला होता. 

दादासाहेबांना धरून नेल्या पासून नमाक्काचा जीवात जीव नव्हता. एकटीच रडत बसलेली असे. कधी शून्यात नजर लावून आढ्याकडे नाहीतर खिडकीतून बाहेर बघत बसे. तिच्याच आजू-बाजूला जना घुटमळत असायचा. कधीतरी त्रागा असह्य होऊन नानांच्या समोर जाऊन घराची वाटणी मागे. 
गावातली माणसं कधी कधी भेटायला येत. तेव्हा तर मोठाच गहजब होत असे. कारण त्या माणसांना जसे दादा तसेच नाना असे वाटे. पण त्या माणसांना पाहून नमाक्काला धीर वाटत असे. मग ती वाटणीची मागणी लावून धरायची. रोजच्या कटकटीला कंटाळून एकदाची वाटणी करायची ठरले. तिला शेतीतले काही कळायचे नाही. मग त्याच्या बदल्यात नानाने तिला रोख रक्कम म्हणून काहीतरी रक्कम देऊन तिची बोलावण केली. २-४ दागिने दिले. वाड्यातल्या ३-४ खोल्या दिल्या. याच्यात जाखाऊ ची बंद केलेली खोली पण देऊ केली.  मध्ये उभी भिंत घालून टाकली. वाड्याचे मुख्य दार त्यांना बंद करून टाकले. भिंतीच्या बाजूला एक सरकारी वहिवाट होती. तिथून त्यांनी त्यांच्या खोल्यात यावे आणि जावे असे ठरले. आपल्याच घरात लक्ष्मी दारोदार झाली. जनाच्या पडक्याची हि नांदी होती. 

पुढे मग नानांनी पैशाच्या जोरावर रेटा लावून दादासाहेबांना फाशी नाहीतर जन्मठेप मिळण्यासाठी जोर लावला. आणि त्याची परिणती शेवटी जन्मठेपेत झाली. भरीस भर म्हणून घरच्यां पासून दूर म्हणून त्यांना पटियाळाच्या जेल मध्ये ठेवायचा हुकूम झाला. म्हणजे आता घर कायमचेच तुटले. 
दादासाहेबांना तो धक्का असह्य झाला. रोज त्यांचा जीव तीळ तीळ तुटायला लागला. जनाच्या आणि नमाक्काच्या काळजीने काळीज कुरतडून निघू लागले. आपली व्यथा बोलून दाखवायला कुणी आपल्या भाषेचा सुहृद देखील आजूबाजूला नसे. जेवण, हवा काहीही मानवेना. तशात त्यांना कावीळ झाली. बघता, बघता  ती रक्तात पसरली आणि एक दिवस दादासाहेब गेल्याची तार नमाक्काला मिळाली. अर्थात हि तार सुद्धा नानांना मिळाली आणि त्यांनी ती जाणून बुजून महिना भर दडवून ठेवली. कुठेही असले तरी दादासाहेब होते हा हि नमाक्काला खूप मोठा आधार होता. आता तो पण गेला. त्यांच्या पुढच्या संस्काराला देखील तिला जाता आले नाही. त्या धक्क्याने ती पण खंगत गेली. वातात आल्यासारखी मोठं-मोठ्याने ओरडे. शिव्या द्यायची. दोन्ही हातानी तळपट करायची. कधी एकटीच रडत बसे. कधी जनाला मांडीवर घेऊन रात्र-रात्र एका जागी बसून राही.

उरले सुरले एकेक करत नानांनी काढून घेतली. आता तिच्या कडे तिचे असे फक्त ते फडताळ राहिले होते. कधी कधी खुप वाईट वाटून घ्यायची आणि त्या फडताळाला घट्ट मिठी मारून बसायची. घरातला संवाद तर संपलाच होता. कुणाचे येणे जाणेही बंद झाले होते. तशातच एक दिवस कधीतरी नमाक्काचाही श्वास थांबला. जनाला काय करायचे ते माहीतच नव्हते. तो देखील बसून राहिला तिच्या बाजूला ३-४ दिवस. असह्य अशी दुर्गंधी सुटली. मग नानाच बघायला आला. त्याला तर वाटले कि दोघेही मेले का काय साप किरडू चावून म्हणून. बघतो जर जना जिवंत होता. 

मग गावातली ४ लोक बोलावून तिची विल्हेवाट लावली. आता जना पुरताच एकटा झाला. 
नमाक्का मेली तेव्हा यरगोळ्यांची म्हातारी उर फुटेस्तोवर रडली. जनाला सोबत घेऊन जाते म्हणाली. पण नानाने तिचे एक ऐकले नाही. वर "परत दारात दिसलीस तर पाय मोडून ठेवीन" म्हणून धमकी दिली आणि जनाला बखोटीला धरून फरफटत आत घेऊन गेला. माणसे पांगली ती कायमचीच!! नानाच्या धसक्याने कुणी जना कडे ढुंकून पाहीना. हळू हळू जना जगाच्या लेखी त्याच्या पडक्याचाच एक भाग होत गेला. 

कधी कधी जनाच्या पडक्यातून रात्री बोलल्याचे आवाज येत असत. काही टवाळ पोरं रात्री त्याच्या पडक्यात घाणेरडे धंदे करायला जात. तिथे जना एकटाच त्या फडताळाशी बोलत उभा असे. असंबद्ध आणि संदिग्ध! नमाक्काच्या कुंकुवाच्या बोटांवरून हात फिरवत बसे. कधी तिच्या लुगड्याची खोळ करून त्यात जाऊन बोलत बसे. हे सगळे नानाच्या तिसऱ्या पोराने पाहिले. त्याचे मित्र घेऊन तो त्याचे फडताळ उचलून आणायला निघाला. तेव्हा जनाने फडताळाला घट्ट मिठी मारली. त्या पोरांनी खूप प्रयत्न केला. त्यात त्या फडताळाचा आरसा देखील फुटला. त्यांनी जनाला लाथा बुक्क्या घातल्या. पण त्यांना ते जनाने नेऊ दिले नाही. बाकीची पोरं नानाच्या पोराला हसली. 
त्या दिवसा पासून नानाचे पोर डिवचल्यासारखे झाले होते. कधी एकदा जनाच्या नरडीचा घोट घेतो असे झाले होते. 

त्यानं नानाला फडताळा विषयी सांगितले. त्यात काय काय लपवले असेल या विचाराने नानाने एक निश्चित युक्ती काढली. त्यानं जनाला वेड्याच्या दवाखान्यात नेऊन ठेवायचे ठरवले. गाडी बोलावून त्याने जनाला त्यात बसविले. आणि गाडी जोरात दवाखान्याकडे घेऊन गेला. जनाला तिथे सोडून तो गेल्या पावली परत देखील आला. तिथल्या डॉक्टरांना त्यानं काय सांगितलं देव जाणे. पण त्यांनी जनाला सर्वात खतरनाक झटके द्यायला सुरुवात झाली. एका मागून एक झटके बसू लागले. प्रत्येक झटक्यानंतर जना गुरासारखा ओरडे. बांधलेले हात-पाय जगाच्या जागी जिवाच्या आकांताने तडफड करत. 

इकडे नाना आणि त्याच्या पोरांनी ते फडताळ पडक्यातून उचलून रस्त्यावर आणून ठेवले. मोठा जल्लोष केला. आता त्याच्या मधून काय काय बाहेर पडणार या उत्कंठेने, त्याच्या भोवती चौकडी जमा झाली. नानाच्या पोराने दार उघडले. आणि त्याच्यातून दोन काळे कुट्ट नाग फणफणत बाहेर आले. त्यांचे खवले अगदी दादासाहेबांच्या मखमली टोपी सारखे उन्हात चमकत होते. जिभा खाऊ कि गिळू अशा वळवळत होत्या. एकमेकांशी फेर धरून फणा काढून बसून होते. 
पोरं बिचकली. मागे सरकली. आणि परत धीर करून तिथल्या दगडांनी त्यांनी ते नाग ठेचून काढले. इकडे एक झटका असह्य होऊन जनाचा श्वास देखील थांबला होता.  

जना मुक्त झाला होता. पळत पळत तो स्मशानापाशी आला. तिथे ३ प्रेतं जळत होती. त्यानं नीट निरखून पाहिलं आणि अचानक त्याला दादासाहेब आणि नमाक्का दिसु लागले. संगमरवरी पाटा भोवती रांगोळ्या काढून पंगत सजवली होती. त्याच्या मध्ये खास मारवाडातून आणणेल्या चांदीच्या समया लावल्या होत्या. सुगंधी अगरबत्त्या आणि हैदराबादी अत्तरे शिंपडली होती. पंच पक्वान्नांनी ताट सजवले होते. चार भाज्या, २ कोशिंबिरी, तीन प्रकारचे भात आणि २ चटण्यांनी चांदीची पाने सजली होती. समई च्या ज्योतीने जनाचे डोळे चमकून उठले होते. आज दादासाहेबांनी राम नारायणाची सारंगी लावली होती. जेवण झाल्यावर जनाने नमाक्काच्या मांडीवर डोके ठेवले. नमाक्का मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून "कौसल्ये चा राम" म्हणू लागली. सर्व वृत्ती शांत होत कधीतरी जना झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तृप्ती मुक्कामाला आली होती. 
सकाळ होत होती. बाजूच्या चिताही विझून गेल्या होत्या. 

~ निखिल कुलकर्णी

Saturday, August 12, 2017

तळवळकर सर

तळवळकर सर गेले. फार वाईट झाले. फार मोठा माणूस होता.
सरांचं आणि माझं नेमकं नातं काय याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या "मटा" मधून एक फार मोठा संस्कार करून ठेवला आहे.
मी शाळा-काॅलेज मधे होतो तेव्हा "गोविंद तळवळकर" या नावाला एक फार मोठे वलय होते. फार मोठा मान होता. "महाराष्ट्र टाईम्स" हे वर्तमानपत्र म्हणजे मराठी पत्रकारीतेतला मानदंड होता.
आमच्याकडे म्हणजे सांगली, मिरज, कोल्हापूर भागांत मटा संध्याकाळी पोचायचा. आमच्या घरासमोर कोडोलीकर सरकार रहायचे. खूप मोठा चौसोपी वाडा होता. त्यांच्या घरी अगदी "जनप्रवास" सारख्या लोकल पेपर पासून ते "महाराष्ट्र टाईम्स" पर्यंत जवळ जवळ सगळे मराठी पेपर यायचे. कोडोलीकर काकांचा माझ्यावर फार जीव होता. संध्याकाळी मी वाड्यात शिरलो की सोप्यात मटा वाचत बसलेले काका, लगेच दोन पाने काढून मला द्यायचे. सोप्यावर बैठकीला आणि पान-सुपारीला येणाऱ्या प्रत्येकाला सांगायचे की ते मटा फक्त माझ्यासाठी घेतात म्हणून. शिवाय मी मटा पहिल्या पानावरच्या तारीख वारापासून, ते "येथे छापून प्रसिद्ध केले" इथं पर्यंत कसा वाचतो, यांचे रसभरित वर्णन करून सगळ्यांना सांगायचे. संपादकीय तर होतेच पण इतर एक एक सदरे अफाट असायची. प्रकाश अकोलकर, अरुण टिकेकर, प्रकाश सामंत, अच्युत गोडबोले, पांडूरंगशास्त्री आठवले, प्राचार्य शिवाजीराव भोसले वगैरे म्हणजे मी वेळ काळ विसरून वाचायचो. इतकेच काय पण "वाचकांची पत्रे" सुद्धा वाचनीय असत. रविवारची मटा पुरवणी म्हणजे पर्वणी वाटायची. मग अंधार पडल्यावर काका स्वत: उठून सोप्यातला दिवा लावत तेव्हाच मी भानावर यायचो.
तेव्हा मटाची टॅगलाईन देखिल अतिशय सार्थ होती "पत्र नव्हे मित्र"!!
कधी कधी काका रंगात आले की एखादं दुसरी इरसाल मराठी-कानडी लावणी नाहीतर गाणी गुणगुणायचे. "मटा मधली एक तरी चूक काढून दाखवा" म्हणून सांगायचे. कसलीही चूक चालेल. कधी कधी तासंतास वाचून देखिल एक सुद्धा चूक सापडायची नाही. कुठेही अशुद्धलेखन नाही. विरामचिन्हांचे घोटाळे नाहीत. जागा संपली म्हणून अर्ध्यात सोडलेले मजकुर नाहीत. पानांचे क्रमांक, मथळे, मजकुर इतकेच काय पण जाहीरातीही दृष्ट लागाव्यात अशा एक संगती घेवून आलेल्या असत. कुठेही बातमी मधे आक्रस्ताळे पणा नसे. उगाच "चौकात विवाहितेचा खून:खूनी फरार" असला गर्दी खेचू प्रकार नसे. सगळेच दर्जेदार!!
मटाचे मिरजेचे वार्ताहर होते दप्तरदार म्हणून. अत्यंत सज्जन आणि लाघवी माणूस!! त्यांच्याकडे पाहून ते वार्ताहर आहेत का कुठल्याशा दत्ताच्या देवळात पुजारी आहेत असा प्रश्न पडायचा. बस स्टॅंडवर, रेल्वे स्टेशन वर कुठेही, गळ्यात लाल रूमाल बांधून, डोळ्याला चकचकीत गाॅगल लावून, कुठलाही मवाली पेपरवाला "मटा मटा" असे ओरडत नसे. किंवा अंगावर काटा आणणाऱ्या बातम्यांचे मथळे ओरडत फिरताना सुद्धा कधी कुणी दिसला नाही.
तेव्हाच्या इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत मटाची प्रकृती म्हणजे अगदी सगळा वाडा लख्ख करून, आवरून, मस्त शालू लेवून, कडीपाटाच्या झोपाळ्यावर, हातातल्या तोड्यांचा आणि हिरव्या चुड्याचा मंद किणकिण आवाज करत, ओव्या नाहीतर श्लोक म्हणत बसलेल्या जहागीरदारीण बाईंसारखा वाटायचा. शांत, सोज्वळ, प्रेमळ तरीही करारी!!
मी नववीत होतो तेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. कोल्हापूर विभागात झालेल्या स्पर्धेसाठी सर स्वत: कोल्हापूरला येणार होते. "आईने रिटायर व्हावे का?" या विषयावर मी बोललो होतो. तेव्हाचे कोल्हापुरचे महापौर माझे भाषण ऐकून मनापासून गहिवरून गेले होते. महापौरानी अगदी मनापासून कौतुक केले. माझे भाषण ऐकून त्यांना त्यांच्या आईची इतकी प्रकर्षांने आठवण झाली की त्यांना अश्रु आवरणे अशक्य होवून गेले. राजकारण्याला इतके हळवे मन असू शकते याचा माझा पहिलाच अनुभव होता. मला भाषण कुणी लिहून दिले हा प्रश्न मी बराच वेळ टाळत होतो. शेवटी महापौरांनी परत परत विचारल्यावर न राहवून सांगून टाकले की माझे भाषण मला माझ्या आईनेच लिहून दिले होते म्हणून!!
माझा कोल्हापूर विभागात पहिला क्रमांक आला होता. इतर स्पर्धकांबरोबर त्यांचे पालक, शाळेतले शिक्षक वगैरे लवाजमा आला होता. महापौरांनी माझ्या आई-वडिलांची चौकशी केली. आम्ही जन्मजात "स्वयंभू" असल्याने बहुतेक स्पर्धांना एकट्यानेच अवतरायचो. ते ऐकून गमतीने म्हणाले की "आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकला एकटा जावू नकोस. आई-वडिलांना घेवून जा."
५०१ रूपये आणि मोठे प्रमाणपत्र मिळाले. त्याच्यावर "गोविंद तळवळकर, संपादक, महाराष्ट्र टाईम्स" अशी ठसठशीत मराठी स्वाक्षरी बघून मला जग जिंकल्यासारखे वाटले होते. वैचारीक सुसंस्कृतपणाचा, सचोटीचा आणि प्रगल्भतेचा मानबिंदू असलेल्या गोविंद तळवळकरांच्या "महाराष्ट्र टाईम्स" ने मला प्रमाणपत्र दिले याहून दुसरे काय मागावे!!
घरी आल्यावर आईला सगळा प्रकार सांगितला. तिला पण खूप आनंद झाला. मग राज्यस्तरीय स्पर्धेला तिलाही नाशिकला घेवून गेलो. सर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकला येणार होते. पण काही तरी झाले आणि त्यांच्या ऐवजी वनाधीपती विनायकदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. चिठ्ठीमध्ये मला विषय आला होता "पाश्चात्य संगीत श्रेष्ठ की भारतीय संगीत श्रेष्ठ". अर्थात मी सगळ्या अठराच्या अठरा विषयांची खडखडीत तयारी केली होती. आणि त्यातला सर्वात चांगल्या विषयाची चिठ्ठी मला आली. मग काय विचारतां महाराजा!! धमाल बोललो. विनायकदादाना अतिशय आवडलं माझं भाषण!! श्रोते ही मुग्ध झाले होते. मटाचे नाशिकचे वार्ताहर दत्ता नागपूरे प्रत्यक्ष भेटून कौतुक करून गेले.
नंतर परिक्षकानी उलट्या क्रमाने क्रमांक वाचायला सुरूवात केली. उत्तेजनार्थ नाही. तिसरा, दुसराही नाही. माझी अवस्था अगदी बघण्यासारखी झाली होती. कारण आता जर आपलं नाव या माणसाने घेतले नाही तर सगळे मुसळ केरात जाणार होते. मग ते भलतच काहीतरी सांगत बसले. वक्ता कसा असावा वगैरे. इकडे दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेली मंडळी त्यांची पाकीटे फोडून नोटा मोजत बसलेली आणि मी बसलो होतो त्याच्या कडे बघत बारीक तोंड करून!!
शेवटी एकदा आमच्या नावाचा पुकारा झाला. पण मी इतका गोंधळून गेलो होतो की मला काय करावे ते सुचतच नव्हते. शेवटी माझ्या शेजाऱ्याने मला "अभिनंदन" म्हटल्यावर मी भानावर आलो. पुढे जावून विनायकदादांच्या हस्ते बक्षिस घेतले. वाकून नमस्कार केला. सरस्वतीचे वाहन असलेल्या मोराची चांदीची मोठी, सोन्यासारखी झळझळीत मुर्ती असलेला चषक हातात घेतला. सगळे कष्ट सुफळ झाले त्याचा आनंद होताच. पण पुण्या-फिण्याच्या सगळ्या वक्त्यांना आपण भारी पडलो याचा असुरी आनंदही होता. शिवाय १००० रूपयाचे बक्षिस पाकीटातून मिळाले. ५० रुपयाच्या कोऱ्या करकरीत २० नोटा मी नंतर किमान ५० वेळा तरी मोजून बघितल्या असतील!! आईला पण खूप आनंद झाला.
तरी सर आले नाहीत यांचे वाईटही वाटत होते. स्पर्धा झाल्यावर औरंगाबादला माझ्या आजोळी गेलो. दुसऱ्या दिवशी किमान २ मैल तरी चालत जावून क्रांती चौकात, मटा विकत घेतला. तिसऱ्या पानावर विनायकदादांबरोबर विजेत्या स्पर्धकांचा फोटो छापून आला होता. "सांगलीचा निखिल कुलकर्णी अंतिम फेरीत सर्व प्रथम" असा मथळा पाहून सगळे भरून पावले होते.
"महाराष्ट्र टाईम्स" बरोबर आयुष्यभर पुरेल अशी एक आठवण तयार झाली होती.
नंतर मिरजेला गेल्यावर कोडोलीकर काकांना जावून भेटलो. त्यांनाही जग जिंकल्याचा आनंद झाला होता. माझा फोटो मटा मधे पाहील्याचे त्यांनी सांगितले. मग काकांना मनातली खंत बोलून दाखवली. "गोविंदराव आले असते तर बरे झाले असते" असे बोलून गेलो. त्यांवर काका हसले. वास्तविक काका मितभाषी. पण त्या दिवशी काका खूप काही बोलले. गोविंदराव हे एक व्यक्ती नसून ती एक प्रकृती आहे. तो एक स्वभाव आहे. तो एक विचार आहे. ती एक जगण्याची अत्युच्च अशी शिस्त आहे. जिथे जिथे ही शिस्त आहे तिथे गोविंदराव आहेतच याची जाणीव त्या दिवशी झाली.
आता या गोष्टीलाही खूप वर्षे होवून गेली. तरी आजही शिस्त" हा शब्द म्हटला की मला माझे आई, वडील, शिक्षक, संघ, सैन्य वगैरे शिस्तीचे छापील प्रकार न आठवतां, पहिल्यांदा आठवतात ते गोविंद तळवळकर आणि त्यांचा लाडका महाराष्ट्र टाईम्स!!
एखाद्या माणसानं समाजाला याहून दुसरं काय द्यायचं असतं!!

Friday, August 11, 2017

आपटे बाई

जुलै च्या पहिल्या आठवड्यात प्रोजेक्ट संपायचा होता. अक्खा जून महिना दिवस रात्र कामात होतो. कधी कधी तर रात्रीचा १ वाजायचा घरी यायला. अंगात संचार झाला होता. काय, कधी आणि कुठे जेवतोय, याचा देखील पत्ता लागेनासा झाला होता. घर, मुले, मित्र, आई-बाबा यांचा कसलाही विचार करायला सवडच नव्हती. "उसंत हरवणे" म्हणजे काय तसे झाले होते. आणि अचानक बाबाना दवाखान्यात नेल्याची बातमी कळली. म्हणजे एकदम सिरीयस. अमेरिकेचे बाकी सगळे चांगले असले तरी अमेरिका थोडी भारताच्या जवळ असती तर जरा बरे झाले असते असे मला सारखेच वाटत आले आहे. 

मी आईला फोन करून बाबांच्या तब्बेतीची चौकशी केली. सांगितले कि मी कधीही निघू शकतो आणि ३०-३५ तासात घरी पोचतो. ती नकोच म्हणत होती. घरातले इतर पण म्हणाले कि मी यायची काही गरज नाही म्हणून! मग मी थांबलो. शेवटी ५ जुलै ला एकदाचा प्रोजेक्ट संपला आणि माझी जबाबदारी संपली. तात्काळ भारताचे तिकीट काढले १३ जुलै ला निघण्यासाठी. आणि सामानाची आवरा आवर करायला सुरुवात केली. 

तिकीट मिळाले. भारतात जायचे. आई-बाबा भेटणार. मॅन्युअल गियर वाली माझी २० वर्षे जुनी Zen, मनसोक्त हॉर्न वाजवत, पौड रोड, युनिव्हर्सिटी रोड आणि सिंहगड रोड वर रात्री बेरात्री झन्नाट चालवायला मिळणार. पहाटे ४ वाजता सिंहगडावर जायला मिळणार. "सुभद्रा" मध्ये उत्ताप्पा. "वैशाली" मध्ये SBDP. औरंगाबादेला "तारा" पान पट्टीवर पान खायचे. सांगलीला सच्या कोरे बरोबर वालचंद कॉलेजच्या टपरीवर भेटायचे. विचार करू तेवढा थोडा होता. मन म्हणजे एकदम स्वैर वाऱ्यासारखे हुंदडायला लागले होते. बराच वेळ दावणीला बांधून ठेवलेले गायीचे खोंड, धारेच्या वेळेला कासरे सोडले कि, जसे सैरभैर होऊन भलती कडेच, चौखूर पळत सुटते, अर्थात त्याला पळणे म्हणतच नाहीत, कारण त्याला कुठली एक ठराविक दिशा नसतेच, त्याला हुंदडणेच म्हणतात, अगदी तसे, त्या खोंडासारखे चालले होते. असंख्य विचार आणि आनंदाच्या उकळ्या!!

आणि अचानक एका ग्रुप वर कुणीतरी मेसेज पाठवला कि आपटे बाई गेल्या म्हणून!! मला आधी विश्वासच बसेना. एक तर आज काल ग्रुप वर काय वाट्टेल ते चालू असते. त्याच्या आदल्याच दिवशी कुणीतरी बाबासाहेब पुरंदरे गेले म्हणून कंडी पिकवली होती. म्हणून मी २-४ जणांना फोन करून खात्री करून घेतली. आणि सुन्नच झालो. तात्काळ निघावे आणि बाई ना शेवटचे भेटावे असाही एक विचार आला. पण आता काढलेले तिकिट बदलून मिळेना. लवकरात लवकरचे तिकीट १० तारखेला होते. हताश होऊन, अमोलला फोन केला. ५-६ वेळा तरी फोन केला असेल. पण एकतर बिझी असे. नाहीतर कव्हरेज च्या बाहेर. काय करणार बिचारा तो तरी!! वेळच वाईट होती.  

एक खूप मोठा, ६०-६२ वर्षे अव्याहत पणे चालत आलेला प्रेमळ श्वास कायमचा थांबला होता. कसल्या कसल्या रांगोळ्या, नक्षा, काशिदे काढणारा हात शांत झाला होता. सगळे भरून पावल्या वर, अगदी तृप्त झालेल्या चित्त वृत्तीतून, व्यक्त होणारे प्रसन्न स्मित, आता अव्यक्ताच्या पसाऱ्यात कुठेतरी कायमचे लुप्त झाले होते. डोळे भरून आले. माझीच आई गेल्या सारखे काळीज तुटून गेले. शद्ब तोकडेच असतात. त्यांना व्यवहाराचे भान कदाचित सांभाळता येत असेलही. पण भावनेच्या महापुरात ते बापडे हरवूनच जातात. जरी अमोल ने फोन घेतला असता तरी मी काय बोललो असतो त्याला? त्याची समजूत काढली असती का त्यानेच माझी समजूत काढली असती? मला बोलायला शब्द सापडले असते? शरद काकानी फोन घेतला असता तर? सगळेच अवघड प्रश्न आहेत. काही क्षणा पूर्वी ते चौखूर हुंदडणारे ते खोंड आता एका कोपऱ्यात आपल्याच्या खुरात तोंड खुपसून निपचित पडले होते. 

मी आपटे बाईंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी मोजून ६ वर्षांचा होतो. "आपले पोर म्हणजे दुसरा आइनस्टाइन आहे" असा आमच्या तीर्थरुपांचा लहानपणा पासून एक गैरसमज होता. म्हणजे त्यांच्या लहानपणा पासून कि आमच्या, तो अजून एक संशोधनाचा विषय होईल, पण सध्या आमच्याच  लहानपणा पासून असे धरून चालू या. तर "आपले हे बिरमुटे चिरंजीव हे अत्यंत हुशार असून त्यांना सर्व विषयाचे अतिशय व्यापक आकलन आहे". असा त्यांनी ग्रह करून घेतला होता. त्यामुळे अशा या "छोट्या आइनस्टाइन" ला जगातील सर्वात उत्कृष्ट शाळेत घालून, त्याला दिवस रात्र अभ्यास करायला लावून, त्याला "मोठा आइनस्टाइन" करायचा त्यांनी विडाच उचलेला होता. त्याच वेळेला माझाही माझ्या बद्दल वेगळाच गैरसमज होता. मला सारखे असे वाटायचे कि मी "छोटा मारुती माने" आहे म्हणून!! आणि मग मोठा "मारुती माने" होण्यासाठी काय काय करावे लागेल याचा मला प्रश्न पडलेला असे. 

वास्तविक मिरज हे गाव म्हणजे कुणीही प्रेमात पडावे असे गाव!! प्रत्येक गावाला स्वत:ची अशी एक खास प्रतिमा असते. त्या गावाला स्वत:चे असे खास व्यक्तिमत्व असते. त्या प्रतिमेला धरून त्या गावाचे व्यवहार होत असतात. काही प्रतिमा मांजरपाटा सारख्या रखरखीत असतात. काही खादी सारख्या खडबडीत असतात. काही रेशमा सारख्या असतात. तर काही कागदासारख्या हलक्या असतात. काहींना त्यांचे स्वत:चे रंग असतात. ढंग असतात. आवडी असतात. निवडी असतात. चांगल्या-वाईटाच्या कल्पनाही वेग-वेगळ्या असतात. 

कोल्हापुरात मित्राची विचारपूस करताना देखील शिवी हासडून वाक्याची सुरुवात करायची एक पद्धत आहे. तशी शिवी तुम्ही पुण्यात एखाद्याला द्याल, तर तुमची पोलिसात तक्रार करून तुम्हाला कोतवालीची सफर घडवून आणायला देखील "पुणेकर" मागे-पुढे बघणार नाहीत. त्यात आता "पुणेकर" ह्या संकल्पनेची लोकसंख्या दिसा-मासाने वाढतच आहे. त्याच्यात सांगली, कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, गडचिरोली वरून आलेले लोक आताशा सामील होत आहेत. आणि सदाशिव, नारायण, शनिवार आणि कसब्यातून राहिलेले मुळचे "पुणेकर" हे विशेषण, आता पार मुळशी, भूगाव पासून ते खराडी, बालेवाडी पर्यंत आणि वडगाव-धायरी पासून ते मांजरी-बुद्रुक पर्यंत कुठेही आणि कसेही राहणाऱ्या मनुष्य प्राण्यास लागू होऊ लागले आहे. त्यामुळे आता नेमके "पुणेकर" कुठले? बारामतीत राहणारे बारामतीकर हे "पुणेकर" ठरतात का नाही? किंवा बारामतीत राहणाऱ्या  "पुणेकर" या बारामतीकर कि पुणेकर? असे असंख्य संभ्रम तयार झाले आहेत. हि असली अजस्त्र  गावे त्यांचा चेहरा हरवून बसलेली असतात. मग सगळीच माणसे त्यांच्या सोयीचे नकली चेहरे लावून व्यवहार करत राहतात. आणि नकली चेहऱ्या सोबत असली निष्ठा नाही राहू शकत. मग असल्या गावात तरुण मुलींकडे मुले चांडाळ चौकड्या करून बघतात आणि चौका चौकात पोलिसांना CCTV कॅमेरे बसवावे लागतात. 

मिरजेचे तसे नाही. हे एक असली चेहऱ्याचे गाव आहे. इथल्या निष्ठाही दणदणीत आहेत. "शरीर माध्यम खलु धर्म साधनं" या सुभाषितावर या गावाचा ठाम विश्वास आहे. हे एक अतिशय प्राचीन गाव आहे. अगदी शिलाहार राजांपासून या गावाचा उल्लेख आढळतो. त्यानंतर यादवांचे राज्य होते. मग बहामनी राज्यात हे एक महत्वाचे ठाणे होते. आदिलशहाच्या ताब्यात असताना तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना देखील हे गाव तीन महिने झुंजून देखील जिंकता आले नव्हते. या गावावर पटवर्धन सरकारांचे गेली कित्येक वर्षे राज्य होते. आणि त्यांनी देखील गावाची राजधानी सारखी बडदास्त ठेवलेली होती. वास्तविक पटवर्धन हे पेशव्यांचे सरदार!! थोरल्या माधवराव पेशव्यांनी, हैदरवरच्या स्वारीत केलेल्या जबरदस्त कामगिरीवर खुश होऊन, मिरजेची जहागीर पटवर्धनांना बहाल केली. कृष्णे पासून ते खाली तुंगभद्रे पर्यंतचा सगळा प्रदेश  त्यांना मिळाला. आणि तिथून  हे गाव पटवर्धनांचं झालं. या चित्तपावन राजानं गावाची अगदी लेकरासारखी काळजी घेतली. ब्रिटिश सत्तेचा कसलाही जाच इथल्या जनतेला जाणवू दिला नाही. गावातल्या कित्येक होतकरू मुलांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या. गावातली मुले पार लंडन मध्ये जाऊन शिकायला जाऊ लागली. या राजाला जसे सरस्वतीचे प्रेम होते, तसेच हनुमानाचे ही!! गावात ठिकठिकाणी तालिमी उभ्या राहिल्या. त्यातून शौकीन पैलवानकी करायला लागले. जोर-बैठका, कुस्त्या, मल्लखांब यातून गावाची वेगळीच ओळख तयार झाली. कदाचित जगात मिरज हे असे एकच गाव असेल जिथे अर्ध्याहून अधिक घरे ब्राह्मणांची होती. गावाच्या एका मोठ्याच मोठ्या भागाला 'ब्राह्मणपुरी" असेच नाव होते. आणि तो ब्राम्हण देखील घणघणीत आणि दणदणीत होता. त्यात देवलांच्या सर्कशीने तर मिरजेचे नाव पार रशिया, अमेरिका आणि युरोप मध्ये नेऊन ठेवले. देवल सर्कस म्हणजे मिरजेचा मानबिंदू होता. अगणित प्राणी, त्यांच्या कडून कसरती करून घेणारे रिंग मास्टर, मैदानी खेळ करणारे तरुण-तरुणी सगळंच जगावेगळं होतं. या सर्कशीची तर प्रत्यक्ष गांधी आणि नेहरूंनी देखील स्तुती केली होती. ब्राह्मणांच्या एखाद्या प्रयोगाचे गांधी आणि नेहरूंकडून कौतुक व्हावे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. त्या सर्कशीच्या नादाने गावात gymnastic चे प्रयोग सुरु झाले. इथला जवळ जवळ प्रत्येक ब्राम्हण म्हणजे मल्लच!! प्रत्येकाची तर्हा न्यारी. दादा महाबळांना तीन वाघा सारखे मुलगेच होते. एकाहून एक दणकट!! सहा फुटाच्या वर उंची आणि तब्बेत देखील तशीच आडवी!! प्रभाकर जोशी होता. लाल्या नातू होता. राणा आणि प्रताप फाटक म्हणून होते. जोगळेकर म्हणून एक तब्बलजी होता. त्याला तबल्याचा एवढा शौक होता कि त्या तबल्याच्या नादात तो ९ वेळेला दहावी नापास झाला होता. कुणी ताटभर जिलब्या खायचा. कुणी कुंडाभरून श्रीखंड खायचा तर कुणी १०० वाट्या बासुंदी प्यायचा. या मंडळींना अशक्य असलेल्या गोष्टींची यादी खूपच लहान होती. गल्लीतले एखादे माणूस गेले तर अर्धे मिरज गोळा व्हायचे. ज्याचे आई नाहीतर वडील गेलेले असायचे, त्याला कळायचे देखील नाही कि लाकडाचे पैसे कुणी दिले आणि नगरपालिकेचा पास कुणी काढला ते!! मंडळी शरीराने सुडौल होतीच पण मनानेहि तितकीच सुदृढ होती. कुणीतरी कौलगुड कुठल्या तरी जोगांच्या नाहीतर बोडसांच्या घरी सकाळी सकाळी शेतावरून काढून आणलेली राजगिऱ्याची पेंडी सोडून जायचा. नाहीतर कुणी एखादा वाटवे कुठल्यातरी गद्र्यांच्या नाहीतर चिप्पलकट्टीच्या घरी द्राक्षांची पेटी ठेऊन यायचा. यांच्यात मोठे प्रथितयश डॉक्टर होते. मोठे नामांकित वकील होते. सरकारी अधिकारी होते. शिक्षकही होते. एवढेच काय पण एखादा उदय जोशी, प्रिंटिंग प्रेस चालवायचा आणि त्याचा भाऊ पांडुरंग जोशी पेट्रोल पंप!! गद्रे म्हणून एक कंपाउंडर होते. तरी सगळे गाव त्यांना डॉक्टर गद्रे म्हणायचे. आणि हे गद्रे डॉक्टर लोकांना त्यांच्या घरी जाऊन इंजेक्शन वगैरे द्यायचे. पेशंटच्या नातेवाईकांना धीर द्यायचे. कुणाला कुणाच्या व्यवसायाचा गर्व नव्हता. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन प्रसंग निभावून न्यायला प्रत्येक जण समर्थ होता. एक प्रकारचा हुंबपणाच तो!! पण त्याचं कुणालाच काही वाटायचे नाही. सगळे गाव एकजीव होऊन जगत होते. 

अशा गावात जगायला मिळायला खरे तर भाग्य असावे लागते. 

तर एकूण गावाचा तोंडवळा बघता आणि विशेष करून आमची शरीर सौष्ठव संपन्न मित्र मंडळी बघता, आमचा आमच्या बद्दलचा "छोटे मारुती माने" हा गैर समज आमच्या तीर्थरुपांच्या, आमच्या बद्दलच्या "छोटे आइनस्टाइन" या गैर समजापेक्षा कमी गैर होता असे आमचे आजही मत आहे.
तर या दोन भिन्न प्रकृतीच्या गैर समाजातून जे व्हायचे तेच होत होते. PhD करणे, scientist होणे, अमेरिकेला जाणे अशी लौकिक उद्दिष्ठे ठेवणाऱ्या गावातल्या हुशार मुलांपेक्षा ७५० जोर मारणे. १००० बैठका मारणे, ५०० सूर्य नमस्कार घालणे अशी अलौकिक उद्दिष्ठे ठेवणारे महावीर हे आमचे दोस्त झाले होते. त्यामुळे स्वाभाविक पणे ते ज्या शाळेत जातील तिथेच मला पण जायचे होते. अर्थात ती शाळा सरकारी होती. म्हणजे एकूण शिक्षणाचा दर्जा जेमतेमच. तीर्थरूपांस ते काही मानवणारे नव्हते. त्यांनी गावातली त्या वेळेची सर्वात चांगली खासगी शाळा शोधून काढली आणि माझे तिथे नाव पण घातले. आता त्या शाळेत गावातील सर्व श्रीमंत लोकांची मुले-मुली यायची. ती फक्त अभ्यास वगैरे करायची असे मी ऐकून होतो. गांगरूनच गेलो होतो. पण इयत्ता पहिली असल्याने आणि तीर्थरुपांच्या मिशांचा पीळ आणि केसांचा रंग गडद काळा असल्याने बंडखोरी करण्याचा विचार तूर्तास रद्द केला होता. बिचकत बिचकत वडिलां बरोबर शाळेत गेलो आणि तिथे कळले कि माझ्या वर्ग शिक्षिका आपटे बाई म्हणून कुणीतरी आहेत!! 

त्यांना भेटलो. प्रसन्न हसरा गोल चेहरा, थोड्याश्या बुटक्या आणि अतिशय आश्वस्त करणारा त्यांचा अविर्भाव मला एकदम आवडला. आपटे बाई एकदम आई सारख्याच दिसत होत्या. मग एक नवीन प्रवास चालू झाला. आजूबाजूला सर्व श्रीमंत मुले, मुली, त्यांचे भारी-भारी कपडे, दप्तरे, वह्या, पाट्या, सगळे बघता बघता मला घाम फुटायचा. एका डॉक्टरांच्या मुलीला शाळेत सोडायला तिच्या घराची गाडी यायची. शाळा सुटल्यावर तो ड्राइवर युनिफॉर्म घालून शाळे बाहेर वाट बघत उभा असायचा.   काही काही मुलींना शाळेत सोडायला आणि घरी न्यायला रिक्षा यायची. मी आपला अवाक होऊन ते बघत राहायचो. कारण त्या काळात कुठेही जायचे असेल तर चालत, असाच समज होता. अगदी लांब असेल, म्हणजे सांगलीला वगैरे जायचे असेल तर बस! रिक्षात मी फक्त वर्षातून एक-दोन वेळाच बसायचो. ते देखील कधीतरी रेल्वेने दुसऱ्या गावात जायचे असेल तर रेल्वे स्टेशन पर्यंत रिक्षाने जायचो. इथे सगळा अजब प्रकार होता. या मुली आणि मुले शाळेत मोठ्या मोठ्या कॅडबरी घेऊन यायच्या. देवा देवा!! तेव्हा आमच्या घरात म्हणजे एक तीळ सात जणात वाटून खायची प्रथा होती. त्या न्यायाने एक कॅडबरी ७०० जणात!! आणि ती मुले तर अख्खी कॅडबरी खायची. मी दिवसेंदिवस खचत चाललो होतो. 
आपण म्हणजे अगदी 'हे' आहोत असे वाटायला लागले होते. पण सगळी चांगली मंडळी होती. त्यांची कॅडबरी मला द्यायची. शप्पथ सांगतो, त्यावेळी मी जर माझी स्वत:ची  कॅडबरी आणली असती तर कुणाच्या बापाला हि दिली नसती, एक तुकडा सुद्धा!! पण मी त्यांची कॅडबरी, बिस्किटे मनसोक्त हाणायचो. त्यांनाही त्याची गम्मत वाटत असणार. त्यांचे आई-बाबा अधून मधून शाळेत येऊन बाईंना भेटून जायचे. बाई पण त्यांच्याशी खूप वेळ बोलायच्या. त्यांचे कौतुक करायच्या. आमचे पण तीर्थरूप अधून मधून डोकावून जायचे. त्यांच्याशी पण बाई बोलायच्या. "थोडासा हूड आहे. पण हुशार आहे. अभ्यास करतो. " वगैरे चांगलेच सांगायच्या. त्यामुळे जीवात जीव यायचा. आपटे बाई म्हणजे मला तरी तारणहार वाटू लागल्या होत्या. या बाईंच्या जागी जर दुसऱ्या कोणी बाई असत्या, आणि त्यांनी जर खरी परिस्थिती विशद केली असती तर मोठाच अनावस्था प्रसंग उभा राहिला असता. कारण आमचे उद्योगच तसे चालू असायचे. 

आपटे बाई म्हणजे वर्गाचा प्राण होत्या. प्रत्येक मुलाला आणि मुलीला असे वाटायचे कि तोच त्यांचा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहे म्हणून!! बाईंनी कधी कुणाला शिक्षा केलेली आठवत नाही. आणि जरी एखाद्याला केलीच तर ते पण सगळे हसण्यावारी न्यायचे प्रकरण. शाळा बुडवावी असे कधी वाटलेच नाही. एकतर बाईंचा मुलगा अमोल पण आमच्याच वयाचा होता. पण आईच्या वर्गात मुलगा नको म्हणून असेल कि काय पण तो दुसऱ्या तुकडीत होता. मधल्या सुट्टीत बाईंना भेटायला यायचा. आम्हाला फार अप्रूप वाटायचे. आपटे बाईं सारखी आई म्हणजे अमोलची काय धम्माल येत असेल असे वाटायचे. असे म्हणतात कि वर्गातल्या दंग्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सगळ्यात जास्त दंगेखोर मुलावर दंगा थांबविण्याची जबाबदारी सोपवावी. त्या न्यायाने बऱ्याच वेळेला वर्गावर लक्ष ठेवायचे काम माझ्याकडे असायचे. मग त्याच्याच एक भाग म्हणून मला गोष्टी सांगायला लावायच्या. भाषणे म्हणून  दाखवायला लावायच्या. निबंध लिहायला सांगायच्या. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीचे कौतुक करायच्या. पुढे कधीतरी डेल कार्नेगीचे "how to win friends and influence people" जेव्हा वाचले तेव्हा राहून राहून आपटे बाईंचीच आठवण येत होती. हे पुस्तक त्या आमच्या बरोबर पहिलीतच प्रत्यक्ष जगल्या होत्या.    

मला अगदी स्पष्ट आठवते कि शाळे मध्ये १५ ऑगस्ट ची तयारी चालू होती. सगळे ग्राउंड स्वच्छ केले जायचे. छोटे छोटे खडे, पाने वगैरे सगळे काढायचो. सगळ्याचे लीडर आम्ही. मग आम्ही आमच्या मर्जीतल्या मुलांना आणि मुलींना चांगली कामे द्यायचो. मग त्यातून वाद व्हायचे. ते सगळे बघून बाईंनी एक नामी युक्ती काढली. या सगळ्या ग्राउंड वगैरेंच्या ढोर कामातून माझी मुक्तता करण्यात आली. आणि मला सांगितले कि तू फक्त शाळेतल्या मुलांसमोर, झेंडा वंदन झाल्यावर भाषण करायचे. माझी पाचावर धारण बसली होती. मी इयत्ता पहिलीत. तिथे झेंडा वंदनाला पहिली ते चौथी चे प्रत्येकी तीन वर्ग. म्हणजे एकूण १२ वर्ग. त्यात प्रत्येकी ५० मुले. म्हणजे एकूण ६०० मुले, त्याच्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे सगळं लवाजमा म्हणजे ७०० लोक तरी येणार. आणि त्यांच्या समोर आपण काय बोलणार? मी जरा निगोशिएट करून बघितले पण बाई ऐकायला तयारच नव्हत्या. घरी गेलो. हात पाय वगैरे धुवून देवापाशी जाऊन बसलो. तीर्थरुपांनी ओळखले कि चिरंजीवांनी काहीतरी दिवा लावलेला आहे. 

मग त्यांना सांगितले कि असे असे भाषण उद्या करायचे आहे म्हणून! मग त्यांनी अधिक वेळ वाया न घालवता मला "लोकमान्य टिळक" या विषयावर एक भाषण लिहून दिले. ते मी बसून त्या रात्रीत पाठ केले. म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ ला नेहरूंनी देखील केली नसे अशी तयारी मी करत बसलो होतो रात्री उशिरा पर्यंत!! चिरंजीव काहीतरी चांगले करत आहेत असे वाटून तीर्थरुपांनी कपड्यांना इस्त्री करून दिली. बुटाला आणि पट्ट्याला पोलिश करून दिले. वा!!  मी मनात म्हटले कि अशी जर सेवा मिळणार असेल तर मी रोज एकेका विषयावर भाषण करायला तयार आहे. तर सगळा जमा निमा करून गेलो. झेंडा वंदन झाल्यावर माझे भाषण होणार असे फळ्यावर लिहिले होते. माझी बोबडी वळली होती. सगळी कडे पाणी फवारून मस्त करून घेतले होते. झेंड्याच्या दांडीपुढे मोठी रांगोळी काढायचे काम काही मुली करत होत्या. सगळ्या शाळेत हिरव्या, पिवळ्या, तांबड्या पताका लावल्या होत्या. सगळे वातावरण अतिशय उत्साही आणि भारून गेलेले होते. एवढे सगळे असून मला श्वास कमी पडतोय असे वाटत होते. पोटात जबरदस्त बाक-बुक होत होती. शाळेतल्या बाई, मुख्याध्यापक वगैरे सगळे माझ्या कडे बघून हसत होते. जणू काही मनात म्हणत होते "आता कसा सापडलास रे माकडा"!! छे!! कधी एकदा झेंडा फडकावतात, आणि ते राष्ट्रगीत होते असे झाले होते. कारण ते झाले कि माझे भाषण!! देवा देवा देवा!! हात पाय गार पडले होते. तोंड कोरडे पडले होते. शेवटी एकदा माझ्या भाषणाची वेळ आली. मी पुढे गेलो. पाय कापतच होते. आणि अचानक आपटे बाईंनी माईक वर बोलायला सुरुवात केली. त्यांनी माझी ओळख करून दिली. मी वर्गात किती छान गोष्टी सांगतो वगैरे सांगितले. ते सगळे ऐकून म्हणजे मला आता रडू येणार का काय असे वाटू लागले. त्यांचा आवाज थांबला आणि मी बोलायला सुरुवात केली. खणखणीत पाठ केलेले भाषण जसेच्या तसे म्हणून ७ मिनिटांनी थांबलो. आणि टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्या कडकडाटात मला फक्त आपटे बाई दिसत होत्या आणि शाळेच्या पटांगणाच्या बाहेर थांबलेले आमचे तीर्थरूप!! कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी भेटून कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांबरोबर फोटो काढला. अर्थात प्रमुख पाहुणे म्हणजे कुणीतरी मामलेदार का तहसीलदार होते आणि आमच्याच शाळेतल्या कुणाचेतरी पालक होते. त्यांनी लगेच त्यांच्या पण मुलाला भाषणात घ्या म्हणून आपटे बाई ना सांगितले. त्यांचे ते शेळपट शेकरू पण तिथेच "पप्पा पप्पा" करत घुटमळत बसले होते. बाईंनी पण काहीतरी सांगायचे म्हणून उगाच "हो हो" म्हणून सांगितले. मला त्याचा असा राग आला होता!! मनात म्हटले, "लेका बापाच्या गाडीत बसून भाषणे करायला येत नसतात. रात्र भर पाठ करावे लागते. आणि तिथे ७०० लोकांच्या समोर जाऊन पोटातून आतडी बाहेर पडत असली तरी उभे राहून पाठ म्हणून दाखवावे लागते. आलाय मोठा भाषण करणारा!!" ते सगळे संपल्यावर मी आपटे बाई ना परत भेटलो. त्यांनी खूप कौतुक केले. मग त्याचा गैर फायदा घेऊन मी त्यांना त्या पोराबद्दलची नाराजी बोलून दाखवली. मग मात्र बाई थोड्याश्या रागावल्या. म्हणाल्या कि, "आपले नाणे आपण सिद्ध केले पाहिजे. आता २६ जानेवारीला तुझी आणि त्याची मी स्पर्धा घेणार आहे. त्यात जो चांगला बोलेल त्यालाच २६ जानेवारीला बोलायची संधी मिळेल." आता काय बोलणार!! 

वास्तविक अमोल तर बाईंचा मुलगा होता. बाईंना त्याला किती तरी संधी अशाच देता आल्या असत्या. पण त्यांनी तसे कधीही केले नाही. कधी कधी अमोल ला शिक्षा वगैरे पण द्यायच्या त्याच्या वर्गाच्या बाई!! पण कधी आपटे बाईंनी त्याची रदबदली केलेली मी पाहिली नाही. किंवा उगाच घ्या त्याला भाषणात, घ्या त्याला गाण्यात. असलेही कधी केले नाही. त्याचे हस्ताक्षर उत्तम होते. त्याची चित्रकला पण छान होती. तो उत्तम खेळ खेळायचा. त्यासाठी बाईंनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. पण कधीही partiality केली नाही. कदाचित त्या वेळी अमोलला ते आवडत देखील नसेल!! पण त्याची पर्वा न करता, शाळेतली सर्वच मुले आपली आहेत अशा समसमान न्यायानेच त्या वागल्या.   

या भाषणानंतर मी असंख्य भाषणे केली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या. फड गाजवले. पण त्या सर्वांची ऊर्जा आणि प्रेरणा हि या पहिल्या भाषणातूनच येत आलेली आहे.  

अजून एक प्रसंग सांगायलाच हवा. आमच्या वर्गा शेजारी चौथीच्या मुलांचा वर्ग होता. ती मुले वयाने मोठी होती. मग ती आमच्यावर फार दादागिरी करायची. उगाच मुलांना वर्गात ढकल. वर्गाचे दार बाहेरून लावून घे. वर्गाच्या बाहेर येताना मुलांना पायात पाय घालून पाड असे उद्योग चालायचे. एक दिवस त्या पोरांनी मलाच पाडले. पोरं वयानं मोठी असली तरी तब्बेतीने  किरकोळच होती!! म्हटले द्यावा एक दणका ठेवून!! आणि त्या पोरट्याला दिला पण एक सणसणीत!! ते मागे जाऊन पडले बाकावर!! आता पहिलीतल्या मुलाने चौथीतल्या मुलाला ठोकला. हि बातमी शाळा भर पसरली. मग त्याच्या वर्गातली सगळी मुले मला मारायला धावली. आता म्हणजे अगदी पावनखिंडी सारखा प्रकार झाला. लढणे हा एकमेव मार्ग माझ्या समोर होता. पण आता हातात लाकड्याच्या पट्ट्या वगैरे घेतलेल्या १०-१२ मुलांना कसे काय आवरायचे? शेवटी पक्का निर्धार करून कमरेचा पट्टा काढला आणि बाजी प्रभूंचे स्मरण ठेवून पट्ट्याची हात घाई सुरु केली. त्यांच्याच वर्गात, त्यांचे सैनिक जखमी होऊ लागले. बाहेर प्रेक्षक वाढू लागले. गलका बघून मुख्याध्यापिका बाई प्रत्यक्ष आल्या. त्या आल्यात हे बघून ती सर्व मुले एकदम शांत झाली आणि मग ती बहुतेक आपल्या शौर्यानेच शांत झाली असे वाटून मी निकराचा मारा चालूच ठेवला. म्हणजे आता चित्र असे होते कि मी एकटाच मारामारी करतोय!! याला नशीब म्हणतात हे नंतर कळाले. तो सगळा प्रकार बघून शाळेतले शिक्षक, शिपाई पळत आले. आणि अर्थात या सर्व कृष्ण कृत्याचे निर्माते म्हणून आमची रवानगी मुख्याध्यापकांकडे झाली. मग माझी सडकून चौकशी झाली. अर्थात पुढे शाळेने पट्टा काढून घेतला. घरी गेलो. तीर्थरुपांनी विचारले पट्टा कुठे आहे म्हणून!! मी काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्याने त्या inspector general of police चे काही समाधान झाले नाही. त्यांनी लगोलग आमची पालखी शाळेत नेली. तिथे मुख्याध्यापक बाईंनी त्यांना सांगायची ती बाजू सांगितली. म्हटले आता काही खरे नाही. त्या सगळ्या प्रकाराने तीर्थरूप इतके संतापले कि त्यांनी मला त्या शाळेतून काढून त्या आधीच्या सरकारी शाळेत घालायचा निर्णय घेतला. मला काय होते आहे हे कळायचे ते वय नव्हतेच. पण ते जुने व्यायाम वाले दोस्त भेटणार म्हणून थोडा आनंद देखील झाला होता. पण नंतर कळले कि तिथे आपटे बाई नाहीत. मग मला काही बोलणे सुचेना. डोळ्यातून पाणी यायला लागले. मी तीर्थरुपांना एकाच विनंती केली कि आपण एकदा आपटे बाई ना भेटू म्हणून!! ती त्यांनी ऐकली आणि मला घेऊन ते आपटे बाईंच्या घरी गेले. तिथे बाई जे बोलल्या ते फार महत्वाचे होते. त्यांनी माझे समर्थन केले नाही. पण एक संधी देण्याबद्दल शब्द नक्की टाकला. माफीनामे लिहून घेतले नाहीत कि पाया पडून घेतले नाही. त्यांनी एक जबरदस्त विश्वास दाखवला. झाल्या प्रसंगाने मी देखील खजील झालो होतो. पण नंतर संपूर्ण चार वर्षात बाईंनी त्या विषयी चकार शब्द देखील काढला नाही. प्रत्येक वेळेला शिक्षेची गरज असतेच असं नाही. चूक उलगडून दाखवणे जास्त महत्वाचे!! People forget what you said to them. But they never forget how you made them feel!!  

नंतर पुढे मग कितीतरी वर्षे मकरसंक्रांतीला बाईंना तिळगुळ वगैरे द्यायला जायचो त्यांच्या घरी!! २ वर्षां पूर्वी फेसबुक वरती बाई भेटल्या. खूप आनंद झाला. अमोल कडून त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला. खूप वेळ बोलल्या. मुलींची, बायकोची चौकशी केली. काय करतोस म्हणाल्या. मिरजेला येऊन जा म्हणाल्या. 

त्यांनी दिलेली संधी मी काही अगदीच वाया घालवली नाही हे बघून कदाचित त्यांना थोडं बरं वाटलं असावं. 

माणसे येतात. प्रसंग घडून जातात आणि शेवटी भास आणि आठवणीच राहतात! 
ग्रेसची एक कविता आठवत राहते. 

सावल्या विसावल्या, विश्वतेज मावळे 
आरतीत नादतील, सजल सांध्य देउळे ।।

सांद्र रंग, सूर संथ, क्षितीज स्फुन्दते अबोल  
मूक वर्तुळात शब्द, शुन्य हा विराट गोल ।।

गगन हे कुठे सरे नि, रंग हा कसा निळा?
दूर पाहतो उदास, संथ भास एकला ।।

मी इथे व्यथालयात, दु:ख सांगतो तुला 
घे मला कुशीत आज, पावलांत शृंखला ।।

संपणार ना कधीही, रात्र घोर पापिणी 
ओंजळीत हि फुले नि, आसवांत पापणी ।।      

गंगे मध्ये सोडलेले दिवे परत येत नसतातच. पण त्यांनी केलेला प्रकाशाचा संस्कार हा चिरकाल टिकणारा असतो. 
त्या प्रकाशाच्या संस्काराला हि फुले ठेवावीशी वाटतात आणि पापण्या ओल्या होतच राहतात. 

 ~ निखिल कुलकर्णी