Wednesday, January 8, 2014

सचिन निवृत्त होतोय...

सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे. 
  
वास्तविक मी स्वतः कधी फार क्रिकेट खेळलो नाही पण पाहिले मात्र भरपूर!! अगदी उद्या वार्षिक परीक्षा असताना देखील आज पूर्ण दिवस क्रिकेट पाहिले. त्यातून मग व्हायचा तो परिणाम वेळोवेळी झालेला आहे. पण त्याची फारशी खंत वाटत नाही. उलट त्यातलेच काही काही सामने तर अगदी आजही पूर्णपणे आठवतात. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा असाच एक सामना. दुसर्या दिवशी MQC चा पेपर. तरी गल्लीतल्या वासू काकाने बोलावले सामना बघायला. वासू काका म्हणजे मुलखाचा मऊ माणूस!! म्हणाला "अरे शेंगदाणे आणि गुळ पण आणुन ठेवला आहे." त्याचा आग्रह मोडणे ब्रह्मदेवालाही जमायचे नाही. म्हटले जाऊ १ तास!! जाउन पाहतो तर तिथे अख्खी गल्ली जमली होती. धनु दादा, राणा दादा, प्रताप फाटक, नाना, नंदू आणी शेखर कोडोलीकर, मंदार महाजन, कलंदर आणि गोट्या आगलावे, शेखर काका, त्याची मुले, सुनील आणि तान्या कागवाडे, अमित आणि अवधूत बोडस अशी सगळी मंडळी जमली होती. वास्तविक या सर्व लोकांच्या घरी TV  होता. पण महत्वाचा सामना असला कि सगळी गल्ली वासू काका कडे जमायची. मग एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या निघायच्या. सामना कोण जिंकणार याच्या पैजा लागायच्या. तेंडल्या किती मारणार याच्यावर पैजा लागायच्या. द्रविड खूप हळू रन काढतो. त्याला काढून टाका. अझरूद्दीन ची फिल्डिंग एकदम भारी. वगैरे अनेक मत-मतांतरे प्रकट व्हायची. प्रत्येकाला मत मांडायचा पुर्ण अधिकार होता. एकेक जण मग अगदी तल्लीन होऊन त्याचे त्याचे आख्यान लावायचा. इतकच काय तर तेंडूलकर चे काय चुकते आणि त्याने काय करायला हवे याच्यावरही एखादे बौद्धिक व्हायचे. जावेद मियांदाद ने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या सिक्सर चे स्मरण व्हायचे. लगेच कुणीतरी चेतन शर्माची बाजू घेऊन त्याच्या वर्ल्ड कप मधल्या hat-trick ची आठवण काढायचे. मग कपिल देव चे स्मरण ठरलेले. मग ८३ चा वर्ल्ड कप. विवियन रिचर्डस. मोहिंदर अमरनाथ. श्रीकांत, गावस्कर हे सगळे ओळीने चर्चेला यायचे. त्या प्रत्येकाचे कौतुक हि व्हायचे आणि त्यांच्या चुकाही शोधल्या जायच्या. एखाद्या वेळी करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक सामन्यात हे सारे आलटून पालटून व्हायचे. पहिल्या १०-१२ ओवर हा सगळा किल्ला चालत असे. मग आपली ब्याटिङ्ग असली आणि १-२ जण लवकर घरी गेले कि मग वातावरण तणावपूर्ण व्हायचे. मग थोडा वेळ मंडळी शेंगा खाण्यात गुंग असल्या सारखी दाखवायची. या शांततेत जो कोणी पहिला बोलेल त्याची काही खैर नसायची. "बोलू नको रे बाबा!! आउट बिऊट व्हायचा तो!!" असली वाक्ये सर्रास यायची. यालाच बहुधा समाधी म्हणत असावेत. 
मग एक २-४ खणखणीत चौके नाहीतर छक्के बसले कि मग मंडळी पुन्हा जमिनीवर यायची. त्या बॉलरचा उद्धार व्हायचा. थोड्या जास्त विकेट गेल्या असतील तर त्याचे आई-वडील देखील निघायचे. आणि ते झाले कि आता त्याचे काय चुकले याची चर्चा सुरु!! आता तो पुढच्या वेळे पासून घरी जाणार काय? याच्यावर एक छोटेखानी परिसंवाद व्हायचा. मग हळुच कुणीतरी वासू काकाच्या बायकोला चहाची ऑर्डर द्यायचा. वासू काका कोकणस्थ आणि काकू देशस्थ!! आणि याचा सगळा फायदा तिथे जमलेली लबाड मंडळी लगोलग करून घ्यायची. "वहिनी करा तुम्ही चहा. दाखवून द्या देशस्थ कसे असतात ते." असा कुणीतरी देशस्थ आक्रोश करायचा. वाहिनी चहा घेऊन यायची. आणि मग एखादा कोकणस्थ शहाजोग पणे म्हणायचा "अरे वासू बिस्किटे आण. दाखवून दे कोकणस्थ काय चीज असते ते." यथास्थित चहा आणि मारी बिस्किटे खाउन पुन्हा चर्चा सुरु. देशस्थ श्रेष्ठ कि कोकणस्थ? मग सावरकर कोकणस्थ होते. बर मग रामदास देशस्थ होते. बर मग टिळक कोकणस्थ होते. बर मग ज्ञानेश्वर देशस्थ होते. मग सेनापती बापट, सी डी  देशमुख, धनंजयराव गाडगीळ, बाजीराव पेशवे, पंत प्रतिनिधी अशा सर्व थोर विभूतींचे स्मरण व्हायचे. आणि हे सगळे चालू असताना अचानक कुणीतरी आउट व्ह्यायचा आणि मग परत एकदा सगळे शांत! "च्याइला तरी तुम्हाला सांगत होतो जरा गप्प बसा म्हणून!! पण ऐकतील तर शप्पथ!! आता आउट झाला न द्रविड. बसा आता बोम्बलत त्याच्या नावाने." असा कुणीतरी सणसणीत बार काढायचा. परत कुणीतरी फुसकुली सोडायचा "ए द्रविड देशस्थ का कोकणस्थ रे?" त्याच्यावर दुसरा कुणीतरी वार करायचा "मुसल्मान. तुला काय करायची रे द्रविड ची जात?" मग अजून कुणीतरी म्हणायचे "द्रविड आणि मुसलमान? छे शक्यच नाही. अरे द्रविड म्हणजे आर्य आणि द्रविड मधला द्रविड!!" मग थोडा वेळ आर्य आणि द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. मग मराठी म्हणजे आर्य का द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. एकुण रोजच्या जगण्यातल्या चिंतांना इथे वाव नसे. हि एक धर्म सभाच म्हणायची. धर्म फक्त क्रिकेट आणि त्याचा महादेव म्हणजे सचिन!! आणि जेव्हा हा महादेव ब्टिङ्ग करायला यायचा तेव्हा हीच खिल्ल्या उडवणारी मंडळी अगदी चिडीचूप असायची. सचिन ला टाकलेला प्रत्येक चेंडू हा साक्षात ईश्वरी संकेत असल्यासारखी मंडळी झपाटून बघायची. आणि त्याचा प्रत्येक फटका हा ईश्वरी प्रसाद असल्यासारखा स्विकारायची. ज्या मंडळीना पूर्ण दिवस मैफिलीला यायला जमायचे नाही ते सुद्धा सचिन खेळायला आला कि हटकून हजार व्हायचे. पण मग दाराची बेल वाजली तरी उघडायला कुणीही उठायचे नाही. सगळा समाधीचाच भाग होता. सचिन चा प्रत्येक फटका म्हणजे एखादे शिल्प असायचे आणि ते पाहताना हि तमाम जनता मुग्ध होऊन जायची. प्रत्येक चेंडूला मनात धास्ती असायची. अपेक्षा एकाच "आउट नको होऊ बाबा आता या बॉलवर!!"… सचिन ने खेळत राहिले पाहिजे. भले मग त्याने फटकेबाजी केली नाही तरी चालेल. पण त्याने तिथे क्रिझ वरती असले पाहिजे. असा साधा विचार माझ्या मनात असायचा. देवाबद्दल देखील आपल्याला असेच काहीतरी वाटते नाही का? अर्थात काही लोक जसे देवाला चार आणे टाकून लाटरीचे लाखाचे तिकीट लागावे म्हणून प्रार्थना करतात तसे वासू काकाच्या घरी देखील "आम्ही गप्प बसतो. पण तू खेळ आणि चांगल्या १०० रन तरी काढच. " अशी प्रार्थना करणारे हि होते. सचिन वर सगळ्यांचा हक्क होता. सचिन म्हणजे सगळ्यांची स्वप्नांची खाण होती. सचिन म्हणजे धावांचे यंत्र होते. सचिन म्हणजे क्रिकेटच सर्व श्रेष्ठ तंत्र होते. सचिन म्हणजे विजयाचे मंत्र होते. देव, देऊळ, पुजारी, मंत्र, प्रार्थना आणि प्रसाद सगळे सगळे सचिन तर होता !!! त्यावर ह्या भाबड्या लोकांनी जिवापाड प्रेम केले. यांचा सगळा जोश सचिन असे पर्यंत च असायचा. एकदा सचिन गेला कि मग हळु हळू एकेक देशस्थ कि कोकणस्थ काहीतरी कारणे सांगून काढता पाय घेत. अर्ध्या तासात वासू काकाचे घर रिकामे व्हायचे. मग घर खायला उठते असे वाटुन काका गल्लीच्या चौकात येउन उभा राहायचा. 
आज सचिन चा शेवटचा सामना!! आता मी काही मिरजेत नाही. त्यामुळे वासू काकाच्या घरी किती गर्दी जमली आहे ते मला ठाऊक नाही. पण आता पुढच्या सामान्यांना वासू काकाचे घर असेच भरेल याची मात्र मला खात्री नाही. 

अतिशय उत्साहाने आपण मखर तयार करतो. त्यात गणपतीची प्रेमळ मूर्ती बसवतो. पूजा-अर्चा सारे मनातले जे काही पवित्र म्हणुन असते ते सगळे त्या गणपतीला वाहतो. त्याच्या बहिणीला बोलवतो. मोदकाचा नैवेद्य दाखवतो. आणि एक दिवशी आरती म्हणून त्याचे विसर्जन करतो. नदी पर्यंत जाई तोवर मारे मोठ मोठ्याने म्हणत जातो "१ २ ३ ४, गणपतीचा जय जय कार".  घरी येताना पाय दिशा हरवून बसतात. आवाज फुटतच नाही. रिकाम्या माखाराकडे पाहून आतल्या आत जीव घुसमटत राहतो "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला". 

आणि मग भाबडी समजूत काढत म्हणतो 
"गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या" 

एका वर्षाची गोष्ट

नवीन वर्ष चालू झाले. वर्ष २०१४. गंमत म्हणून २०१३ कडे वळून पहिले तर पोटात गोळा आला. एक अविस्मरणीय वर्ष!! असंख्य अनुभवांनी खचाखच भरलेले वर्ष!! आम्हा सर्वाना अनेक वर्षांनी मोठे आणि अनेक वर्षांनी तरुण करून गेलेले वर्ष!!! त्याची हि गोष्ट!!  

६ जानेवारी २०१३ ला मी San Jose विमानतळावरून पिओरिआला निघालो. सकाळी ५ वाजता अस्मिता, अर्चिस आणि रेनिसा ला घेऊन सोडायला आली होती. खूप वाईट वाटत होते. दोघी गाडीत झोपल्या होत्या. कसाबसा तिथून निघालो. दुपारी डल्लास ला पोचलो. आणि रात्री उशिरा पिओरिआला पोचलो. सगळे घर आवरायचे होते. सगळ्या सामानाची विल्हेवाट लावायची होती. उरले-सुरले भावनिक बंध तोडून सगळे सोडून निघायचे होते. १५ जानेवारीला ह्यूस्टन मधला प्रोजेक्ट सुरु व्हायचा होता. त्याच्या आत होता होईल तितके आवरायचे होते. असंख्य गोष्टी मना विरुद्ध जाऊ शकणार होत्या. गेल्या-गेल्या पेंटर ला बोलावून घेतले. जमेल तितके सगळे सामान खालच्या मजल्यावर आणून ठेवले. वरचा मजला जवळ जवळ रिकामा केला. भाडेकरू मुले रहात होती त्यांना जागा सोडायला सांगितली. जमतील तितके माझे कपडे ब्यागेत भरले. क्लोसेट मधले सामान ग्यारेज मध्ये ठेवायला घेतले. वाल्मार्ट मधून रिकामी खोकी आणली. त्यात बरेचसे सामान भरले आणि टेप लावून बंद केले. जवळ जवळ अर्धे ग्यारेज भरेल इतके सामान झाले होते. मग किचन मधले सामान भरले. प्रत्येक गोष्टीवर अर्चिस, रेनिसा नाहीतर अस्मिताची काही न काही आठवण होती. एखादा प्लास्टिक चा डबा टाकून द्यायचे ठरवले तर लगेच त्या डब्यात भडंग खाणारी नाहीतर तो डबा घेऊन शाळेला निघालेली अर्चिस दिसायची. कि लगेच डबा टाकून द्यायचा विचार रद्द !! इतकेच काय पण अर्चिस ची उंची मोजायला अस्मिताने एक कागद आमच्या मास्टर बेड मध्ये भिंतीला लावून ठेवला होता. तो काढताना तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले. अडीच फुटापासून ते थेट चार फुटापर्यंतच्या खुणा त्याच्यावर होत्या. नंतर काही सुचेना. मग गाडी घेऊन घरातली सगळी साठलेली चिल्लर घेऊन वाल्मार्ट मध्ये गेलो. Coinstar च्या मशीन मध्ये ती सगळी चिल्लर टाकली. सगळे मिळून १४८ डॉलर झाले. मशीन ने विचारले कि नोटा हव्यात, गिफ्ट कार्ड हवे का डोनेट करायचे म्हणून!!आधीच हळवा झालो होतो त्यात unicef चे चित्र पाहून अजून भावूक झालो. रस्त्यावर उपाशी झोपणारी उघडी-नागडी पोरं दिसायला लागली. पावाच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या झिंज्या धरून अंगभर ओरबाडणारी त्यांची मातकट बोटे दिसायला लागली. आणि क्षणात सगळे पैसे unicef ला डोनेट करून टाकले. खूप मोकळे वाटायला लागले. बरेच काही गेले होते अजून थोडे आपण हून दिल्यावर मात्र खूप मोकळं वाटलं. ढीगभर चिल्लर देऊन चिमुट्भर आनंद घेऊन घरी परत आलो. असं म्हणतात कि मन आपल्या शरीरात राहते. या गोष्टीनंतर मात्र मला असं वाटायला लागलं कि मन सगळ्या विश्वाला व्यापून राहते. आपण मात्र आपल्याला हवे तेव्हा, हवे तितके ते आपल्यात साठवून ठेवतो. 

७ वर्षे उभा केलेला चिमणीचा संसार मोडायला आणि गुंडाळून न्यायला ७ दिवस मिळाले होते. अर्चिस ला काय ठेवायचे आहे? अस्मिता ला काय ठेवायचे आहे ? रेनिसा ला काय ठेवायचे आहे? याचा कसलाही निर्णय मला घेता येईना. याच्यात मग तुटलेली खोडरबरे होती. अर्ध्या शिसपेन्सिली होत्या. वाळलेली स्केच पेन होती. बाहुल्या होत्या. निळ्या-तांबड्या बांगड्या होत्या. चित्रं होती. अर्चिस ने आई-बाबांना आपल्या हातानी करून दिलेली ग्रीटिंग कार्ड होती. त्याच्यावर लिहिलेली आणि काळजात खोलवर कोरलेली वाक्यं होती "I love you Daddy!!" "I love you Mommy!!" आणि त्याच्या शेजारी आई बाबांची काढलेली चित्रे देखील होती. मुलं जवळ असती तर कदाचित हे सगळे कचरा म्हणुन फेकता आलेही असते. पण ती जवळ नसताना ह्या कागदांची अगदी सोनपाने झाली. सगळेच ठेवले शेवटी!!

पेंटर बरोबर जावून नवीन पेंट घेऊन आलो. घर रंगवायला सुरुवात झाली. आम्ही घर घेतले तेव्हा मोठ्या हौसेने light banana रंग दिला होता. तो थोडासा bright होता. कदाचित आमच्या भावी भाडेकरूला तो आवडणार नाही म्हणून मग आता winter wheat द्यायला घेतला. एकदम neutral color. एकेक भिंत जशी रंगून होत होती तसे माझेच घर मला वेगळे वाटायला लागले. घराला लागलेला आमचा रंग संपत चालला होता. घर हळुहळु परकं होत चाललं होतं. 

बरेचसे फर्निचर अस्मिता तिच्या बरोबर घेऊन गेली होती. जे राहिले त्यातली ट्रेडमिल विकली गेली पण अजून त्याने नेली नव्हती. सोफा विकला गेला. माझी मोटारसायकल विकली गेली. आता राहिली होती एक गादी, २ खुर्च्या, जुना TV, व्यायामाचा बेंच आणि रिक्लायनर! ब्याग भरून मी ठरल्याप्रमाणे १५ तारखेला ह्युस्टन ला जॉईन झालो. एक आठवडा ह्युस्टन मध्ये राहून परत पिओरिआ ला जायचे होते. काही कामे बाकी होती.  Caterpillar मध्ये कामाचा handover द्यायचा होता. हि मात्र घरी राहण्याची शेवटची संधी असणार होती. २३ तारखेला ह्युस्टन airport वरून strategy class ची assignment submit केली आणि कसा बसा धावत पळत विमानात पोचलो. पिओरिआ मध्ये पोचेपर्यंत अर्धी रात्र संपली होती. घरी जावून बघतो तर घराला कुलूप. पेंटर जिथे किल्ली ठेवतो म्हणाला होता तिथे किल्ली नव्हती. घरात दिवे चालू होते. तडक रात्री १ वाजता पेंटर च्या घरी गेलो. बघतो तर त्याला फ्लू झालेला. त्याच्या कडून किल्ली घेतली. घरी जाउन बघतो तर पेंटिंग चे काम अर्धवट झाले होते. कागद, वस्तू, रंगाचे डबे इतस्ततः पडले होते. घर भर रंगाचा वास पसरला होता. या सगळ्याचा विचार करता करता कधी तरी झोप लागली. सकाळी उठून बघितले तर अंगात उठायचे त्राण शिल्लक नव्हते. अशक्य खोकला येत होता. काही खावेसे वाटत नव्हते. तसाच उठून डॉक्टर कडे गेलो. २ तास वाट बघितल्यावर माझा नंबर आला. blessing in disguise म्हणजे डॉक्टरनी strep throat म्हणून सांगितले. म्हणजे फ्लू नव्हता. मग २४ आणि २५ घरीच पडुन राहिलो. २६ ला परत एकदा सुरुवात केली. आता ग्यारेज मधले सामान गाडीत भरायला घेतले. BMMPeoria चे सगळे सामान, कागद, फ़ाइल वगैरे सगळे भोसले काकांना देऊन आलो. त्या दोघांना भेटलो. बराच वेळ बोललो. आशीर्वाद घेऊन निघालो. ट्रेडमिल वाला ट्रेडमिल घ्यायला आला. अद्वैत जोशी ला बरोबर घेऊन ते धूड बेसमेंट मधून कसेबसे बाहेर काढले. महेंद्र आणि दिपेश ला घेऊन व्यायामाचा सेट पण बाहेर काढला आणि महेंद्र च्या घरी नेउन ठेवला. ग्यारेज मधले बरेचसे सामान पण महेंद्र च्या घरी नेउन ठेवले. आता जरा थोडी जागा झाली. मग बॉक्सेस गाडीत भरायला घेतले. दिपेश ने फार मदत केली. जुना TV साफ-सफाई करणार्या बाईना देऊन टाकला. त्यांना अगदी आभाळ गवसल्याचा आनंद झाला.          
सगळं घर vaccum करून घेतले. बेस्मेंट क्लीन केले. आणि बसेल तसे, किंवा घुसेल तसे सामान गाडीत भरत राहिलो. शेवटी गाडी इतकी भरली कि गाडीत ड्रायवर ला सुद्धा जायला जागा शिल्लक नव्हती!!! माझीया मना जरा थांबना, तुझे चालणे अन मला वेदना असा काहीसा प्रकार झाला होता. 

आता अगदी शेवटचा दिवस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ची flight होती. म्हणजे ५ वाजता airport वर जायचे होते. त्याच्या आधी गाडी महेंद्रच्या घरी सोडायची होती. मग विचार केला कि गाडी रात्रीच महेंद्र कडे सोडू आणि रात्रीच दिपेश कडे झोपायला जाऊ. पण घर काही मला सोडायला तयार नव्हते. united मधून fone आला. धुक्यामुळे flight cancel झाली आणि त्यांनी मला ८ च्या flight चे तिकिट दिले. मग ते निमित्त करून मी अजून एक रात्र घरीच झोपलो. दिपेश थोडा नाराज झाला. पण मला त्याची पर्वा नव्हती. प्रेम आंधळे असते ते असे. या रात्री मात्र घर अगदी स्वच्छ झाले होते आणि माझे मन सुद्धा!!!

सकाळी अगदी लवकर उठून गाडी महेंद्र कडे सोडली. महेंद्र ने मला परत घरी आणून सोडले. कॅब दारात थांबलीच होती. घराला कुलूप लावले आणि कुठून कुणास ठाऊक ते 'साधी माणसं' सिनेमातलं गाणं आठवलं 

'अखेरचा हा तुला दंडवत, सोडुन जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देउळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले हसले, कडीकपारी अमृत प्याले 
आता हे परी सारे उरले, उरलं मागं नाव 

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता 
कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव'

शब्दनशब्द खरा वाटत होता. मराठी माणुस त्रिखंडात गेला तरी त्याचं मन मावळ्याचं आणि ते राहतही मावळातच!! त्या मातीची गाणी खूप खोल गेलेली असतात आणि मग अशा कातर वेळी तीच गाणी आठवत राहतात. कधी हसवतात. कधी रडवतात. 

धुक्यात लपलेली पिओरिआ मग मला फारशी दिसली नाही. आधी शिकागो ला आणि नंतर ह्युस्टन ला कधी पोचलो ते देखील कळले नाही. जाता जाता पिओरिआ airport वर १० मिनिटे वाजवलेली बासरी मात्र आठवते. आणि त्या बदल्यात  just as a token of appreciation म्हणून एयरलाइन च्या स्टाफ ने दिलेले फर्स्ट क्लासचे अपग्रेड आठवते. 

आम्ही पिओरिआ वर खूप प्रेम केलं आणि अगदी आम्ही जाईस्तोवर पिओरिआने देखील आमच्यावर तेवढंच प्रेम केलं. पुलंच्या 'रावसाहेब' मध्ये 'कशाला आला होता रे बेळगावात!!' हे ऐकल्यावर जसे वाटते तसेच काहीसे वाटत राहिले. आम्ही भाग्यवान खरेच!!

मग ह्युस्टन मधल्या कामाने वेग घेतला. बरीच मोठी जबाबदारी होती. MBA अजून चालूच होते. त्याचे वाचन, भारतातली टिम, अमेरिकेतली टिम यातून मग विचार करायला सवड नव्हती. मग दर २ आठवड्यांनी San Francisco च्या फेऱ्या सुरु झाल्या. पोरं परत भेटायला लागली. परत एकदा गाडीनं वेग घेतला. साधारण एप्रिल मध्ये नव्या नोकरीचा शोध सुरु केला. आता MBA संपले होते. नव्या आत्मविश्वासाने पाऊले पडायला लागली.  Amazon, Ernst & Young, Google, Apple, Deloitte, PwC, IBM मध्ये प्रयत्न चालू केले. पण माझी अगदी मनापासून पहिली पसंती Ernst & Young ला होती. एक तर It is one of BIG 4 consulting in the world plus its very well known for its corporate culture. या वर्षी जगातल्या सर्वोत्कृष्ट employers मध्ये Ernst & Young चा जगात दुसरा क्रमांक वगैरे आलेला होता. आणि कॉलेज मध्ये असल्या पासून मला असे वाटायचे कि  Ernst & Young मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट लोक काम करतात. माझ्या बऱ्याच सिनियर मित्रांनी पण सांगितले होते कि 'working at Ernst & Young is a qualification in it self'. शिवाय 'Management Consulting' चे खूळ डोक्यात होते. तेव्हा माझा विचार अगदी पक्का होता. Infact त्याच्यासाठीच तर MBA चा घाट घातला होता. 'याची साठी केला अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा'!!

एप्रिल मध्ये त्यांचे २ interview मिळाले. दोन्ही चांगले झाले आणि मग त्यांनी शिकागो ला in person interview ला बोलावले. मी अगदी तिकिट सुद्द्धा काढले आणि अचानक त्यांचा फोन आला कि काही कारणाने interview पुढे ढकलावा लागला. बराच हिरमोड झाला. गाव अगदी जवळ आलं असं वाटत असताना अचानक मध्ये एखादा डोंगर यावा किंवा ते ठिकाण दूर निघून जावे तसे झाले. पण मग माझीच समजूत काढली कि त्यांनी नाही म्हणून तर सांगितले नाही न!! आगे बढो!! जीना इसीका नाम है वगैरे!! शेवटी ३ आठवड्यांनी त्यांनी परत बोलावले आणि मी धन्य झालो. 

गुरुवार ९ मे २०१३.  मी बुधवारी रात्रीच ह्युस्टन हून शिकागो ला पोचलो होतो. रात्री शिकागो downtown मध्ये जाऊन नविन बूट घालून interview ची जागा प्रत्यक्ष पाहून आलो. बरीच वर्षे जवळ बाळगलेले स्वप्न होते ते!! 155 N Wacker Dr, Chicago. २४ व्या मजल्यावर interview होता. E&Y चे ४ पार्टनर (इथे पार्टनर म्हणजे सर्वेसर्वा) एकामागोमाग एक असे भेटणार होते. प्रत्येकाबरोबर ३०-४० मिनिटे धरली तरी साधारण अंदाजे ४ तासांचा कार्यक्रम ठरला होता. सकाळी उठलो आणि साधारण १० वाजता बाहेर पडलो. डोळ्यासमोर येत होता शनिवारवाड्या समोरचा बाजीरावांचा पुतळा! हातातल्या भाल्याच्या जोरावर अगदी अनभिज्ञ अशा मुलुखात बेडर पणे भगवा नाचवणारा सच्चा मराठा!! बादशाहीची पिसे काढून अटकेपार अगदी पेशावरा पर्यंत भीमथडी तट्टे झोकात फिरवून आणणारा माझ्या मुलुखाचा राजा!! त्यांच्या महत्वाकांक्षेला तर तोडच नव्हती पण इतरही घेण्यासारखे खूप काही होतं. मला माझ्या इंजिनियरिंग कॉलेज चे दिवस आठवले. तेव्हा मी पुण्यात राहायचो. प्रत्येक पेपर च्या आदल्या दिवशी, सगळा अभ्यास झाला कि मी आणि आशिष वाटवे रात्री शनिवारवाड्या वर जायचो. दिल्ली दरवाज्याच्या पायरीवर बसून सगळा विषय पूर्ण revise करायचो. सगळे Formula, सगळी Derivations, सगळ्या concepts एकमेकांना सांगायचो. आणि मराठ्यांच्या त्या राजधानीतून रग्गड आत्मविश्वास घेऊन रात्री १२-१ ला घरी जायचो. पेपर चांगले गेले. चांगल्या मार्कांनी पास झालो. नोकऱ्या मिळाल्या. पण आज E&Y च्या interview ला जाताना मात्र आपलं मर्म कशात आहे, आपली प्रेरणा कुठून येते, आपल्याला आत्मविश्वास कुठून मिळतो याची जाणीव पहिल्यांदाच होत होती. त्याच विचारात 155 N Wacker Dr च्या दारात पोचलो. 

आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस!! सगळ्यात मोठा interview!! अर्थात सगळे चारही interview अगदी यथासांग पार पडले. अगदी मनासारखे!! आपल्या मनाइतका दुसरा प्रामाणिक आरसा सापडायचा नाही. मला अगदी खात्री वाटत होती. चारही पार्टनर खुश होते. कुठे काही चुकले, काही कमी पडले, काही बोलायचे राहिले, काही बोलायची गरज नव्हती असे काहीच वाटत नव्हते. त्यामुळे मी सुद्धा खुश होतो. लगेच ओहेर एयरपोर्ट ला गेलो. जेवलो आणि ह्युस्टन च्या flight मध्ये बसलो. मस्त ४ तासांची flight  होती. बाण सुटला होता आता चिंता कसली !! अगदी बिनघोर स्वस्थ चित्ताने झोपलो. संध्याकाळी ८ वाजता ह्युस्टन मध्ये पोचल्यावर फोन चालू केला. त्यावर E&Y च्या HR मधून फोन येउन गेलेला दिसला. अतिशय अधीर होऊन मेसेज ऐकला. 

"Hello Nik This is Whitney from Ernst and Young. Congratulations!! I got the feedback on your interview and all the 4 partners are very impressed with you. You will receive formal offer early next week. I just thought to give you good news before the week end. Once again Congratulations!"    

माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता. मी तो मेसेज ३, ४, ५ आता मला आठवत नाही मी किती वेळा ऐकला ते. शेवटी अस्मिता ला फोन केला. तिला मेसेज forward केला आणि तिला पण ऐकायला सांगितले. काय सांगा तिला काही वेगळे ऐकायला यायचे. पण तिने पण confirm केला. मग मात्र माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. आज पर्यंत इतका आनंद कशानेच झाल्याचे मला तरी आठवत नाही. अस्मिता ला फोन केल्यावर मी फोन वर इतक्या जोरात बोलत आणि हसत होतो कि कॅब चा ड्रायवर घाबरला. त्याने २-३ वेळ आरशात पाहिले. माझ्या handsfree मुळे त्याला सेल फोन कानाला लावलेला दिसला नाही. मग तो अजूनच घाबरला. त्याला वाटले मी एकटाच बोलतो आहे!! त्याने आतले दिवे लावले आणि गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. शेवटी त्याला मी फोन वर बोलतोय हे सांगितले आणि मग गाडी पुढे निघाली. 

अजून २ दिवसांनी UIUC मध्ये MBA चे convocation होते. त्यामुळे परत ह्युस्टन हून शिकागो ला गेलो. अस्मिता, अर्चिस आणि रेनिसा San Jose हून शिकागो ला आले. मग त्या रात्री शिकागो मध्ये राहून दुसऱ्या दिवशी Champaign ला गेलो. एखादे स्वप्न जगत आहोत असे वाटत होते. E&Y ची ऑफर काल मिळाली होती आणि MBA ची degree आज मिळणार होती. गेली २-३ वर्षे जी अव्याहत धावाधाव झाली त्याचे काहीच वाटेनासे झाले. उलट प्रत्येकाचे कौतुक वाटायला लागले. त्या रात्री आम्ही सगळे अगदी अचानक पिओरिआ ला गेलो. अचानक महेंद्रच्या घरी जाऊन छापा घातला. तिथे अपेक्षेप्रमाणे दिपेश आणि गिरीश पण भेटले. जुन्या गप्पा निघाल्या. सकाळी लवकर गाडीत बसून आमच्या घराच्या बाजूनेही एक चक्कर मारली. आपलंच घर परक्यासारखं बाहेरून पाहण्याचा अनुभव देखील नवीनच  होता. खूप नितळ आणि मोकळं वाटत होतं. नुकताच पाउस पडून गेलेल्या आकाशासारखं!!!     

१० जुन ला मी Ernst and Young मधे जॉईन झालो. 303 Almaden Blvd, San Jose वर गाडी पार्क करताना खूप छान वाटले. Ernst and Young च्या reception मध्ये डिजिटल स्क्रीन वर 'Welcome Nik Kulkarni' वाचून तर अभिमान वाटला. आणि मग सुरु झाला घराचा शोध. कॅलिफोर्निया मधे घर म्हणजे वेगळेच प्रकरण आहे. तेव्हा म्हटले ६-७ महिने तरी सहज लागतील घर मिळायला. पण ग्रेस परत एकदा जिंकले. ग्रेस म्हणायचे कि 'योग तेजस्वी असतात. त्यांचे तेज तेच असते ताऱ्या सारखे!!' घराचा योग लगेच जुळून आला. San Jose मधेच एक सुंदर Single Family होम मिळाले. अगदी पहिल्या भेटीत प्रेमात पडावे असे. छोटेसे, टुमदार घर. घराच्या दारात झाडांची गर्द सावली, मागच्या बाजूला निळ्या स्वच्छ पाण्याचा स्विमिंग पूल, त्याच्या मागे घराची भिंत आणि भिंती पलीकडे मस्त टेकडी!! अगदी private!!
 
स्विमिंग पूल पाहून अर्चिस आणि रेनिसा खूप खुश झाल्या. त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना असण्याचं त्यांचं वय नाही पण त्यांच्या डोळ्यातून भरून वाहणारा आनंद पाहून मला हलकं वाटत होतं.     

सार्त्र नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञ होऊन गेला. त्याचे एक प्रसिद्ध वाक्य आहे 'People are condemned to be free.' म्हणजे माणसाला मुक्त राहण्याचा नैसर्गिक वर (किंवा शाप) प्राप्त झालेला आहे. याच्याही पुढे जाउन तो म्हणतो कि 'जगात येउन जगण्याचा अनुभव हा इतर कुठल्याही ऐकीव किंवा सांगीव ज्ञानापेक्षा मोठा आहे. अधिक उत्कट आहे.' सार्त्राचा निरीश्वर वाद जरी बाजूला ठेवला तर मला त्याचे 'अनुभव हा सर्वात श्रेष्ठ आहे' हे मत अगदी अनुभवाने पटले आहे.

दोन मुलांना घेऊन अस्मिताने एकटीने लढलेला किल्ला, तिला मुलांनी दिलेली साथ, अस्मिता आधी कॅलिफोर्नियात गेल्यावर अर्चिस आणि रेनिसा ने माझ्या बरोबर पिओरिआ मधे काढलेला एक महिना, हे सगळेच  खूप मोठे अनुभव आहेत आणि मला असे वाटते कि ते इतर कुठल्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा निर्विवाद श्रेष्ठ आहेत. 

एखादी गोष्ट लक्षात ठेवणे आणि ती गोष्ट समजणे याच्या मध्ये बराच फरक आहे. एखाद्या वेळेस प्रयत्न करून सगळी भगवदगीता पाठ करता येईल. पण ती पाठ झाली, लक्षात राहिली याचा अर्थ ती समजली असा होत नाही.नेमका तोच फरक अनुभवाचे पुस्तक वाचण्यात आणि तो अनुभव प्रत्यक्ष जगण्यात आहे याची मला खात्री पटली आहे. या गेल्या वर्षातल्या अनुभवाने माझ्या मुली माझ्या साठी खूप मोठ्या झाल्या आहेत. त्यांची समज तर वाढलीच आहे पण त्यांच्या बद्दलची माझी समज जास्त वाढली आहे. जी अस्मिता पिओरिआ मध्ये असताना माझ्या शिवाय कधीही कुठेही गेली नाही, तिने या वर्षी एकटीच्या जीवावर कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी सारे जमवून आणले. घर शोधण्यापासून, ते मुलींच्या शाळा आणि डे केअर पर्यंत सारे तिने केले. हा अनुभव खूप मोठा आहे.

अर्चिस, रेनिसा, अस्मिता या सर्वानीच अपरंपार समजूत दाखवली आहे. देव व्हायला काय लागते ते मला ठाऊक नाही पण माणूस होणे हे फार अवघड असते याची मला खात्री आहे. आणि हि तीन माणसे माझी आहेत म्हणून मी खूप भाग्यवान आहे. कदाचित यालाच साफल्य म्हणत असावेत. २०१३ ने आम्हा सर्वांना जगण्याचा एक यथार्थ अनुभव दिला आहे. बोथट झालेल्या जाणीवा परत एकदा जाग्या करून दिल्या. मनावर बसलेली नेणीवांची पुटं पुसून टाकली आणि आयुष्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवला आहे. 

Thank you 2013!! We will miss you!! We will cherish you!!