Monday, September 24, 2018

ओढ

ओढ
~निखिल कुलकर्णी 

विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे आत्मरुप होत, बेभान होऊन अनिमिषपणे चमचमणाऱ्या, पृथेच्या य:कश्चित दिनकराहून सहस्त्र पटीने प्रदीप्त अशा शुभ्रधवल तेजोनिधीला, त्या दिवशी उल्का होण्याची ओढ का वाटली असावी? 

दूर कुठेतरी मायेच्या अथांगात, आत्मभान हरवून स्वतःशीच भरकटत, क्षीणशा, दुय्यम वाटावे अशा तेजाने, तांबूस पिवळसर दिसणाऱ्या लोहगोलाच्या भोवती एकलग प्रदक्षिणा काढत बसलेल्या त्या निळसर, ओलसर, वेडगळ पृथेत, त्या महान तेज:पुंजाने काय पाहिले असावे? तेजोमय अहंकाराची राजस वृत्ती कायमची सोडून द्यायला लावणारा, अवकाशाच्या अथांग पोकळीतला अनभिज्ञ आणि आत्मघातकी प्रवास त्या नभोत्तमाला ठाऊक नसेल काय? नक्षत्रांच्या स्वर्गीय रांगोळी मधले स्वत:चे अढळ स्थान कायमचे सोडून देऊन पृथेच्या भेटीला जाताना होणाऱ्या अतिउष्ण तलखीची त्याला कल्पना आली नसेल काय? या प्रवासात वाटेत जागोजागी थांबलेले काळ्याकुट्ट मायेचे लोट, त्याचे स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशीत तेजाचे अस्तित्व आपल्या चिकटलोळ पदरांनी कायमचे झाकोळून टाकतील याची त्याला यत्किंचीतही तमा वाटली नसेल काय?

कदाचित त्याने कधीतरी ब्राम्हमुहूर्तावर आपल्याच अन्हिकात रमलेल्या पृथेवरचे प्राजक्ताचे महादान पाहिले असावे. आकाशातल्या इवल्या इवल्या दहिवराच्या साकळलेल्या थेंबांनी, पाकळी-पाकळी गहिवरून आलेला, अहम विसरून, एकटाच धरेकडे झेपावणारा भाबडा प्राजक्त त्याने साक्षेपी नेत्रांनी पाहीला असावा. संपूर्ण अस्तित्व ज्या मायेने दिले तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहात, अलगदपणे विलग होऊन, आपल्याच पाकळ्यांचे पंख करत, जमिनीवरच्या चंद्रस रांगोळीतला एक कण म्हणून अजरामर होण्याची प्राजक्ताची अलौकिक ओढ त्याने अनुभवली असावी. स्वत:चे अहंमन्य अस्तित्व संपवून, पृथेच्या पार्थिवावर असंख्य प्राजक्तांनी एकच एक होत घातलेली पांढरी तांबडी पाखर त्याला भावली असावी. आणि मग जन्मापासून मोक्षा पर्यंतचा, तो, केवळ काही पळांचा कृतकृत्य, एकमग्न, मनस्वी प्रवास त्या नभश्रेष्ठास आकाशातल्या तेजोमय अनंत अढळतेहून श्रेष्ठ भासला असावा.

ओढ वैश्विक आहे..

~निखिल कुलकर्णी


Saturday, August 18, 2018

अटलजी

अटलजी
~ निखिल कुलकर्णी 

अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही. 

त्यांची पहिली सभा मी ऐकली तेव्हा मी चौथीत होतो. मिरजेच्या अमर खड्ड्यात त्यांची सभा झाली होती. प्रचंड गर्दी, आकाशाला भिडलेले मातीचे लॉट, अटलजींचे मिरज जंक्शन वरचे भव्य स्वागत, रस्त्या रस्त्यांवर अशोक खटावकरनी रात्र रात्र जागून स्वत:च्या हाताने रंगवलेले मोठे मोठे कट आउट्स या पलीकडे फारसं काही आठवत नाही. अटलजी काय बोलले ते काही कळायचे ते वय ही नव्हते आणि ते बोलले हिंदी मध्ये. आणि तेव्हा हिंदी हि एक भाषा आहे याच्या पलीकडे दुसरे त्यातले काहीही कळत नव्हते. पण कदाचित तेव्हा जे काही प्रश्न पडले त्या प्रश्नांनी या नेत्याची माझ्या मनाने तेव्हा पासूनच एक उंचच उंच अशी प्रतिमा रंगवायला घेतली असावी. नंतर मग घडत गेलेल्या प्रत्येक घटनेने त्या प्रतिमेत रंग भरत गेले असावेत. 

इंदिरा गांधी गेल्याची बातमी रेडिओवर ऐकली होती. तो प्रसंग अजून हि जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गांधी वधानंतर झालेल्या बेफाम जातीय दंगलीचा आणि लुटीचा अनुभव पाठीशी असल्याने गल्लीतली कर्ती माणसे एकमेकांना "इंदिराजींची हत्या कुणी केली?" हा प्रश्न परत परत विचारून खात्री करत होती. पोलिसांच्या गाड्या गल्लीच्या चौका-चौकात उभ्या होत्या. घरांचे, वाड्यांचे दरवाजे कडेकोट बंद झाले होते. खिडकीचे दरवाजे किलकिले उघडून आम्ही रस्त्यावर काय चालू आहे याचा अंदाज घेत होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. मधेच एखादी पोलीस गाडी जायची तेवढीच काय ती हालचाल. शेवटी रात्री खूप उशिरा जेव्हा कुणी खून केला याची पक्की बातमी रेडिओवरून आली, तेव्हा लोकांच्या जीवात जीव आला. बाजीरावाच्या देशात आणि पटवर्धनांच्या गावात ब्राह्मणांना जीव मुठीत धरून जगायची वेळ आणणाऱ्या सरकारांचे, त्यांच्या पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण मूळ मुद्दा माहितीचे प्रसारण किती तोकडे होते हा आहे. कशाचा कशाला धरबंध नव्हता.      

नंतर मग देखण्या राजीव गांधींचा शपथविधी झाला. याच्या नंतर कधीतरी गल्लीत TV आला होता. वासू काका बोडसांच्या घरी अक्खी गल्ली, पोरे बाळे घेऊन रोज संध्याकाळी TV  बघायला जमायला लागली. चित्रहार, बातम्या, साप्ताहिकी आणि ये जो है जिंदगी बघता बघता रात्रीचे ९ वाजायला लागले. काही काही सोकावलेली मंडळी तर "चांगला आहे, चांगला आहे" म्हणून रात्री दहाचा प्रणव रॉय यांचा "The world this week" कार्यक्रम पण बघत बसायची. वासू काकाची आई कधी कधी संतापून म्हणायची कि उद्या येताना गाद्या आणि उश्या पण घेऊन या म्हणून!! एक चांगले म्हणजे तेव्हा वासू काकाचे लग्न झाले नव्हते. अर्थात पुढचा फायदा लक्षात घेऊन गल्लीतल्या जाकीट नेहरूंनी, वासू काकाला, "लग्न का करू नये?" हे पटवून दिले असावे असाही एक मत प्रवाह आहे. पण धमाल यायची. कित्येक नविन नविन गोष्टी बघायला मिळू लागल्या. माहितीचे नविन दालन नुकतेच उघडत होते. अनेक गोष्टी घडायच्या होत्या. अनेक प्रश्न पडायचे होते. अनेक उत्तरे मिळायची होती. 

हळू हळू मग नाना महाजनांकडे TV आला. मग पटवर्धनांकडे TV आला. आणि मग बघता बघता TV घेण्याची स्पर्धा सुरु झाली. नंतर कधीतरी आमच्याही तीर्थरुपांना आपल्याकडे TV नसल्याने आपले चिरंजीव गावात वरावरा हिंडत असतात असे वाटून असेल कि काय पण मग आमच्या पण घरी एकदाचा TV आला. मग त्याला लाकडाची केस काय, त्याच्या वर टाकायला कसला कसला काशिदा काढलेले फडके काय, काही विचारायची सोय नाही. मग मधूनच ते चित्र हलायला लागायचं. मग कौलावर चालून तो अजस्त्र अँटेना हलवणे, खालून कुणीतरी "आलं आलं" असं ओरडे पर्यंत मग ते फिरवत राहायचं. आणि सगळं करून खाली आलो कि वर परत एक कावळा जाऊन बसायचा कि खाली परत सगळे नेते, क्रिकेटर, सलमा सुलताना वगैरे जगच्या जागी नाचायला लागायच्या. पण त्यांना परत सरळ करायचा हट्ट फार मोठा होता. त्यावेळेला मला कावळ्यांचा फार राग यायचा. तर या TV  ने घरी बातम्या आणल्या. हिंदी भाषा आणली. माझं तर असं मत आहे कि जर तेव्हा TV आला नसता, तर मराठी लोकांना पण आज तामिळ्यांना जेवढी हिंदी येते तेवढीच हिंदी आली असती. तर हिंदी भाषेची ओळख करून गोडी लावल्या बद्दल खरे तर वासू काकाचे आणि TV चे आभार मानायला हवेत. मग पुढं या हिंदी भाषेनेच आपण केवढ्या मोठ्या देशाचे नागरिक आहोत याची जाणीव करून दिली. हि भाषा जिथे बोलली जाते तिथले नेते हे संपूर्ण देशावर कसे गारुड करतात याची ओळख व्हायला लागली. मग त्यातूनच पुढे व्ही पी सिंग, बुटासिंग, ग्यानी झैलसिंग, गुलाम नबी आझाद (हे गृहस्थ चंद्रशेखर आझाद यांचे नातेवाईक आहेत असेच मला वाटत आले होते. पण ते नातेवाईक नसून त्यांचे चंद्रशेखर आझादांशी नाते वाईट आहे हे नंतर TV पाहूनच कळत गेले.),  एन डी तिवारी, चंद्रशेखर, इंदर कुमार गुजराल, एल के अडवाणी हि नावे ऐकू यायला लागली. आणि मग व्ही पी सिंगांचे सरकार आले. त्यांची ती फरची टोपी, चष्मा, जयपुरी कोट काय रुबाबदार माणूस होता! त्यांच्या बातम्या, त्यांचे वर्तमान पत्रातले फोटो, सत्तेत येण्यासाठी आणि आल्यावर ती टिकवण्यासाठी त्यांची अद्वितीय धडपड, सगळेच अद्भुत वाटत होते. मग त्यांनी राखीव जागांचा मंडल आयोग लागू केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून तरुण मुले मुली आत्मदहन करायला लागली. हे सगळेच इतके दाहक होते कि कधी कधी हे सर्व आपण का पाहिले असेही वाटते. TV  ने हि सगळी परिस्थिती अगदी घरात आणून ठेवली. एकच चॅनेल लागायचे. त्यामुळे मुले बघताहेत म्हणून चॅनेल बदलायचा प्रश्न नव्हता. आणि भरीस भर म्हणून रिमोट नसल्याने प्रत्यक्ष उठून TV  बंद करायला लागायचा. त्यामुळे न जाणो TV  बंद करताना अँटेनाच्या वायर ला धक्का लागला तर परत TV लागायचाच  नाही या भयाने लोक एकदम रात्री सगळे कार्यक्रम संपल्यावर, मुंग्या दिसायला लागल्यावरच TV बंद करत असत. 

तेव्हा जे दिसेल ते सर्व बघणे हा एकच पर्याय होता. त्यामुळे इच्छा असो नसो हा सगळा देशी लोकशाहीचा अफलातून अविष्कार बघायला मिळाला. आज काय व्ही पी सिंग पंतप्रधान होते. मग त्यांनी कुणावर तरी कसले तरी कॅमेरे लावले. आणि मग त्यांचा पाठींबा गेला. मग अचानक त्यांच्या जागी चंद्रशेखर पंतप्रधान झाले. हे म्हणजे थोडेसे "ये ग साळू, दोघी लोळू" सारखं चाललं होतं. मग आम्ही गल्लीत एकेक पंतप्रधान आणि त्यांच्या बोलण्याची नक्कल करायचो. एवढंच नाही पण गोट्या खेळताना ज्याच्यावर तंगीचा डाव यायचा, त्याचा "व्ही पी सिंग" झाला असे म्हणण्या पर्यंत आमची मजल गेलेली होती. अहो हातात, पुठ्ठयाचे कव्हर घालून आणि गळ्यात म्हशीचे कासरे गुंडाळून, गल्लीतून अमिताभ बच्चन च्या "शहेनशहा" सारख्या फिरणाऱ्या आम्हाला TV ने राजकीय पात्रे पण आमच्या विश्वात आणून ठेवलीच होती.

त्याच्या नंतर परत एकदा आक्रीत झालं. एका सभेत राजीव गांधी गेले. अर्थात यावेळी TV ने चांगलेच बाळसे धरले होते. तीन तीन भाषांतून दिवसातून दोन तीन वेळा बातम्या मिळत होत्या. पण याचा परिणाम असेल कि काय पण ते जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत कुठल्याही दलाची डाळ अजिबात शिजली नाही. आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. मला हा माणूस विलक्षण आवडायचा. एक तर अत्यंत संयमी, धीरगंभीर असे व्यक्तिमत्व होते. आणि ते कुणाचे तरी पुत्र, नातू, पणतू होते म्हणून पंतप्रधान झालेले नव्हते. शिवाय त्यांना १३ भाषा अस्खलित बोलता यायच्या. त्यांच्या महाराष्ट्रातल्या सभेत ते कित्येक वेळेला मराठीत बोलायचे. TV वर ते पाहताना अचंबा वाटायचा. आता आमच्या ओठांवरती पण काळी रेघ दिसायला लागली होती. वर्गात कोण आधी दाढी करतो याची चुरस लागायला लागली. 

आणि त्याच वेळेला अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रश्नाची धग वाढत गेली. आडवाणीनी रथ यात्रा काढली. तिला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कि देश ढवळून निघाला. ती रथयात्रा  जनता दल "इ" का "फ" वाल्यानी बिहार मध्ये अडवली (हे जनता दलदलीतून नंतर मग म्हशीचा चारा खाल्ला म्हणून तुरुंगात जाऊन आले. काय चुकून खाल्ला कि मागचा जन्म आठवला देव जाणे!!). मग तर काय अजूनच प्रकरण चिघळले. देऊळ बांधायचा घोष चालूच होता. त्याच्यात "रथ सोडा" च्या आरोळ्या पण सामील झाल्या. आमच्या गावात एक रामाचे देऊळ होते. पण आमच्या पैकी कुणी फारसे तिकडे फिरकत नसे. आमच्या गावात रामापेक्षा दत्ताची आणि गणपतीची चलती होती. रामाच्या देवळाची फुटलेली कौले देखील बदलायला पैसे मिळत नसत. देवळाचे पुजारी राम नवमीच्या आधी गयावया करून वर्गणी गोळा करत. तेवढ्या एक दिवशी देऊळ गजबजून उठे. पुढे पुजारी जाणोत आणि खुद्द राम जाणोत.. पण अचानक लोक राम भक्त व्हायला लागले. कारसेवेच्या नावाखाली पैसे जमा होऊ लागले. आणि अचानक रेल्वे भरून भरून माणसे अयोध्येला जायला लागली. कल्याण सिंग, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, झालच तर कुठल्या कुठल्या साध्वी जोरजोरात भाषणे देऊ लागल्या. गल्लोगल्ली एकच ध्यास दिसू लागला "अयोध्या"! मी तर म्हणतो कि प्रत्यक्ष भगवान राम, राज्य करत असताना देखील भरतखंडाला अयोध्येची एवढी आस लागली नसेल. याच्या मध्ये जे प्रत्यक्ष कार सेवेला चालले होते किंवा जाऊन आले होते ते कार सेवेला न जाणाऱ्या लोकांकडे इतक्या तुच्छतेने पाहत कि त्या माणसाला त्याच्या पुरुषत्वाचीच  शंका यावी. आणि मग तो हि लगोलग "तिकीट कसे काढायचे" वगैरे चौकशी करायला लागायचा. गर्दीने जे करायचे ते सगळे पुढे केलेच. पण हे सगळं होत असताना दोन माणसं मात्र पहाडासारखी अविचल होती. एक होते देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि दुसरे अटलजी.. रावांचे एक समजू शकतो कि ते सत्तेत होते. पण अटलजींनी एकही भडकावू भाषण केले नाही. कसल्याही घोषणाही दिल्या नाहीत. उलट ते वेळोवेळी संयमाची आठवण करून देत होते. त्यांच्या पक्षातील काही लोकांना कदाचित ते आवडले नसेलही. पण माझ्या या नेत्याच्या चित्रात मात्र वेगळेच रंग भरत गेले. त्याच्या नंतरच्या प्रत्येक घटनेने या माणसा बद्दलचा माझा आदर वाढत गेला. मग त्यांच्या कवितांची पुस्तके साहित्य संमेलनातून विकत घेतली. एकाहून एक कविता. 

बाधाएँ आती है आये, 
धीऱे प्रलय की घोर घटाये 
पावों के नीचें अंगारे,
सीर पर बरसें यदि ज्वालाएं 
निज हाथों में हंसते हंसते,
आग लगाकर जलना होगा |  
कदम मिलाकर चलना होगा | 

हास्य रुदन में, तूफानों में, 
अमर असंख्यक बलिदानों में, 
उद्यानों में, वीरानों में ,
अपमानों में, सम्मानों में, 
उन्नत मस्तक, उभरा सीना 
पीड़ाओं में, पलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
उजियारों में, अंधकार में, 
कल कछार में, बीच धार में, 
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में, 
जीवन के शत शत आकर्षक,
अरमानो को दलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
 
काय स्थितप्रज्ञता आहे!! हातात निखारे असतील, पायाखाली निखारे असतील. मित्रा पण आपल्या साठी एकच मार्ग आहे चालत राहण्याचा.. आणि ते देखील हसत हसत.. कुणी तुझी निंदा करतील.. कुणी तुझी स्तुती करतील. अपमान होतील. सन्मान होतील. विजय होतील आणि पराजय हि होतील. पण मित्रा आपल्याला फक्त चालत राहायचं आहे आणि ते देखील ताठ मानेने आणि वाघा सारखी छाती काढून! 
 
हे एखादया राजकीय पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा नेता सांगतोय याच्यावर मुळात माझा विश्वासच बसेना. मग मी अजून वाचत गेलो. केवढा दुर्दम्य आत्मविश्वास आहे, केवढी अविचल वृत्ती आहे, केवढा ध्येयवाद आहे..प्रत्येक माणसाला जगताना एक तरी आदर्श लागत असतो. माझा तो शोध नुकताच संपला होता.
 
मंदिर बांधायचे ठरत नव्हते. पण मशीद मात्र पडली होती. मशीद पडली तेव्हा मला तरी वैयक्तिक रित्या थोडे वाईटच वाटले होते. काळाने केलेल्या सम्राट बाबराच्या नामुष्कीची आणि पराभवाची एक अस्सल निशाणी आपण आपल्या हातानी पुसून टाकली असे मला वाटले होते. मग त्यानंतर मुंबईच्या दंगली झाल्या. मग मुंबईचे 
बॉम्ब स्फोट झाले. 

हत्तीच्या टकरीमध्ये कुठला हत्ती जिंकतो ते माहित नाही. पण मोडलेल्या फांद्यावरची चिमण्यांची घरटी मात्र अधांतरी होतात हे मात्र नक्की. अनेक संसार मोडले. अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक चिमुकली अनाथ होऊन वाटेला लागली. काही कायमची आंधळी पांगळी झाली. युद्धच कशाला हवंय, पण मला तरी प्रत्येक संघर्षात आणि रक्तपाता मध्ये Tolstoy स्वत:च मरतो आहे असेच वाटत आले आहे. तर ते एक असो. 

पण त्याच्या नंतर देशात राजकीय चक्रे गतिमान झाली. आणि भारतीय जनतेने भारतीय जनता पक्षाला लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनविला. त्याचे नेते म्हणून अटलजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली. मला अतिशय आनंद झाला. एक अत्यंत हळव्या अशा कवी मनाचा, सर्वाना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मानसिकता असलेला, स्वच्छ प्रतिमेचा नेता, देशाचे नेतृत्व करणार होता. अतिशय मनापासून आनंद झाला होता. अगदी किती आनंद झाला होता हेच मोजायचे झाले, तर वाजपेयी पंतप्रधान होणार या खुशीत आम्ही आणि आमच्या समस्त रिकामटेकड्या मित्रानी Walchand Engineering College च्या बाहेरच्या चहा गाडीवाल्याची, त्याचं नाव "मंज्या" होतं, तर त्याची सगळी, म्हणजे सगळी, गेल्या सहा-आठ महिन्यांची उधारी, एका दमात फेडून टाकली होती. अतिशय आनंद!! आता देशात परत एकदा कायद्याचे राज्य येणार. कायद्यासमोर सर्व समान असणार. समाजातल्या सर्व घटकांना समान संधी मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन सरकार पाकिस्तान वर अणू हल्ला करून पाकिस्तान बेचिराख करणार. पण मग तसे झाले तर पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मॅच कशा होणार? असा पण एक प्रश्न चर्चेला येऊन गेलेला होता. या आणि अशा विचाराने आम्ही सातव्या अस्मान मध्ये मुक्कामाला गेलो होतो. वयच ते होतं. पण एक नक्की कि आमच्यातल्या प्रत्येकाला तो स्वत:च पंतप्रधान झाल्यासारखा भास होत होता. त्यात भरीस भर म्हणजे महाराष्ट्रात देखील वर्षानुवर्षे बसून बसून पुठ्ठ्यावर खुर्चीचे छाप उठलेल्या खादीतल्या पांढऱ्या बगळ्यांना देखील पब्लिक ने घरी बसवले होते. संघर्ष यात्रा, जोशी-मुंडे सरकार, प्रमोद महाजन, नितीन गडकरी.. वाह!! आता बारामतीत देखील सांगली सारखे लोड शेडींग मुळे दिवस दिवस दिवे जायला लागणार, या कल्पनेने तरअंगावर रोमांच आले होते. एन्रॉनचा प्रकल्प बुडवण्यासाठी मुंडे साहेब तो प्रकल्प समुद्रापर्यंत नेणार कसा? असे काही अनुत्तरित प्रश्न होते, नाही असं नाही. पण प्रत्येक दिवस म्हणजे असा उत्साहाने रसरसून भरूनच उगवत होता. सकाळी उठल्यावर काय करू आणि काय नको असे व्हायचे. एका युगाचा अंत झाला असे खात्रीने वाटत होते. 

पण हा आनंद एक आठवडाभरच टिकला. त्याच्या नंतर बातमी आली की जरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी देखील त्यांच्या कडे बहुमत सिद्ध करण्यासाठी लागतील इतके खासदार नाहीत. आता काय करता येईल हा मोठाच प्रश्न होता. तेवढ्यात कुणीतरी मंज्याचे पैसे द्यायची एवढी घाई करायची जरुरी नव्हती, असाही एक मुद्दा मांडला. पण हा घाव जिव्हारी लागलेल्या एका गणूने त्याला लगोलग, इथे राष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि तुला चहाच्या उधारीची काय पडली आहे अशा आशयाचा दम भरून विषय तिथेच संपवला. अटलजींचे सरकार कसे वाचवता येईल? याचा सगळ्यांनाच पेच पडला होता. कुणी कुणाशी फारसे बोलेना. तरी एक चांगले म्हणजे महाराष्ट्रातले युती सरकार भक्कम उभे होते. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार अशीच आमची भावना होती. त्यात बाळासाहेब काहीतरी जादू करतील असेही वाटायचे. आमच्यातल्या कुणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे आम्हाला काय वाटावे हे आमचे आम्हीच ठरवत असू. तर शेवटी एकदा तो दिवस आलाच ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटत होती. अटलजींनी राजीनामा दिला. जो तो आपल्या वाटेने निघून गेला. हाता तोंडाशी आलेली आणि एवढ्या महत्प्रयासाने मिळवलेली सत्ता अशी कसल्या तरी तांत्रिक कारणाने जावी हे म्हणजे पेपरात सगळी गणिते बरोबर सोडवून देखील केवळ नावात खाडाखोड केली म्हणून नापास होण्यासारखे होते. त्या रात्री मंज्याच्या गाडीवरची संसद निपचित झाली होती. 

त्याच्या नंतर दिल्लीत जो निर्लज्ज प्रकार झाला त्याने तर मला आज हि संताप येतो. अटलजींसारख्या एका देखण्या, सज्जन, ज्ञानी माणसाला, अत्यंत दुःख देऊन तुम्ही बाजूला काढलत. आणि आणलं कुणाला तर देवेगौडांना? तेव्हा पासून, न्यायासारखी सत्ता देखील आंधळी असते यावर आमचा अगदी गाढ विश्वास बसला. तो अजून उतरलेला नाही. मग पुढे बहुतेक त्या सकलविद्यामंडित, मदनरूप  अशा  देवेगौडांनी कुणालातरी रागवलेलं असावं. एक तर ते कानडी अप्पा. त्यांनी साधं "काय कस काय चाललंय?" असं जरी विचारलं कानडीतून, तरी समोरचा खजील होऊन टकामका बघायला लागतो. त्यात या बुवांना झोपेचं भारी वेड! जिथे जातील तिथे झोपत. दोन भाषणांच्या मध्ये तर ते झोपतच. पण एकाच भाषणाच्या दोन वाक्यात देखील झोपत असावेत असाही एक प्रवाद होता. तर अशा गृहस्थाबद्दल "बोलले असतील झोपेत एखाद दुसरा शब्द" म्हणून दुसर्यांनी तरी सोडून द्यायचं कीं नाही? तर नाही.. ते अडून बसले. जे झोपेत सुद्धा बोलणार नाहीत असे बुवा गादीवर बसवा म्हणाले. मग लागला इंदर कुमार गुजरालांचा नंबर. हे गृहस्थ काय बोलले हे अजूनही एक कोडंच आहे. किंबहुना ते पंतप्रधान असताना "देश चालवायला खरेच पंतप्रधान लागतात का? आणि नसले तर काय होईल?" यावरही एक परिसंवाद झालेला आठवतो आहे. 
त्यांची दाढी मात्र मला अतिशय आवडली होती. पण तशी दाढी आपण ठेवली तर मंज्याच्या गाडीवरचे "संसदीय सहयोगी" आपल्याला "गुजराल" म्हणतील या विचाराने ती ठेवता पण येईना. पण एकूण हा आमच्या साठी एक अत्यंत दुःखद असा कालखंड होता. मग ते इंदर कुमार पण गेले आणि मग सगळी लोकसभाच बरखास्त करून टाकली. पण या राजकारणी लोकांच्या "मला नको. तुला पण नको. घाल कुत्र्याला." या वृत्तीचा अतिशय संताप आला होता. देशाचा पैसा वापरून हा काय गोरखधंदा चालवला आहे असे आमच्या सारखेच देशातल्या जवळ जवळ प्रत्येकालाच वाटले असावे. जमेची बाब एवढीच होती कि अटलजी १३ दिवस का होईना देशाचे पंतप्रधान झालेले होते. घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में, कदम मिलाकर चलना होगा | 

आता नव्या निवडणुकाआल्या. परत एकदा प्रमोद महाजनांची तोफ चौफेर धडाडू लागली. ममता, समता, जयललिता सगळे एका झेंड्याखाली एक आले. "अटलजी आदी.. आता लै झाली खादी" असल्या घोषणा आम्ही पण तयार केल्या होत्या. अर्थात त्या दिल्या नाहीत हे हि खरेच आहे. पण निकाल लागला.  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत सगळे भुई सपाट झाले. आणि अटलजी परत एकदा पंतप्रधान झाले. मागच्या खेपेचा अनुभव लक्षात घेऊन पानपट्टीवाल्या स्वामीची उधारी लगोलग देण्याचा मोह सर्वानी मिळून टाळला होता. देशातल्या विरोधी पक्षांवरचा, त्यांच्या उद्दिष्ठावरचा विश्वास सर्वात कमी झालेला होता. कधी काय भानगडी करून परत अटलजीना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील याचा काही नेम नव्हता. अटलजी हे भारतीय मनाचा मानबिंदू झालेले होते. आणि त्यांना विरोध करणारे गुन्हेगार! शेवटी सहा महिन्यांनी सगळे व्यवस्थित चालले आहे असे बघून परत एकदा स्वामीची उधारी फेडण्यात आली. देर हैं अंधेर नही.. अयोध्या तो झाकी है,  काशी मथुरा बाकी हैं वगैरे नव्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. माझ्या पोटात गोळा आला होता. एक अयोध्येचं नाव काढलं तर इथं रामायणापेक्षा मोठं रामायण झालं. आता हे लोक काशी मथुरा म्हणू लागले. मनात म्हटले कि हे काही बरोबर नाही. आम्ही मनातच म्हणायचे. पण त्या बाईंच्या डोश्याच्या पिठात कुणी कणिक घातली काय ठाऊक, पण अचानक जयललितानी बोट बदलली. परत एकदा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आणि अटलजींना परत राजीनामा द्यावा लागला. 

मध्ये एकदा अटलजी पुण्याला आले होते. फर्गुसन कॉलेज मध्ये त्यांची सभा होती. त्यावेळी अपक्ष म्हणून कलमाडी उभे होते आणि त्यांना भाजप ने पाठिंबा दिला होता. मला फार वाईट वाटले होते. कारण एक तर दुसरे उमेदवार होते अविनाश धर्माधिकारी. आता अविनाश धर्माधिकारी यांच्या सारखा स्वच्छ चरित्राचा, तरुणाईचा आदर्श असा  उमेदवार असताना खरे तर भाजप ने त्यांनाच पाठिंबा द्यायला हवा होता असे मला अगदी मनापासून वाटले होते.पण तसे व्हायचे नव्हते. सभेला प्रचंड गर्दी होती. मैदान तुडुंब भरले होते. मुंगीला देखील शिरायला जागा नव्हती. जबरदस्त पोलीस बंदोबस्त होता. मला मिरजेची सभा आठवली. इतकी वर्षे निघून गेली. इतके पक्ष आले आणि गेले. इतक्या घटना झाल्या. इतके नेते होऊन गेले. प्रश्न बदलले. लोकांचे राहणीमान बदलले. पण गर्दीने अटलजींची पाठ कधी सोडलीच नाही. 

रिवाजा प्रमाणे कलमाडींनी त्यांच्या सुस्पष्ट मराठी (?) मध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह "घडियाल" म्हणून सांगितले. त्याच्यावर अटलजींनी त्यांना सावरून घेत, "मंडळी, हि हिंदी मधली घडियाल नाही.. मराठी मधले घड्याळ" म्हणून सांगितले आणि एकाच हशा पिकला. त्यांच्या भाषणात त्यांनी अविनाश धर्माधिकारी यांना देखील अत्यंत सन्मानाने त्यांचा उल्लेख करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. आपण एकाच ध्येयासाठी काम करतो आहोत. मग वेगवेगळे आणि एकमेकांशी लढण्यात काय हशील आहे असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता.अर्थात झालेही तसेच.. तेव्हा कलमाडीही पडले आणि धर्माधिकारी सुद्धा!!  मोठ्यांचं मोठेपण हे दुसऱ्यांना मान देण्यात असतं हे अटलजींकडून शिकावं. हास्य रुदन में, तूफानों में, कदम मिलाकर चलना होगा | 

पण मेलं कोंबडं जाळाला अजिबात भीत नाही. नंतर परत निवडणुका झाल्या आणि या वेळेला मात्र स्पष्ट बहुमत घेऊन अटलजी पंतप्रधान झाले. या सगळ्या मनस्ताप देणाऱ्या प्रकारात त्यांची लोकसभेतील भाषणे TV वर पाहाणे  हा एक अत्यंत नितांत सुंदर असा अनुभव असे. ते त्यांच्या विरोधकांना देखील इतक्या आर्ततेने, मैत्रीच्या नात्याने  विनवणी करत आणि न्यायाची आणि सत्याची बाजू उचलून धरायची विनंती करत कि आमच्या तर डोळ्यात पाणी यायचे. आणि असले जबरदस्त मुद्देसूद भाषण ऐकून सुद्धा त्याचा स्वतः:वर काहीही परिणाम होऊ न देणारे समोर बसलेले काँग्रेस आणि  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे ची मंडळी अत्यंत रडीचा डाव खेळत आहेत याची खात्रीच पटली होती. मला तर वाटतंय अटलजी या प्रत्येक पराभवाच्या वेळेला खचून न जाता उलट कणभर जास्त उत्साहाने उसळून येत होते. उन्नत मस्तक, उभरा सीना,पीड़ाओं में, पलना होगा । कदम मिलाकर चलना होगा |     

एवढा सगळा खटाटोप यांनी का केला याचं उत्तर पुढच्या पाच वर्षात मिळालं. पोखरण मध्ये दुसरी अणुचाचणी करून राष्ट्राची शस्त्रसिद्धता सिद्ध केली. अशी तुलना करू नये पण अमेरिकेच्या उपग्रहांना चकवून हे काम घडवून आणणं हे अधिक कठीण काम होतं. एका बाजूला दिल्ली लाहोर बस सेवा सुरु करून एखाद्या पौराणिक योध्याच्या दिलदार वृत्तीनं चिवट आणि जुनाट शत्रूलाही आपलंसं केलं आणि पुढं त्याच शत्रूने आगळीक करताच त्याचा सामना देखील एखाद्या कसलेल्या सेनापतीच्या करारी पणाने केला. वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा!!
देशात वेगवान रस्त्याचं जाळं विणायला सुरुवात केली. देशातल्या नद्या एकमेकींना जोडायला सुरुवात केली. देशाला काय काय हवंय याचा आराखडा तयार केला. आपत्ती निवारणासाठी देश पातळी वर नवी यंत्रणा उभी केली. त्यांच्याच काळात गुजरातेत दंगे झाले. त्यावेळी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावायला देखील त्यांनी कसलाही अनमान केला नाही. नंतर मग परत एकदा सत्ता बदल झाला. मग प्रमोद जी पण गेले आणि आता अटलजी पण गेले. मंज्याच्या गाड्यावरची संसद आज पोरकी झाली. 
    
अटलजींच्या जनतेवर आणि जनतेचा अटलजींवर एक अतूट विश्वास होता. सन्मान आणि विश्वास या गोष्टी कधी मागून मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. जपाव्या लागतात. त्यासाठी कुठल्या पक्षाची, धर्माची आणि भाषेची  बांधिलकी लागत नाही. किंवा कुठल्या हाय कमांडचा आदेश पण लागत नाही. अशा नेत्याला एकाच वेळी देशाचं पितृत्व घ्यावं लागतं. एखादी तुरट औषधाची मात्रा एखाद्या वेळेला द्यावी लागते. एखाद्या वेळेला स्वप्नांची दुलई द्यावी लागते. कधी बागुलबुवाची तर कधी राजा राणीची गोष्ट सांगावी लागते. काळीज आभाळाएवढं करून कधी खोटी खोटी सावली देखील करावी लागते. आणि हे सगळं करताना स्वत:ची दमलेली पावलं आणि डोळ्यातलं पाणी आपल्यापाशीच ठेवून, कुंतीचा कर्ण होऊन जगावं लागतं. आपल्याच मनाशी खूप खूप बोलावं लागतं श्वास संपेपर्यंत. 

अटलजी म्हटले कि मला पुरुषसुक्तात वर्णन केलेल्या पुरुचे रूप आठवते. कधीकाळी आकाशाला भिडलेल्या धुळीच्या लोटा मधून उमटलेली हि प्रतिमा, हि खरे तर पुरुषोत्तमाची आहे हे स्पष्ट उमटू लागले आहे. त्याचे सहस्त्रशीर्ष, सहस्त्र अक्ष, ज्याने जमीन, समुद्र, आकाश आणि अंतरिक्ष व्यापला आहे आणि तरी देखील जो दशांगुळे शिल्लकच उरलेला आहे. या पुरुनेच या विश्वाची निर्मिती केली आहे. तरी देखील या विश्वाच्या समष्टीसाठी स्वत:च्या पूर्णाहुतीसाठी त्याने स्वत:लाच यद्नवेदीला बांधून घेतले आहे.
या पुरुषोत्तमाचे सामर्थ्य, महाकाय अस्तित्व आणि ते सर्वस्व वाटून टाकण्याची त्याची मनीषा आणि संयम पाहून एकच म्हणावेसे वाटते, 

वेदा॒हमे॒तं पुरु॑षं म॒हान्तम्॓ । आ॒दि॒त्यव॑र्णं॒ तम॑सः॒ पर॑स्तात् ।
तमे॒वं वि॒द्वान॒मृत॑ इ॒ह भ॑वति । नान्यः पन्था॑ विद्य॒ते‌உय॑नाय ॥

(अर्थ - मी अशा एका पुरुषाला पाहिलं आहे कि ज्याचं तेज सूर्यापेक्षा किंचित जास्तच आहे आणि हेच तेज घेऊन ज्याने अज्ञान आणि अनास्थेचा शेवट केला आहे.  या अशा तेज:पुंज पुरुषोत्तमाला केवळ ओळखण्यामुळेच मला अमर्त्य असे ज्ञान झाले आहे. आता मला मोक्षासाठी दुसरा कोणता मार्ग किंवा धर्म किंवा शिकवणीची कसलीही गरज उरलेली नाही..)

लेखनसीमा     
~ निखिल कुलकर्णी   

Monday, June 25, 2018

मेपल

मेपल

~ निखिल कुलकर्णी

Listen to "Maple" here

आज पियोरातल्या आमच्या मित्राने आमच्या पियोरियातल्या घराचे काही फोटो पाठवले. पियोरियातून काहीही आलं, एखादा फोन, ईमेल किंवा अगदी गेलाबाजार पियोरिया काउंटीचं टॅक्स भरायचं स्मरणपत्र जरी आलं, तरी मला म्हणजे अगदी त्रासलेल्या सासुरवाशीणीला माहेरगावचं माणूस आल्यासारखं वाटत आलेलं आहे. माझ्यासारख्या “मारुती छाप” माणसाला हळवं करणाऱ्या ज्या काही थोड्याच गोष्टी आहेत त्यातली पियोरीया ही एक आहे.
वास्तविक माझा जन्म आणि आयुष्यातली जवळ जवळ पंचवीस एक वर्षे तर भारतातच गेली. त्यामुळे भारतातल्या एखाद्या गावाविषयी अशी ओढ वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. मिरज, सांगली, फलटण, पुणे, बारामती, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी या ना त्या कारणाने छोट्या मोठ्या कालावधीसाठी राहण्याचा योग आलेला आहे. त्याने यातल्या एखाद्या गावाशी भावनिक बंध जुळलेले समजण्यासारखे आहे. त्यातल्या त्यात मिरजेच्या तर जवळजवळ प्रत्येक घराशी काहीना काही आठवण चिकटलेली आहे. कित्येक घरातले खाष्ट आजोबा, नाहीतर कशावर तरी जन्माच्या रागावून बसलेल्या, एकेकट्या म्हाताऱ्या, त्यांना दुपारच्या वेळेत बारीकशी सुद्धा झोप लागू नये यासाठी आमच्याच वयातल्या, आमच्या गुरु आणि गुरूबंधूंना सोबत घेऊन केलेल्या नानाविध क्लृप्त्या, चिंच, वड, पिंपळ अशा वेगवेगळ्या झाडावर चढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि एका झाडावर चढून, दोन तीन म्हाताऱ्यांना यथेच्छ त्रास देऊन, दुसऱ्या भलत्याच झाडावरून खाली उतरण्याचे आकाशमार्ग, मर्कटमार्ग म्हणू हवे तर, वगैरे आठवले की हसू येते. आणि एक एक करत एकेक आजी आजोबा गेल्याच्या बातम्या कळल्या की वाईटही वाटतं. कधीकळी माणसांनी गजबजलेले वाडे रिकामे झाल्याची कल्पनाच सहन होत नाही. मग मी मिरजेला जायचं टाळत राहतो.
सांगलीची वेगळीच तऱ्हा.. या गावातल्या सगळ्या आठवणी तरूण!! सकाळी पाच ते सहा आणि नंतर आठ ते नऊ अशा दोन शिकवण्यांच्या मधल्या वेळेत, कृष्णेच्या काठावर, शाळेतल्या ड तुकडीतल्या मुलांबरोबर केलेला अजस्त्र व्यायाम.. म्हणजे ती मंडळी व्यायाम करत आणि आम्ही नुसते बाजूला उभे राहून त्यांच्या कडे बघून उगाच खूष होत असू. म्हणजे अगदीच काही व्यायाम केला नाही असे नाही. पण त्यांच्या दहा जोरा मागे आपण एक जोर मारावा आणि उरलेल्या वेळी त्यांना प्रोत्साहन द्यावे असा प्रकार!! शाम सोनावणे, राजा मुंढे, गड्डया पवार वगैरे मंडळी म्हणजे दृष्ट लागावी अशी एकेकाची शरीरयष्टी. यातल्या शाम्याने तर पुढे, न थांबतां सलग दहा हजार जोर मारून, जगात सगळ्यात जास्त जोर मारायचं जागतिक रेकाॅर्ड केलं. त्याची गिनीज बुकात नोंद देखील झाली. एकूण मित्रसंपदा अफाट. एकतर अ तुकडीतला मुलगा, अभ्यास वगैरे असल्या क्षुल्लक बाबी सोडून, आपल्या बरोबर व्यायामाला येतो याचेच त्यांना कौतुक वाटत असणार. काय असेल ते असो. ती मंडळी पण “या पैलवान. काल दिसला नाही तालमीवर!” किंवा “परवा ऐकला तुमचा रेडीओ वरचा प्रोग्राम” वगैरे विचारत. वाह वाह, अजून काय हवे होते महाराजा!! आपण अ तुकडीत असून आपल्याला लोक “पैलवान” म्हणतात हा एक अत्यंत सुखद आणि उगाचच शंभर पटीनं आत्मविश्वास वाढवणारा असा अनुभव असायचा.
नंतर मग संध्याकाळी मारुती रोड वरची चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे पाहावीत. त्यातल्या एखादीचा भाऊ कुठल्या तालमीत जातो त्याचा माग काढून ठेवावा. अशा सगळ्या अतिशय छान आणि चिरतरुण आठवणी सांगलीच्या. पण त्यातलीच काही स्थळे आमच्याच काही अ आणि ब तुकडीतल्या ढोंगी मित्रांनी आमच्या डोळ्यादेखत फूस लावून पळवून नेलेली होती. त्यामुळे न जाणो, सांगलीत गेल्यावर तिच्या त्या फसव्या राव्याची सावली हातात घेऊन ती दिसलीच तर तिचे काजळात बुडालेले चंद्र आपल्याला पाहणे जमेल का? अशा अवेळीच दाटून आलेल्या अंधाऱ्या विचाराने मी सहसा सांगलीला जायचं देखील टाळत आलेला आहे..
इतर गावांचे योग तसे अगदीच जुजबी. नातेवाईक होते म्हणून नाते होते अशातला काहीसा प्रकार. औरंगाबादमधली असंख्य थडगी आणि बुरूज, कोल्हापूरातला जुना राजवाडा आणि जाधवांची भेळ, बारामतीतली नवी MIDC आणि तिथले दृष्ट लागावी असे स्वप्नील रस्ते, फलटणातला “टिप्या” नावाचा कुत्रा असल्या छोट्या छोट्या आठवणी सोडल्या तर काही फारसं जोडून ठेवेल असं काही नाही. पुण्याची तर तऱ्हाच न्यारी. काहीएक वर्षे इथल्या समुद्रातला एक अव्यक्त थेंब होऊन दररोज गर्दीच्या काठाला धडकत राहीलो आणि एक दिवशी एका लाटेने समुद्रातून हाकलून लावले. यापेक्षा जास्त काही आठवत नाही. आणि ज्या गावात महत्वाकांक्षे शिवाय दुसरं काहीच जोपासल नाही, त्या गावाविषयी यापेक्षा जास्त काही आठवूही नये.
अशा पुण्यप्रभावातून तावून सुलाखून निघालेल्या या थेंबाने मग देशाबाहेरची अनेक गावे पाहीली. न्यूयाॅर्क, शिकागो, डेट्राॅइट, मिनीयापोलीस, अटलांटा, डॅलस, ह्युस्टन, लाॅस एंजेलिस, फिनिक्स, सॅन होजे, सॅन फ्रान्सिस्को, एकाहून एक दिपवून टाकणारी श्रीमंत गावे.. तिथल्या उंचच्या उंच इमारती, लांबच लांब सरळसोट विस्तीर्ण आणि वेगवान रस्ते, भव्य पटांगणे, नद्यांवरचे अजस्त्र पुल, सगळंच दिपवून टाकणारं! प्रत्येक गावाची तऱ्हा न्यारी. ही गावे रात्री एखाद्या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यासारखी दिसतात आणि दिवसा एखाद्या उत्तुंग शिल्पासारखी!! प्रत्येक गावाला स्वत:चं असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक इमारतीला तिचा इतिहास आहे. बांधणाऱ्या अभियंत्यांचं कसब लेवून एकेक भींत वर्षानुवर्षे दिमाखात उभी आहे. यातल्या एखाद्या इमारतीतल्या चाळीसाव्या मजल्यावरून खालून वाहणाऱ्या रस्त्यांवरच्या गाड्या पाहणे आणि किनाऱ्यावर बसून दुरवर तरंगणारी जहाजे पाहणे हे दोन्ही अनुभव मला तरी सारखेच वाटत आलेले आहेत. कारण या दोन्ही वेळी आपण गर्दीत असून देखील गर्दीत नसल्याचा आभास हा सारखाच आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचं आकर्षण घेवूनच आम्ही “जगाची बौद्धीक राजधानी” सोडली होती. तेव्हा लाॅस एंजेलिस मधे होतो आणि अचानक साहेबाचा फोन आला की दोन तीन आठवड्यांसाठी पियोरियाला जायचे आहे म्हणून. ह्या गावाचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते. नकाशात नेमके कुठं आहे ते देखील नीट सापडले नाही. मग ते अमेरिकाच्या बर्फाळ भागांत असून तिथं जायला थेट विमान नसल्याने भयंकर वेळ लागतो असे कळले. तेव्हा “हमारे दो” नसल्याने कुठेही जायची अडचण अशी नव्हती. तरी नविन गाव, अप्रचलित ठिकाण, बर्फ या सगळ्या शंका होत्याच. तरी मी आपला “दोन तीन आठवड्यांच्या” भरवशावर हो म्हणालो होतो.
लाॅस एंजेलिस सोडले त्या दिवशी सकाळी विमानतळावर तुफान गर्दी होती. सुरक्षेच्या रांगेत थांबून राहीलो आणि दहाचे विमान चुकले. मग शेवटी काहीतरी करून दुपारी चारचे विमान मिळाले. त्याने शिकागोत पोचायला रात्रीचे बारा वाजले. मग आता तिथून रात्री पियोरियाला जायला टॅक्सी केली. त्यालाही काही माहिती नाही आणि आम्हालाही काही माहिती नाही. त्याला वाटले, असेल इथंच कुठेतरी पियोरिया म्हणून. आमचा तर पत्ताच गुल झालेला होता. टॅक्सीत झोपायला तरी मिळेल या विचाराने मी बसून होतो. हळू हळू शिकागोमधून बाहेर पडलो. रस्त्यावरचे दिवे संपत गेले. आणि मग महाकाय अंधारात टॅक्सी एकटीच चालू लागली. आमच्या शिवाय त्या अखंड रस्त्यावर कोणीही नव्हते. लांब दूरवर कुठेतरी मिणमिणते दिवे दिसायचे आणि परत अदृष्य व्हायचे. बराच वेळ झाला तरी हा प्रकार चालूच होता. मला तर ते मरतुकडे दिवे पाहून कसली अवदसा आठवली असे वाटायला लागले होते. मजल दर मजल थांबत आणि पत्ता शोधत शेवटी सकाळी चार वाजता पियोरियात पोचलो. ते झोपलेलं, “रुकडी छाप” गाव पाहून भयंकर अपेक्षाभंग झालेलाच होता. पण त्या टॅक्सी वाल्याचे बील ऐकून मी भूतो न भविष्यति हादरलो होतो. त्याने चारशे डाॅलर मागितले. जेव्हा महिन्याचा पगार चार हजार डाॅलर होता तेव्हा चारशे डाॅलरची टॅक्सी म्हणजे सायकलवरून घरोघरी जावून, सोलापूरी चादरी वगैरे विकून महिन्याकाठी शंभरेक रुपये मिळवणाऱ्या इसमाने, “हाॅटेल ताज रेसिडेन्सी” मध्ये जावून तीस रुपयाचा चहा पिल्यासारखेच होते. काही इलाज नव्हता. “रात्र के समय तुम ऐसे कैसे पैसे मांग सकते हो?” अशा आशयाचं इंग्रजी वाक्य मी त्याच्यावर फेकून बघीतलं. पण त्या घटोत्कचावर कसलाही परिणाम झाला नाही. शेवटी सगळे खिसे, पर्स, बॅगा सगळे उघडून अक्षरश: वेचून वेचून एकूण तीनशे नव्वद डाॅलर त्याला दिले. आणि “when you come to India, you will have a friend there in our form” वगैरे थापा मारून त्याला बिदा केला. पण हे करताना या राधेयाची तीनशे नव्वद डाॅलर मधे साठलेली अमोघ शक्ती संपून गेली होती हे वेगळे सांगायला नकोच.
सकाळचे पाच वाजले. सात वाजता मिटींग होती. मग न झोपता तसाच तयार झालो. पण आता काॅफी साठी देखील डाॅलर नव्हता. साहेबाला फोन केला की आपण त्याच्या गाडीत जरा मिटींगची तयारी करू वगैरे. मग तो मला घ्यायला आला. आणि मग पहिला दिवस साजरा झाला. पियोरियाने केलेले जंगी स्वागत जन्मभर लक्षात राहील असे होते.
पण हा एक दिवस सोडला तर या गावाने आमच्यावर फार प्रेम केले. “दोन तीन आठवडे” म्हणून आलेले आम्ही नंतर तब्बल नऊ वर्षे या गावात राहीलो यातच सगळे आले. बरे वाईट सगळेच अनुभव होते. पण या गावात झोप छान लागली. इथे उंच इमारती नव्हत्या. भले मोठे रस्ते नव्हते. गजबजलेली डाऊनटाऊन नव्हती. पण गाव चांगलं होतं. या गावात परत एकदा मी माणसात मिसळलो. अगदी सांगली मिरजेत असल्यासारखा!! खूप माणसं भेटली. मराठी मंडळ काढलं. मुलांसाठी मराठी शाळा चालवली. मुलांची नाटके बसवली. खूप कार्यक्रम केले. तुकारामांची गाथा अखंड वाचून त्याच्यावर एक दीड तासाचा कीर्तनासारखा कार्यक्रम केला. नाट्यसंगीतावर एक विवेचनात्मक कार्यक्रम केला. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या “वऱ्हाड निघालय लंडनला” चे प्रयोग केले. जुन्या कवितांचे कविसंम्मेलन केले. असंख्य गोष्टी केल्या. कुणाला आवडल्या. कुणाला कदाचित काही गोष्टी आवडल्या नसतीलही. पण मी माझ्यासाठी माझ्यापुरता या गावात अगदी भरभरून जगलो.
याचं गावात “हम दो” चे “हम दो हमारे दो” झाले. मग आर्चिसच्या पहिल्या वाढदिवशी हे घर घेतलं होतं. अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण तेव्हा पियोरीयात कॅटरपिलरचे एम्प्लाॅई असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जायचे. आणि तेव्हा आम्ही दोघेही साधे कन्सल्टंट होतो. मग “कन्सल्टंटनी घर घ्यावे का?” (म्हणजे इथे “कन्सल्टंट” हे “भिकार कन्सल्टंट” असे वाचावे.)
यांवर काही घरात रात्रीची चर्चा सत्रे झाल्याचे आम्हास ठाऊक होते. पण मेलं कोंबडं जाळाला भीत नाही. पहिल्याच दिवशी चारशे रुपयांची टॅक्सी केलेली असल्याने आमची पैशाची आणि ते संपल्याची भीती तेव्हाच संपलेली होती. अर्थात गंमत अशी की अशा भिकार कन्सल्टंटनी घर घेतलेले बघून नंतर बऱ्याच, जवळ जवळ निवृत्तीला पोचलेल्या (ही ज्ञानोबांची निवृत्ती नव्हे!!) आणि वैचारिक गुंत्यात अडकलेल्या एंप्लाॅईंनी पटापट घरे घेऊन टाकली. होऊ नयेत पण कितीही म्हटले तरी अशा गोष्टीनी मनाला गुदगुल्या व्हायच्या त्या होतातच.
तर अशा कन्सल्टंटच्या घरात आता झाड लावायचे ठरवले. इतर लोकांनी कुठून कुठून तीनशे चारशे डाॅलर देवून झाडे विकत आणून लावली. ती झाडे आणली तेव्हाच तीन चार फुटांची होती. चांगली खात्यापित्या घरची वाटायची. आम्ही थोडा वेगळा विचार केला. म्हटले कुठेतरी दुसरीकडे मोठे वाढलेले झाड उपटून आणण्यापेक्षा एखादे रोपटे लावून बघू. एका कॅनाॅलच्या शेजारी एक झाडांचे गचपण होते. अतिशय अंधारलेल्या जागेत मेपलची दोन चार रोपे जीवाचा आटापीटा करून सूर्याच्या शोधात वेडी वाकडी वाट काढत वाढत होती. ती अशा ठिकाणी उगवली होती की त्यांना सूर्य दिसणे अवघडच नाही तर अशक्य होते. तरी त्यांच्यातल्या कोंबाचा संघर्ष अलौकिक होता. मी काहीही विचार न करता त्यातले एक रोप हळूवार पणे उपटले आणि घरी घेवून आलो. तसेही त्या गचपणातल्या अंधारात ते बोटभर अस्तित्व मेलंही असतं आपल्याशीच कुढत. पण आता मी त्याला उपटून आणल्याने त्याच्या प्रत्येक श्वासाचा विश्वस्त मी झालो होतो. त्याला घरी आणून एका स्वच्छ, मोकळ्या जागी लावले. आर्चिस रोज पाणी घालायची. पण का कुणास ठाऊक त्याची पाने गळायला लागली. जन्मापासून अंधारात राहीलेल्या त्या जीवाला दिवसभराचा स्वच्छ सूर्यप्रकाश सहनच होईना. त्याच्या पानांना विचित्र भोकं पडायला लागली. आर्चिसच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे सुचायचे नाही. मी आपलं काहीतरी सांगून तिची समजूत काढायचो. पण एकामागोमाग एकेक पाने गळून गेली. शेवटचे पान गळाले तेव्हा तर मला फारच अपराधी वाटलं. बाहेर उन्हात त्या रोपाची काडी तशीच एकटी उभी होती. शेवटी काहीतरी सांगायचे म्हणून मी आर्चिसला रविंद्रनाथांची शांतिनिकेतनाची गोष्ट सांगितली. मग ती पण त्या काडीपाशी जावून बोलत बसायला लागली. “लवकर लवकर मोठा हो” म्हणायची. त्याला हात लावून “I love you!!” म्हणायची. प्रत्येक क्षणाला माझी घुसमट वाढत होती. मला बऱ्याच जणांनी सांगितले की ते झाड काही परत येणार नाही म्हणून. पण आर्चिसचा भाबडेपणा मला ते काढू देईना. आणि तिची समजूत कशी काढावी तेही कळेना.
आणि शेवटी एक दिवशी त्या काडीवर एक कोवळी फुट फुटताना दिसायला लागली. आणि मला आभाळ थोडे झाले. रोपाला कोंब येणे ही काही विशेष बाब नाही. पण त्या रोपाचा कोंब हा रविंद्रांच्या अलौकिक अस्तित्वाची प्रचिती होता की आर्चिसच्या असीम भाबडेपणाला आलेलं यश होतं हे सांगणे अवघड आहे.
आज दहा वर्षे झाली तो मेपल अगणित हिरव्यागार पानानी डवरला आहे. खरे तर आता तो घरापेक्षाही उंच झाला आहे. आता त्याला त्याचे अस्तित्व आहे. व्यक्तित्व आहे. त्याची मुळे कुठे कुठे खोल गेलेली आहेत. त्यांना देखील मायेचे असीम ओलावे सापडले आहेत. एका बाजूला वसुधेला घट्ट धरून ठेवत तो असंख्य डोळ्यांनी आकाशातल्या ताऱ्यांना त्याच्या अस्तित्वाचा डौल समजावून सांगतो आहे. आपल्याच पानातून ऐकू येणारं रविंद्रसंगीत ऐकून तृप्त होतो आहे. अंधारलेल्या गचपणात प्रकाशाच्या शोधात त्याच्या बुंध्याच्या तळाशी झालेली थोडी वेडीवाकडी वाढ सोडली तर गतजन्माची अशी कोणतीच खूण आता त्याच्या अंगावर शिल्लक नाही.
आम्हाला पियोरिया सोडून देखील पाच वर्षे होवून गेली आहेत. त्याला आता आमची काही गरज देखील वाटत नसेल कदाचित. आम्हालाच वाटत राहते जावू कधीतरी पियोरियाला म्हणून. आता ते घर आम्ही त्याच्यासाठीच ठेवले आहे.

स भूमिं विश्वतो वृत्वा। अत्यतिष्ठद्दशांगुलम ।।


~निखिल कुलकर्णी

Monday, April 30, 2018

अनंत यात्रा

आपल्याच रंगात रंगावं, सृष्टीनं दिलेलं दोन थेंबांचं दान पिऊन, फुलून यावं रखरखीत वाळूत सुद्धा, आपले इवलेसे पाय रोवून, खाऱ्या बोचऱ्या वाऱ्यात, लाटांच्या भीषण रौद्र खर्जात देखिल, उमलून यावं कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या उषेच्या अमोघ किरणासारखं, आसमंत भेदत शिरावं अनंताच्या गर्तेत, आपल्याशीच संवाद करत, वाटेत भेटेल त्या अस्तित्वाच्या प्रत्येक जड कणाला आपल्याच रंगाचा दुबोटी गंध लावत, उजळून टाकावीत त्यांची ललाटे, टिपावे क्षणिक स्मित आणि जातच रहावे परत एकदा अनादी अनंताकडे, अलगद, हळूवार पंखाला पराग चिकटलेल्या फुलपाखरासारखे.. 

करू दे त्या मग्रूर सागराला त्याच्या उन्मत्त लाटांचा हिशेब..मोजू देत त्या नेभळत कड्यांना त्यांच्याच वाळूंचे डोंगर..वाहू देत त्या गर्विष्ठ वाऱ्याला त्याच्या सामर्थ्याची प्रौढी मिरवत..

नेल्या दोन चार जांभळ्या पाकळ्या त्याने त्याच्या हिडीस खांद्यावरून तरी पडतीलच कधीतरी परत पृथेच्याच मायेने तिच्याच पार्थिवावर तिच्या अनंत यात्रेसाठी..


~ निखिल कुलकर्णी

Monday, April 16, 2018

प्रत्येकाचा क्षण

गेल्या वसंताच्या आठवणीने कष्टी होऊन, अविरत निश्चलतेनं, चैतन्यहीन होऊन, आपल्याशीच कुढत बसलेल्या, पायाखाली स्मशानातील भुतांच्या गुंतवळी प्रमाणे अविरत घुटमळत राहणाऱ्या अतीशीत अशा पयाचा मनस्वी तिटकारा येवून, निळ्याशार आकाशातून, खाली पृथेचा उत्सव पाहात उभ्या असलेल्या, बघ्या वृत्तीच्या जलधींना, आपल्या असंख्य पिंजारलेल्या हातांनी लहलहा करून हुसकावून देवून, आपल्या अशा निर्वस्त्र, बेढब आणि कुरूप अशा अस्तित्वाकडे कुणीही पाहू देखिल नये अशा इर्षेने, एखाद्या क्रुद्ध आणि शापीत समंधासारख्या संत्रस्त झालेल्या, तळ्याकाठच्या या आत्ममग्न वृक्षाला कल्पना तरी आहे का की, त्याच्याच पायाशी, शिशिराच्या कडाक्यात देखिल हिरवट खुरट गवताच्या पात्यांवर सूर्याचे कण होऊन बहरलेली ही पिवळसर फुले, जणू त्यांच्या स्वर्गीय पाकळ्यांच्या क्षणिक अस्तित्वाचा सोहळा अनाहूतपणे साजरा करत, वाऱ्याच्या प्रत्येक तरंगाला सोबतीला घेत, स्वत:ला आकाशाच्या कुशीत आश्वस्त होऊन मनसोक्त झोकून देत आहेत? की ज्या तळ्याच्या थेंबांवर ही इवलीशी सृजनाची प्रतिके उमटली, त्या थेंबांना सूर्याकडून उसने घेतलेले हळदीचे वाण देवून, आपल्या जडत्वहीन बहराचे शिंपण घालत, कृतकृत्य होऊन आलिंगन देत आहेत?

प्रत्येक क्षण तर वेगळा आहेच. पण कदाचित प्रत्येकाचा क्षण हा त्याहूनही वेगळा आहे..

~ निखिल कुलकर्णी



सहवासी

मंतरलेल्या प्रत्येक सकाळी, नव्या लाटा घेवून जुनेच प्रश्न परत परत विचारत का बसलेला असतोस त्याच मुक्या आकाशाला, कधीतरी बोलेल आकाश तुझ्याशी तुझ्या अस्तित्वाविषयी असे वाटून? खरेतर प्रत्येकाचेच अस्तित्व स्वत:ला निर्गुण करुणे मधे शोधत बसलेले असते अहोरात्र, वाळूच्या एकेकट्या कणांसारखे, अथांग अपरंपार निष्ठेने...एवढी साधी गोष्ट तुला कळू नये?

एकेक थेंब मिळून झालेला अजस्त्र थेंब ही तुझ्या कुरूप अस्तित्वाची ओळख तुला पुरेशी नाही का? आणि काय करायचे आहे तुला तुझ्या जन्माचे गुह्य ऐकून? अरे त्या निराकार आकाशा सारखा तुझा जन्म देखिल अपरंपार असहायतेतूनच झाला असेल कदाचित. तुझ्या जन्मासाठी कुणीही कसलाही यज्ञ केला नसेल किंवा तुझ्या जन्माचा कुणी कुठेही उत्सव देखिल साजरा केलेला नसेल. कदाचित पृथेचा लाडका चंद्र जेव्हा रागाच्या भरात तिला सोडून कायमचा निघून गेला असेल त्या दिवशी अशाच ब्राम्हमुहूर्तावर ती रडली असेल एकटीच काळ्या कुट्ट अंधारात, गोठ्यातल्या वासरू हरवलेल्या गाई सारखी, सूर्याची चाहूल लागण्यापूर्वी, ताऱ्यांच्या संगतीत रमलेल्या आपल्या लाडक्या कोरीतल्या चंद्राकडे पहात आणि भरली असेल तिची रिती ओटी तिच्याच अथांग अश्रुंनी..या अपार दु:खाची आठवण म्हणून वागवत असेल ती तुला तिच्या अंगाखांद्यावर अपार करुणेने. त्याची थोडी तरी आठवण ठेव कृतघ्ना आणि थांबव ते भयंकर निष्ठूर आसूड...सहवासी हो, प्रगल्भ हो, प्रशांत हो..आकाशासारखा..

~निखिल कुलकर्णी


दैवी: स्वस्तिरस्तुन:

आकाशाशी स्पृहा करणाऱ्या काळ्या कभिन्न कड्यावरच्या एकुटक्या धारेतल्या उगमापासून, ते सहस्त्र भुजांनी अजस्र सागराला उत्कट आलिंगन देणारी, शीतोष्ण पयाच्या अगणित बिंदूंनी काढलेली, अनेकानेक गहीवरांनी, उन्मादांनी, प्रपातांनी आणि कल्लोळांनी काठोकाठ भरलेली एक रेघ. ही रेघ त्यातल्या पाण्याइतकीच अखंड होऊन, उगमा इतकाच उत्साह घेऊन अव्याहत वाहात राहते, महादाना पर्यंत..

धारोष्ण उग्रट ज्वालामुखीच्या संगतीने अहंकाराच्या गर्तेत आकंठ बुडालेल्या, नाही तर कदाचित नभांगणातला एखादा स्वयंप्रकाशी तारा होण्याचं स्वप्न कायमचं भंगल्याने, निराशेच्या गर्तेत थिजून, अकालीच प्रौढत्वात गेलेल्या जडत्वाच्या ठिपक्यांना, ती अहोरात्र ऐकवत राहते शैशवाचे गान, तांबड्या रिबीनी लावलेल्या परकरातल्या पोरीसारखी, उत्शृंखलपणे गजग्यांचा खेळ खेळत हातातल्या बांगड्यांची अविरत किणकिण करत, अगदी ठिपक्यांच्या अंतापर्यंत..

या क्षणांची आठवण म्हणून नेते ती सोबत त्या ठिपक्यांचे काही कण गाठीला बांधून आणि मग आपल्याच आनंदात हरकून दिसू लागते नवयौवनेसारखी अधीर, आसक्त तरीही अव्यक्तच. हा जडत्वाचा समागम वाढवत राहतो तिचा आवेग क्षणाक्षणाने आणि अलगद एखाद्या प्रपातावर, अनावर होत देहाची कुरवंडी करून झोकून देते ती स्वत:ला बेफाम, बेलगाम, बेफिकीर होत आकाशाच्या प्रतलावर, अनावर विश्वव्यापी ओढीने. आणि मग जिवंत होतो तिचा प्रत्येक कण, आकाशाला धरून हिंदोळताना आणि स्वत:च्याच अस्तित्वाची ओळख विसरून स्वच्छंद विहार करू लागतो, यथेच्छ रानवारा पिऊन कळपाचे भान सुटलेल्या चौखूर उधळलेल्या वासरा सारखा..

गुरूत्वाच्या प्रभावाने जशी ही धुंदी उतरते तेव्हा हे अवखळ बाष्पाचे वारू परत एकदा निर्गुण निराकार होत आकाशाची संगत सोडून धरेला जावून बिलगतात आणि निष्पाप होउन करू लागतात सलगी, त्याच साकळलेल्या ठिपक्यांच्या कणांशी आणि चालू लागतात आपल्याच धुक्याचा पदर डोक्यावरून ओढून घेत, समाधिस्त अस्तित्वाच्या संगतीने, चिरकालासाठी..

भेटतात तिला वाटेत काहीएक जीवांची कोंडाळी, घाटांवरच्या आपल्याच जळमटात रमलेली. येत राहतात त्यांचे कृतघ्न हात आणि जिव्हा, अनभिषिक्त रिक्तता घेऊन, जन्मभराची. ती मात्र पुरवत राहते त्यांची तृषा, जो जे वांछील तो ते लाहो असे माऊलीचे काळीज घेऊन..

एखाद वेळी तिच्या कुशीत आकंठ डुंबणारी पोरं पाहून हसते स्वत:शीच, कड्यावरचं तिचे शैशव आठवून आणि मोहरून उठते परत एकदा आपल्याच सृजनाच्या जाणिवेने. भरलीच कोणी ओटी तर लावून घेते हळदी कुंकवाचे ठसठशीत डाग कपाळावर आणि ठेवून घेते चार तांदूळ, तिच्या, देवळांच्या गोपूरांच्या नक्षांनी आणि नंदीच्या घंटांनी सजलेल्या, हिरव्यागार पाचूच्या पदरात..

कधी आकाशात दूरवर, उंच उंच गेलेल्या, तिच्या कर्तबगार लेकुरवाळ्यांची, निरतिशय कौतुकाने, पुसत राहते वास्त, त्यांच्या, जमिनीच्या अंतरंगात खोलवर गेलेल्या पायाशी बसून, त्यांना ठिपक्यांचे लिंपण लावत आणि विसावते त्यांच्याच विशाल सावल्यांमधून माध्यान्हीची धाप टाकत पळभरासाठी..

परत पुन्हा एकदा उत्फुल्ल मनाच्या, संध्येच्या अविरत ओढीने, तिची पाऊले चालू लागतात अनामिक अगांतुकपणाने, जडावलेला देह घेऊन, अस्ताच्या दिशेने प्रशांताच्या दर्शना साठी. आणि तिचे असंख्य हात आतूर होतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या अखंड महादानासाठी..

उगमा पासून फक्त देतच आलेली ही चिरभरीता सरीता, सर्वव्यापी सागराला देखिल अर्पण करत राहते आपले स्नेहल अस्तित्व, बळीसाठी वेदीला बांधलेल्या अनंत पुरूखासारखे..

तिच्या यज्ञवेदीवरून, कधीच कुणी रीतं जात नाही.. जलधी सुद्धा...

शेवटच्या महादाना वेळी आकाशीचे गंधर्व गात राहतात कल्याणाचे महासूक्त, दैवी: स्वस्तिरस्तुन:, स्वस्तीर्मानुषेभ्य: ...

~निखिल कुलकर्णी



मोरपीस

मोरपीसाला वय नसतच मुळी. असतात त्या असंख्य आठवणी, अमुक्त आणि अनुत्तरीत. आठवणी अमुक्त आहेत की त्या धारण करणारे मन हा मोठाच प्रश्न आहे. पण एखादं मोरपीस मनाच्या अथांग विवरात आठवणींचे तरंग उठवत राहतं, सागराच्या लाटांसारखे, अलगद, अनाहत, अविरत..

वास्तविक ती निघून गेली त्यालाही बरीच वर्षे झाली. तसं तीचं म्हणून काही त्याच्या जगात राहीलेलं देखिल नाही फारसं. तिचे आवाज ऐकू येत नाहीत की तिचे श्वास देखिल जाणवेनासे झाले आहेत कधीपासूनच. आणि तो देखिल तिचे काहीच देणे लागत नाही अशाच अहंकारात दिवसामागून रात्री गुंतवत चालला आहे, अजस्त्र दिशाहीन अर्गलेसारख्या, वर्तमानाच्या अर्वाच्य कोलाहलात..

पण असतं एखादं मोरपीस थांबलेलं, एखाद्या पुस्तकात, अंधारलेल्या धुळकट माळ्यावर, एकटच, निपचीत, तिच्याच आठवणींची संगती लावत बसलेलं. लागलंच कधी ते पुस्तक हाताला, तर त्याच्या हळूवार केसांना चिकटलेल्या असंख्य आठवणी जाग्या होत जातात, एका मागून एक, नागीणीसारख्या, लहलहा करत, मनांतल्या अंधारलेल्या कोपऱ्यातून आणि वर्तमानाचा आसमंत भूताच्या रंगांनी माखून जातो संध्याकाळच्या भळभळीत आभाळासारखा, आरक्त, आसक्त तरीही अव्यक्तच..

सूर्य अज्ञाताला निघून जाणार या कल्पनेने धरती कासावीस होते अंतर्बाह्य. हरेक संध्येला, पिळवटून निघते तिचे अंत:करण विरहाच्या जाणिवेने अस्वस्थ होऊन, संध्यामग्न मित्राच्या ओढीने..

तिच्या भाबड्या मनाची अवस्था, मायावी मारिचयाला विशद करण्याचा मोह, आवरत नाही त्या सर्वव्यापी आकाशाला. आणि मग आकाश त्याचे दिव्य कण, असे अनंत हस्तानी, मुक्तपणे उधळून टाकते आसमंतात, जशा रंगीबेरंगी अक्षतांच्या सरीच पडत राहतात, विचारमग्न तरीही खिन्न, पृथेच्या सर्वांगावर एकामागून एक, अनंत, अगणित, अविरत..

भयाण वाटणाऱ्या शांततेला, घराच्या ओढीनं लगबगीनं उडत चाललेले खग त्यांच्या अस्फुट फडफडीचे संगीत देत निष्ठूर हिरण्यगर्भाची विनवणी करत राहतात केविलवाणी, क्षितीजाच्या रेषेवरून. तरी देखिल तो आदित्य अदृष्यच होत जातो वर्तमानाच्या पानावरुन पुढे...

आकाशानी टाकलेल्या या अक्षता हे मोरपीस गोळा करून साठवून ठेवतं त्याच्या रंगीबेरंगी डोळ्यात आणि जिवंत ठेवतं तो विरहाचा विहंगम सोहळा शतजन्मांतरी पुनर्भेटीच्या पळापर्यंत. त्या सोहळ्याचे सूर वर्तमानाचे कोलाहल शांत करत राहतात आणि परत एकदा पृथ्वीचे अंतरंग उमटू लागतात पाण्यावर तरंगणाऱ्या भास्कराच्या डोळ्यांतून...

~निखिल कुलकर्णी



गाज

जडत्वाची प्रौढी मिरवत धरतीचे दूत, सागराला आव्हान देत अखंड उभेच असतात, अव्याहत पणे.
तितक्याच स्पृहेने सागर देखिल आपल्या अगणित करांनी या धरतीच्या दूतांना खेळवत बसलेला असतो. आणि प्रत्येक क्षणाला जलाच्या प्रवाही वृत्ती पुढे धरतीचे जडत्व झीजत जात राहते.
सागराला चिरतारूण्याचे वरदान आहे. त्याला भेदाचा शापही नाही आणि वेळेचे बंधन सुद्धा. त्याचा प्रत्येक थेंब हे चिरतारूण्य घेऊन, अखंड होवून, अभेद्य होऊन नाचत राहतो अनादी कालापर्यंत निष्पाप, निर्व्याज मनाने!!
वास्तविक ज्या धरेने संपूर्ण सागराला धारण केले, त्या धरेचे हे सागराने केलेले कृतकृत्य पादप्रक्षालन आहे की आकाशात दूरवर निघून गेलेल्या चंद्राच्या ओढीने संतप्त होऊन केलेले निश:ब्द आक्रमण, हे सागरा इतकेच प्रशांत असे कालातीत गूढ आहे.
इवली इवली पाखरे त्यांच्या बोटभर पंखात मावेल तेवढं, चिमूटभर आकाश साठवून सागरावरून उडत जातात. तरी सागरापेक्षा त्यांचा जीव आकाशाच्या अथांगतेत जास्त रमत असावा. कधी लागलीच एखादी धाप, तर टेकवतात त्यांची करडी पाऊले त्या दूतांच्या अंगाखांद्यावर. पण ती देखिल या दूतांना सागराविषयी कधीच काहीच सांगत नाहीत. क्षणिक एक मूक साक्ष ठेवून, शेवटची भेट घेत असल्यासारखा कटाक्ष टाकत, आकाशातल्या अनंताकडे निघून जातात. त्यांच्या सावल्यांची रांगोळी दूतांच्या अंगावर काही क्षण उमटते दूतांच्या भविष्यासारखी आणि पुन्हा नाहीशी होते.
पाण्यातल्या माशांची देखिल काही वेगळी स्थिती नसते. क्षणिक पाण्याच्या पृष्ठावर येवून ते बिचारे एखाद क्षण किनारा न्याहाळत असतील देखिल. पण लगेचच, सूर्याच्या तेजाची अंगावर पडलेली चांदणी पाहून, दिपून जात, परत एकदा विहंगम लाटेत तोल जावून समतल अनंतात अदृश्य होत राहतात.
नाही म्हणायला सागरातल्या मृत वनस्पती थांबतात घटकाभर किनाऱ्याची वास्त पुसायला. कदाचित प्रशांत सागराच्या अंतरंगातली अविरत घुसमट, किनाऱ्यावर स्तब्ध उभ्या असलेल्या दूतांना त्या सांगत देखिल असतील त्या घटकेत. पण सागरावर धरेने केलेल्या उपकरांचे उन्मत्त वारे प्यायलेल्या त्या भ्रमिष्ट दूतांना ते निर्वाणीचे आर्त स्वर ऐकू तरी येत असतील का?
पुढच्याच लाटेत, आपले गुह्य उघड होण्याच्या अनामिक भीतीने सागर त्या मृत वनस्पतींना देखिल परत आपल्या अथांगात ओढून घेत राहतो हापापल्यासारखा.
अनिमिष नेत्रानी, सागरा सारखेच विशाल, निवळशंख तरीही हतबल आकाश, सागराला थोपवत राहते एका बाजूने. सूर्य आणि चंद्र हा अविरत योग फक्त पहात राहतात त्रयस्था सारखे, अस्फुट, अविचल!!
आता सागराची गाज सोडली तर इथे कुणीही कुणाला काहीच सांगू शकत नाही. धरतीचे दूत झीजतच राहतात अंता पासून अनंता पर्यंत...

~निखिल कुलकर्णी


Wednesday, October 18, 2017

नवसहस्त्र कोट

नवसहस्त्र कोट 
~ निखिल कुलकर्णी 

गेल्या वर्षी आपल्या नव्या पेशव्यांनी पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बंद केल्या. खूप वाईट झाले. आमचा नव सहस्त्र रुपयांच्या “काळ्या नोटा” (“काळा पैसा” नव्हे!!) कशा खपवाव्यात , याच्या विचारात गेले सहा महीने मेंदू कुरतडून गेला आहे. कधीतरी शुक्रवारी संध्याकाळी, व्हिस्कीचे २-३ पेग पोटात गेल्यावर उगाचच त्या नव सहस्त्रांची आठवण होते. वाईट वाटते. रिझर्व बॅंकेने स्वत: छापलेल्या नोटा, जेव्हा खुद्द रिझर्व बॅंकेने देखिल स्विकारल्या नाहीत, तेव्हा आम्हास, किंवा आमच्या नोटास, अगदी अनाथ आणि पोरके झाल्यासारखे वाटलेले आहे..

“मै धारक को पाच सौ रूपये अदा करने का वचन देता हूं।” असे त्या नोटांवर “हिंदी” मधे लिहीलेले वाक्य आणि खाली "नाना फडणवीस" अशी स्वाक्षरी, आम्ही खुद्द रिझर्व बॅंकेच्या दारावर बसलेल्या “माननीय, महोदय, साहेब वगैरे” असलेल्या,  चार फुटी इसमास वाचून देखिल दाखविले.  उगाच कुठल्या कुठल्या सेनेचे कार्यकर्ते आहोत असे वाटू नये म्हणून आम्ही, आम्हाला अवगत असलेल्या, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती, बंगाली वगैरे इतर सर्व राष्ट्रभाषा टाळून, “हिंदी” ची निवड केली होती. पण ते साहेब मराठी सारख्या भाषेतूनच गुरकावले. “रिजर बॅंकेच्या गोरनर कडे गेलात तरी तुमची नोट बदलून मिळाची नाय आता.. टायम संपला कवाच.. काय? निगा आता, टायम वेष्ट नका करू!!” असा अस्सल कोकणी आणि इंग्रजी मिश्रीत मराठी मधे आमच्यावर वार काढला. त्याचा चढलेला आवाज पाहून आजूबाजूचे २-३ बंदूक वाले पोलीस देखील तिथे दाखल झाले. त्यांच्या दंडावर काढलेली "म. पो." (म्हणजे "महाराष्ट्र पोलीस"!! "मला पोसा" नव्हे!) हि अक्षरे पाहून आम्ही अधिक धारिष्ट्य केले नाही. "वैष्णव जन तो तेणे कहिये जी..." असे गुणगुणत, गांधी खिशात मारत तिथून काढता पाय घेतला. साऱ्या प्रकाराने आम्हाला अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले. आमच्या नोटांना आणि त्यावरच्या गांधींना तर खिशात परत लोटले जात असताना, भर रस्त्यात आई-बापाने ओळख दाखवण्यासही नकार दिलेल्या, केस वगैरे पिंजारून, चकचकीत गॉगल लावून, गावात मोकाट फिरणाऱ्या मवाली पोरासारखे वाटले. आमचे तर असेही मत झाले आहे कि गांधी वध हि एक निव्वळ घटना नसून ती एक अखंड चाललेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात फक्त नथुरामाने केली आणि त्यानंतर हरेक ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा मधून गांधी हत्येचे परमिट मिळू लागले आहेत. त्याच्यात विशेष म्हणजे "खादी" आणि "खाकी" वाल्याना तर हे परमिट विनामूल्य उपलब्ध आहे. असेही आमचे एक मत झाले आहे.   

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. आमच्या स्मरणात असल्या पासून, हिरवा असो कि लाल, गांधींवर ताबा मिळवणे हे एक परम संतोषदायक असे ध्येयच आहे. मागच्या खेपेला देश सोडला तेव्हा शरयूच्या आजीने (म्हणजे आमच्या सासूबाई) शंकर आणि शरयूच्या हातावर एकेक हिरवा गांधी ठेवला आणि “विमानतळावर गोळ्या आणि बिस्किटे खा हं!” असे म्हणाली. आता तिला कशाला सांगायचे की विमानतळावर गोळ्या बिस्किटे मिळत नाहीत म्हणून!! मिळताहेत दोन गांधी तर का सोडा असा विचार करून आम्ही मनातून जाम खूष झालो होतो. रिक्षात बसल्या बसल्या आम्ही ते ताबडतोब आमच्या ताब्यात जवळजवळ हुसकूनच घेतले. शंकऱ्याने त्याची नोट लगेच दिली. पण शरयूने, तिला तिच्या आजीने सांगीतल्या सारखे "गोळ्या पाहीजेत" म्हणून हट्ट करायला घेतला. विमानतळावर भोकाड पसरले. "गोळ्या खाऊन दात किडतात" वगैरे सांगून बघितले. शेवटी तिथल्या बंदूकवाल्या 
"म. पो." ची भीती दाखवली. मग मात्र तिने मोठ्या नाखुशीनेच तिची नोट आम्हाला दिली होती. कुठल्याही स्थळी गांधींच्या हस्तांतरणासाठी बंदूकवाल्या "म. पो." ची गरज लागते याची आता आम्हाला खात्री पटलेली आहे. अर्थात नोट ताब्यात घेतल्यावर आम्हाला मात्र चंद्रावर चालल्या सारखे हलके हलके वाटत होते. अशा लेकरा-बाळांच्या तोंडातून काढून घेतलेल्या नोटांची आणि त्या वरच्या गाधींची त्या कारकुंड्याने रिझर्व बॅंकेच्या आवारात बंदुकीच्या जोरावर हत्या केली त्याचे वाईट वाटते.

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. गांधींनी देशासाठी "काय केले" किंवा "काय काय केले" हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे. पण आमच्या साठी बापू हे पानपट्टीपासून ते विमानतळावरच्या Duty Free दुकानांपर्यंत कायमच सोबत करत आलेले आहेत. त्या काळी साठ पैशाची गाय छाप घेऊन आम्ही राजरोसपणे दहा रूपयाचा गांधी पुढे करत असू. तेव्हा संभा पानट्टीवाला कळवळून विचारत असे की “साहेब सुट्टे नाहीत का?” म्हणून!! मनात विचार यायचा की काय करंटा माणूस आहे हा, गांधी दिले तर सुट्टे मागतोय हा!! मग आम्ही तांबडे गांधी परत आमच्या खिशात ठेवून, त्याला “मांडून ठेव” असा आदेश देवून पुढे कूच करायचो..संभाने मांडून ठेवले की नाही ते एका विश्वंभरास ठाऊक! परंतु आजही आम्हाला जेव्हा जेव्हा संभा पानपट्टीवाला आठवतो, तेव्हा देखील गांधी सोडून सुट्टे मागणारा संभा हा तितकाच दयनीय आणि दळभद्री वाटत आलेला आहे. त्याला भेटून त्याचे थकलेले खाते एकदाचे देऊन टाकावे कि काय, असाही एक विचार मनात येत असतो. परंतु केवळ गांधी प्रेमा पोटी आम्ही असे आत्मघातकी विचार मागे टाकत आलेले आहोत.

तुम्हाला सांगू का, आमच्या घराचा एक मोठा विचित्र प्रकार आहे. इथे दोन भारतीय पासपोर्ट राहतात आणि दोन अमेरिकन!! 
उगाच सुभाषबाबूंच्या आठवणीने गहिवरून जाल आणि त्या बारक्या मिशीवाल्याची स्तुती कराल तर खबरदार!! तुमचे मुंडके उडवले जाईल मानवतेचे हत्यारे म्हणून!! 
मागे असेच एकदा “आझाद हिंद” सेनेचे गोडवे आम्ही या जीभेने आमच्या घरी गायले होते. "इंफाळचा लढा", "जपानचा पाठिंबा",  जर्मनी, जपान, सुभाषबाबू वगैरे बद्दल त्वेषाने आणि अभिमानाने बोललो. मग काय विचारता महाराजा!! आमचीच खरड निघाली. 
त्यानंतर शरयूने पुढचा एक महिना आम्हाला Netflix वर कसल्या कसल्या documentary बघायला लावल्या. यात बहुतेक ज्यूंचे कसे हाल झाले, जर्मन कसा वाईट होता वगैरे सगळे मुद्देसूद वर्णन होते. डोके सुन्न होऊन गेले. 
देवा नारायणा, या घरात रहावयाचे कसे हाच मोठा प्रश्न आहे..

मागे एकदा आमच्या अमेरिकन शरयूने प्रश्न विचारला होता की तुमच्या देशाचे जाॅर्ज वाॅशिंग्टन कोण म्हणून.. काय उत्तर द्यावे याला!! तिला सांगितले कि बापू हेच आमचे जॉर्ज आहेत आणि म्हणूनच त्यांचे चित्र सर्व नोटांवर छापलेले असते. मग तिने विचारले कि कुठे कुठे युद्धे झाली वगैरे...

शेवटी तिला सांगितले कि 'दे दि हमे आजादी बिना खड़ग बिना ढाल' म्हणून!! मग ती पुढे काही फार बोलली नाही. पण तेव्हा पासून तिचे ब्रिटिशांबद्दलचे मत बदलले आहे. ब्रिटिशांनी भारताला असेच स्वातंत्र्य दिले आणि अमेरिकेला मात्र युद्ध करायला लावले असे वाटून ब्रिटिश हा एक अत्यंत घातकी आणि पक्षपाती माणूस आहे असे तिचे ठाम मत झाले आहे. अर्थात ब्रिटिशांबद्दल आमचे देखील अगदी असेच मत असल्याने, या बाप आणि लेकीमधल्या अभूतपूर्व एकमताबद्दल बापुंचेच आभार मानायला हवेत.     

अर्थात असे जरी असले तरी आमचे देखील मराठी रक्त आहे. मी सुद्धा घरात अमेरिकन पासपोर्ट वाल्याना सांगून टाकले आहे कि या घरात एलिझाबेथ राणीच्या तोतऱ्या बापाचे आणि चर्चिलचे गोडवे गाल तर याद राखा म्हणून!! येता जावळी जाता गोवळी!! शेवटी एकदा वचपा काढलाच. तिला सावरकरांची माहिती सांगितली. सावरकर म्हटले कि आमचा उर अभिमानाने भरून येतो. जितका आम्हाला बापूंबद्दल आदर आहे तितकाच स्वातंत्र्यवीरांविषयी देखिल आदर आहे. मग बोलता बोलता आम्ही तिला अंदमान, काळे पाणी, तिथल्या अभेद्य भिंती, त्या भिंतीवर लिहीलेली 'कमला' सारखी अद्वितीय काव्यें हे देखील सांगून टाकले. मग क्रांतिकारी म्हणजे काय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू वगैरे बरीच माहिती सांगितली. ते ऐकून ती म्हणाली कि मग भारताचे खरे जॉर्ज वॉशिंग्टन तर हेच स्वातंत्र्यवीर आहेत. म्हटले चला. भारतीय पासपोर्ट जिंकला एकदाचा!! पण पुढच्याच क्षणी म्हणाली कि यातल्या कुणाचे नोटेवर चित्र कसे नाही म्हणून!! अर्थात याचे उत्तर आम्हालाच काय पण आमच्या इतिहासाच्या मास्तरांना देखील देता येणार नाही याची आम्हाला खात्रीच आहे. शेवटी तिला काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले कि जर स्वातंत्र्यवीरांनी थोडी अमेरिकेशी दोस्ती केली असती, तर कदाचित तेच भारताचे पहिले पेशवे झाले असते म्हणून!! आणि मग अगदी हजार, दोन हजारच्या नाही तरी २५ पैसे, ५० पैसे, रुपया असल्या चिल्लर नाण्यांवर तरी त्यांचे चित्र आलेच असते. 
अर्थात नंतर असा विचार केला कि त्यांचे चित्र नोटांवर आणि नाण्यांवर नाही ते बरेच आहे. उगाच कशाला लोकांच्या पुठ्ठयाचा सहवास द्यायचा त्यांना!!

पण एकूण चर्चेअंती तिला भारताचा जॉर्ज वॉशिंग्टन एकदाचा सापडला याबद्दल ती खुश झाली आहे आणि "अमेरिकेचे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्व" ऐकून तर तिच्या अभिमानाला पारावर राहिलेला नाही.
 
आमच्या इथे येण्यामुळे दोन कट्टर अमेरिकन नागरिकांची निर्मिती होणार आहे याची बारीकशी जरी कल्पना असती तर आम्ही देखिल कर्वे रोडच्या पेट्रोल पंपावर गुपचूप रांगेत जाऊन उभे राहीलो असतो. या आमच्या गुन्ह्याबद्दल रायगडावरील छत्रपती आम्हाला कदापिही माफ करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच वाटू लागली आहे. आम्ही फक्त पोटापाण्यासाठी या देशात आलेली “साधी माणसे” आहोत. गांधी, सावरकर, वॉशिंग्टन आणि हिटलर यांचा आमचा संबंध फक्त इतिहासाच्या पेपरातल्या ४ मार्कां पुरता!! आमच्या साठी नोट हि फक्त देण्यासाठी असते. मग त्याच्यावर बापू असोत, नाहीतर जेफरसन त्याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही.  

त्यातल्या त्यात एक बरे म्हणजे नवसहस्त्र कोट गांधी बगलेत मारून आमचे थोर गांधीवादी गुरुदेव, आंग्लदेशात वानप्रस्थाला वास्तव्याला आलेले आहेत. त्यांचाच आदर्श आम्हीही ठेवून आहोत. आमच्याकडे नवसहस्त्र कोट सध्या उपलब्ध नसल्याने, तूर्तास
आम्ही अंगात कोट घालून त्याच्या खिशात आमच्याकडे कायमचे मुक्कामाला आलेले नवसहस्त्र गांधी ठेवून गुरुदेवांसारखेच आचरण (दिवसा आणि रात्री सुद्धा) करायचे निश्चित केले आहे. 

अर्थात हे थोडेसे, दाढी वाढली म्हणून शिवाजी होऊन फिरण्यासारखे आहे याची देखील आम्हाला कल्पना आहेच!!

~ निखिल कुलकर्णी

Monday, September 25, 2017

"एनाराय" एक अभिष्टचिंतन

"एनाराय" एक अभिष्टचिंतन
~निखिल कुलकर्णी
"एनाराय" हे "येनार हाय" याचे अमेरिकन रूप आहे असे आमचे मत आहे. तर या "एनाराय" लोकांचे अमेरिकातील योगदान तर स्तंभित आणि अचंबित करणारे असेच आहे. त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच वैद्यकीय या सर्वच क्षेत्रातील सहज आणि सुगम वावर, त्यांना मिळालेली पदे ही सर्व दृष्ट लागावी अशीच आहेत. त्यांच्या याच ज्ञानाचा, पराकोटीच्या जिद्दीचा, अद्वितीय व्यासंगाचा, धैर्याचा, झालेच तर चिकाटीचा, फायदा आपल्या गरीब देशाला व्हावा, अशा आशेने त्यांची वेडी माय, तिच्या गोतावळ्याला हा आपला परदेशी गेलेला नरपुंगव एक दिवस परत "येणार हाय" "येणार हाय" म्हणून वेड्या आशेने सांगताना आम्ही या कानानी ऐकले होते. तर ते एक असो!!
परंतु सांप्रत काळी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे अध्वर्यु, राजकुमार, वार्धक्यातही आपल्यातले शैशव जपत आलेले, असे सर्वांग सुंदर देखणे राष्ट्रपुरूष, अमेरिकेत आलेले आहेत. त्यांचा प्रगाढ व्यासंग, इतिहासाची सखोल जाण, देशाबद्दल तसेच अमेरिकेतील भारतीय नागरीकांबद्दल असणारी जाज्वल्य अशा प्रकारची निष्ठा, देशप्रेम, त्याग तसेच आंग्ल भाषेच्या, वाघीणीच्या दुधावर पोसलेली तल्लख बुद्धीमत्ता यांनी तर आसमंत दिपून गेलेला आहे. हा नेमक्या कोणत्या लोकीचा ("लौकीकाचा" असे वाचू नये) राजपुत्र आहे? असा प्रश्न आम्हाला सततच पडत आलेला आहे.
त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्या अलौकिक विचार मंथनातून बाहेर आलेल्या रत्नासम वाटत आलेला आहे. प्रेझेटेशनला जाणे म्हणजे प्रेझेंट घ्यायला जाणे यासारख्या नव्या नव्या संकल्पना ते अगदी लिलया मांडून जातात. तेव्हा तर या भाषाप्रभूला साष्टांग नमस्कार करावासा वाटतो. परंतु दुष्ट आणि असहिष्णू राज्यकर्त्यांच्या राज्यांत कदाचित या राजकुमाराला नमन केल्या बद्दल आमचीच मान मारली जाईल या भीतीने आम्ही तो मनातल्या मनातच करत आलेलो आहोत.
बांगला देशाच्या निर्मितीचा विषय असो किंवा हाताच्या निवडणूक चिन्हाला सर्व धर्मातील मोठमोठ्या देवानी दिलेल्या पाठिंब्यावरचे त्यांचे विवेचन असो, सर्वच अद्भूत आणि अगम्य आहे. त्या शिवाय मागील सभेत सांगीतलेला चमत्कार काहीच नाही असे वाटायला लावून या सभेत नवा चमत्कार सांगायची त्यांची विजीगीषू वृत्ती हे सुद्धा त्यांच्या क्षात्रतेजाला शोभेल असेच आहे.
याच एकाहून एक उत्तुंग विक्रम करण्याच्या मनस्वीतेतून परवा त्यांनी "एनाराय" या विषयावर देखिल त्यांचे शब्दमौक्तिक मुक्त पणाने उधळले आहेत. वास्तविक "एनाराय" या शब्दाकडे पाहून "एना" हा कानडी शब्द असून "राय" हा बंगाली शब्द वाटतो. त्यामुळे "रोजा" सिनेमातल्या "आसामसे गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक" याप्रमाणे गेल्या पन्नास एक वर्षात "एना से राय तक" मधल्या अनेकानेक गावातून जे लोक पोटापाण्यासाठी भारता बाहेर गेले ते "एनाराय" असे आम्हाला वाटत आलेले आहे. अर्थात प्रत्येकाच्या बुद्धीचा जोर हा ज्याच्या त्याच्या आई वडिलांच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असतो असे आम्ही कुठेतरी वाचलेच होते. पण आज राजपुत्राचे बोल ऐकून आम्हाला या बोलाची खात्रीच पटली आहे.
वास्तविक अमेरिकेत राहणारे सगळेच कुठून कुठून आलेले "एनार" च आहेत. कुणी "एनार इंग्लीश" आहे. कुणी "एनार जर्मन" आहे. कुणी "एनार जपानी" आहे तर कुणी "एनार कंबोडीयन" आहे. पण यातल्या एकाही "एनार" जमातीला बापू, चाचा, सरदार तयार करता आलेले नाहीत, हे कळल्या पासून तर "एनाराय" च्या आनंदाला पारावार राहीलेला नाही. वास्तविक सकाळी आठ ते पाच पर्यंत गुगल, ॲपल वगैरे कंपन्यात पडेल ते सर्व "पडेल" काम करून, मुलाला किंवा मुलीला शनिवारी मराठी नाहीतर कानडी शाळेत घेऊन जाणारा आणि त्यांनी "कोलन" चा का असेना, पण डाॅक्टर व्हावे म्हणून त्याच्या शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून जुन्या चड्डया आणि मोजे सहा सहा वर्षे वापरणारा "एनाराय" आता अचानक एका वेगळ्याच तेजाने आणि आत्मविश्वासाने झळाळून गेला आहे. या "एनाराय" लोकांचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान खुद्द राजस मुखातून ऐकून आपण एका केवढ्या मोठ्या तेजस्वी आणि दिव्य परंपरेचे भाग आहोत असे वाटून गहिवरून गेला आहे. आता "त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करत राहणार आहे." अशी प्रतिज्ञा देखिल काहीजणानी घेऊन टाकली आहे.
आमचे एक परममित्र "एनाराय" श्री. गणोजीराव, (गावाकडे यांना "आमचं गण्या" असे म्हणत) यांनी तर हे बोलणे इतके मनाला लावून घेतले आहेत की त्यांनी त्याच्या अमेरिकन चिरंजीवानी, घराबाहेर लावलेला अमेरिकन ध्वज काढून गुंडाळून तळघरात ठेवून दिला आहे. तसेच ते आता त्यांच्या घरापुरता भूभाग हा "स्वतंत्र" झाला आहे असे देखिल सांगू लागले आहेत. याच बरोबर त्यांनी अमेरिकन राष्ट्रध्वज छापलेले बनियन आणि चड्ड्या देखिल वापरायचे थांबवले आहे असे कळते. बुधवारांतून आणलेले लंगोट आणि बंड्या, ॲटीक मधून काढून, धुवून, उन्हात वाळवून, परत वापरायला काढायचा निर्णय निश्चित झालेला आहे.
त्यांच्या "ॲरन" नावाच्या मुलाला ते आता "अरूण" म्हणून हाक मारू लागले आहेत. आणि "स्विटी" नावाच्या मुलीला "स्वाती" म्हणू लागले आहेत. तसेच त्यांची मुले, अरूण आणि स्वाती, त्यांना जेव्हा "डॅड" म्हणून हाक मारतात तेव्हा तर त्यांनी ओ द्यायचे देखिल बंद केले आहे. "तो मी नव्हेच" असा चेहरा करून बसून राहतात.
एकूण या राजकुमाराच्या राजस बोलाने "एनाराय" लोकांमधे एक अत्यंत दुर्दम्य अशा राष्ट्रवाद आणि देशीवाद वाढीला लागला आहे.
या राजपुत्राची आणि त्याच्या बोलाची महती "एनार पाकिस्तानी" लोकांना देखिल पटली असून, "मुस्लिम लिगची" चळवळ देखिल "एनार पाकिस्तानी" लोकांनी चालू केली असे त्यांचेही मत झाले आहे. त्यामुळे तिकडेही "इद-ए-मिलाद" सारखे वातावरण आहे.
इतकेच काय पण अगदी उजव्या विचारांच्या,कडव्या लोकांना देखिल स्वातंत्र्यवीर देखिल "एनाराय" असल्याचे कळल्यापासून, त्यांना देखिल या राजपुत्राबद्दल वाटणाऱ्या असूयेत लक्षणीय घट झालेली आहे.
रस्ताच्या कडेला वडा पावची गाडी लावून, चार घरची धुणी-भांडी करून संसार चालवणाऱ्या एखाद्या दामूला, आणि त्याच्या सखूला, जर अचानक कळले की ते प्रत्यक्ष पेशव्यांच्या वंशातले असून, थोरल्या बाजीराव साहेबांचे तिसरे सुपुत्र, श्रीमंत जनार्दनराव पेशवे, हेच त्यांचे मुळ पुरूष आहेत, तर जी अवस्था होईल, तीच अवस्था आज "एनाराय" ची झालेली आहे. या एका वैचारीक पुनरूत्थानासाठी राजकुमाराचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.
पण आता दोन खोल्याच्या ब्लाॅक मधे राहणाऱ्या या दामूला आपला दरबार कुठे भरवावा, याचीच काय ती चिंता लागून राहीली आहे.
~निखिल कुलकर्णी

Sunday, September 3, 2017

विल्यम कचरू डिसूझा

एक नविन लघु कथा "विल्यम कचरू डिसूझा" 

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर शंभरेक बसक्या कुडाच्या घरांची एक वस्ती होती 'वड्डी' म्हणून. बरीचशी घरे कानडीच होती. त्यांना मराठी पण येत असे. गावाच्या जवळून एक वाळत घातलेला ओढा कृष्णेला जाऊन मिळत असे. त्या ओढ्याच्या अंगाला वसलेली घरे म्हणून त्याला 'वड्डी' असे नाव मिळाले असावे. या ओढ्याला पाणी आलेले कधी कुणी पाहिलेले नाही. एक मोठाच मोठा लांब, तापलेल्या वाळूचा आणि खडकांचा ओबडधोबड असा तो अजगरासारखा पसरलेला पट्टा होता इतकेच! त्याच्यात गावातली पोरे खड्डे करून पाणी मिळवायची. गुरे मोकाट हिंडत असत. गावाच्या खालच्या बाजूला तर ओढ्याचा निव्वळ हागणदारी साठी उपयोग केला जाई. त्याच्या बाजूलाच एक पत्र्याची शेड करून घेतली होती. मागच्या वेळी आमदार साहेब आले होते तेव्हा त्यांनी 'हिंदू स्मशानभूमी' असा एक पत्र्याचा बोर्ड लावून त्याचे उदघाटन केले होते. गावातली बहुतेक घरे हिंदूच होती. तरणी ताठी लोकं कधीच गाव सोडून पोटापाण्यासाठी मोठ्या मोठ्या शहराकडे निघून गेली होती. आता बहुतेक सगळी म्हातारी, खंगलेली, पोटे पाठीला लागलेली मंडळी गावात राहिली होती. 

गावाचा मुख्य व्यवसाय शेती. सगळा कोरडवाहूच कारभार होता. गावातली खवट म्हातारी तर रंगात आली कि म्हणायची "त्या वड्याचे पानी तर धुवायला दिकून पुरत नाही!!". दुसरा व्यवसाय होता चामडी कमावण्याचा. गावात तशी गुरे कमीच. पण आजूबाजूच्या गावात कुठेही जनावर मेलं कि त्याला चाकाच्या गाडीवर घालून गावात आणायचे. मग त्याची खांडोळी करून त्याचे वाटे केले जायचे. आणि मग त्याची चामडी काढून ती सरसाच्या द्रवात भिजत घातली जायची. त्याचा उग्रट, कुबट दर्प वस्ती मध्ये भरून राहिलेला असे. नवख्या माणसाला तर त्या वासाने जागेवर उमाळून यायचे. गावाच्या बाजूने एक मोठा रस्ता जात असे. त्या रस्त्यावरून जाणारी माणसे देखील गाव सुरु झाले कि नाक बंद करून प्रवास करीत असत. पण गावातली अर्ध्याहून अधिक घरे याच व्यवसायात राबत असत. कमावलेले चामडे मग घड्या करून अथणीला नाहीतर कोल्हापूरला पाठवले जायचे. त्याच्यातून काय कमाई होईल ते सगळे गाववाले वाटून घेत असत. ज्याच्या त्याचा वाटा ज्याच्या त्याच्या जाती प्रमाणे ठरलेला होता. गावात म्हसोबाचे एक टेकडे होते. त्याच्या बाजूला मोठा वड होता. शनिवारी, अमावास्येला, पौर्णिमेला काहींना काही निमित्त काढून म्हसोबाला कोंबडे कापले जायचे. त्या कोंबड्यांच्या पिसांनी सगळा पार भरून गेलेला असे. किती तरी नवस कोंबडा मारून फेडले जात. एखादा जीवघेणा आजार सुद्धा म्हसोबाला कोंबडे कापून बारा होतो अशी गावाची श्रद्धा होती. गावात एखादे लग्न झाले कि नवीन जोडपे म्हसोबाला पाया पडून नैवेद्य दाखवून येई. गावातले कुणी गेले तरी देखील त्याच्या तेराव्याला म्हसोबाला कोंबडा ठेवला जायचा. 

म्हसोबाला वळसा घालून थोडे पुढे गेल्यावर एक सतीची समाधी होती. कधीतरी सोळाव्या शतकात कुठलीतरी बाई इथे सती गेली होती. तिची आठवण म्हणून वाल्मिकची बाई निर्मला इथे रोज दिवा लावून जात असे. या सतीच्या समाधीवर वर्षातून एकदा साफसफाई करून तांबडीभडक काव लावली जाई. त्याच्यावर चुन्याची स्वस्तिके आणि गाईची खुरे काढली जायची. सतीच्या समाधीवरून स्मशानात जळणारी चिता अगदी स्पष्ट दिसत असे. 

निर्मला बोलवाडची. वड्डी पासून गाडीने वट्ट एखादा तास लागायचा. घराची शेती वाडी होती. गुरं ढोरं  होती. येताना तिच्या बापानी तिला चांदीचे मंगळसूत्र करून घातले होते. निर्मलाचं वाल्मिक बरोबर लग्न झालं तेव्हा निर्मला होती ९ वर्षाची आणि वाल्मिक होता २३ वर्षाचा!! त्यांचा जोडा भलताच विजोड दिसत होता. गावातली सगळी लोकं हसायची. ओढ्यावर पाणी भरायला गेली तर सगळ्या बाया निर्मलाला फिदीफिदी हसत. घालून पडून बोलत. "वाल्मिक तिचा बाप शोभतो" असं म्हणत. आधी आधी निर्मलाला खूप वाईट वाटत असे. घरी येऊन वाल्मिकच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून ती रडायची. कधी कधी वाईट वाटून घेऊन घेरी येऊन बेशुद्ध पडत असे. मग वाल्मिक आणि त्याची माय तिची समजूत घालत. वाल्मिक तिला सायकलवर घालून रेल्वे रुळाच्या बाजूला फिरवून आणायचा. सतीच्या समाधीच्या बाजूला एक सोनचाफ्याचे झाड होते. त्याला मुबलक फुले लागत. त्या झाडाखाली बसून दोघे मग फुले गोळा करत. त्याचे दोन गजरे करत. एक सतीला वाहत आणि एक निर्मलाच्या केसात!! मग हसत हसत दोघे अंधारायच्या आत घरी जायची. 

वाल्मिकचं घर म्हणजे तरी काय, तर दोन खोल्यांचं एक कुडाचं झोपडं होतं. जागोजागी ठेपे लावून छप्परावरचे, वाळलेले गवताचे भारे असे थोपवून धरलेले असत. पावसाच्या महिन्यात वाल्मिक त्याच्यावर मोठी ताड पत्री घालत असे. तरी त्याच्या भोकातून सगळभर गळत असे. भिंती आणि जमीन शेणमातीने सारवलेली असायची. भिंतीवर कसल्या कसल्या नक्षा काढलेल्या असत. बाजूला चुलखंड होतं. त्याच्या बाजूला सुक्या लाकडाच्या ढलप्या ठेवलेल्या असत. वाल्मिकची आई सकाळी चाराला उठे आणि तेव्हापासून घर धुराने भरून जायचे. बाजूला दोरीवर कपडे वाळत घातलेले असायचे. जुनी धडुते आणि चिरगुटे जोडून जोडून गोधड्या शिवलेल्या असायच्या. वाल्मिकच्या आईला हि कला अवगत होती. ती निर्मलाला बरोबर घेऊन दिवसभर शेजार पाजारच्या गावातून चिंध्या, जुनी फाटकी कापडे गोळा करून आणायची. ती धुवून घेत. त्याचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करून, मग परत वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकमेकांना शिवून घेत. वाल्मिक जेव्हा चामडे विकायला शहरात जायचा तेव्हा निर्मला त्याच्या बरोबर अशा ४-२ गोधड्या घेऊन जात असे. त्याचे पैसे बघून निर्मलाचे डोळे चमकून उठत असत. मग वाल्मिकच्या आईला नवीन लुगडं, नाहीतर एखादी नवीन परात नाहीतर एखादे पितळ्याचे भांडे बाजारातून घेऊन ती घरी यायची. 

पुढं मग निर्मलाला दिवस गेले. पहिला मुलगा झाला. गुरुवारी झाला, म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं दत्तू. मग दोघे दत्तूला घेऊन बाजारला जायला लागले. बाजार झाल्यावर त्याला सुरकी, टोपडी घेत. हिरवे, तांबडे खुळखुळे घेत. त्याच्या पायात घालायला चांदीचे तोडे करून घेतले तेव्हा तर निर्मलाला आभाळ ठेंगणे झाले होते. "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं पायात चांदीचे तोडे घालणारा!!" असं वाल्मिक त्याला कौतुकानं म्हणायचा. वाल्मिकची माय पण तोंड भरून दत्तूचे कौतुक करत असे. त्याला नजर लागेल का काय म्हणून काजळ, तीट, बटटू लावायची. मीठमोहऱ्या ओवाळून टाकायची. त्याच्या वाढदिवशी म्हसोबाला कोंबडं देऊन यायची. 

दत्तू चार वर्षाचा झाल्यावर निर्मलाला परत दिवस गेले. यावेळी मात्रं लक्षण वेगळं दिसत होतं. निर्मलाला खूप दम लागायचा. मधेच डोके गच्चं धरून बसायची. श्वास कोंडल्यासारखे व्हायचे. कुणाला सांगायची देखील सोय नव्हती. वाल्मिकच्या म्हातारीने अंथरूण धरले होते. ती दिवस रात्र खोकून बेजार व्हायची. कण्हायची, रडायची, भेकायची. आणि शेवटी एक दिवस तिने डोळे मिटले. ती गेली तेव्हा सगळा गाव गोळा झाला होता. बाजूच्या गावातून देखील बाया येऊन बघून जात होत्या. शेवटी तिला खुर्चीवर बांधून बसवून नेलं स्मशानात. तेव्हा तर पार सतीच्या ओट्या पर्यंत गर्दी झाली होती. आठ महिन्याचं पोट घेऊन निर्मला देखील सतीच्या ओट्या पर्यंत जाऊन आली. डोळ्याची धार थांबत नव्हती. घरी आल्यावर एका कुडाला पाठ टेकून वाल्मिक शुन्याकडे बघत बसून होता. समोरच्या कुडाला टेकून निर्मला बसली होती भिंतीवरच्या गोधडी कडे बघत!!

या वेळी निर्मला फार दडपून गेली होती. छातीवर कसले तरी मणाचे ओझे असल्यासारखी हापत होती. वाल्मिक म्हसोबाला नवस बोलून आला होता. तरी निर्मलाची अवस्था बघून त्याला काही सुधरत नव्हते. जशी वेळ जवळ आली तशी वाल्मिक ने बाजूच्या गावातली सुईण बोलावली आणि निर्मलाची सुटका केली. बाळ आणि बाळंतीण दोघी सुखरूप बघून वाल्मिकच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. लगोलग नवसाची फेड करून आला. मोठ्याच अडचणीतून सुटका झाली असे वाटून त्याचे नाव ठेवले "उत्तम"!!

हळूहळू जगण्याचा धीर वाढू लागला. निर्मला मग परत सतीला दिवा लावायला जाऊ लागली. एकेक इयत्ता करत दत्तू शाळा पास होत गेला. गावातली शाळा संपली म्हणून तालुक्याला मिरजेच्या शाळेत गेला. तिथून शहरात गेला. आणि शेवटी एकदा मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये त्याला शिकण्यासाठी प्रवेश मिळाला. त्याची प्रगती बघून वाल्मिक खुळा व्हायचा राहिला होता. गावात भेटेल त्याला सांगायचा कि "माझा दत्तू मुंबईला आता मोठा साहेब होनार म्हणून!!". निर्मलाही हरकून जायची. पण त्याच्या शिक्षणाचा खर्च, प्रवासाचा, राहायचा खर्च कसा करायचा याच्या विचाराने तिला रात्र रात्र झोप लागत नसे. वाडवडिलार्जित जमिनीचा तुकडा विकून टाकला. त्यातून पैसे आले त्यातून दत्तूला सफारी शिवली होती. तेव्हा देखील वाल्मिक कौतुकाने म्हणाला कि, "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं सफारी घालणारा!!". त्याचा खर्च भागावा म्हणून आता निर्मला अजून चार गावात जाऊन चिंध्या गोळा करायला लागली. त्याचे भारेच्या भारे डोक्यावरून, उन्हातान्हातून घेऊन यायची. रात्र रात्र जागून त्याच्या गोधड्या शिवायची. अंगुस्तान घालून घालून तिच्या बोटातून रक्त निघायचे. बसून बसून पाठीचा कणा पार वाकून गेला होता. 

इकडे उत्तमचे काही अभ्यासात लक्ष नसायचे. तो आपला दिवसभर शेळ्या घेऊन ओढ्याच्या बाजूला हिंडत बसायचा. मधेच ओढ्यात खड्डे काढून त्याच्यात खेकडे धरायचा. त्याच्यात त्याच्या एका दोस्ताने त्याला साप पकडायला शिकवले. मग त्याचाच नाद घेऊन बसला. सतीच्या बाजूला सोनचाफ्याच्या गचपणात तासंतास दबा धरून बसायचा. एखादी धामण, नाहीतर घोणस बघून ठेवायचा. मग तिचा माग काढत काढत तिच्या बिळापर्यंत जायचा. आणि नकळत एखादी वाळलेली काटकी उचलावी तसा तो साप जिवंत पकडायचा. गावातल्या पोरांना त्याचं कौतुक होतं. पण निर्मलाला भारी भीती वाटायची. "काय सांगा एखादवेळी नेम चुकला तर संपलाच खेळ!!" या विचाराने ती खूप घाबरी व्हायची. पण बोलायची सोय नव्हती. आणि एक दिवस उत्तमचा मित्र धनाजी कुडाकडे धावत आला आणि त्याने निर्मलाला सांगितले कि उत्तमला साप चावला म्हणून!! 

त्या बातमीने निर्मलाचे अवसानच गळून गेले. डोळ्यापुढे अंधारी आली. आणि ती उभ्या जागी दारातच कोसळली. मग धनाजीने वाल्मिकला बोलावून आणले. गावातली ३-४ माणसे पुढे आली. निर्मला बोलत नव्हती. काही हालचाल होत नव्हती. मग सगळ्यांनी गाडी करून तिला मिरजेला हॉस्पिटल मध्ये न्यायचे ठरवले. हा सगळा गलका चालू असताना तिकडून उत्तम चालत आला. निर्मलाला गाडीत घालताना बघून तर त्याला काही कळेचना. त्याला बघितल्यावर तर वाल्मिकने त्याला मिठीच मारली. मग उत्तमने  त्याला सगळी हकीकत सांगितली कि तो आणि धनाजी एक साप धरत होते म्हणून. धनाजीचा चुकून त्या सापावर पाय पडला आणि तो साप उत्तमला चावला. ते बघून धनाजी पळत सुटला. पण उत्तम ने धीर करून त्या सापाला धरले. आणि मग कळले कि ती धामिण होती म्हणून!! आणि एवढे सांगून उत्तम हसायला लागला. वाल्मिकला काही सुधारत नव्हते. त्याने उत्तमच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे जण निर्मलाला घेऊन गाडीत बसले.

मिरजेत एक अगदी नावाजलेले हॉस्पिटल होते. निष्णात डॉक्टर, सेवाभावी नर्स आणि अद्ययावत मशिनरी होती. या दवाखान्याला अमेरिकेतून आणि युरोपातून पैसा मिळायचा. त्यामुळे मिरजेच्या आजूबाजूच्या गावातून बहुतेक गोरगरीब लोक इथेच उपचाराला यायचे. त्याची ख्याती ऐकून वाल्मिक निर्मलाला घेऊन इथे आला. डॉक्टर जॉर्ज म्हणून कुणीतरी होते. त्यांनी निर्मलाला तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि तिच्या हृदयाला एक भोक आहे म्हणून. त्यांनी वाल्मिकला बोलावून घेतले. त्याला सगळ्या परिस्थीतीची कल्पना दिली. खूप मोठे आणि अवघड ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. वाल्मिक खाली मान घालून ऐकत होता. सारखा डॉक्टरांच्या पाया पडत होता. डोळे पुसत होता. मानेने होकार देत होता. बोलता बोलता डॉक्टरांनी त्याचा धर्म, त्याची जात, त्याची आर्थिक स्थिती याचा अंदाज घेतला आणि मग डॉक्टरनी गोर्डे म्हणून एक नर्स होत्या त्यांना बोलावून घेतले.
 
गोर्डे बाईंबरोबर डॉक्टर काय बोलले ते वाल्मिकला कळले नाही. मग डॉक्टर गेल्यावर गोर्डे बाईंनी वाल्मिकला समजावून सांगायला घेतले. त्याला त्यांनी सांगितले कि हे खूप खर्चिक ऑपरेशन आहे म्हणून. आणि ते अगदी लवकरात लवकर करावे लागेल म्हणून. त्या साठी लाखो रुपये लागतील. ते सगळे ऐकून वाल्मिक अगदी सुन्न होऊन गेला. आता हे सगळे कसे जमायचे या एकाच प्रश्नाने त्याला ग्रासून टाकले होते. 

तेवढ्यात गोर्डे बाईंनी एक कागद समोर धरला. आणि सांगितले कि जर वाल्मिकने त्या कागदावर सही केली तर त्याला कशाचीही काळजी करायची गरज नाही. त्याने जर सही केली तर निर्मलाचे ऑपरेशन अगदी विनामूल्य आणि लगोलग होईल असेही आश्वासन दिले. वाल्मिकला काही सुचेना. हा कसला कागद आहे? याच्यावर काय लिहिले आहे? माझी जमीन तर मी कधीच विकली. आता माझ्या जवळ लिहून देण्यासारखे काय आहे? याची उत्तरे त्याला सापडेनात. मग गोर्डे बाईंनी त्याला सांगितले कि तो धर्मांतराचा कागद आहे म्हणून!! वाल्मिकने फक्त लिहून द्यायचा अवकाश कि तो धर्मांतराला तयार आहे म्हणून आणि लगोलग निर्मलावर उपचार सुरु होणार होते. वाल्मिक क्षणभर चरकला. पिढ्यांपिढ्या जो धर्म लावला तो आज अचानक सोडून द्यायचा या विचाराने त्याला अपराधी वाटले. तो विचार करत होता तेवढ्यात उत्तम तिथे आला आणि वाल्मिकने त्याला त्या कागदविषयी विचारले. उत्तम म्हणाला कि उठवा बिनधास्त अंगठा म्हणून!! नाहीतर "हिंदू म्हणून काय पेढे बर्फी खायला मिळती आहे का काय तुम्हाला?" असेही विचारून गेला. उत्तमचा सल्ला आणि निर्मलाचे मिटलेले डोळे पाहून वाल्मिकने त्या कागदावर डाव्या हाताचा अंगठा उठवला. गोर्डे बाईंचा चेहरा उजळून निघाला. त्यांनी तात्काळ फर्मानं सोडली. वार्ड बॉय आले. नर्स आल्या. त्यांनी निर्मलाला स्ट्रेचरवर घालून लगबगीने ऑपरेशन थेटर कडे नेले. डॉक्टर जॉर्ज देखील ऑपरेशन चा सूट घालून काही मिनिटात हजर झाले. वाल्मिकच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रभू येशू दयाळू आहे. आणि तो सर्वांची काळजी घेतो म्हणून सांगून गेले. वाल्मिक काही कळण्याच्या पलीकडे गेला होता. ऑपरेशन थेटर चे दार बंद झाले आणि वाल्मिक आपल्याच घोणेत मुंडी घालून मुसमुसत बसून राहिला. कसला धर्म? आपला धर्म कोणता होता? आपल्या मायला, हिंदूच्या स्मशान भूमीत नेऊन जाळण्याच्या पलीकडे आपण हिंदू धर्माचे म्हणून काय केले? आज आपण ख्रिश्चन झालो म्हणजे काय झाले? कागदावर अंगठा उठवल्यावर अचानक सगळे खर्च कसे काय माफ झाले? येशू कोण? तो अचानक दयाळू कसा झाला? असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते. पण त्याहून महत्वाचा प्रश्न होता निर्मला बारी होईल ना हाच होता. त्याच विचारात त्याचा कधीतरी डोळा लागला. 

त्याला जेव्हा जाग आली तेव्हा डॉक्टर जॉर्ज त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवत होते. निर्मला कशी आहे? निर्मला कशी आहे? असे तो परत परत विचारत होता. तेवढ्यात स्ट्रेचर वरून निर्मलाला वार्ड बॉय बाहेर घेऊन येत होते. निर्मला तशीच शांत झोपली होती. तिला बाहेर येताना पाहून वाल्मिकचा बांध फुटला. आणि तो हमसून हमसून रडू लागला. बाजूलाच गोर्डे बाई पण उभ्या होत्या. येशूने कृपा केली. सगळे व्यवस्थित पार पडले म्हणून सांगत होत्या. हळू हळू निर्मलाची तब्बेत सुधारत होती. टाके आणि जखमा भरून निघत होत्या. महिन्याभरात ती हिंडू फिरू लागली. आता डॉक्टर कधी एकदा घरी जायला सांगतात त्याची सगळे वाट बघत होते. 

आणि अचानक एक पाद्री निर्मलाला भेटायला म्हणून आला. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गळ्यात चार दोन काळ्या मण्यांच्या माळा, त्याच्यावर एक चार दोन क्रॉस असा सगळा पोशाख भरून वाल्मिक गडबडूनच गेला.  मग त्या पाद्रीने वाल्मिकला पुढचा कार्यक्रम सांगितला. दोन दिवसांनी वाल्मिक, उत्तम आणि तो पाद्री इचलकरंजीला गेले. तिथे विजापूर रस्त्यावर जरा आड बाजूला एक पाण्याचा तलाव होता. तिथे फारशी रहदारी नसायची. त्या तलावात गुडघाभर पाण्यात २ पाद्री आणि २ सिस्टर उभ्या होत्या. वाल्मिक सारखे इतरही बरेच जण तलावाच्या बाजूला रांगेत उभे होते. तो तलावातील पाद्री एकेकाला नाव घेऊन पाण्यात बोलावत होता. एकेक करत त्यांनी वाल्मिकला पाण्यात बोलावले. त्याला एका वाटीतून वाईन प्यायला दिली. मग एक अत्यंत कुबट वासाचा पावाचा तुकडा त्याला खायला दिला. डोक्यावरून तांब्याभरून कसले तरी पाणी ओतले. त्यातल्याच एका पाद्र्याने वाल्मिकला सांगितले कि आज पासून त्याचे नाव "विल्यम कचरू डिसुझा" झाले आहे म्हणून!! आणि मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या.

वाल्मिकला वास्तविक त्याचे काहीच वाटले नाही. त्याला परत घरी जायचे वेध लागले होते. संध्याकाळी तो परत मिरजेला आला. आणि २-३ दिवसात निर्मलाला घेऊन परत वड्डीला आला. गावात आल्यावर दोघेही म्हसोबाला डोकं टेकवून आली. नवस बोलला होता तसा एक तुर्रेवाला काळा कोंबडाही त्याने दिला. गाव जेवण घातले. त्या दिवशी वाल्मिक आणि निर्मला खूप खुश दिसत होती. गावात कुठेतरी बोलताना उत्तमने मग घडलेली हकीकत त्याच्या मित्रांना सांगितली. निर्मलाला मिरजेला कसं नेलं, तिथल्या डॉक्टरनी कसं तपासलं, मग कसल्या फॉर्म वर सही घेतली, मग ऑपरेशन कसं झालं आणि हे झाल्यावर त्याने गंमत म्हणून इचलकरंजीची गोष्ट पण सांगितली. ते पाद्री कसे बुटके होते आणि त्यांनी कसले घाणेरडे पाव खायला दिले ते पण सांगितले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. गावातल्या पंचांनी वाल्मिककडे चौकशी केली. त्याचे नाव "विल्यम" झाले का ते विचारले. घाबरत घाबरत वाल्मिकने जे सुचेल ते सांगून टाकले. मग पंचांनी जात पंचायत बोलावली. झाल्या प्रकारची चौकशी झाली. त्या दिवशी उत्तम पण चौकशीला हजर होता. त्याने पंचांना अर्वाच्य शिव्या दिल्या. निर्मला दवाखान्यात मरणाच्या दारात ताटकळत होती तेव्हा कुठे होती तुमची जात पंचायत म्हणून तो वाट्टेल ते बोलला पंचांना. वाल्मिकने पंचांची माफी मागून बघितली. पाया पडून बघितले. कशाचा काही उपयोग झाला नाही. आणि त्या दिवशी वाल्मिकला पंचांनी जातीतून काढून टाकले. सगळे एकेक करत घरी निघून गेले तरी वाल्मिक आणि निर्मला बराच वेळ तिथेच बसून होती. 

झाल्या प्रकाराने उत्तम मात्र भडकला होता. तशात त्याच्या मित्रांनी पण त्याला 'बाटगा, बाटगा' म्हणून हिणवयाला सुरुवात केली. त्याने तो अजूनच धुमसायला लागला. अशाच तिरीमिरीत त्याने मिरज गाठले. तिथल्या पाद्रीला जाऊन त्याने सगळी कहाणी सांगितली. पाद्रींने त्याला येशू दयाळू आहे. तो सर्व ठीक करेल वगैरे सांगून बघितले. पण उत्तम काही ऐकेना. उत्तम ने त्याला वड्डीला घेऊन जायचा हट्ट धरला. शेवटी एका रविवारी वड्डीला येण्याचे आश्वासन घेऊन उत्तम घरी परतला. आता उत्तम त्या पाद्र्याच्या स्वागताची तयारी करू लागला. तो कधी एकदा येतोय आणि आपण कधी एकदा गावातल्या लोकांचे  उट्टे काढतोय असे त्याला झाले होते. शेवटी एकदाचा तो पाद्री उत्तमच्या घरी आला. त्याने त्याला सगळा गाव हिंडून दाखवला. कोण कुठे राहतो, काय करतो याची बित्तम्बात त्याला पुरवली. गावातल्या लोकांनी देखील उत्तमला त्या पाद्री बरोबर फिरताना पाहिले. आता तो पाद्री दर रविवारी गावात यायला लागला. गावात अजून ४-२ जणांना त्यांनी ख्रिश्चन करून टाकले. त्यांच्या संगतीने त्यांनी एका जागेवर कुंपण घातले आणि त्याच्यावर पत्र्याची पाटी लिहिली कि "ख्रिश्चन स्मशानभूमी" म्हणून! मग त्या नंतर गाववाल्यानी उत्तमला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी याच्यावर उपाय म्हणून त्या पाद्र्याने उत्तमला आणि त्याच्या नवीन ख्रिश्चन मित्रांना घरातले देवाचे फोटो आणि मूर्ती गटारीत नेऊन ठेवायला सांगितल्या. आणि ज्या रविवारी पाद्री यायचा होता, त्या दिवशी उत्तमने त्याच्या घरातले देव, घरा समोरच्या गटारीत मांडून ठेवले. ते बघून तर गावातल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. आणि त्यातल्याच काही धडधाकट माणसांनी उत्तमची आणि त्या पाद्र्याची गचांडी धरली. पाद्री जीव वाचवून पळून गेला आणि उत्तमला लोकांनी मरेपर्यंत मारला. उत्तम कसा तरी खुरडत खुरडत घरी येऊन पोचला. त्याची अवस्था पाहून शेवटी वाल्मिकने दत्तूला तार करून बोलावून घेतले. दत्तू आला आणि मग त्याला हि धर्मांतराची बातमी गावातल्याच कुणीतरी सांगितली. दत्तूला दुःख झाले. आपल्या अपरोक्ष एवढ्या घटना घडल्या म्हणून तो आधी वाल्मिकवर भडकला. दत्तूने त्याची चांगलीच खरड काढली. वरतून त्याला हे पण सुनावले कि केवळ वाल्मिकने धर्म बदलला म्हणून दत्तूचा धर्म बदलला असे होत नाही. त्याची हि मग्रूर उत्तरे पाहून शेवटी उत्तमने त्याला निर्मला दवाखान्यात होती तेव्हा तू आणि तुझा धर्म कुठे होतात म्हणून विचारले. हे सगळे असह्य होऊन निर्मलाने डोळे मिटून घेतले ते कायमचेच!! दुसऱ्या दिवशी सकाळी वाल्मिक जेव्हा निर्मलाला उठवायला गेला तेव्हा त्याला कळले आणि त्याला शब्दच फुटेनात. 
बऱ्याच वेळाने त्याने उत्तम आणि दत्तूला निर्मला गेल्याची बातमी सांगितली. तरी दोघेही त्यांच्याच तंद्रीत होते. उत्तमने गावातली ख्रिश्चन मित्र बोलावले आणि दत्तूने हिंदू. मग त्यांनी मिळून निर्मलाची अंत्य यात्रा काढली. जेमतेम सतीच्या समाधीपर्यंत पोचले असतील नसतील, मग त्यातल्याच एकाने शंका काढली कि निर्मलाला हिंदू स्मशानात न्यायाचे कि ख्रिश्चन स्मशानात!! परत एकदा वादाला तोंड फुटले. निर्मलाच्या देह सतीच्या समाधीवर ठेवून जोरजोरात तंडायला सुरुवात झाली. काठ्या आणि तलवारी निघाल्या. रक्ताचे सडे पडायला लागले. 

वाल्मिकीने निर्मलाचे डोके मांडीवर घेतले. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि त्या पाद्र्याने दिलेला क्रॉस दोन्हीही काळवंडून गेले होते. आता वाल्मिकला काहीही ऐकू येत नव्हते. काहीही दिसत नव्हते. त्याने तिथलीच सोनचाफ्याची फुले गोळा केली. काही फुले सतीला घातली आणि काही निर्मलाला!! त्याच्या बाजूने एक काळीकुट्ट धामिण सळसळत निघून गेली.  

~निखिल कुलकर्णी