Tuesday, April 9, 2019

शाहीर

शाहीर
~निखिल कुलकर्णी
त्या दिवशी सकाळीच कोडोलीकर गल्लीच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी जमा व्हायला लागली होती. गल्लीचे रस्ते झाडून घेतले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूना पाणी शिंपडून घेतले होते. गल्लीतली तरुण पोरे दादासाहेब कोडोलीकरांच्या देखरेखीखाली एकेक काम निमूटपणे करत होती. इतकी गर्दी असून देखील कसलाही आवाज, गोंगाट नव्हता. मुक्याने तिरडीच्या काठ्या बांधायचे काम चालू होते. मधेच एखाद्याला हुंदका अनावर व्हायचा तेवढाच काय तो आवाज. हार, फुले, पांढरी कापडे, डोंबलाचे मडके एका बाजूला आणून ठेवले होते. गल्लीतली मोठी मोठी माणसं सुद्धा रस्त्याच्या कडेला घोणेत मुंडी घालून मिशन हॉस्पिटलच्या दिशेकडे डोळे लावून शाहिरांची वाट बघत बसली होती. शाहीर वामनराव आज सकाळी देवाघरी गेले. "धन्य तो धन्य शिवाजी झाला" म्हणत डफावर मारलेली मर्द मावळ्याची थाप आज कायमची शांत झाली होती. महाराणा प्रतापाचा, अफझलखान वधाचा, राणी चेन्नम्माचा, वीर सावरकराचा आणि हुतात्मा भगतसिंगाचा पोवाडा कायमचा थांबला होता. मिरज नगरपालिकेची गाडी वामनरावांना घेऊन आली. तिचं मागच्या बाजूचं दार उघडलं तसं गर्दीचा लोंढा खिन्न मनाने एक एक करत आत शिरू लागला. कित्येक म्हातारे तर गाडीची पायरी सुटून धडपडले देखील. पण आपले शांत झोपलेले शाहीर पाहून त्या गर्दीला कशाचंही भान राहिलं नव्हतं. वामनरावांचा तो पिवळाफटक चेहरा पाहून तर बायका पुरुष धाय मोकलून रडू लागली. कुणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. गर्दी इतकी झाली कि वामनरावांची पत्नी, जिला सगळी "जीजी" म्हणायची, तिला देखील आत जाता येईना. शेवटी तिनं दारातूनच शाहिरांना पाहिलं.. त्यांच्या पावलांवर हात ठेवून काहीही न बोलता तशीच बसून राहिली शून्यात पाहात कितीतरी वेळ..
वास्तविक वामनराव मुळचे, कोल्हापूर जवळ हेर्ले म्हणून गाव आहे तिथले कुलकर्णी. तिथं थोडी जमीन होती. शेतात एक विहीर होती. एक दोन खणाचं दोन खापी घर होतं. खायला, प्यायला आणि पांघरायला काही कमी नव्हतं. सख्खे, सावत्र, चुलत, दत्तक, पै, पाव्हणा म्हणत शंभर एक डोकी एका छताखाली नांदत होती.

पण पुढं काय झालं कुणास ठाऊक पण नंतर कधीतरी शेतात मोकाट गुरं घुसली आणि घरात भाऊबंदकी. शेवटी गावातल्या दंडेलीला आणि हडेलहप्पीला शरण जाऊन वामनरावांच्या तीर्थरुपांनी हेर्ले कायमचेच सोडले आणि मग वामनराव आणि त्यांची ५ भावंडे सगळी मिरजेला येऊन राहिली. जमीनदारांचे दारोदार झाल्यावर जे भोगवटे मिळायचे ते एकास दहा होऊन मिळत गेले. वामनरावांचे आजोळ मिरजे जवळच्या ढवळीला होते. पोरं वेळ मिळाला कि ढवळीला चालत नाहीतर बैलगाडीनं जात. निवांत कृष्णेच्या शांत खोल डोहात उड्या मारत. मामाची गुरं माळावर आणि टेकाडावर वळायला नेत. करमणुकीचे आणि शिक्षणाचे बहुतेक सगळे अविष्कार निळ्या आकाशाच्या खाली मोकळ्या बेभान वाऱ्याच्या साथीत मिळत गेले.

कधी एखाद्या वेळेला रंगात आला कि मामा त्याच्या या देशोधडीला लागलेल्या भाचरांना, वगाला नाहीतर तमाशाला घेऊन जात असे. तिथल्या ढोलकीच्या चाटीशी, डफाच्या थापेशी आणि तुणतुण्याच्या तारांशी जी सलगी जमली, ती कायमचीच. सरस्वतीची हि सोंगं एकदा काढली कि एकतर पुढे जन्मभर पाठ सोडतही नाहीत आणि लक्ष्मीला तर सोप्यातून पुढं माजघरात देखील येऊ देत नाहीत.

पुढे मग दिनकर, वसंत, निळकंठ हि भावंडं जशी कर्ती झाली तशी एकेक आपल्या मार्गानं निघून गेली.
कुणाचा देवी डॉक्टर झाला. कुणाचा पोस्टमन झाला. कुणी पांडबाच्या भट्टीत गडी म्हणून कामाला लागला.
वामनरावांच्या डोक्यात मात्र वेगळंच वारं शिरलं होतं. नोकरी, पैसा, कुटुंब यांच्यात रमणारं ते खोडच नव्हतं.
साताप्पा, सगनभाऊ, अमर शेख, होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापूराव हि दैवतं झालेलीच होती. त्यांनी आता दिवसा आणि रात्री सुद्धा डोळ्यापुढं फेर धरला होता. उत्तम हस्ताक्षर, मोडी लिपीवर प्रभुत्व आणि कवनाची जाण या भांडवलावर गुरूचा शोध सुरु झाला. आणि तो लवकरच संपलाही. पलूसच्या शाहीर दीक्षितानी गंडा बांधला.
मिरजेचा मुक्काम पलूसला हलवला. घरून विरोध व्हायचं कारणच नव्हतं.

पलूस म्हणजे किर्लोस्कर वाडीच्या अगदी जवळ कृष्णेच्या काठापासून थोडंसं बाजूला वसलेलं जेमतेम २०० घरांचं एक गाव. निस्तब्ध आणि निशंक. कसली गडबड नाही. धावपळ नाही. गोंगाट नाही. कैकदा तर दुपारच्या वेळेला पिंपळाच्या सळसळीशिवाय दुसरा आवाज देखिल यायचा नाही. खाली पळसाच्या तलावात पाखरे पाण्यात चोच मारून मासे पकडत त्याचाही आवाज अगदी वर पर्यंत ऐकू येत असे.

पलूस, आमणापूर, औदुंबर, भुवनेश्वरवाडी, भिलवडी या गावांना जोडणारा रस्ता म्हणजे तर पाचूचा हारच शोभावा. दोन्ही बाजूनी हिरवी गार शेते आणि त्याच्या बाजूने उंच दांडगी अवाढव्य वाढलेली चिंचेची झाडे. त्याच्या एका बाजूने शेतांच्या पलीकडे खाली खोल, लफ्फेदार वळणे घेत हळू हळू वाहत जाणारी कृष्णामाई तर अगदी तृप्त होऊन निवांतपणाने माहेरपणाला येवून दुपारच्या वेळेला डोळा लागलेली लेकुरवाळीच वाटायची. भुवनेश्वर वाडीच्या आणि नदी पलीकडच्या औदुंबराच्या देवळातल्या घंटांचे नाद तिची झोपमोड होणार नाही अशा सावधपणाने हळुवार समाधीचे संगीत वाजवत राहत. आसमंतात एक असीम अशी तृप्तता होती. एकसलग अशी संगती होती.

अभ्यासाला सुरवात झाली. परब्रम्ह, नादब्रम्ह, विश्व, निर्मिती, संगीत, इतिहास, काव्य, रचना, प्रार्थना, पाठांतर, कथासूत्र, मांडणी असा सर्वव्यापी अभ्यास सुरु झाला. जुन्या ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन, बखरी, जुनी मोडीतली पत्रे, शिलालेख यांची छाननी चालू झाली. वग, गवळण, तुर्रे वाले, कलगी वाले, नागेश बाळी, ज्ञान बाळी, नाथ संप्रदायाची कवने यांचा अभ्यास चालू झाला. आवाजाच्या तयारी साठी, ओंकाराची साधना चालू झाली. आणि एक दिवशी कृष्णेच्या काठावर वामनरावांच्या मुखातून नमनाची पहिली प्रार्थना उमटली,

ओम नमो शारदापते, नमो गणपते, पार्वतीपुत्रा पार्वतीपुत्रा ।
वंदुनी चरण, आधी तुझे । धरितो कथासूत्रा । जी जी जी ।।

खणखणीत, गगनभेदी आवाज, तितकाच रुबाबदार चेहरा, सरळसोट लांब धारधार नाक, भेदक, करारी नजर, पाय जमिनीत पुढे मागे असे घट्ट रोवून उभे राहण्याचा मराठमोळा बाज, हातातला डफ, कमरेचा शेला, हातातली सलकडी आणि डोक्यावरचा फेटा.. शिवबाचा सवंगडीच जणू. त्याच्या तोंडून "करू वंदन शिवाच्या नंदना' असं नमन ऐकताना दीक्षित गुरुजींना शाहिरी परंपरेला कोहिनुर मिळाल्याचा भास झाला. आणि त्याच आनंदात त्यांनी वामनरावांना कडकडून मिठी मारली. माजघरातून दीक्षित गुरुजींची एकुलती एक कन्या, मालती, डोळे भरून हा प्रसंग पाहत होती. भरल्या डोळ्यात साठवत होती. मनातल्या मनात काहीतरी ठरवत होती.

आता वामनराव शाहीर दीक्षितांच्या फडातून तुणतुणे धरून उभे राहू लागले. अधून मधून एखाद दुसरी चाल घ्यायला मिळू लागली. एखादा प्रसंग सांगायला मिळू लागला. उभ्या रंगात आलेल्या फडात अचानक, "सुभेदार तान्हाजी गडावर चढून आलेला आहे” असं खणखणीत वाक्य दांडपट्ट्या सारखं फेकू लागले. आणि लोकांच्या डोळ्या समोर तो अंधारातला कोंढाणा, त्याची घोरपड आणि पाठीला तलवार बांधलेला, फेंदारलेल्या मिशांचा मर्द तानाजी उभा राहू लागला. त्याच्या हातातली तलवार अंधारात चमकू लागली आणि कधी एकदा त्या उदेभानाला जीवे मारतो याची उत्कंठा शिगेला पोचून मायबाप प्रेक्षक बसल्या जागी खिळून राहायला लागलं. उदेभानाची खांडोळी उडताच टोप्या, पटके हवेत फेकले जाऊ लागले. बेभान होऊन शिट्ट्या ऐकू यायला लागल्या. आणि पुढच्याच क्षणाला आपलं सुभेदार पडल्याची वार्ता येऊन तेच शिट्ट्या वाजवणारे प्रेक्षक चिडीचूप होऊन अगदी आत्ता काही क्षणापुर्वी सुभेदार पडल्यासारखं सुन्न होऊन जायला लागलं. क्वचित प्रसंगी हुंदकेही ऐकू यायला लागले. प्रसंग जिवंत होत गेले. शिवाजी, तानाजी, बाजी, मुरार प्रेक्षकांना परत परत भेटायला यायला लागले. आधी कित्येक वेळा तो पोवाडा ऐकला असला तरी या वेळेला कोंढाण्यावर काय होणार याची उत्कंठा लागलेली असायची. आज उदेभानानं कसला फेटा बांधलाय?, आज तानाजीचा शेला तांबडा आहे का पिवळा?, घोरपड नीट वर गेली का? याची उत्कंठा लागून राहिलेली असायची. प्रेक्षकांची हि अवस्था, तर असा प्रसंग जिवंत करणाऱ्या शाहिरांचे काय सांगावे! समोरचा श्रोतृवर्ग आपल्या बरोबर कधी कोंढाण्यावर, कधी पुरंदरावर तर कधी पन्हाळ गडावर येणार आहे या जाणिवेनेच वामनरावांच्या अंगावर रोमांच उठायचे. छाती फुलून जायची. आणि डफावर नव्या दमाची थाप उमटायची आणि या पहिल्या थापेनेच फडावरची सरस्वती प्रसन्न होऊन जायची. मग पुढं फड संपेपर्यंत सरस्वतीच व्यक्त होत राहायची वामनरावांच्या शाहिरीतून...

वामनरावांची कामगिरी आणि शाहिरी वरची अपरंपार निष्ठा पाहून शाहीर दीक्षित अतिशय समाधानी होते. त्यांनी त्यांचा फड वामनरावांच्या समर्थ हाती सोपवला. हे सारे होत असतानाच एक अतिशय निष्पाप आणि सकस अशी प्रेम कथा कृष्णेच्या काठावर जन्म घेत होती. शाहिराच्या पोटी जन्मलेल्या मालतीने आपला हात देखील एका शाहिराच्याच हाती देण्याचं नक्की केलं. औदुंबराच्या साक्षीनं कृष्णेच्या घाटावर आणा भाका घेतल्या गेल्या. वचने दिली गेली. गाठी पक्क्या झाल्या. शाहीर दीक्षितांच्या कानावर जेव्हा हि गोष्ट गेली तेव्हा त्यांनी मालतीला बोलावून घेतलं. शाहिराची पत्नी होणं हि सती परीक्षा आहे. याची कल्पना दिली. काळ बदलतोय. बदलत्या काळाच्या चक्रात शाहीर अजून पिळून निघू शकतो याचाही विचार करायला सांगितलं. तिचा विचार काही बदलला नाही. मग दीक्षितांनीही अधिक विचार न करता वामनरावांना विचारले. स्वत:चं राहत घर देखील देऊन मोकळे झाले. लग्न झालं. आणि वामनराव संसारात पडले.

पोवाड्याच्या सुपाऱ्या मिळत गेल्या. मिरजेचे पटवर्धन सरकार किल्ल्यावर वरचे वर बोलावू लागले. कोल्हापूरचे आणि साताऱ्याचे छत्रपती, औंधचे पंतप्रतिनिधी, फलटणचे नाईक.. कित्येक सुपाऱ्या फोडल्या. फड गाजवले. शाहीर वामनराव म्हणजे नामांकित झाले. यश, टाळ्या आणि सत्कार वामनरावांची सोबत करू लागले. आकाशवाणी सांगली, आकाशवाणी पुणे, इथे त्यांचे कार्यक्रम परत परत लागू लागले. सगळे चांगलेच होते. विजयाची धुंदी होतीच. पण त्याच्या जोडीला जसा लक्ष्मीचा वावर वाढायला हवा होता तसा काही तो वाढला नाही. मिरजेच्या पटवर्धनांच्या किल्ल्यात पोवाडा झाल्यावर वास्तविक राजे साहेब ११ रुपये, शेला आणि पागोटं बिदागी म्हणून देत. त्यातला १ रुपया, शेला आणि पागोटं ठेवून बाकीचे १० रुपये वामनराव किल्ल्यातल्याच नरसिंहाच्या देवापुढे नेऊन ठेवत. गावात कुणाचं पोर चांगलं तबला वाजवतंय असं कळलं तर वामनराव त्याला तबला वाजवून दाखवायला सांगत आणि नंतर ख़ुशी म्हणून त्याला कोटाच्या खिशातून बिदागीचा राहीलेला रुपया देखिल काढून देत. इथं सरस्वतीने लक्ष्मीला माजघरातच काय पण वामनरावांच्या सोप्यात देखील फिरकू दिलं नाही. .

वामनरावांचे पोवाडे आणि त्यांचे मालती वरचे प्रेम पाहून त्यांची मित्र मंडळी मालतीला “जीजी" म्हणू लागली.
या दरम्यान वामनरावांच्या घरात चार वेळा पाळणा हलला. हळू हळू घरात शेल्या पागोट्याना ठेवायला जागा पुरेना आणि मालतीला घर चालवायला लक्ष्मी!! दीक्षितांची भविष्यवाणी काही खोटी ठरायची नव्हती. भारत सरकारने या राजांचे तनखे बंद केले आणि मग तर या सुपाऱ्या यायच्या पण बंद झाल्या. शाहिराचा संसार म्हणजे विस्तवाशी खेळ. आता दोन वेळेच्या जेवण्याची भ्रांत पडू लागली. पोरांच्या अंगावर गरिबी दिसायला लागली. एकेक करत अंगावरचे सगळे डाग सोनाराकडे निघून गेले. जरी काठाची लुगडी नेसलेली जीजी आता विरलेल्या जागी गाठी मारायला लागली. शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून जवळच्या शाळेत हेड मास्तरांना भेटून आली. जीजी चांगली मॅट्रिक शिकलेली होती. हेडमास्तरांनी तिला शाळेत बालवाडीच्या वर्गाला शिकवायला सांगितलं. मुलांचे हाग-मूत काढायचे काम तिला मिळाले. पण तिने अनमान केला नाही. घरची चार, तशी दारची चार असा विचार करून ती मिळेल तो पैशाला पैसा जोडत राहिली. तोंडाला घास भरवत राहिली. कधी एखाद्या दिवशी खूपच वाईट वाटलं तर ती दीक्षितांनी वामनरावांना मारलेली मिठी आठवायची. तिला हसू हि यायचं आणि रडू हि...

पुढं काळ बिघडतच गेला. नाही म्हणायला अधून मधून सरकारातून बोलावणं यायचं कि एखादा दारूबंदी नाहीतर हुंडाबळी वर वग लिहा म्हणून. पण सिनेमा, नाटके, रेडिओ, दूरदर्शन अशा नव्या दमाच्या माध्यमांपुढे शाहिरी मागे पडायला लागली. लोकांसमोर तिकिटे लावून शाहिरी करून पैसा मिळवणे याच्यात व्यवसायाशी प्रतारणा वाटायला लागली. मग वामनराव फुकटच पोवाडे करायचे. त्यांची मित्र संपदा देखील अफाट होती. शंतनुराव किर्लोस्कर, यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कोडोलीकर, जगाकाका कोल्हटकर, मारुती माने, नागनाथ अण्णा नायकवडी अशी मोठी मोठी मंडळी त्यांच्या उठबशीत होती. हि मंडळी केव्हाही भेटली तर त्या रात्रीचा कार्यक्रम म्हणजे शाहिरांचे पोवाडे. आणि मग रात्र भर शाहीर कुठल्या कुठल्या गडांची, कुठल्या कुठल्या युद्धांची, कधी क्रांतिकारकांची भेट घडवून आणायचे. सगळा आनंदाचा मामला असे. शाहिराला गाणाऱ्या गळ्याखाली एक पोट देखील असतं याचं कुणालाच स्मरण राहायचं नाही. मित्रांना आणि वामनरावांनाच काय पण जीजीला सुद्धा!! या मेळ्यात एखाद्या राजपुत्रासारख्या दिमाखात उभ्या असलेल्या आपल्या राजबिंड्या प्रियकराला पाहून प्रेक्षकात बसलेली जीजी आनंदानं मोहरून जायची. वामनरावांची एकेक थाप, एकेक चाल आणि एकेक मुद्रा बघून ती कृतकृत्य होऊन जायची..त्या वेळी तिचा आनंद पाहून तिच्या बरोबर आलेली गरिबी अंग चोरत तिच्याच पावलाखाली सावलीसारखी दबून, घाबरून बसलेली असायची.

काळ हा स्वतंत्र आहे. त्याचं कुणाशी काहीही घेणे देणे नाही. एकेक करत मुले मोठी झाली. आपआपल्या मार्गाने निघून गेली. आणि आता आज तिचा राजकुमार पण तिला सोडून गेला. जीजीला मात्र आत्ताही तीच दीक्षितांनी मारलेली मिठीच डोळ्या पुढे दिसत होती.

पुढे जीजी निवृत्त झाली. आता ती फारच एकटी झाली. मुले करायचे तेवढे करतच होती. दोन चार नातवंडेही अधून मधुन येत जात असायची. गावात एखादं कुणीही काहीही चांगलं गाता वाजवताना दिसलं तर त्याला जीजी देखील शाहिरांसारखाच रुपया काढून द्यायची आणि “शाहिरांनी दिलाच असता कि!!”, म्हणून हसायची.. जीजीचा जीव शाहिरात होता. एकटीच शाहिरांच्या डफांवरून हात फिरवत बसायची. त्यांचे शेले-पागोटी फडताळातून काढून पुढ्यात मांडून त्यांच्याशी घटका घटका बोलत बसायची. हसायची. रडायची सुद्धा!!

जीजी गेली तेव्हा जेमतेम चार माणसे कशी बशी जमली होती. त्यातला एक जण म्हणाला देखील कि, “आटपा लवकर.. उशीर होतोय” म्हणून..

कृष्णा काठचा औदुंबर मात्र त्या दिवशी हळवा झालेला दिसत होता...

~लेखनसीमा

No comments:

Post a Comment